फिल्म इंडस्ट्रीमध्ये पडद्यावर झळकणारे स्टार, सुपरस्टार, नायक, खलनायक, चरित्र अभिनेते हे नेहमीच गाजतात, चर्चेत राहतात, लक्षात राहतात, परंतु त्या चित्रपटात एक-दोन मिनिटांतही महत्त्वपूर्ण भूमिका करत असतात आणि त्या चित्रपटाचा महत्त्वाचा भाग असतात ते स्टंटमन, एक्स्ट्रॉ किंवा ज्युनिअर आर्टिस्ट. या इंडस्ट्रीत स्ट्रगल करायला येणारे अनेक असतात. सगळेच हीरो बनू शकत नाहीत. हीरो बनायचे स्वप्न पाहणारे नैराश्याने निघून जातात. काही जण मनमोहन देसार्इंच्या नसिब चित्रपटातील अमिताभ बच्चनप्रमाणे जगतात. या गाण्यातच या साºयाचे सार आहे. ‘अंग्रेजी हो, या देसी... फिल्मे सभी मैंने देखी/ हर पिक्चर देख के सोचा, मैं भी अॅक्टर बन जाऊ/ किस्मतने घुमाया... होटल में पहुंचाया / जॉन जॉनी जनार्दन... तररम पमपमपम’ असे अनेक जण साइड अॅक्टर, स्टंटमन, ज्युनिअर आर्टिस्ट असे छोटे-मोठे रोल करत असतात, पण त्यांचे या क्षेत्रातले प्रेम कधीच कमी होत नाही. मेरा भी टाइम आयेगा असे स्वप्न पाहात ते संघर्ष करतात आणि या इंडस्ट्रीचा एक भाग बनून जातात. असाच एक सच्चा कलाकार म्हणजे जनार्दन पाटील. यांचे मूळ नाव आहे जनार्दन मस्कर, पण त्यांची ओळख जनार्दन पाटील म्हणूनच या इंडस्ट्रीला आहे. नसिबमधील अमिताभचा जनार्दन फिल्ममधून हॉटेलमध्ये वेटर म्हणून पोहोचतो, पण आमचा जनार्दन मात्र संघर्ष करून इथे टिकून राहतो, हेच या जनार्दन पाटील यांचे वैशिष्ट्य आहे.गेली चाळीस वर्षे हिंदी, मराठी फिल्म इंडस्ट्रीत मिळेल ते काम करण्याच्या इराद्याने काम करणारा प्रामाणिक कलाकार. राज कपूर, देव आनंद यांच्यापासून सुभाष घर्इंपर्यंत आणि अमिताभ बच्चन, जॅकी श्रॉफ, गोविंदा यांच्यापर्यंत सर्वांशी हसतमुखाने काम करणारा हा कलाकार. मदन पुरी, अमरिश पुरी अशा खलनायकांबरोबर काम करणारा असो वा मराठीतील अशोक सराफ, मोहन जोशी, रमेश भाटकर, लक्ष्मीकांत बेर्डे, विजय चव्हाण यांच्याबरोबरही त्यांनी कामे केली आहेत. त्यांच्याबरोबर जनार्दन पाटील यांचे मित्रत्वाचे संबंध आहेत.मिळणारे काम छोटे की मोठे याचा विचार न करता सेटवर जाऊन ऐनवेळीही मेकअपला बसायचे आणि त्या छोट्याशा भूमिकेतही समरसून काम करायचे. या मोठ्या कलाकारांकडून कौतुकाची थाप मिळवायची हीच नशा या कलाकाराला आहे. इतकी वर्षे या इंडस्ट्रीत राहूनही निर्व्यसनी राहिलेला कलाकार म्हणून आज त्यांची ख्याती आहे. मुंबई ही मायानगरी, स्वप्ननगरी, चित्रपटनगरी. ही मुंबई मूळची आगरी कोळी बांधवांची. अशाच आगरी समाजात जन्माला आलेला हा कलाकार. आगरी समाजाने फिल्म इंडस्ट्रीला अनेक कलाकार दिले आहेत, पण यामध्ये जनार्दन पाटील या कलाकाराचे स्थान वेगळे आहे.१९८० च्या दशकात दूरदर्शनवर प्रिया तेंडुलकरची रजनी ही मालिका गाजली होती. या रजनी मालिकेतील अनेक भागांत महत्त्वपूर्ण भूमिका जनार्दन पाटील यांनी केली होती. दूरदर्शनची आणखी एक गाजलेली मालिका म्हणजे उडान. कविता चौधरी म्हणजे सर्फची ललिता, हिच्याबरोबर अनेक भागांत जनार्दन पाटील होते. याशिवाय कहाँ गये वो लोग, परमवीरचक्र या मालिकांमध्येही जनार्दन पाटील यांनी चमक दाखवली होती. ही मॅन धर्मेंद्रबरोबर शहजादा या चित्रपटातही जनार्दन पाटील यांनी चांगलीच चमक दाखवली होती. नाट्यसंपदाची निर्मिती असलेल्या एन्काऊंटर या नाटकात प्रभाकर पणशीकरांबरोबरही त्यांनी रंगभूमीवर काम केलेले आहे. छोट्या-मोठ्या भूमिकांमध्ये कधी हवालदार, पोलीस, तर अनेक चित्रपटांमधून अमरिश पुरीच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम त्यांनी केले आहे. अमरिश पुरी म्हटले की, तो खलनायक असणार. मग त्याची गाडी वेगाने पळवणारा स्टंटही जनार्दन पाटील यांनी केलेला आहे. दे मार फायटिंग करणे आणि स्टंट करून आपले लक्ष वेधून घेणे यातच त्यांनी धन्यता मानली. हीरोकडून मार खाण्याची भूमिकाही प्रामाणिकपणे करून त्या हीरोलाही लाजवण्याचे काम हे जनार्दन पाटील यांचे आहे. खर्जातल्या आवाजात भूमिका करणाºया रजा मुराद यांच्याबरोबर अनेक चित्रपटांत जनार्दन पाटील झळकले आहेत. भारत-पाकिस्तान बॉर्डरवर घडणारा चित्रपट म्हणजे आरके प्रॉडक्शनचा हीना. या चित्रपटात हीनाला नेण्यासाठी आलेला पाकिस्तानातील पोलीसही साकारण्याचे काम जनार्दन पाटील यांनी केले आहे. शशी कपूरची निर्मिती असलेल्या अजूबा या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांच्याबरोबर जनार्दन पाटील यांनी काम केले होते. हा चित्रपट हिंदी आणि रशियन अशा दोन भाषांमधून काढला होता.इतकी वर्षे चित्रपटसृष्टीत काम केल्यावर चित्रपटनिर्मितीचा मोह हा होणारच, पण हा चित्रपट आपल्या मराठी भाषेत असावा असा विचारही जनार्दन पाटील यांनी केला. त्याप्रमाणे मुंबईचा किनारा हा मुंबईतील मातीशी इमान राखणारा चित्रपट निर्माण केला. आता लवकरच त्यांची निर्मिती असलेला भन्नाट भिंगरी हा चित्रपट येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय कोलते करत आहेत. अरुण नलावडे, निशा परुळेकर अशा दिग्गज कलाकारांसमवेत या चित्रपटातून जनार्दन पाटील यांचा मुलगा प्रफुल्ल पदार्पण करत आहे.अशोक सराफ यांच्याबरोबर आबा झिंदाबाद या चित्रपटात काम करताना मजा आली होती. त्यामुळेच अशोक सराफ यांच्या आग्रहाखातर त्यांना आणखी एक चित्रपट मिळाला होता. तो म्हणजे हृदयात समथिंग समथिंग यातील भूमिका. रमेश भाटकर यांच्याबरोबर आई राजा उदो उदो या चित्रपटात विशेष भूमिका होती. दुनिया गेली तेल लावत या चित्रपटातील त्यांचा पोलीस इन्स्पेक्टर चांगलाच गाजला होता.आगरी समाजातील शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला हा मुलगा प्रचंड कष्टाने या इंडस्ट्रीत झगडत टिकून राहिला. कायम हसतमुख स्वभावाने सर्वांशी मैत्री करण्याचा स्वभाव असल्याने या इंडस्ट्रीत टिकून राहिला. आज यशस्वी निर्माता म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत स्थिरावत आहे. कुठल्याही गोष्टीचे वाईट मानून न घेता मिळालेली भूमिका पदरात पाडणारा हा कलाकार सच्चा कलाकार आहे. छोट्या मोठ्या भूमिका करून यशस्वी बनलेला कलाकार हीच त्यांची खरी ओळख आहे.
रविवार, १ मार्च, २०२०
स्टंटमन, एक्स्ट्रॉ, ज्युनिअर आर्टिस्ट ‘जनार्दन’
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा