गुरुवार, १९ मार्च, २०२०

कोरोनाचा बंद; बेमुदत?



गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोनाने हैदोस घातला आहे. त्यापेक्षा जास्त हैदोस माध्यमांनी आणि अफवांनी घातला आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट बंद केली जात आहे, म्हणजे आमच्या राजकीय पक्षांना जे जमत नाही, ते या कोरोनाने करून दाखवले. आजकाल कोणताही राजकीय पक्ष किंवा संघटनेने बंदची हाक दिली, तर बंद यशस्वी होत नाही. बंदला संमिश्र प्रतिसाद अशीच बातमी येते, पण या कोरोनाच्या भीतीने पुकारलेला बंद मात्र शंभर टक्के यशस्वी होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने मुंबईतील गर्दी कमी झाली नाही, तर लोकलही कदाचित बंद ठेवावी लागेल, असा इशारा दिला आहे. हे अत्यंत गंभीर आणि तितकेच विचित्र आहे.लोकांनी गर्दी कमी केली नाही, तर मुंबई लोकल बंद करावी लागेल, असा इशारा मंगळवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे खासगी कंपन्यांना घरून काम करण्याची मुभा देण्याची विनंती केली आहे. गरज पडल्यास ५० टक्क्यांपेक्षा कमी लोकांनाच कार्यालयात बोलवा असं सांगितलं आहे. सरकारी कार्यालयातही ५० टक्क्यांपेक्षी कमी लोकांनी काम करावं असा निर्णय घेत आहोत. जेणेकरून सार्वजनिक वाहतूक सेवेवर ताण कमी पडावा. त्या अनुषंगाने महत्त्वाचे निर्णय घेत आहोत. मुंबईच्या लोकांनी ऐकलं नाही, तर बस आणि ट्रेन सेवा १० ते १२ दिवसांसाठी जनहितार्थ बंद करावी लागेल, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. अर्थात, लोकलची संख्या कमी केली किंवा बंद केली, तर गर्दी आणखी वाढेल. त्यामुळे रेल्वे स्थानकांवरील गर्दी कमी करण्यासाठी सर्वात प्रथम लोकलची संख्या वाढवली पाहिजे. ज्यादा फेºया कराव्या लागतील. ही गर्दी रोखणे केवळ अवघड आहे. आज किती जणांना सरकारी नोकºया आहेत? मुंबईत ७० टक्के लोकांची हातावर पोटं आहेत. खाजगी नोकरी करणाºयांचे प्रमाण सर्वाधिक आहे. तिथे कामगारांना रजा कशी काय मिळू शकेल? ३१ मार्चपर्यंत किंवा पंधरा दिवस कामगारांना बिनपगारी घरी बसावे लागेल. ते नुकसान कसे भरून काढायचे? ही पोटाची चिंता प्रत्येकाला आहे. त्यामुळे ही गर्दी कदापि कमी होणार नाही. रेल्वे स्थानकांवरील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे बंद करणे हा उपाय नाही, तर ज्यादा रेल्वे सोडून स्टेशनवरून प्रवाशांना पटापट बाहेर पडता येईल असे काही तरी करावे लागेल.बुधवारी सकाळपर्यंत महाराष्ट्रात ४२ करोना रुग्ण आहेत. आतापर्यंत ८०० टेस्ट झाल्या असून, त्यापैकी ४२ पॉझिटिव्ह सापडले आहेत. उर्वरित सर्व निगेटिव्ह आहेत. परदेशातून आलेल्यांचीच चाचणी केली जात आहे, तसंच राज्यात आणखी काही लॅब, हॉस्पिटल्स सुरू होणार आहेत. सरकार म्हणते आहे की, अत्यावश्यक सेवा कुठल्याही स्थितीत बंद करणार नाही, परंतु अनावश्यक व्यवहार बंद करायला हवेत. पालिकांशी संपर्क साधून ज्वेलर्स, कपड्यांसारखी दुकानं बंद ठेवण्यास सांगण्यात येणार आहे. हा एक प्रकारे आणीबाणीचाच प्रकार आहे. यामुळे काळ्या बाजारालाही ऊत येऊ शकतो, पण कोरोनाने केलेला हा बंद बंदसम्राट जॉर्ज फर्नांडिस यांच्यापेक्षा भयानक बंद आहे असे वाटते.परिस्थितीचा फायदा आणि गैरफायदा घेणारे अनेक जण असतात. त्यात काही गंभीर प्रकार, तर कधी विनोदही घडत असतात. आज तेच वातावरण सगळीकडे पाहायला मिळत आहे. या जमाव बंदी, संचारबंदी, बंद प्रकाराने सगळीकडे होत असलेला शुकशुकाट स्मशानशांतता निर्माण करत आहे. सर्वात भयानक म्हणजे, ज्या भागात असा रुग्ण असल्याचा संशय आहे, त्या घरातील लोकांना आसपासचे, सोसायटीतील लोक ज्याप्रकारे वागणूक देत आहेत, तो प्रकार वाईट आहे, म्हणून सोसायटीतल्या लोकांनी रुग्णांशी माणुसकीला धरून वर्तन करावे. त्यांना गुन्हेगारासारखी वागणूक देणं योग्य नाही. कोरोनाचा आजार हा उपचार घेऊन बरा होणारा आहे. त्यामुळे रुग्ण आढळल्यास त्यांना १४ दिवसांचं विलगीकरण करावं, उपचार करावेत, पण केवळ सोशल मीडिया आणि दुसरी बातमी नसल्याने रंजित करून बातम्या सांगणाºया वाहिन्या यांच्यामुळे दहशत पसरत आहे. बंदचे वातावरण वाढीस लागत आहे. खरं तर या सगळ्या टीव्ही वाहिन्या चार दिवस बंद ठेवल्या, तर आपोआप हा रोग आटोक्यात येईल असे वाटते. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि अन्य समाजमाध्यमे बंद केली, तर या व्हायरसचा प्रसार थांबू शकेल.एक महिला आपल्या पाच वर्षांच्या मुलाला हाताला बोट धरून चालली होती. रस्त्याने अनेकांनी तोंडाला मास्क लावला होता. मुलाला गंमत वाटत होती. हे काय आहे? अशी उत्सुकता त्याच्या चेहºयावर दिसत होती. त्याने आईला विचारले, ‘हे काय लावले आहे? तर ती बाई पटकन म्हणाली, ‘कोरोना झाला की, असे तोंड झाकून घ्यायचे असते! म्हणजे कोरोना झाल्यावर मास्क लावायचा की, तो होऊ नये म्हणून तो लावायचा हेही लोकांना नीट समजत नाहीये. संध्याकाळी त्या मुलाचे वडील घरी आले, तेच मुळी मास्क लावू०न. झाले, मग काय? त्या मुलाला वाटले, आपल्या वडिलांना कोरोना झाला. तो सगळीकडे उड्या मारत आमच्या पप्पांना कोरोना झाला, असे सांगत सुटला. सोसायटीतील सगळी दारे फटाफट बंद झाली. हाही बंदचा प्रकार नवाच होता. हे असले प्रकार सगळीकडे चालू आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: