महाराष्ट्रातील शहरांचे शिल्पकार असे ब्रीदवाक्य असलेल्या सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकपदी भूषण गगराणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एका कल्पक आणि क्रियाशील व्यक्तिमत्वाला ही मिळालेली संधी सिडकोचा मुखडा बदलून टाकणारी असेल. सिडकोचे विद्यमान व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांची मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने हे पद रिक्त झाले होते.
यापूर्वी सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी, माहिती संचालनालयाचे महासंचालक, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशा विविध पदांवर गगराणी यांनी उत्कृष्ट कामे केली आहेत. आपल्या कारकीर्दीत कितीही वाद निर्माण झाले तरी शांत चित्ताने त्यांनी आपली भूमिका बजावलेली आहे.
गांव करील ते रांव करील काय अशी आपल्याकडील म्हण आहे. पण सनदी अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, प्रशासन करेल ते सरकार करेल काय? अशी म्हण आता लागू पडते. त्याप्रमाणे बदल घडवण्यात प्रशासनाचा हातभार लागण्यासाठी भूषण गगराणींसारखे अधिकारी महत्वाचे ठरतात. सनदी अधिकार्याने मनात आणले तर तो वाळवंटातही नंदनवन फुलवू शकतो. पण अंगात नवे काही करण्याची धमक नसेल तर व्यवस्थेला दोष देण्यास अनेक अधिकारी तयार असतात. अशा अधिकार्याचे अनेकदा सत्ताधार्यांशी मेतकूटही जुळलेले असते. अशा मेतकुटातून अनेक भ्रष्टाचार घडत असतात. आदर्श घोटाळ्यांसारखे अनेक घोटाळ्यात राजकीय नेते आणि अधिकार्यांचे जमलेले मेतकूट जगाने पाहिले आहे. पण या मेतकुटाचे बक्षीस त्या त्या अधिकार्याला निवृत्तीनंतर सरकारच्या विविध समित्यांवर पदे मिळाल्यानंतर मिळते. भ्रष्टाचार पचवला तर नवी इनिंग सुरु होते. नाहीतर आतही जावे लागते. त्यामुळे सक्षम, प्रामाणिक आणि स्पष्टवक्ते अधिकारी असणे गरजेचे असते.
अशा चांगल्या अधिकार्यांपैकी एक म्हणजे गगराणी. भूषण गगराणी हे तसे मितभाषी पण कामाचा उरक चांगला आहे. त्यामुळे असे अधिकारी शांतपणे काम करीत असतात. ते त्यांच्या कामांचा गाजावाजा करीत नाहीत. त्यामुळेच आज स्मार्ट शहरांचा जमाना असताना सिडकोवर त्यांची नेमणूक होणे फार महत्वाचे आहे.
शहरांचा नियोजित विकास करण्यासाठी सिडको प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे. या सिडकोनेच मुंबईपासून जवळच असलेले नवी मुंबई हे शहर वसवले आहे. नियोजनबद्ध पद्धतीने शाश्वत विकासाचे काम सिडको प्रशासन करीत असते. त्यामुळेच सिडकोचा अधिकारी होणे, हे सनदी अधिका-यांचे स्वप्न असते. आता तर गगराणी यांची सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आल्याने अधिक स्वतंत्रपणे काम करण्याची नवी संधी त्यांच्याकडे चालून आली आहे. ते या संधीचा योग्य पद्धतीने उपयोग करतील यात बिलकूल शंका नाही. मुंबईतील जमिनी भूखंड आता संपले आहेत. त्यामुळे नवे प्रकल्प उभारता येणे अशक्य आहे. अशा परिस्थितीत नवी मुंबई हे त्यासाठी योग्य ठिकाण आहे. वास्तविक पाहता मुंबईवरचा बोजा कमी करण्यासाठी आणि सर्वांना सोयीचे पडावे यासाठी १९७० च्या दशकात नवी मुंबईचा प्रस्ताव आला होता. पण ज्या झपाट्याने दिल्लीचे नवी दिल्ली झाले त्याप्रमाणात नवी मुंबईचा विकास झाला नाही. वसाहती, सेक्टर वाढले. पण शासकीय कार्यालयांचे स्थलांतर झाले नाही. मुंबईकडे जाणारे लोंढे थोपवता आले नाहीत. हे काम भूषण गगराणींच्या कारकीर्दीत होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
नवी मुंबईला लागूनच रायगड जिल्हा आहे. याचा बेखुबीने वापर करण्यासाठी सरकारने नवी मुंबईत विमानतळ उभारण्याचे ठरवले होते. याशिवाय या परिसरात ‘नयना’ या नावाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प येऊ घातला आहे. ही जबाबदारी सांभाळण्यासाठी गगराणी यांच्यासारखा दुसरा सक्षम अधिकारी दृष्टिक्षेपात येत नाही. त्यामुळे सिडकोमध्ये त्यांची झालेली नेमणूक योग्यच आहे. ही सर्वांची अपेक्षा भूषण गगराणींच्या काळात पूर्णत्वास येईल अशी अपेक्षा करायला काहीच हरकत नाही.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबर २०१९पर्यंत नवी मुंबईचे विमानतळ कार्यान्वित होईल, अशी घोषणा केली आहे. त्याच्या पूर्ततेसाठी सिडकोची टीम झोकून देऊन काम करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. शिवाय, ‘नयना’ या नव्या शहराच्या निर्मितीसाठी गती देण्याचे काम आता गगराणींना करावे लागणार आहे. ज्या कामांसाठी गगराणी यांच्यासारख्या अधिकार्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे, ते काम ते निष्ठेने पूर्ण करतील याबाबत शंका बाळगण्याचे कारण नाही. ‘मेक इन इंडिया’ या केंद्राच्या योजनेचे ब्रँडिंग करण्यासाठी मुंबईत काही दिवसांपूर्वी मोठे प्रदर्शन झाले, त्याच्या नियोजनात गगराणींचा फार मोठा वाटा आहे. जागतिक पातळीवर या प्रदर्शनाचे नाव व्हावे यासाठी त्यांनी त्यांच्यातील कल्पकता, योजकता दाखवली. त्यामुळे सिडकोसारखे प्राधिकरण मिळाल्यावर खर्या अर्थाने ते भूषणावह कामगिरी करतील यात शंका नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा