- गेल्या दोन निवडणुकांपासून कॉंग्रेसमध्ये प्रियांका लाओ देश बचाओ असा छुपा प्रचार होताना दिसतो आहे. इथे देश बचाओचा प्रश्न नाही, त्याचा अर्थ आहे कॉंग्रेस बचाओ. १९९६ साली नरसिहराव सरकारनंतर गाळात गेलेल्या कॉंग्रेसला बाहेर काढण्यासाठी खुद्द शरद पवारांनीच सोनिया लाओ देश बचाओ अशी हाळी दिली होती. या देश बचाओचा अर्थ कॉंग्रेस बचाओ असा असतो. त्यामुळे आता येत्या काही दिवसात प्रियांका हे कार्ड बाहेर काढण्याची कॉंग्रेसची तयारी दिसते. कारण पप्पू उर्फ राहुल गांधींनी कॉंग्रेसचा पुरता पोपट केल्यावर आता कॉंग्रेसला वाचवणे किंवा बुडताना पाहणे हेच कॉंगींपुढे आव्हान आहे. त्यामुळे सोनिया गांधींच्या थकलेल्या अवस्थेत मरगळलेल्या कॉंग्रेसला संजीवनी देण्यासाठी आता प्रियांका गांधींना आणण्याची कॉंग्रेस स्वप्न पहात आहे. फक्त ते कशाप्रकारे सादर करायचे याचे इमले रचले जात आहेत.
- कॉंग्रेसच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रियांका गांधी-वाड्रा यांची डिमांड सारखी वाढत असली तरी त्यांना पुढे आणायचे की नाही, या द्विधा मनस्थितीत सध्या कॉंग्रेस हायकमांड आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या प्रचाराची धुरा सांभाळणारे प्रशांत किशोर यांनी उत्तरप्रदेशच्या निवडणुकीत प्रियांका गांधी यांना चेहरा बनविण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे प्रियांका गांधींचे राजकारण उत्तर प्रदेशातून सुरू करून तिथल्या अडाणी भोळ्या जनतेमधून सहानुभूतीची लाट निर्माण करण्याचा खास कॉंग्रेसी गेम आहे.
- आगामी काळातील उत्तरप्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत प्रियांका गांधी यांना कॉंग्रेसचा चेहरा बनवायचा की नाही, या मुद्यावर कॉंग्रेसमध्ये सध्या गंभीर मंथन सुरू आहे. याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसला तरी प्रियांका गांधी सक्रीय झाल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांनी यूपीतील अनेक नेत्यांच्या भेटी घेण्यास सुरुवातही केली आहे. प्रियांका गांधी आतापर्यंत कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या रायबरेली आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अमेठी मतदारसंघात पक्षाचा प्रचार करीत होत्या. अधून-मधून मतदारसंघांचा दौरा सुध्दा करायच्या. मात्र आता त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची मागणी सतत वाढत आहे. कारण पावणेदोन वर्ष उलटून गेली आता सत्तेपासून दूर झाल्याला. कॉंग्रेसला सत्तेपासून दूर राहणे कधीच शक्य नसते.
- कॉंग्रेसचे कार्यकर्ते हे गांधी घराण्याबाबत फार हळवे असतात. कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना प्रियांका गांधी या त्यांच्या आजी म्हणजे माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्याप्रमाणे भासत आहेत. कॉंग्रेसला देशात विशेषतः उत्तरप्रदेशात पुन्हा जीवंत करायचे असेल तर प्रियांका गांधी यांच्यासारख्या तेजतर्रार नेत्यांना समोर आणण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे इंदिरा गांधींसारख्या सेम टू सेम त्या वाटतील यासाठी जोरदार प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे. मोदींच्या एकाधिकारशाहीला इंदिरा गांधींच्या कार्यप्रणालीची नेहमीच उपमा दिली जाते. त्यामुळे त्यांना रोखण्यासाठीही याच एक्क्याचा वापर करण्याचे कॉंग्रेस गोटात शिजते आहे.
- उत्तर प्रदेशातील निवडणूक पुढील वर्षी असली तरी सर्वच पक्षांनी त्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणातून आणि सत्तेतून सतत बाहेर फेकल्या जात असलेल्या कॉंग्रेसला मुसुंडी मारण्यासाठी ही नवी संधी आहे असे कॉंगींना वाटते. कॉंग्रेसने प्रचाराची रणनिती प्रशांत किशोर यांच्यावर सोपविली आहे. प्रशांत किशोर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभेत आणि नितीशकुमार यांना बिहार विधानसभेच्या निवडणुकीत यश मिळवून दिले होते. आता अशा चमत्काराची आशा कॉंग्रेसला आहे. त्यांनीच प्रियांका गांधी यांना जनतेसमोर आणण्याचे आवाहन केले आहे.
- कॉंग्रेस तब्बल २७ वर्षांपासून उत्तर प्रदेशातून सत्तेपासून दूर आहे. मुख्यमंत्री नारायणदत्त तिवारी यांना सत्ताच्यूत करून मुलायमसिंग यादव हे डिसेंबर १९८९ मध्ये मुख्यमंत्री झाले होते. कॉंग्रेस तेव्हापासून दूर फेकली गेली आहे. पंतप्रधानपदाचा मार्ग यूपीतून तयार होतोे. कारण यूपीत लोकसभेच्या ८० जागा आहेत. एवढया महत्त्वाच्या राज्यात कॉंग्रेस २७ वर्षांपासून अपयशी होत आहे. म्हणजे कॉंग्रेसचा जनाधार संपला असे अजिबात नाही. २००९ च्या निवडणुकीत कॉंग्रेसचे २१ खासदार निवडून आले होते. उत्तरप्रदेशवासीयांनी प्रत्येक पक्षाला समान संधी दिली आहे. मागच्या अर्थात २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला अमेठी आणि रायबरेली या दोन जागांवर विजय मिळाला. अर्थात, उत्तरप्रदेशात स्वतःची जागा तयार करावयाची असेल तर कॉंग्रेसला भरपूर मेहनत करावी लागेल. लोकप्रिय उमेदवार आणि कुशल नेतृत्व याची गरज पडेल. कॉंग्रेसला उत्तरप्रदेशात पुनर्जिवीत करण्याची क्षमता फक्त प्रियांका यांच्यातच आहे असे अनेकांना वाटते. महत्वाचा मुद्या म्हणजे, प्रियांका गांधी यांना यूपीचा चेहरा बनविला तरी राहुल गांधी यांच्या राष्ट्रीय व्यक्तिमत्वाला कुठलाही धक्का बसणार नाही. यूपीच्या निवडणुकीत संवाद कौशल्य फार महत्वाचे आहे. ते कॉंग्रेसच्यावतीने प्रियांका उत्तमप्रकारे करतील असा होरा कॉंग्रेसचा आहे. अनेक वर्षांपासून निर्माण झालेली पोकळी प्रियांका गांधी भरून काढू शकतात. कार्यकत्यांमध्ये उत्साहाचा संचार करू शकतात आणि कॉंग्रेसचा गेम चेंज करू शकतात. विशेष म्हणजे यूपीत कॉंग्रेसजवळ गमावण्यासारखे काही नाही. अशात राज्य पातळीवर प्रियांका गांधी यांना पुढे करून कॉंगेसला प्रयोग करता येवू शकतो. शिवाय राहुल गांधी यांच्या प्रतिमेवर त्यामुळे कुठलाही प्रभाव पडणार नाही. त्यामुळे प्रियांका गांधी यांना समोर आणण्याचा निर्णय संजीवनी देणारा होवू शकतो.
बुधवार, ६ एप्रिल, २०१६
कॉंग्रेसच्या संजीवनीसाठी प्रियांका
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा