गुरुवार, ५ मार्च, २०२०

देश वाट पहातोय...



आज ३ मार्च. हा दिवस तरी उजाडावा अशी तमाम भारतीयांची इच्छा आहे. कारण यापूर्वी दोन वेळा उगवणार म्हणून तो दिवस उगवलाच नाही. त्यामुळेच आज संपूर्ण देश हा दिवस उगवायची वाट पहात आहे. हा दिवस आहे तो निर्भया बलात्कार आणि हत्याकांडातील गुन्हेगारांना फाशी देण्याचा.अगोदर २२ जानेवारी, मग १ फेब्रुवारी असे दोन वेळा डेथ वॉरंट काढले गेले होते. गुन्हेगारांच्या वकिलांनी ही फाशी होऊ नये यासाठी जंग जंग पछाडले आहे. दोन वेळा वकिली डावपेच आखून ही फाशी थांबवली. कधी दयेची याचिका, कधी क्युरेटिव्ह टेस्ट, कधी मानसिक स्थिती बरोबर नाही, तर कधी आजारपणाचे कारण काढून ही फाशी लांबवली गेली.सर्वोच्च न्यायालयाने तिस‍ºयांदा डेथ वॉरंट काढल्यानंतरही ही तारीख पुढे ढकलली जावी म्हणून या वकिलांनी प्रचंड प्रयत्न केले. शुक्रवारी पुन्हा एकदा ही फाशी जन्मठेपेत बदलावी, अशी मागणी केली गेली.पण या देशात कोणालाही असे नराधम जिवंत नको आहेत. त्यांना फाशी व्हावी म्हणून केवळ निर्भयाची आईच नाही, तर देश आक्रोश करत आहे. त्यामुळे मंगळवारची सकाळ उजाडेल ती या फाशीची बातमी घेऊनच, अशी तमाम भारतीयांची अपेक्षा आहे.माणूस कधी मृत्यूची वाट पहात नाही. पण या चार जणांच्या मृत्युदंडाची वाट पाहावी लागते आहे, यासारखे दुर्दैव कोणते असेल? न्यायालयीन लढ्यातील डावपेच आणि विलंबामुळे आज सामान्य माणसांच्या मुठी आवळायला लागल्या आहेत. म्हणजे सरकार, न्यायालय जर यांना फासावर चढवणार नसेल, तर त्यांना मोकळे सोडा, आम्ही त्यांचा न्याय करू, अशी भावना आज समाजात पसरली आहे. याचे कारण आज समाजात भीती निर्माण झालेली आहे. आमच्या मुलीबाळी सुखरूप घरी परत येतील की नाही याची खात्री नाही. कारण प्रत्येक टप्प्यावर असे वखवखलेले खवीस टपून बसलेले आहेत. त्यांच्यात अशा शिक्षेला होणा‍ºया विलंबाने किंवा शिक्षा होत नसल्यामुळे धाडस वाढत आहे. न्यायालयीन विलंबाने अशा घटनांमध्ये वाढ झालेली आहे.२०१२ च्या डिसेंबरनंतर संपूर्ण देशात महिला अत्याचार, बलात्कारांच्या घटनेत वाढ झालेली आहे. संपूर्ण देशभर महिलांना जाळणे, अ‍ॅसिड टाकणे, असे प्रकार वाढत गेले. कारण दिल्लीसारख्या राजधानीत झालेल्या सामूहिक बलात्कारातील गुन्हेगारांनाही आपल्याकडे शिक्षा होत नाही. त्यामुळे आपल्याला कसली आली आहे भीती? ही भावना वाढीस लागली आहे. अशा घटनांचे कोणालाच काही वाटेनासे झाले आहे. हे फारच भयानक आहे.रोजच्याच अशा घटनांची माणसांना सवय लागली आहे. काही वृत्त वाहिन्या तर इतक्या बिभत्स झाल्या आहेत की, त्यांना अशा बातम्या नसतील तर ते बेचैन होतात. वृत्त वाहिन्या कसल्या यांना विकृत वाहिन्याच म्हणावे लागते.देशभरातील अनेक समस्या असताना त्याकडे लक्ष न देता फालतू चर्चा दाखवायच्या आणि ते नाही मिळाले तर कुठे बलात्काराची घटना नाही का झाली म्हणून वाट पहायची. या वाहिन्यांच्या रिपोर्टरना अशा बातम्या मिळवा म्हणून आग्रह धरला जातो. काही दिवसांपूर्वी एका वाहिनीच्या नवख्या रिपोर्टरने आपल्या संपादकाला फोन केला होता की, आमच्या गावात एका महिलेवर बलात्कार झाला आहे. तर त्या संपादकाने त्या रिपोर्टरला इतके भंडावले होते की, ही माणसे आहेत का असा प्रश्न पडतो. काय वयाची होती महिला? अल्पवयीन आहे का? ती अल्पवयीन नाही म्हटल्यावर त्या संपादकाने सांगितले त्यात काय विशेष? अल्पवयीन असेल आणि तिच्यावर बलात्कार झाला तर त्यात न्यूज व्हॅल्यू आहे. काय ही असुरी भावना वाहिन्यांची? तो रिपोर्टर समजावू लागला आमच्या गावातील सरपंचाच्या मुलाने बलात्कार केला आहे, आता तरी त्यात न्यूज व्हॅल्यू आहे का? त्यावर हे संपादक महाशय म्हणाले, कुठल्या पक्षाचा आहे तो सरपंच? कोणत्या मोठ्या नेत्याच्या जवळचा आहे का? रिपोर्टर म्हणाला नाही तो सरपंच अपक्ष होता. कोणत्याच पक्षाचा नाही. स्थानिक आघाडीचा होता. आता संपादकाने त्या रिपोर्टरला शिवीच हासडली, कोणाशी तरी संबंध जोड रे त्याचा तर ती न्यूज दाखवायला मजा येईल. फालतू सरपंच काय कामाचा? आता तो रिपोर्टर हट्टाने म्हणाला, पण सर महिलेवर बलात्कार झाला आहे ही बातमी आहे. सरपंच महत्त्वाचा की बलात्कार महत्त्वाचा? आता संपादक हट्टाला पेटला. म्हणाला, किती जणांनी केला बलात्कार? सरपंचाबरोबर सगळे ग्रामपंचायत सदस्य होते का? तसा रिपोर्टर म्हणाला, नाही एकानेच बलात्कार केला. आता संपादक उसळून म्हणाला, मूर्ख आहेस. आजकाल सामूहिक बलात्कारांचा ट्रेंड चालला आहे. किरकोळ बलात्काराची बातमी देऊन आमचा टीआरपी घसरवायचा नाही मला. असे म्हणून फोन कट केला. केवढी ही असुरी प्रवृत्ती म्हणायची? म्हणजे देशभर या घटनांमध्ये इतकी वाढ झाली की, त्याचे काही वाहिन्यांना वाटेनासे झाले.ही प्रवृत्ती का वाढली? तर आमच्याकडे गुन्हेगारांना शिक्षा होत नाही. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतो. हे थांबले पाहिजे. यासाठी आज देश संपूर्ण वाट पाहतोय. हा लेख वाचकांच्या हातात पडेपर्यंत त्या नराधमांना फाशीची शिक्षा झालेली असेल असे आपण अपेक्षित धरूया. कारण आता तरी या शिक्षेची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: