- सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात चर्चेतील व्यक्ती म्हणजे आमचे नाथाभाऊ. अर्थात महसूलमंत्री आणि मुख्यमंत्रीपदाचे दावेदार एकनाथ खडसे. एकनाथ खडसे यांच्यावर सध्या आरोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. दर चार आठ दिवसांनी एक याप्रमाणे महसूलमंत्र्यांवर आरोप होऊ लागले. जमिनीच्या व्यवहारापासून दाऊदशी असलेले कथित संबंध अशी आरोपांची व्याप्ती आहे. आरोपही असे आहेत की ठामपणे निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र देता येत नाही आणि खडसे दोषी आहेत असेही ठामपणे म्हणता येत नाही. आरोप करणार्यांच्या वक्तव्यांमध्ये विसंगती आहे. आणि त्याबाबत केलेल्या खडसेंच्या खुलाशामध्येही विसंगती आहे. यामुळेच आरोप खरे की खोटे यापेक्षा आरोप खडसेंवरच का होत आहेत हा प्रश्न अधिक महत्त्वाचा झाला. परंतु या सर्व प्रकारामुळे नाथाभाउंची फार मोठी गोची झालेली आहे हे नक्की.
- हा प्रश्न राजकीय आहे. पक्षांतर्गत राजकारणाचे खडसे बळी ठरत आहेत की ते खरोखरच भ्रष्ट आहेत, असा संभ्रम नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. वरून कितीही सोवळ्याचा आव आणला तरी देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात सर्वकाही आलबेल नाही. गटबाजीचे, दबावाचे राजकारण सुरू आहे. किंबहुना कॉंग्रेस प्रमाणेच भाजप हा गटातटांचा आणि गटबाजी करणारा पक्ष झालला आहे. तसे ते कोणत्याही राजकीय पक्षात असतेच. त्यात खडसे हा काम करणारा माणूस. स्वच्छ प्रतिमेच्या प्रेमात पडणारा. प्रसंगी नियम झुगारून देऊन काम करणारा. फडणवीस मंत्रिमंडळात खरोखर कोणी काम करीत असेल तर ते खडसे, असे कॉंग्रेस राष्ट्रवादीचे आमदारही सांगतात. नारायण राणे यांनीही एकमेव एकनाथ खडसे हे लायक मंत्री आहेत असे म्हटले होते. स्वच्छ प्रतिमा जपणारा माणूस सहसा आरोपांच्या कचाट्यात सापडत नाही. कारण तो मुळात कामच करीत नसल्यामुळे त्याच्यावर आरोप करण्याची संधी मिळत नाही. स्वच्छ राहूनही धडाक्याने काम करणे बरेच कठीण असते. काम करवून घेताना कुठे ना कुठे नियमांशी तडजोड करावीच लागते. एकदा तडजोड केली की फट राहतेच त्या फटीतून आरोप करता येतात.
- गेल्या काही वर्षांत आरोप करण्याची एक संस्कृती तयार झाली. त्याला प्रसारमाध्यमांनी अधिक फोडणी घालून ती संस्कृती खमंग केली आहे. खैरनार हे त्याचे जनक आहेत असे म्हणतात. आप या पक्षाने तर त्याचे एक शास्त्रच बनवले. अण्णा हजारेंनीही तेच केले. अंजली दमानिया यांचा तोच धंदा आहे. हाती कोणताही ठोस पुरावा नसताना दुबळ्या पुराव्यावर सटासट आरोप करीत समोरच्या व्यक्तीला हैराण करून सोडायचे. प्रकरण न्यायालयात गेले तरी निकाल लागण्यास कित्येक वर्षे जातात. तोपर्यंत आरोप झालेला माणूस भांबावलेला राहतो. आरोप करीत असतानाच पोलिस, न्यायव्यवस्था, प्रसारमाध्यमे या सर्वांबद्दल अविश्वासाचे वातावरण तयार करायचे. उलटसुलट विधाने करून सरकारी यंत्रणांबद्दल संशय निर्माण करायचा अशी या आरोपशास्त्रातील काही सूत्रे आहेत. ही सूत्र केजरीवाल यांनी विकसीत केली आहेत.
- पण अशाच प्रकाराने खडसे अडचणीत आले आहेत. सत्ताधारी पक्षातील असल्यामुळे त्यांची चौकशी ही होणे अपरिहार्य आहे. पण या चौकशीत काहीही निष्पन्न झाले तरी नाचक्की ठरलेली आहे. पोलिसांनी तपास केला तरी तो दबावाखाली केला असा आरोप होत राहील. न्यायालयाच्या देखरेखीखाली केला तरी आरोप करणार्यांचे समाधान होत नाही हे नरेंद्र मोदींवरील अनेक आरोपांतून देशाच्या लक्षात आले आहे. निर्दोषत्व सिद्ध होईपर्यंत खडसेंनी मंत्री राहू नये असे सांगण्यात येते. पण कोणीही आरोप केले म्हणून पद सोडणे हे योग्य नाही. विधिमंडळात जबाबदार विरोधी पक्षाकडून आरोप झाले असते तर राजीनामा देणे योग्य ठरले असते. अडवाणी वा शरद यादव यांनी तसे केले होते. इथे तसे झालेले नाही. पुण्यातील जमिनीचा व्यवहार खडसे यांनी उघडपणे केला आहे. तो व्यवहार अद्याप पूर्ण झालेला नाही. हा व्यवहार होण्यासाठी पदाचा गैरवापर करून खडसेंनी नियमाला बगल दिली असे अजून तरी दिसत नाही. आरोपांच्या चक्रव्यूहातून निर्णायकपणे बाहेर पडण्याचा मार्ग सध्या तरी खडसेंकडे दिसत नाही. खडसे विरोधी पक्षात असताना त्यांच्याबद्दल शरद पवार यांनी सूचक वक्तव्य केले होते. ते जमीन व्यवहारांशी संबंधितच होते. खडसेंवरील ताजे आरोपही जमिनीसंबंधीचे आहेत अंडरवर्ल्डलाही जमिनीच्या व्यवहारातच रस असतो. अशा परिस्थितीत आरोपांतील खरे-खोटे काय हे विश्वासार्ह रीतीने सांगण्याचे कठीण काम एकतर खडसे यांना किंवा फडणवीस सरकारला करावे लागेल. चौकशीची थेट मागणी करून खडसे आपल्या परीने प्रयत्न करीत आहेत, पण पोलिसांची उलटसुलट वक्तव्ये पाहता या चौकशीवर किती जणांचा विश्वास बसेल याबद्दल शंका आहे. पण यामुळे खडसे पुरते अडचणीत सापडले आहेत. त्यांची राजकीय कारकीर्द तशी संपुष्टात येण्याच्या बेतात आहे.
मंगळवार, ३१ मे, २०१६
नाथाभाऊंची गोची
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा