सध्या देशात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे सगळीकडे साथीच्या रोगांची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर चित्रपटातील रोगराई यावर नजर टाकली तर तत्कालीन चित्रमाध्यमांतून ते विषय कसे हाताळले गेले होते, हे लक्षात येईल. काही रोग हे परंपरागत असतात. त्याचा वापर आपल्याकडे कथानकात घुसडण्यासाठी केला जातो, पण योग्य वेळी योग्य रोगांची निवड करणे हे चित्रपट माध्यमांचे वैशिष्ट्य ठरलेले आहे.१९७० च्या दशकात हृषिकेश मुकर्जी यांचा तुफान गाजलेला चित्रपट आला, तो म्हणजे ‘आनंद’. तत्कालीन सुपरस्टार राजेश खन्ना आणि भावी सुपरस्टार अमिताभ बच्चन हे या चित्रपटाचे आकर्षण होते. त्यात राजेश खन्ना हा कॅन्सरग्रस्त तरुण दाखवला आहे. त्यापूर्वी कोणत्याही चित्रपटात कॅन्सर हा रोग दाखवला गेला नव्हता, पण त्यानंतर कॅन्सर, ट्यूमर हे चित्रपटात येऊ लागले, पण चित्रपटातील कॅन्सरचा जनक हा आनंद म्हणावा लागेल. त्यानंतर अनेक दशके ही साथ अनेक हिंदी चित्रपटांत पसरली. ‘मजबूर’ या चित्रपटात अमिताभ बच्चनना ब्रेन ट्यूमर झालेला दाखवला आहे. ‘प्रेम तपस्या’ चित्रपटात जितेंद्रला फुप्फुसाचा कॅन्सर झाल्याचे दाखवले आहे. या कॅन्सरच्या रोगातून अनेक दिग्गजांनी आपले प्राण ओतले आहेत. ‘एक ही रास्ता’ चित्रपटात शबानाला कॅन्सर झाला आहे. मग प्रेमाचा त्रिकोण आल्यावर एकाला कॅन्सर होऊन त्याचा मृत्यू घडवणे हे कथानकाचे बलस्थान ठरू लागले. मग तो नायक, नायिका डोळ्याभोवती काळे वर्तुळ, खंगत जात खोकताना दाखवून एके दिवशी प्रेक्षकांना रडवत मरून जायचा. ‘मांग भरो सजना’, ‘अर्पण’ यासारख्या अनेक जितेंद्रपटांत कधी रेखा, कधी रिना रॉय, कधी मोसमी चटर्जी यांना कॅन्सरने खपवले आहे. कॅन्सरची ही साथच चित्रपटात अनेक वर्षे टिकली. कॅन्सर हा भयंकर रोग आहे. त्यावर खुद्द सुनील दत्तने ‘दर्द का रिश्ता’ हा चित्रपट काढला होता. पत्नी नर्गिसचा कॅन्सरने मृत्यू झाल्यामुळे त्याने तो विषय घेऊन चित्रपट काढला होता. यात सुनील दत्तची पत्नी रिना रॉय दाखवली आहे. तिचा मृत्यू कॅन्सरने होतो. त्यानंतर त्यांची मुलगी असते. ती म्हणजे अभिनेत्री खुशबू दाखवली आहे. तिलाही कॅन्सर झालेला दाखवला आहे. कॅन्सरग्रस्त रुग्णांचा विषय घेऊनच तो चित्रपट काढला गेला होता. ही कॅन्सरची साथ दीर्घकाळ चालली होती.कॅन्सर येण्यापूर्वी चित्रपट क्षेत्रात टीबी हा रोग दाखवला जात असे. ‘अमर अकबर अँथनी’ चित्रपटात प्राणची बायको भारती म्हणजे निरुपा रॉयला टीबी होतो, म्हणून ती घर आणि तिन्ही मुलांना वाºयावर सोडून निघून जाते, पण मनमोहन देसार्इंच्या चित्रपटात चमत्कार घडतात. मग तिचे झाड पडून डोळे जातात, ती परत येते, डोळे परत येतात, पण त्यात तो टीबी कुठे गायब होतो हे चित्रपटात नंतर कधीच पुढे येत नाही. अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना यांचा आणखी एक चित्रपट म्हणजे ‘नमक हराम’. मालक-कामगार संबंधावर असलेल्या या चित्रपटात कामगारांमधला एक असलेल्या रझा मुरादला टीबी झालेला दाखवला आहे.कॅन्सर आणि टीबीच्या तुलनेत जास्त काळ आणि एव्हरग्रीन असा रोग म्हणजे हृदयविकार. या रोगाने चित्रपटसृष्टीची भरपूर साथ दिली. धक्का बसला की गेला तो अभिनेता. यात श्रीराम लागू, ओम शिवपुरी, मदन पुरी, अमरिश पुरी, ओमप्रकाश अशा अनेकांनी रुपेरी पडद्यावर हृदयविकाराने कधी अंथरुण धरले, तर कधी प्राण गमावला आहे.मराठी चित्रपटातही अनेक प्रकारचे रोग आणि रोगांवर चित्रपट येऊन गेले आहेत. २२ जून १८९७ सारख्या चित्रपटांतून ऐतिहासिक कथानक असल्याने तत्कालीन प्लेग या रोगाची पार्श्वभूमी घेतलेली आहे. त्यापूर्वी १९६०च्या दशकात संपूर्ण देशभरात कुष्ठरोगाची भीती होती. त्यामुळे ‘स्वप्न तेच लोचनी’ या गाजलेल्या चित्रपटात कुष्ठरोग आनुवंशिक नाही हा संदेश देताना चंद्रकांत गोखले या अभिनेत्याला कुष्ठरोग झाल्याचे दाखवले आहे.बाकी तसे सर्दी, खोकला, ताप असल्या किरकोळ आजारांना चित्रपटात स्थान कोणी दिलेले नाही. गेल्या वीस वर्षांत अनेक आजार आले आहेत, त्यामध्ये डेंग्यू, स्वाइन फ्ल्यू, बर्ड फ्ल्यू असे अनेक रोग आले, पण या रोगांना चित्रपटांत काम मिळालेले नाही. अर्थात, भविष्यात हे रोग पडद्यावर येतील किंवा कदाचित कोरोनालाही रुपेरी पडद्यावर स्थान मिळू शकते.
बुधवार, १८ मार्च, २०२०
चित्रपटातील रोगराई!
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा