- प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा प्रत्येकाचा काहीसा काळ असतो. कोणी सुपात असतात तर कोणी जात्यात असतात. पण जे झोतात आहेत त्यांच्या प्रसिद्धीचा वारेमाप फायदा उठवण्याची प्रथा ही प्रसारमाध्यमांमध्य रूजली आहे. म्हणजे प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या अभिनेता, खेळाडू यांच्या जसा वापर कंपन्या करून घेतात तसा वापर नेत्यांचा केला जातो आणि कालांतराने त्यांना हीच माध्यमे दूर करतात. १९८० च्या दशकात बूस्ट इज द सिक्रेट ऑफ माय एनर्जी असे कपिलदेव म्हणत होता, नंतर सचिन तेंडुलकर म्हणू लागला. नंतर तीज जाहीरात महेंद्रसिंग धोनी करू लागला आणि आता विराट कोहली करतो आहे. प्रत्येकाचा जमाना जसा आहे त्याचा लाभ उठवण्याचा प्रयत्न कंपन्या करतात तसेच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील वजनाचा फायदा माध्यमे उठवत असतात.
- पाच वर्षांपूर्वी म्हणजे २०११ च्या सुमारास देशात लोकपाल नावाची एक मोठी चळवळ झाली. त्याचा चेहरा म्हणून अण्णा हजारे देशव्यापी व्यक्तीमत्व होऊन गेले होते. देशातल्या कुठल्याही विषयावर तेव्हा कुठल्याही चॅनेलचे पत्रकार कॅमेरा घेऊन अण्णांची प्रतिक्रीया विचारायला धावत असायचे. आजकाल अण्णांच्या कुठल्याही मताची कुठल्याच वाहिनी वा वृत्तपत्राला किंमत वाटेनाशी झाली आहे. आज नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी नेता कन्हैयाकुमारचा जमाना आहे. त्यामुळे संबंध नसलेल्या विषयातही त्याची प्रतिक्रीया घेतली जाते. २०१३ मध्ये तसा केजरीवालचा जमाना होता. त्यावेळी प्रत्येक गोष्टीत केजरीवाल नाक खुपसायचे. अगदी आठनऊ महिन्यांपुर्वी गुजरातच्या हार्दिक पटेलचा जमाना होता. त्याच्यामागे सगळे कॅमेरे धावत होते. त्यामुळे कन्हैयाच्या मागे धावणारे आणखी कोणी तरी नवा तयार होईपर्यंतच धावतील. इथे कोणी कायमचा नसतो.
- याला खर्या अर्थाने मार्केटींग म्हणतात. तोच तोच माल खपवायला तात्कालीन नवे व लोकप्रिय मॉडेल शोधले जाते. त्याच्या करवी आपल्या मालाची जाहिरात केली जाते. पण एकदा त्या मॉडेलची बाजारातली लोकप्रियता संपली, मग त्याच्याकडे कोणी ढुंकून बघत नाही. आज कन्हैयाचा मोसम आहे. ज्या पद्धतीत त्याचे मार्केटींग चालू आहे, त्यानुसारच प्रतिसाद मिळणार ना? पुण्यात फ़र्ग्युसन कॉलेजमध्ये नेहरू विद्यापीठातील घटनेच्या निमीत्ताने काही घडल्याचे छापून आले आणि तात्काळ त्यात राजकीय नेत्यांनी ढवळाढवळ सुरू केली. राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड तिकडे धावून गेले. त्याचा कल्लोळ झालेला बघून थोर समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांनीही कन्हैयाला पुण्यात बोलावण्याचे घोषित करून टाकले. त्याला धाकटा भाऊ बनवून टाकले. ज्या कुमार सप्तर्षींना आदर्श मानले जात होते ते कन्हैयाच्या प्रसिद्धीचा लाभ स्वत:साठी घेवू लागले.
- रोजच्या रोज कन्हैया आता जगातल्या कुठल्याही घटना गोष्टींवर आपले मतप्रदर्शन करीत असतो. तमाम माध्यमे व वाहिन्या त्याचे मत जनतेकडे घेऊन जायला उत्सुक व सज्ज असतात. वास्तविक कन्हैया काही नवे बोलत नाही. काही बाबतीत तर मुर्खासारखे बोलतो. पण तरीही थोर विचारवंत किंवा बुद्धीजिवी असल्याप्रमाणे त्याच्या बोलण्याला वागण्याला प्रसिद्धी मिळते आहे. तीन वर्षांपूर्वी केजरीवाल काय बोलायचे आठवते? मोदी को हराना है! बस्स तीन महिने सलग केजरीवाल जाईल, तिथे कॅमेरे फ़िरत होते. पत्रकार धावत होते. मग गुजरातच्या हार्दिक पटेलचा मोसम आला. नित्यनेमाने हार्दिकचे बारीकसारीक मत आपल्यापर्यंत इमानेइतबारे पोहोचविले जाऊ लागले.
- त्यानंतर अडगळीत पडलेल्या विविध साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांचा जमाना सुरू झाला. एकामागून एक पुरस्कार वापसीच्या बातम्यांची चलती झाली. ज्यांना कुत्रंही विचारत नव्हतं त्यांना पुरस्कारवापसी प्रकारामुळे प्रसिद्धी मिळू लागली. त्यामुळे असे पुरस्कार्थी हयात आहेत हे तरी भारताला समजले. आता हळुहळू त्याची मजा संपली.
- मग देशद्रोहाचा आरोप झालेल्या व आठवडाभर तुरूंगात गेलेल्या कन्हैयाला हिरो म्हणून पेश केले. त्याला जामिन मिळताच नाट्यमय रितीने पेश केले. त्याच्या तोंडून आपला जुनाच माल खपवण्याचा व्यापार पुन्हा तेजीत आणायची धावपळ सुरू झाली. आता नेहरू विद्यापीठात कन्हैयाने नवा सिद्धांत मांडला आहे. लोकसभा निकालानंतर अडगळीत जाऊन पडलेला गुजरात दंगलीचा माल कन्हैयाने बाहेर आणला आहे. दिल्लीच्या इंदिरा हत्येनंतर उसळलेल्या दंगली आणि गुजरातच्या दंगलीत मोठा फ़रक असल्याचे कन्हैयाने सांगितले आहे. या दोन्हीशी तुझा काही संबंध आहे का? तुझा जन्म तरी तेव्हा झाला होता का? पण आपण त्या दोन्हीचे साक्षीदार असल्यासारखी मते कन्हैय्या व्यक्त करतो आहे. म्हणजे मोदींना रोखण्यासाठी, त्यांच्या बदनामीसाठी तीस्ता, केजरीवाल, विविध स्वयंसेवी संस्था किंवा सोनिया-राहुल, लालू यांनी कन्हैयापेक्षा काय वेगळे सांगितलेले आहे? पण कन्हैया त्याच शिळ्या कढीला ऊत आणतो आणि सुमार भुरटे सेक्युलर पत्रकार त्याच कढीवर ताव मारीत आहेत. ज्याला कोणालाही देशव्यापी राष्ट्रीय वाहिन्यांवर प्रसिद्धी हवी असेल, त्याने कन्हैयाला आपल्या व्यासपीठावर आमंत्रित करावे. राष्ट्रीय वाहिन्या कन्हैयाचा कार्यक्रम म्हणून त्याला भरपूर प्रसिद्धी देतील. पर्यायाने कुमार सप्तर्षी सारख्या पडीक लोकांना कधी नव्हे इतकी देशव्यापी प्रसिद्धी मिळून जाईल. नवा चेहरा पुढे येईपर्यंत या पडिक लोकांना आणि धंदेबाज वाहिन्यांना सध्या कन्हैया हवा आहे. दुसरा चेहरा सापडला की आमटीत पडलेल्या झुरळासारखे त्याला झटकले जाईल.
सोमवार, ४ एप्रिल, २०१६
मग त्याला झुरळासारखे झटकले जाईल
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा