मंगळवार, १७ मार्च, २०२०

देवाघरी जाण्याचा मार्ग बंद


कोरोनाचे संकट इतके वाढले आहे की गर्दीची सगळी ठिकाणे बंद केली जात आहेत. सुरवातीला शाळा, महाविद्यालये, मॉल, नाटयग्ृहे, चित्रपटगृहे बंद केली. मग पोहोण्याचे तलाव, सार्वजनिक उद्याने, पब, बार बंद करण्यात आले. मग काही ठिकाणी जमावबंदी करण्यात आली. गर्दीची सगळी ठिकाणे बं करूनही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोच आहे. मग निर्णय घेण्यात आला की देवस्थाने बंद ठेवण्याचे. कोरोनामुळे देवाघरी जाण्याची वेळ येउ नये म्हणून देवाचीच दारे बंद करण्यात आली तर.कोणतेही संकट  आल्यावर आम्ही शरण येतो ते देवाला. देव आम्हाला बळ देईल. आत्मीक ताकद देईल. आमचे गार्हाणे ऐकेल. त्यासाठी मनाचा संवाद साधण्यासाठी आम्ही देवाला जातो. पण आता आम्हाला देवाशीच संवाद साधता येणार नसेल तर करायचे काय? पुण्यातील कसबा गणपती बंद. दगडुशेठ हलवाई गणपती बंद. सारसबागेतील गणपती बंद. पंढरपूरचा विठोबा आता बंद. नाशिकचा त्र्यंबकेश्वर बंद. शिर्डीचे साईबाबा नका येउ मला भेटायला म्हणतात. कोल्हापूरची अंबाबाई महालक्ष्मी आता भकतांना दार बंद करून घेणार आहे. आता आम्ही गारहाणे गाण्यासाठी जायचे कुठे?   आम्ही शिर्डीच्या साईबाबांचे चरित्र ऐकले, वाचले. त्यांच्यावर काढलेले मनोजकुमारपासून ते दिपक बलराजपर्यंतच्या अनेक निर्मात्यांचे चित्रपट पाहिले. या कथानकात शिर्डीत महामारीची साथ येउ नये म्हणून बाबांनी वेशीवर पिठाची रांगोळी घालून तो रोग रोखला होता. पण आता हा रोग रोखण्याची ताकद बाबांमध्ये नाही असे का वाटते? बाबांच्या जन्मभूमी आणि कर्मभूमीचे राजकारण आणि वाद केल्यामुळे बाबा नाराज आहेत का? म्हणून ते या रोगाला रोखू शकत नाहीत का? का आमची श्रदधा कमी पडली की सबूरी कमी पडली? बाबांनी दार बंद करू न घेतले? देवाघरी जाण्याचा मार्ग बंद करण्यासाठी दार बंद केले की हे संकट एवढे वाढणार आहे की ते देवालाही पाहवत नाही म्हणून त्यांनी दरवाजा बंद केला म्हणायचा?   कसबा गणपती आमचा मानाचा. त्याला नारळ ठेवल्यावर आमच्या सगळया मनोकामना पूर्ण होतात. राजकीय पक्षांचे नेते यश मिळण्यासाठी इथूनच प्रचाराची सुरूवात करतात. दगडूशेठ हलवाई गणपतीही आमच्या नवसाला पावणारा गणपती. मग या रोगाचे समूळ नष्ट होउन दे असा नवस बोलायला का कोणी जाउ शकत नाही? तो नवस बोलायला येण्यापूर्वीच भक्तांना दरवाजा बंद केला गेला? सारसबागेतील गणपती हा तर पेशवेकालीन गणपती. अटकेपार झेंडा लावण्यापूर्वी इथेच कौल लावून, आशीर्वाद घेउन आमचे मराठे पेशवे यशस्वी झाले. मग या कोरोनाला अटकेपार नाही तर हद्दपार करण्यासाठी हा गणपती का आमच्या मदतीला धावून येणार नाही? पण त्याला साकडे घालण्याच्या आतच तर दरवाजे बंद झाले आहेत.   मुंबईतला सिद्धीविनायक तर जगभरातील नामवंतांचे आकर्षण. राज्याचे मुख्यमंत्री पदाची सूत्र घेण्यापूर्वी याचेच दर्शन घेतात. सचिन तेंडूलकर आपले विक्रम करतो तेव्हा सिद्धीविनायक त्याच्या पाठिशी असतो. अमिताभ बच्चन संकटातून बाहेर पडण्यासाठी जुहूपासून पायी या मंदीरापर्यंत येतो. मग आम जनतेवर आलेले संकट दूर करण्यासाठी हा बाप्पा नाही का येणार? मग त्याचेच दार बंद करून भकतांनी जायचे कुठे? भक्तांवरचे संकट रोखता येणार नाही म्हणून तर हे देव आता बंदीस्त होत नाहीत? कोरोना हा प्रलयकारी महामारी होणार का? देवही तुमच्याकडे पाठ फिरवतो आहे का?   कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई हे तर शक्ती पीठ.  सर्वांना लढण्याचे बळ  देणारी ही जगन्माता. तीचाही दरवाजा भकतांना बंद होणार? खरंच इतका भयंकर आहे का हा कोरोनाचा रोग? पुराणकथांमध्ये आपण वेगवेगळया आकारांचे चेहर्रंयांचे राक्षस पहायचो. तसाच हा दानव प्रकटला आहे का? हा चिनी डॅ्रगन किंवा राक्षस मारण्याची ताकद आमच्या देवांमध्ये नाही म्हणजे नवा अवतार येणार का कोणी? काय होणार आहे आता? सगळं ठप्प झाले तर माणसांनी गप्प बसून करायचे तरी काय? तुळजापूरची भवानीमाता आमच्या छत्रपती शिवरायांना भवानी तलवार देते आणि संकटांत लढण्याचे बळ देते, यश मिळवून देते. मग आज तीचाच दरवाजा बंद झाला तर आम्ही जायचे कुठे?   आज संपूर्ण देशात महाराष्ट्रात सर्वाधिक रूग्ण आहेत. या रूग्णांना वाचवण्यासाठी आणि नवीन बाधा होउ नये म्हणून देवाला साकडे घालायचीही आता सोय राहिलेली नाही. देवानेच पाठ फिरवली तर जायचे कुणीकडे? शेवटी अंतिम उपाय झाल्यावर विज्ञानवादी डॉकटरही म्हणतो की आता सगळे देवावर सोपवा. आता दवा नाही दुवा आवश्यक आहे. मग हा दुवा आता बंद झाला तर होणार तरी काय?पण हातपाय गाळून चालायचे नाही. लढायचे, काम करत रहायचे, परिणामांची चिंता न करता काम करत रहा, तो रोग काम करणार्यांच्या वाटेलाही जाणार नाही. बंद झालेली देवस्थाने तेच सांगत असतील, असे मानायला हरकत नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: