गुरुवार, १२ मार्च, २०२०

मनसेची शॅडो कॅबिनेट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १४ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शॅडो कॅबिनेटची घोषणा केली. राज्यातील महाविकासआघाडी सरकारच्या कामावर नजर ठेवण्यासाठी राज ठाकरे यांनी ही आखणी केलेली आहे. वास्तविक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकमेव आमदार विधानसभेत आहे. तरीही त्यांनी शॅडो कॅबिनेट बनवून संपूर्ण महाराष्ट्राचेच नाही, तर देशाचे लक्ष यानिमित्ताने वेधून घेतले आहे. कारण ज्याप्रकारे अमराठी वृत्तपत्रे आणि वाहिन्यांनी या बातमीला चालवले आहे त्यावरून ही एक लक्ष वेधून घेणारी घटना आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी आपला पक्ष उतरवला, तेव्हाच त्यांनी जाहीर केले होते की, आम्हाला प्रबळ विरोधी पक्ष म्हणून निवडून द्या. सगळे पक्ष आणि आघाड्या या आम्हाला सत्ता द्या अशी जोरदार मागणी करत असताना एकमेव राज ठाकरे असे नेते होते की, त्यांनी प्रत्येक सभेत आम्हाला सक्षम विरोधी पक्ष म्हणून कौल द्या, अशी मागणी केली होती, म्हणजे एकाच वेळी शिवसेना-भाजप यांची युती होती. ते युतीला सत्ता मागत होते. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांची आघाडी होती. ते त्यांना सत्ता मागत होते, तर वंचित बहुजन आघाडीही आम्हाला एकदा संधी द्या, असे म्हणत होते. सत्ता मिळावी यासाठी सगळे धडपडत असतानाच राज मात्र आम्हाला विरोधी पक्ष म्हणून खंबीरपणे बसू दे, अशी मागणी करत होते.राज्यात सक्षम विरोधी पक्ष असेल, तर सरकारवर अंकुश ठेवता येतो, हे राज ठाकरे यांचे ठाम मत आहे. ते आत्ताचे नाही, अगदी २००९ च्या पहिल्याच निवडणुकीत राज यांना चांगले यश मिळाले होते तेंवहाही त्यांचे तेच मत होते. म्हणजे आपल्या भाषणात राज ठाकरे नेहमी म्हणत की, राज्यात चार हत्ती माजले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप हे चार हत्ती आहेत. त्यांच्यावर अंकुश चालवणारा माहुत मला बनायचे आहे, असेच त्यांचे मत होते. त्यामुळे विरोधात राहून भक्कम कामगिरी करण्याचे ध्येय हे राज ठाकरे यांचे होते. आजही ते आहे.आता त्यांनी शॅडो कॅबिनेट तयार केलेली आहे. वास्तविक शॅडो कॅबिनेट ही विरोधी पक्ष तयार करतो, पण गेल्या काही वर्षांत राज्यात विरोधक प्रबळ राहिलेले नव्हते. या खेपेला प्रथमच भारतीय जनता पक्षासारखा प्रबळ विरोधी पक्ष आह, ज्यांच्याकडे सरकारमध्ये असलेल्या प्रत्येक पक्षाच्या दुपटीपेक्षा जास्त संख्याबळ आहे. त्यामुळे हे शॅडो कॅबिनेट खरे तर भाजपने बनवण्याची गरज आहे, पण भाजपने ते केले नाही. ते अजून सत्तेपासून बाहेर गेलो आहे, हे मान्य करायला तयार नाहीत. अशावेळी राज ठाकरे आपल्या पक्षाचा एकमेव आमदार निवडून आलेला असताना ते शॅडो कॅबिनेट बनवतात, हे विशेष आहे. भाजपला विरोधक म्हणून कामगिरी करायची नाही, तर अन्य छोेटे पक्ष आणि आमदारांना कोणाबरोबर तरी जायचे आहे. त्यामुळे विरोधकांची पोेकळी भरून काढण्याचे काम फक्त मनसेच करू शकतो हे राज ठाकरे यांनी दाखवून दिले आहे.आपले पुत्र अमित ठाकरे यांच्यासह मनसेच्या नेते, पदाधिकाºयांकडे एकेका खात्याची जबाबदारी दिली आहे. हे सर्व घडवून आणताना सरकारच्या चांगल्या कामाचे कौतुक करा, पण चुका असतील, तर त्या डोळ्यांत तेल घालून शोधा, हे राज ठाकरे यांनी सांगितले आहे. गेल्या पंधरा वर्षांत सरकार आणि प्रशासनाची डोकेदुखी होती ती माहिती अधिकाराचे कार्यकर्ते. त्यामुळे तेच विरोधकांची भूमिका करत किंवा विरोधक स्वत: काही न करता अशा कार्यकर्त्यांच्या आडून प्रहार करत होते. त्यामुळे त्याचा अनेक वेळा गैरफायदा घेतला जात होता. त्याला आळा घालण्याचे कामही राज ठाकरे यांनी केले आहे. अमित ठाकरे यांच्याकडे पर्यटन खात्यावर लक्ष ठेवायची जबाबदारी दिलेली आहे, म्हणजे जे खाते आदित्य ठाकरे यांच्याकडे आहे, त्यावर नजर ठेवायचे काम अमित ठाकरे करणार आहेत.अर्थात, या शॅडो कॅबिनेटच्या माध्यमातून किती प्रखर विरोधी पक्ष आपण आहोत हे राज ठाकरे दाखवून देण्याचा प्रयत्न करत असले, तरी त्याला कितपत यश येते आणि सरकारला ते कशाप्रकारे कोंडीत पकडतात, हे पाहण्यासाठी काही महिने वाट पाहावी लागेल!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: