कबूतरांवर नजर कोण ठेवणार?
सध्या जगभरात कोरोनाची चर्चा आहे. हा रोग वेगाने पसरतो आहे म्हणून देश चिंतेत आहे. पण तो कशाने पसरतो आहे याचा शोध खरंच घेतला जात आहे का? केवळ कोरोनाच नाही तर अनेक रोग मुंबईत अशा प्रकारे पसरतात की त्या कारणांकडे दुर्लक्ष केले जाते. आज कोरोना रूग्णांना लांब ठेवून, त्यांच्या पासून आपल्याला हा रोग होउ नये म्हणून मास्क घातले जात आहेत, गर्दी कमी केली जात आहे. पण हा रोग प्राणी आणि पक्षांपासूनही पसरत नाही ना याचा कोणी विचार करतो आहे का? मुंबईत कबूतरे ही फारच खतरनाक बनताना दिसत आहेत. मुंबई, ठाणे, रायगड जिल्हयात एवढी कबूतरे वाढली आहेत की त्यांच्यामुळे अनेक रोगांचा प्रसार होतो आहे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात ठिकठिकाणी कबूतरांचे हजारोंच्या संख्येचे थवे आहेत. या कबूतरांचा सामान्यांना खूप त्रास होत असतो. पण काही पक्षीप्रेमी त्यांच्या अतिरेकी प्रेमापोटी संपूर्ण शहरांमधून घाण करत असतात. बाजारपेठेत, गर्दीच्या ठिकाणी रस्त्यावर, फूटपाथवर कबूतरांना बाजरी, धान्य खायला टाकत असतात. त्यामुळे कबूतरांचा थवाच्या थवा येतो आणि ते कण टिपत असतो. रस्त्याने चालणारी माणसे आली की ती भुर्रकन उडतात. उडताना प्रचंड प्रमाणात घाण ही कबूतरे टाकतात. त्यांची पिसे, मातीचा धुरळा आणि काही कबूतरे विष्ठाही टाकतात. रस्त्याने जाणार्या माणसांच्या कपडयांवर, अंगावर, डोकयावर ही घाण पडते. दिवसात हजारो माणसांना या संकटाला सामोर जावे लागते.मुंबई, ठाणे, नवी मुंबईत खाण्याचे स्टॉल ठिकठिकाणी फुटपाथवर असतात. पोहे, उपीट, शिरा, खिचडी असे अनेक पदार्थ विकणारे उभे असतात. त्यांच्याकडून उघडन्यावरच हे खाद्य पदार्थ खाण्यासाठी माणसे जमा होतात. त्याचवेळी वरून कबूतरांचे थवे उडत जात असतात. काही विजेच्या तारांवर लटकत असतात. काही कबूतरांचे थवे इमारतींच्या भिंतींवर कोपरयांवर बसून रस्त्यावर नजर टाकत असतात. खाद्य पदार्थ दिसले की लगेच झेपावतात. त्यांच्या पंख फडकवण्याने मोठया प्रमाणात धुरळा आणि जंतू हवेत पसरत असतात. हे थवे सर्वाधिक रोग प्रसाराचे काम करत असतात. पण तरीही डोकयावर जंतुंचा आणि धुलीकणांचा वावर होत असताना माणसांना उघडयावर पदार्थ खाण्याशिवाय पर्याय रहात नाही. या कबूतरांचा काहीतरी बंदोबस्त करण्याची गरज आहे. त्यांच्यावर नजर ठेवण्याची गरज आहे. ही कबूतरे केवळ अन्नपदार्थ खाउन घाण करतात असे नाही तर अनेक प्रकारची घाणही भक्षण करत असतात. अनेक लोक खाउन थुंकतात त्यातही ही कबूतरे चोच मारताना दिसतात. त्यामुळे रोगप्रसाराचे फार मोठे माध्यम हे कबुतरांचे थवे होताना दिसत आहे. या कबूतरांमुळे अनेकांना दमा, अस्थमा असे आजार झाले आहेत. कबूतराची पिसे नाका तोंडात गेल्यामुळे न बरी होणारी सर्दी अनेकांना झालेली आहे. कपडयांवर आणि अंगावर कबूतरांची विष्ठा पडल्याने अनेकांना त्वचारोग आणि अन्य आजारही झालेले आहेत. अशा परिस्थितीत कोरोनाचा प्रसारही मोठया प्रमाणात कबूतरे करत नाहीत ना याचा तपास करावा लागेल.ही कबूतरे कुठून कुठून येत असतात. कोरोना बाधित भागातून स्थलांतरीत झालेले कबूतर मोठया शहरात आले. त्या कबूतराने अनेक कबूतरे बाधीत होउन त्या रोगाचा प्रसार करू शकतात. त्यामुळे कबूतरे ही फार मोठा रोग प्रसार करणारी ताकद बनताना दिसत आहे. या रोग पसरवणारया पक्षांना पोसण्याचे काम अनेकजण करताना दिसत आहेत. म्हणूनच यावर प्रतिबंध कसा लावता येईल याचा विचार करावा लागेल. माणसामाणसांमधून या रोगाचा प्रसार होत आहेच. त्याहीपेक्षा हवेतून कबुतरांसारखे पक्षी काही संकट घेउन येत नाहीत ना याचा विचार केला पाहिजे. कबूतरांना शांतीदूत म्हटले जाते. पण ती पांढरी कबूतरे आहेत. ही घुटरघुम करणारी पारवा रंगाची कबूतरे ही अत्यंत घाण करत असतात. दुर्र्गधी पसरवत असतात. पिसवांसारखे कीटकही या पक्षांमुळे हवेतून माणसांच्या अंगावर येतात. त्यामुळे या कबूतरांवर नजर ठेवण्याचे काम कोण करणार हा प्रश्न आहे. फोटो काढायला हे थवे चांगले वाटत असतीलही. पण ते लांबूनच चांगले दिसतात. आपल्या डोकयावरून वाहीली जाणारी ही घाण अत्यंत धोकादायक आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा