कॉंग्रेसला सध्या प्रसिद्धीची गरज आहे. मग ती कोणत्याही माध्यमातून सकारात्मक नकारात्मक असेल तरी चालेल, पण चर्चेत राहिले पाहिजे. नाहीतर कॉंग्रेस लोकांच्या विस्मरणातून जाईल याची भिती वाटते आहे. त्यामुळे कोणत्याही घटनेवर आपली प्रतिक्रीया दिलीच पाहिजे, हा सध्या कार्यक्रम आहे. अशा कार्यक्रमात एक चांगली संधी ऋषी कपूरने दिली आणि कॉंग्रेस नेत्यांच्या हातात आयतेच कोलीत सापडले. त्यामुळे काल सोलापूरात एका स्वच्छतागृहाला ऋषी कपूरचे नाव देण्याचा आणि त्याचा निषेध करण्याचा कार्यक्रम कॉंग्रेस कार्यकर्त्यांना करता आला. आता त्याचे अनुकरण सर्वत्र होईल यात शंका नाही. पण ऋषी कपूरचे नेहरू गांधी घराणे आभार मानत असतील नक्की.ट्विटर हे समाजमाध्यम प्रसिद्ध आहे. राजकीय नेते असो, सिनेकलाकार, सामान्य माणसे त्यातून व्यक्त होत असतात. व्यक्त होणे चुकीचे नाही. पण व्यक्त होताना काहीतरी भान ठेऊनच व्यक्त झाले तर त्याला अर्थ असतो. काही दिवसांपूर्वी अभिनेता ऋषी कपूर यांनी ट्विटरवर केलेली बडबड ही कॉंग्रेस नेत्यांना चांगलीच झोंबली. एरव्ही त्यांनी दुसर्या कोणाच्या बाबत अशी बडबड केली असती तर त्याची दखलही घेण्याची आवश्यकता नव्हती. पण त्यांनी थेट नेहरू-गांधी कुटुंबावर केलेल्या शरसंधानामुळे त्यांच्या या ‘टिवटिवीची’ दखल घ्यावीच लागते. कॉंग्रेसवर टिका केली की झालाच तो लगेच नमोभक्त असे समजायचे सध्याचे दिवस आहेत. त्यामुळे लगेच पद्म पुरस्कारासाठी ही टिका केल्याचे कॉंग्रेस वर्तृळातून बोलले गेले. भाजपा, संघ, शिवसेना यांची गांधी-नेहरू घराण्याविषयीची चीड अनेकांना माहीत आहे. अनेकदा त्या पक्षातील बोलभांड मनातली मळमळ व्यक्त करीत असतात. त्यात आता ऋषी कपूरची भर पडली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत भरीव योगदान दिले असे काही ऋषी कपूरचे कर्तृत्व नाही, शोमन राज कपूरचा मुलगा अशीच त्यांची ओळख आहे, वडिलांच्या वलयातून ही व्यक्ती अद्यापही बाहेर पडलेली नाही, अशी लगेच कॉंग्रेस नेत्यांकडून टिका सुरू झाली. पण गम्मत इथेच आहे जी कॉंग्रेस नेहरू गांधी घराण्यातून बाहेर पडू शकत नाही ती ऋषी कपूरवर घराणेशाहीची आणि राजकपूरचा मुलगा अशी ओळख असल्याची टिका करते आहे. कॉंग्रेसमध्ये कोणाला स्वतंत्र ओळख आहे? राहुल गांधी केवळ राजीव गांधींचा मुलगा म्हणून तर सोनिया गांधी या राजीव गांधींच्या पत्नी म्हणून ओळखल्या जातात. त्यांचे कर्तृत्व तरी कुठे होते? पण लगेच कॉंग्रेस कार्यकर्ते ऋषी कपूरच्या कर्तृत्वावर टपले.वास्तविक राजकपूरच्या तीन मुलांपैकी ऋषी कपूरनेच दीर्घ काळ कारकीर्द केलेली आहे. रणधीर कपूर राजकपूरच्या स्टाईलमध्ये अडकलेला असताना आणि राजीव कपूर हा शम्मीची नक्कल करत असताना स्वत:ची छाप आणि शैली ऋषीनेच निर्माण केली. वेगळी वाट धरली. पण बापाचे आणि आजोबांचे नाव सांगून त्या इतिहासावर मते मागणार्या राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाला वाटते ऋषी कपूर आपल्यासारखाच केवळ बिनकामाचा आहे. लगेच त्याला भाजपचा कार्यकर्ता म्हणून बोलले गेले. हाती फारसे काम नसेल तर माशा मारायला बराच वेळ मिळतो, ऋषी कपूरच्या बाबतीतही तसेच म्हणावे लागेल, असे कॉंग्रेसने ऋषी कपूरवर टिका करताना म्हटले आहे. पण त्याच कॉंग्रेस कार्यकर्त्यांना आपले युवराज किती निकम्मे आहेत आणि त्यांच्या हातात माशी मारण्याचेही बळ नाही हे कळत नाही. खासदार असूनही मध्येच वेड्यासारखे बेपत्ता होतात, अधिवेशनाच्या काळातही गैरहजर राहतात या निकम्मेपणाकडे कॉंग्रेस का दुर्लक्ष करते हे अनाकलनीय आहे. वास्तविक पाहता राज कपूर हे पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांचे चांगले समर्थक होते. याची जाणीव कदाचित कॉंग्रेस कार्यकर्त्यांना नसावी. राज कपूर हे तर समाजवादी गांधीवादाने भारलेले होते. त्यांच्या चित्रपटातून कळत नकळत त्याचे शेड्स उतरलेले आहेत. भारत व रशिया यांच्या मैत्रीपर्वाचा सर्वात जास्त फायदा राज कपूर यांना झालेला आहे. त्यामुळेच रशिया येथे त्यांच्या नावाचे एक स्क्वेअर आहे याची माहिती कॉंग्रेस कार्यकर्त्यांना नसावी किंवा असली तरी ते जाणूनबुजून त्याकडे डोळेझाक तरी करीत असावेत.कॉंग्रेसविरोधात काही बोलले तर त्याला राजाश्रय लाभतो. तो अनुपम खेर, गजेंद्र चौहान यांना लाभला आहे. त्याच होडीत आपल्याला बसता येईल का, याची चाचपणी करण्यासाठीही ऋषी कपूर यांनी हे बेताल वक्तव्य केल्याची शक्यता कॉंग्रेसने व्यक्त केली आहे. पण राजकारणात जसे गांधी नेहरू घराणे हे मोठे आहे, त्याचे प्रस्थ बडे आहे तसेच हिंदी सिनेसृष्टीत कपूर घराण्याचे आहे. त्यामुळे राहुल गांधी काही बरळले तर ते शहाणपणाचे आणि ऋषी कपूरने काही मत प्रदर्शन केले की ते चुकीचे असे म्हणणे याचा अर्थ कॉंग्रेसला लोकशाही मान्य नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य नाही असाच होतो.
सोमवार, ३० मे, २०१६
ऋषी आणि राहुल
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा