- बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हेच सध्याच्या परिस्थितीत पंतप्रधानपदाचे योग्य उमेदवार आहेत असे वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. त्यामुळे आगामी निवडणुकीत शरद पवार हे कुठेच असणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे. २०१४ ला मोदी लाटेत आपला टिकाव लागणार नाही हे लक्षात आल्यावर पवारांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ते राज्यसभेवर गेले. आता आपला करीष्मा संपला आहे हे त्यांनी ओळखले. कारण हातात ८ खासदारांचे संख्याबळ असतानाही ते पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत असे बोलले जात होते. त्याचे कौतुकही होत होते आणि टिंगलही होत होती. पवार समर्थक याबाबत देवेगौडांचे उदाहरण देत असत. देवेगौंडांकडे पवारांइतकेही संख्याबळ नव्हते, त्यामुळे तसाच काही चमत्कार घडेल या अपेक्षेत ते होते. तर त्यांचे विरोधक राहुल गांधी पवारांनी जास्त जागा मिळवल्या तर त्यांना पंतप्रधान करू असे म्हणून ज्यांना निवडणुकीसाठी उभे करायला डझनभर उमेदवार मिळत नाहीत ते कसे काय पंतप्रधान होणार असे बोलुन पवारांची टर उडवत होते. पण तरीही पवार कायम पंतप्रधानपदाच्या रेसमध्ये असायचे. आता मात्र त्यांनी एकदम माघार घेतलेली या वक्तव्यावरून स्पष्ट होते.
- नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाची शपथ घेऊन येत्या २६ मे रोजी दोन वर्षे पूर्ण होतील. त्यांच्या पाठीशी एकटया भाजपाचे २८२ आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे ३३६ खासदार आहेत. म्हणजे आणखी किमान तीन वर्षे त्यांच्या सरकारला धोका नाही. त्यानंतरच्या निवडणुकीतही मोदींना पुन्हा संधी मिळू शकते असे आतापर्यंतची या सरकारची कामगिरी पाहता म्हणण्यास वाव आहे. लोकांनी सरकारला डोक्यावर घेऊन नाचावे असे काही घडले नसले तरी पायदळी तुडवावे किंवा यांना आता घरी हाकललेच पाहिजे असे जनमत तयार व्हावे असे काहीच या सरकारने केलेले नाही. त्यामुळे उद्या निवडणुका झाल्या किंवा २०१९ मध्येही झाल्या तरी मोदी सरकारच्या काही जागा कमी होतील. पण त्यांची सत्ता कायम राखली जाईल, अशीच आताची शक्यता आहे. त्यामुळे आजची परिस्थिती, आपले वय आणि मिळणारी संधी पाहता आता आपले सगळे संपले हे शरद पवारांनी ओळखले. पण तरीही मत व्यक्त करायचे म्हणून जाता जाता मोदींना पर्याय कोण ठरू शकतो त्याचे नाव घेतले. त्यामुळेच, सद्य परिस्थितीत बिगरभाजप पक्षांनी भाजपविरोधी आघाडी स्थापन करायची झाल्यास नितीश कुमार हे पंतप्रधानपदाचे पहिले दावेदार असतील, असे वक्तव्य केले. कॉंग्रेस नेतृत्वाला बाहेर काढण्याचा हा त्यांचा डाव मात्र यातून स्पष्ट झालेला दिसून येतो.
- अलीकडेच नितीश कुमार यांनी बिगरभाजप पक्षांची महाआघाडी स्थापन करण्याचे सूतोवाच केले होते. या पार्श्वभूमीवर पवार यांचे हे वक्तव्य नव्या राजकीय समीकरणांच्यादृष्टीने सूचक समजले जाऊ शकेल. भविष्यात बिगरभाजप पक्षांची आघाडी अस्तित्वात आल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसचा त्याला पाठिंबा असेल, असेही पवार म्हणाले आहेत. नितीश कुमार यांची पवारांनी तारीफ करतानाच कॉंग्रेसकडे पंतप्रधानपदासाठीचा चेहरा नाही, असे म्हणत पवारांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राहुल गांधी नेतृत्त्व करत असलेल्या सध्याच्या कॉंग्रेसपेक्षा सोनिया गांधींच्या नेतृत्त्वाखाली कॉंग्रेस पक्ष उजवा असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.
- राहुल गांधी पवारांच्या तुलनेत तर खूप नवखे आहेत. त्यांचे नेतृत्व पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने मान्य करावे असे कोणीच म्हणणार नाही. परंतु २०१९ मध्ये सर्व विरोधी पक्षांचे कडबोळे सत्तेच्या जवळ पोहचले तर राहुल गांधी पंतप्रधान होऊ नयेत आणि त्यांच्या हाताखाली आपल्याला काम करण्याची वेळ येऊ नये या भावनेतून पवारांनी नितीश कुमार यांच्या नावाला पसंती दर्शवली असेल तर त्यात चुकीचे काही नाही. पण या जरतरी गप्पांना तसा काहीच अर्थ नाही. राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणणेच बावळटपणाचे ठरेल.
- आजपर्यंत विरोधी पक्षांमध्ये सोनिया गांधी सर्वमान्य नेत्या आहेत. त्या सगळ्यांना सोबत घेऊन जातात. २०१४ मध्ये झालेली लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीने कॉंग्रेसशी आघाडी करुन लढवली होती. मात्र मोदी लाटेत राष्ट्रवादीचे चारआणि कॉंग्रेसचे केवळ दोन खासदार निवडून आले होते. त्यामुळे महाराष्ट्रात आपणच एक नंबर हा त्यांना आनंद मिळाल होता. अर्थात हा फारच मोठा विनोदही होता. मात्र मोदी लाट नसतानाही राष्ट्रवादीने स्वबळावर निवडणूक लढवली तेव्हा या पक्षाला फार यश मिळालेले नाही. इतर राज्यात तेथील प्रादेशिक पक्षांनी कधी ना कधी स्वबळावर सत्ता स्थापन केली आहे. तसे यश महाराष्ट्रात राष्ट्रवादीला अजूनपर्यंत तरी एकदाही मिळालेले नाही. त्यामुळे कॉंग्रेसच्या हाताला लकवा मारला असला तरी त्याचे बोट राष्ट्रवादी सोडू शकत नाही. तरीही लोकसभा निवडणुकीला आणखी तीन वर्षे अवकाश असताना पवार आताच पंतप्रधानपदाबाबत बोलू लागले आहेत. पवारांची स्वतःची पंतप्रधानपदाची महत्वाकांक्षा असली तरी आकडयांचे गणित आपल्या बाजूने नाही याची जाणीव त्यांना असते. त्यांच्या नावाची चर्चा मध्यंतरी राष्ट्रपती पदासाठी सुरु होती. कोणालाही राष्ट्रपती व्हायचे असेल तर नितीश कुमार यांचा पाठिंबा महत्वाचा ठरेल एवढया जागा त्यांच्या आघाडीने बिहारमध्ये जिंकल्या आहेत. त्यामुळे नितिशकुमारांच्या पंतप्रधानपदापेक्षा पवारांच्या राष्ट्रपतीपदासाठी हे सगळे आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
शुक्रवार, ६ मे, २०१६
राष्टपतीपदाच्या पाठींब्यासाठी
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा