गुरुवार, ५ मार्च, २०२०

कोरोनाचा फटका अर्थव्यवस्थेला

दोन दिवसांपूर्वी शेअर बाजार जोरदार कोसळला. मागील महिनाभर चीनसारख्या महासत्तेला झुंजवणाºया कोरोना विषाणूने शुक्रवारी गुंतवणूकदारांना सळो की पळो करून सोडले. कोरोनाने आशिया आणि युरोपात हातपाय पसरून जीव घेण्यास सुरुवात केल्यानंतर धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी शुक्रवारी बाजारात तुफान विक्री केली. या पडझडीत मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल १४४८ अंकांनी घसरला. त्याचप्रमाणे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४३१ अंकांनी घसरून ११ हजार २०१ अंकांवर बंद झाला. या पडझडीत गुंतवणूकदारांचे जवळपास ६ लाख कोटींचे नुकसान झाले. मागील सहा सत्रांत गुंतवणूकदारांनी १० लाख कोटी गमावले आहेत. त्यामुळे कोरोनाचा फटका आंतरराष्ट्रीय पातळीवर बसत असतानाच अर्थव्यवस्थेला त्याच्यापासून धोका निर्माण झालेला आहे.बाजार उघडताच शुक्रवारी तुफान विक्री सुरू झाली आणि अवघ्या पाचच मिनिटांत सेन्सेक्स १००० अंकांनी कोसळला. सर्वच क्षेत्रात विक्रीचा प्रचंड मारा सुरू झाला, जो अखेरपर्यंत थांबला नाही आणि गुंतवणूकदार पोळून निघाले. बँका, आॅटो, तेल आणि वायू, फार्मा, मेटल, एफएमसीजी, एनर्जी यांसारख्या क्षेत्रात प्रमुख कंपन्यांचे शेअर जोरदार आपटले. घसरणीची तीव्रता इतकी होती की, सेन्सेक्स २६०० अंकांपर्यंत आपटला होता. दिवसअखेर सेन्सेक्स तब्बल १४४८ अंकांनी घसरून ३८२९७ अंकांवर बंद झाला. यामुळे अर्थव्यवस्था चांगलीच धास्तावली होती. हे फक्त भारतातच घडले असे नाही, तर जगभर शेअर बाजार गडगडलेले पहायला मिळाले. त्याचे एकमेव कारण कोरोना व्हायरसच ठरले. कोरोनाचा फटका जगभरातील इतर शेअर बाजारांना गुरुवारी बसला. भारतात शुक्रवारी त्याचा परिणाम दिसला. अमेरिकन शेअर बाजारात जोरदार पडझड दिसून आली होती. अमेरिकेचा डाऊ जोन्स तब्बल ११९० अंकांनी कोसळला. एसअँडपी ५०० निर्देशांक १३७ अंकांनी आपटला. नॅसडॅक ४१४ अंकांनी घसरला.जागतिक महासत्ता होण्याची घाई असलेल्या चीनला विकासाच्या मार्गातले अडथळे अधिक अस्वस्थ करत आहेत. त्यातच आता तिथे कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. काही हजार नागरिकांचे बळी आणि रुग्णालयात उपचार घेत असणारे हजारो लोक याची चीनला चिंता आहेच. कोरोना व्हायरस आणि नव्याने उद्भवलेल्या बर्ड फ्लूमुळे निर्माण झालेल्या नकारात्मक वातावरणातून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्याचे मोठे आव्हान चीनपुढे उभे ठाकले आहे. त्याचा परिणाम भारतासारख्या देशावरही होत आहे. परिणामी भारतीय शेअर बाजारातही जोरदार पडझड झालेली पहायला मिळाली. चीनमध्ये पहिल्यांदा आढळून आलेला कोरोना व्हायरस आता जगभरातल्या अनेक देशांमध्ये पाय पसरू लागला आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊन मृत्युमुखी पडणाºयांची संख्या चीनमध्ये झपाट्याने वाढत आहे. जगभरात इतरही देशांमध्ये या विषाणूंची लागण होऊन नागरिकांचे मृत्यू झाले आहेत. त्यामुळे जगभरातल्या नागरी जीवनावर कोरोना विषाणू परिणामकारक ठरतोच आहे. त्याचबरोबर जगभरातल्या देशांच्या अर्थव्यवस्थेवरही नकारात्मक प्रभाव टाकतो आहे. यंदाच्या वर्षी जागतिक बाजारपेठेमध्ये सोन्याच्या भावामध्ये ७ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. कोरोना व्हायरसमुळे जागतिक विकासावर परिणाम होण्याची भीती गुंतवणूकदारांच्या मनात आहे. आर्थिक आणि राजकीय अस्थिरतेच्या काळात सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक सुरक्षित समजली जाते. त्यामुळे सोने खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरोना व्हायरसचा चीनच्या विकासावर परिणाम झाला आहे. तसाच तो अन्य देशांच्या आर्थिक प्रगतीवरही परिणाम करताना दिसत आहे. नव्हे, तसा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेनेच दिला आहे.सध्या जगभरातल्या अर्थव्यवस्थेचा विचार करता अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला टक्कर देईल इतकी मजबूत किंबहुना, जगात पहिल्या क्रमांकावर जाण्याची क्षमता असलेली अर्थव्यवस्था म्हणून चीनच्या अर्थव्यवस्थेकडे पाहिले जाते. त्यामुळे कोरोना विषाणूचा चीनच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. या परिणामामुळे चिनी अर्थव्यवस्था अपेक्षित विकासदर गाठू न शकल्यास जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊन मंदीसदृश स्थिती निर्माण होऊ शकते. भारत तर अगोदरपासूनच आर्थिक मंदीसदृश स्थितीचा सामना करत आहे. कोरोना व्हायरस हे जैविक युद्धासाठी चीनने तयार केलेले हत्यार आहे असे म्हणतात. ते त्यांच्यावरच उलटल्याचे म्हटले जाते, पण त्याचवेळी चीनच्या अर्थव्यवस्थेची अमेरिकेला भीती असल्यामुळे या व्हायरसमागे अमेरिकेचा काही संबंध आहे काय, याचाही विचार करावा लागेल. पण काही झाले तरी त्याचा फटका भारताला बसताना दिसत आहे हे नक्की.भारताची अर्थव्यवस्था ही विकसनशील म्हणून ओळखली जाते. त्यामुळे एकाच वेळी चीन आणि भारत अशा दोन महाकाय देशांच्या अर्थव्यवस्थेमध्ये समस्या निर्माण होणे जागतिक अर्थव्यवस्थेसाठी चिंताजनक ठरू शकते. कोरोना व्हायरसचा चिनी शेअर बाजारावर मोठा वाईट परिणाम झाला आहे. हा परिणाम दृश्य स्वरूपात पाहायला मिळत आहे. कोरोना व्हायरसमुळे चीनचा विकास दर एक टक्क्याने घटू शकतो. अर्थव्यवस्थेचे ९.६६ लाख कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते. कोरोना व्हायरसमुळे अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होत असल्यामुळे सरकारने नववर्षाची सुट्टी आणखी काही दिवस वाढवली. जपानमधल्या कार निर्मिती करणाºया टोयोटा कंपनीने चीनमध्ये सद्यस्थितीत असणारे सर्व प्रकल्प काही काळ बंद ठेवणार असल्याची घोषणा केली आहे. चीनमध्ये असलेल्या जपानी, कोरियन तसेच अन्य अनेक कंपन्यांनी आपल्या उत्पादनांवर बंदी घातली आहे. अमेरिकेसह जगभरच्या विमान कंपन्यांनी चीनमधील उड्डाणे रद्द केली आहेत. चीनमध्ये पर्यटनाला जाण्याचे प्रमाण जवळजवळ शून्यावर आले आहे. वुहानसारख्या शहराची आणि त्या भागाची ओळख वैद्यकीय शिक्षणाचे हब म्हणून आहे. त्याच भागात आता कोरोना व्हायरस झाला असल्यामुळे तिथे गेलेले विद्यार्थी परत आले आहेत. तिथल्या वैद्यकीय प्रवेशांवर परिणाम होण्याची भीती आता व्यक्त होत आहे. हे एक गंभीर जागतिक संकट आहे. आरोग्य आणि अर्थ या दोन्हीला मारक असे हे संकट आहे. ज्याचा परिणाम जगभरातील विकसनशील देशांवर होणार आहे, होत आहे.इंडोनेशियात चीनच्या एका प्रकल्पाला टाळे ठोकण्यात आले आहे. त्यामुळे तिथे काम करत असलेल्या सुमारे ४० हजार कामगारांवर बेरोजगारीचे संकट ओढवले आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या नवीन रुग्णांच्या संख्येत घट झाली असली, तरी मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे. आतापर्यंत मृत झालेले बहुतांश नागरिक हे हुबेई प्रातांतील असल्याची माहिती चीन राष्ट्रीय आरोग्य विभागाने दिली आहे. रोजच नवीन रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. सर्वाधिक रुग्ण हुबेई प्रांतात आढळत आहेत. दक्षिण कोरियामध्ये कोरोनाचा संसर्ग झालेले नवीन रुग्ण शेकडोंच्या संख्येने आढळत आहेत. दक्षिण कोरियात आतापर्यंत साडेआठशे जणांना लागण झाली आहे. चीननंतर सर्वाधिक रुग्ण दक्षिण कोरियामध्ये आढळले आहेत. मागील काही दिवसांत दक्षिण कोरियात कोरोनाच्या रुग्णांत अचानक वाढ झाली आहे. दक्षिण भागातील शहर दाएगूमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण आढळले होते. कोरियात आतापर्यंत सातजणांचा मृत्यू झाला आहे.कोरोनाबाबत गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, आगामी काही दिवस महत्त्वाचे असणार असल्याचे मून यांनी सांगितले. चीनमधील हुबेई प्रांताची राजधानी वुहानमधून परदेशी नागरिकांना वुहान सोडण्यास प्रशासनाने मंजुरी दिली आहे. ज्या नागरिकांमध्ये कोरोनाचा संसर्ग आढळला नाही, त्यांनाच वुहान शहरातून जाता येणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. वुहान शहराची लोकसंख्या जवळपास एक कोटी असून, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून शहरातील व्यवहार ठप्प पडले आहेत. सार्वजनिक आणि खाजगी प्रवासी वाहतुकीवरही निर्बंध घालण्यात आले होते. चीनमध्ये कोरोनाने हाहाकार माजवल्यानंतर दक्षिण कोरियातही कोरोनाचा फैलाव झाला आहे. युरोपियन देशांनीही कोरोनाचा धसका घेतला आहे. इटलीमध्ये कोरोनाचा संसर्ग अधिक होऊ नये यासाठी कठोर पावले उचलण्यात आली आहेत. कोरोना संक्रमित विभागात प्रवेश केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. या संकटावर भारताने तातडीने उपाय केले हे विशेष. महाराष्ट्रातीलही अनेक लोक तिकडून सुखरूप परत आणण्याचे काम सरकारने केलेले आहे. सर्वात प्रथम केरळमधील रुग्ण आढळल्यानंतर एक भीतीचे वातावरण तयार झाले होते, पण भारत त्यातून सावरला असला तरी अर्थव्यवस्थेचे संकट ओढवले आहे.चीन, कोरियाबरोबर हे संकट इटलीला पोहोचले आहे. इटलीतील जवळपास ५० हजार कुटुंबीयांना घरातून बाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याशिवाय सार्वजनिक स्थळी न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. इटलीतील कोरोनाचा संसर्ग झालेला परिसर, कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो अशा परिसरातील शाळा, दुकानांना बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. व्हेनिस फेस्टिवलही रद्द करण्यात आला आहे, तर इटालियन फॅशन डिझायनर जियोर्जिया अरमानीचा शोही रद्द करण्यात आला आहे. परंतु या संकटातून अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी फार मोठा काळ लागेल हे नक्की. भारतात १० लाख कोटींचा बसलेला फटका सावरण्यासाठी शेअर बाजारात कशी लवचिकता येते हे आता पहावे लागेल, पण अर्थव्यवस्थेला आता सावरले पाहिजे हे नक्की.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: