रविवार, १५ मे, २०१६

कोण कोणाचे अनुकरण करते?


  •  अर्धा मे महिना संपून गेला. पुण्याचे हवामान खाते अंदाज जाहीर करीत आहे की, यंदा सव्वापट पाऊस पडेल. आज दुसरा अंदाज आला आहे की केरळात मान्सून उशीरा येणणार. नेमके खरे काय आणि खोटे काय हे समजत नाही. पण पावसाचे अंदाज जाहीर होऊ लागलेत.. अवकाळी पाऊस कोसळू लागला आहे. सातारसारख्या ठिकाणी नुसतेच ढग जमा होत आहेत आणि हवा गरम होत आहे, पण अंदाज काही कुणाचाच लागत नाही. अगदी आपल्या सरकारसारखेच हवामान खाते झुलवते आहे. अच्छे दिन येणार प्रमाणे सव्वापट पाऊस पडणार अशी घोषणा केली आणि पुन्हा नवा अंदाज व्यक्त केला गेला. 
  •   आतापर्यंत सरकार जे शब्द वापरत होते तो शब्द होता, ‘टंचाईग्रस्त परिस्थिती’ किंवा ‘टंचाईसदृश्य स्थिती’ या शाब्दिक छळामुळे सरकारची जबाबदारी पूर्णपणे बाजूला पडत होती. दुष्काळ म्हटल्यानंतर सरकारवर काही निश्चित जबाबदारी येते. अन्नधान्य, पाणी आणि चारा पुरवणे या गोष्टींची जबाबदारी आता सरकारवर पडली आहे. सरकार चलाख आहे. जे कॉंग्रेसने केले तोच गाडा हे सरकार हाकत आहे. दुष्काळ आणि टंचाईबाबत संभ्रम निर्माण केला जात आहे. याबाबतची वास्तवता ज्येष्ठ शेकाप आमदार गणपतराव देशमुख यांनी तीन वर्षापूर्वीच दाखवून दिली होती. हे वास्तव फडणवीस सरकारला माहित असतानाही शाब्दीक खेळात हे सरकार का फसवते आहे हा प्रश्‍न आहे.
  •    आधीच्या सरकारने पाऊस यायच्या तोंडावरच दुष्काळ जाहीर करून टाकला आहे. अजून १५ ते २० दिवस अडचणीचे आहेत. मे अखेपर्यंत परिस्थिती अवघड आहे. आता दोन दिवसांपूर्वी सरकारने २९ हजार ६०० गावे दुष्काळी म्हणून जाहीर केली आहेत. पाण्यासाठी सरकारने नेमके काय केले? हे सरकारलाच अजून सांगता येत नाही. टँकरवाल्यांनीच सरकारला अर्धे अधिक लुटले आहे. टँकर किती चालू आहेत, हेच सरकारला माहीत नाही.
  • पूर्ण पाणी भरून टँकर जातो की नाही, त्याचे वाटप होतेय की नाही, कोणाला कशाचा काहीही पत्ता नाही. पण लातूरला रेल्वेने पाणी पुरवल्याचे भांडवल आता शिवसेना करते आहे तर भाजप असेच काही बोलत आहे. सरकारची ही धूळफेक म्हणजे हवामान खात्याच्या अंदाजालाही लाजवेल अशीच आहे.
  • आज सातारा सांगली जिल्हयतील कृष्णा-कोयना नद्यांच्या संगमावर रखरखाट आहे. पण कोयनेेचे पाणी कर्नाटकला पाठवून इथल्या लोकांना खूप पाणी आहे असे भासवले गेले. या स्थितीमध्ये लातूरला ट्रेनने पाणी पुरवण्याचा प्रयोग झाला. २९ हजार ६०० गावांत दुष्काळ असताना पाणी वाटपाचा समान प्रयत्न का झाला नाही? 
  •  सरकारने पाणी उपसा करण्यावर बंदी घातली. पण कधी ही बंदी घातली.. तर आता १२ मे रोजी.  तिथपर्यंत जेवढे उपसायचे होते तेवढे पाणी उपसून झाले. दोन महिने अगोदर हा निर्णय घेतला असता तर किती फरक पडला असता? आता विहिरीतही पाणी नाही, नदीतही पाणी नाही आणि जमिनीतही पाणी शिल्लक राहिलेले नाही. उपशावर बंदी घालून फायदा काय? हवामान खात्यासारखाच हा चकवा आहे.  हवामान खाते म्हणते आहे, ‘भरपूर पाऊस पडणार’.. दोन दिवसात पाऊस केरळात उशिरा येणार असे जाहीर केले जाते. तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती केली असे आम्ही सांगतो. आम्हाला बरोबर अंदाज व्यक्त करता येत नाही?
  •    आज केवळ २९ हजार ६०० गावेच नव्हे तर महाराष्ट्रातील सगळीच गावे आणि शहरे पावसाकडे डोळे लाऊन बसली आहेत. हवामान खाते सांगत आहे की, ‘मराठवाडयात २४ टक्के पाऊस जादा पडणार, विदर्भात ३१ टक्के जादा, कोकणात २४ टक्के जादा पडणार आणि बाकी ठिकाणी २४ टक्केच जादा पडणार’ ही आकडेवारी पाहिल्यानंतर घामाने भिजलेले लोक त्या कोसळणार्‍या जलधारेत कधी भिजू असे महाराष्ट्राला होऊन गेले आहे. सामान्य माणसाची अशी अपेक्षा आहे की, अगदी सव्वापट पाऊस नाही पडला तरी चालेल. नेहमीच्या सरासरीत पडला तरी पुरेसा आहे. पण सरकार आणि हवामान खात्यातील चुकीचे अंदाज फेकण्याच्या चढाओढीने आता जनता अधिकच व्याकूळ होणार असे दिसते. 
  • महाराष्ट्रातील लाखो घरांमध्ये आज हंडा, दोन हंडे पिण्याचे पाणी मिळवण्याकरिता ही जी वणवण आहे ती आता बघवत नाही. गेली पाच वर्षे आषाढ कोरडा गेलेला आहे. खरा पाऊस कोसळतो तो जुलैमध्ये. पण हवामान खात्याचा अंदाज नेमका कधी बरोबर येणार हा सामान्यांना प्रश्‍न पडला आहे. म्हणजे दोन चार दिवसांपूर्वी मान्सून खूप लवकर येणार, २७ टक्के जास्त पडणार असा अंदाज वर्तवल्यावर आज पुन्हा केरळात सात दिवस उशिरा पाऊस येणार हे सांगून नागरिकांना शिव्यांचा पाऊस पाडायला कारणीभूत केले. त्यामुळे सरकार हवामान खात्याचे अनुकरण करते की हवामान सरकारचे? अच्छे दिन आनेवाले है, पाऊस जास्त पडणार आहे या विधानांमधील अविर्भाव दोघांचा सारखाच.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: