शुक्रवार, १३ मार्च, २०२०

शरद पवारांचे मत किती खरे, किती खोटे?



राज्यसभेसाठी अर्ज दाखल केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मध्य प्रदेशसारखी स्थिती महाराष्ट्रात उद्भवणार नाही, अशी प्रतिक्रिया पत्रकार परिषदेत दिली. अर्थात, देशाच्या राजकारणात शरद पवारांबाबत नेहमीच असे म्हटले जाते की, पवार ‘नाही’ म्हणतात, तेव्हा त्याचा अर्थ ‘हो’ असतो आणि ‘हो’ असतो, तेव्हा त्याचा अर्थ ‘नाही’ असा असतो. त्यामुळेच शरद पवारांचे हे मत किती खरे आणि किती खोटे यांचा विचार करावा लागेल.सध्या राज्यात असलेल्या सरकारची अशी ख्याती आहे की, हे सरकार ठाकरे सरकार असले, तरी चालवणारे पवार सरकार आहे. आपल्या अनुभवाचा आणि ज्येष्ठत्वाचा पुरेपूर फायदा उठवत उपमुख्यमंत्री अजित पवार सतत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या आजूबाजूलाच असतात. त्यामुळे हे सरकार राष्ट्रवादी काँग्रेस चालवते असाच आरोप केला जात आहे. त्यामुळे या सरकारमध्ये काँग्रेसचा चेहरा कुठेच दिसत नाही. साहजिकच हा असंतोष बाहेर पडला, तर या सरकारला काँग्रेसमुळे धोका निर्माण होऊ शकतो.भारतीय जनता पक्षाने जिथे जिथे आॅपरेशन लोटस केले, तिथे तिथे वर्षभर सरकार चालवल्यानंतर ते पाडण्याची किमया भाजपने केली आहे. कर्नाटकात कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या सहकार्याने बनवलेले सरकार भाजपने वर्षभर चालू दिले. लोकसभा निवडणुकीत भाजपला यश आल्यानंतर येडियुरप्पांनी ते सरकार अस्थिर केले. काँग्रेस आणि जनता दलाचे आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केला. तोच फॉर्म्युला यशस्वी करण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे. मध्य प्रदेशचे सरकारही भाजपने वर्षभर सव्वा वर्ष चालू दिल्यानंतर कमलनाथांचा गेम करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात आॅपरेशन लोटस यशस्वी करण्यासाठी भाजप आता घाई करणार नाही. साधारण दिवाळीनंतर डिसेंबर महिन्यात असा काही घोळ घालण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळेच शरद पवारांनी दिलेली प्रतिक्रिया आज खरी वाटत असली, तरी ती तितकीशी खरी नाही असे चित्र आहे. अर्थात, हे सरकार किती काळ टिकवायचे हे जरी शरद पवारांच्या हातात असले, तरीही भाजप काहीच प्रयत्न करणार नाही, असे नाही.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील हे अगोदरच फिल्डिंग लावून बसले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी वक्तव्य केले होते की, या वर्षाच्या अखेरीस राज्यात मुदतपूर्व निवडणुका होतील. त्यामुळे भाजपचे राज्यातील आॅपरेशन लोटस म्हणजे हे सरकार कोसळवणे असले, तरी फोडाफोडी करून नवे सरकार आणण्याचे धोरण आहे की, निवडणुकांना सामोरे जाण्याचे धोरण आहे हे अजून ठरलेले नाही, पण स्पष्ट बहुमत मिळवण्यासाठी भाजप राज्यात पुन्हा निवडणुकांना सामोरे जाण्यास लावणार असेच दिसत आहे. त्यामुळे शरद पवारांनी जरी राज्यात मध्य प्रदेशसारखी परिस्थिती नाही, असे वक्तव्य केले असले, तरी ते तितकेसे खरे नाही. या सरकारवर टांगती तलवार आहेच.वयात आलेल्या किंवा सोळा वर्षांच्या यौवनेचा जसा भरवसा देता येत नाही. कोण कधी शिळ घालून बोलावेल आणि फूस लावून पळवून नेईल याची शाश्वती नसते, म्हणूनच म्हटले जाते की, ‘तरुणपणाच्या रस्त्यावरचं पहिलं ठिकाणं मोक्याचं, सोळावं वरीस धोक्याचं गं सोळावं वरीस धोक्याचं’. त्याप्रमाणे विद्यमान सरकारमधील कोणत्या आमदारांना कमळाबाई शुकशुक करून नादाला लावेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे शरद पवार हे जरी या सरकारचे राखणदार असले, तरी त्यांचा डोळा चुकवून काही हालचाली होणारच नाहीत याची खात्री आज पवारांनाही नाही. त्यामुळेच पवारांच्या या मतात तसा काहीच दम नाही. ते आत्मविश्वासपूर्ण तर बिल्कूल नाही. महाराष्ट्रात मध्य प्रदेशसारखी परिस्थिती उद्भवणार नाही, असे जरी ते म्हणत असले, तरी हे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल असे पवारांनी अजूनही ठामपणे सांगितलेले नाही. त्यामुळेच प्रश्न पडतो की, त्यांचे हे मत खरे किती आणि खोटे किती?महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण झालीच तर ती काँग्रेसकडूनच होऊ शकते. याचे कारण आज जी खाती काँग्रेसच्या वाट्याला आलेली आहेत, त्याबाबत काँग्रेस समाधानी नाही. तसेच आपली एकूणच सरकारमध्ये उपेक्षा होत आहे, असेच काँग्रेस नेत्यांना वाटत आहे. त्यातच काँग्रेसमध्ये राज्यात इतकी गटबाजी आहे की, पक्ष नामशेष होत असतानाही गट-तट काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे अतिशय सहिष्णू आहेत. त्यांचा तसा कोणावर प्रभाव पडत नाही. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण हे वेगळ्या भूमिका घेताना दिसतात. बाळासाहेब थोरातांची भिस्त ही प्रामुख्याने शरद पवारांवर आहे. त्यामुळे ते शरद पवारांचेच बोट धरून काँग्रेसला नेत आहेत. त्यामुळे पवार विरोधक निष्ठावंत काँग्रेस आक्रमक होऊन काही गडबड करू शकते. काँग्रेसच्या अनेक युवा नेत्यांना तसे सध्या काहीच काम नाही. त्यामध्ये मिलिंद देवरा असतील, संजय निरुपम असतील किंवा अनेक पडेल उमेदवार हे आपले अस्तित्व राज्यात टिकवण्यासाठी आक्रमक होऊ शकतात. त्यामुळे ते आपल्या जवळच्या आमदारांना कुठे तरी गडबड करायला लावतील, असे दिसते. त्यामुळे राज्यात मध्य प्रदेशसारखी स्थिती उद्भवणार नाही, हे शरद पवारांचे वक्तव्य तितकेसे खरे ठरेल असे नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: