- सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल दवे, न्यायमूर्ती एस. के. सिंग आणि ए. के. गोयल यांच्या खंडपीठाने देशातील वैद्यकीय प्रवेश हे ‘नीट’च्या माध्यमातून घेण्यात यावेत, असा निकाल दिला. या निर्णयामुळे देशातल्या सर्व राज्यांतील एमबीबीएस, बीडीएस आदी अभ्यासक्रमांचे प्रवेश हे ‘नीट’च्या माध्यमातून करणे बंधनकारक ठरणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात दाद मागण्यासाठी राज्य सरकार आता राष्ट्रपतींकडे धाव घेण्याचे बोलले जाते. त्यामुळे राष्ट्रपती आता गुणवंत विद्यार्थ्यांचे हित पाहतात की भांडवलदार शिक्षणसंस्थांचे हित पाहतात हे दिसून येईल. न्यायालयाच्या या निर्णयावर कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश आदी सरकारकडूनही कडाडून विरोध सुरू झाला. कोणत्याही विद्यार्थ्यांनी आमच्यासाठी नीटचीच परीक्षा घ्या, अशी मागणी केली नव्हती. ती मागणी होती केवळ एका संस्थेची. त्यामुळे डिम्ड किंवा अभिमत विद्यापीठांच्या हितासाठी निर्णय घेणे चुकीचे आहे. ज्यांनी वैद्यकीय शिक्षण महाग केले, ज्यांच्यामुळे वैद्यकीय सेवा महागल्या त्याला आळा बसण्यासाठी आता गुणवंतांना संधी मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी हा निर्णय योग्यच आहे.
- डिम्ड आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांत वैद्यकीय प्रवेशासाठी मोठा गैरव्यवहार चालतो, त्याला अंकुश बसावा यासाठी ‘नीट’ घ्यावी, अशी एका संस्थेची मागणी होती. त्या संस्थेचेही यासाठी अभिनंदन केले पाहिजे.
- नीटचा सर्व अभ्यासक्रम हा केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळाच्या म्हणजेच सीबीएसईच्या अभ्यासक्रमावर आधारित असतो. राज्यातील मुलांना या अभ्यासक्रमाची फारशी माहिती नसते. त्यामुळे यंदा ज्या विद्यार्थ्यांनी राज्य सीईटीची तयारी केली, त्यांना नीटचे आव्हान पेलणे आणि तेही येत्या २४ जुलै रोजी दुसर्या टप्प्यापर्यंत कसे शक्य होईल, हा खरा प्रश्न आहे. पण तशी मुदतही काही कमी नाही. आव्हाने पेलणे हे फार महत्वाचे आहे, त्याची सवय विद्यार्थ्यांना आत्तापासूनच लागली पाहिजे.
- सर्वोच्च न्यायालयात ‘चैतन्य’ नावाच्या संस्थेने खासगी वैद्यकीय महाविद्यालये, डिम्ड विद्यापीठांमध्ये वैद्यकीयच्या प्रवेशामध्ये होणार्या भ्रष्टाचार आणि कोटयवधींच्या उलाढालींची माहिती देत यासाठी ‘नीट’ची ही परीक्षा या प्रवेशासाठी घ्यावी, अशी मागणी केली होती. त्याला कडाडून विरोध राज्य सरकार आणि खाजगी विद्यापीठांनी केला. पण न्यायालयाने योग्य असाच निर्णय दिलेला आहे. त्याच निर्णयावर आता राष्ट्रपतींना ठाम राहून सामान्य विद्यार्थ्यांचे हित पाहिले पाहिजे. डिम्ड आणि खासगी संस्था कोटयवधी रुपये प्रवेशासाठी उकळतात. त्याला आळा घालण्यासाठी हा उपाय महत्वाचा आहे. यामुळे आता गरीब विद्यार्थीही डॉक्टर होऊ शकतील. गुणवंत विद्यार्थ्यांनाच संधी मिळेल. आज जे डॉक्टरचा मुलगा डॉक्टर हा प्रकार सुरू होता. त्यामध्ये केवळ बापकमाईवर मोठे होणारे लुटारू डॉक्टर तयार होत होते त्याला आळा बसणार आहे. म्हणून या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे.
- २०१०मध्ये मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने नीटसंदर्भात पहिले परिपत्रक काढले होते. त्यात पहिल्यांदाच देशातील वैद्यकीयचे प्रवेश हे या परीक्षेच्या माध्यमातून व्हावेत, अशी सूचना मांडली. २०११ रोजी ‘नीट’ कोणी घ्यावी, यासाठीची तयारी झाली नव्हती. यामुळे पुढे २०१२ रोजी ‘नीट’ पहिल्यांदा जाहीर झाली. तेव्हा फरक इतकाच होता की, नीटच्या या परीक्षेबाबतची माहिती २०१२ मध्ये दोन महिने अगोदरच कळली होती. त्यावेळी राज्याने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. तेव्हा ‘नीट’ काही होऊ शकली नाही. मात्र पुढे २०१३ मध्ये ‘नीट’ झाली. त्यानंतर सर्व सुरळीत होण्याच्या मार्गावर असतानाच २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ‘नीट’ रद्दबातल ठरवली.
- आता ऐनवेळी ‘नीट’ बंधनकारक केल्यामुळे केवळ क्लासेस लावलेल्या आणि सीबीएसईच्या विद्यार्थ्यांनाच याचा लाभ होईल, यात मग राज्यातील विद्यार्थ्यांनी काय करायचे? अशी ओरड होत आहे. पण त्याला काही अर्थ नाही. न्यायालयाने या गोष्टीचा विचार केला असणारच हे लक्षात घेतले पाहिजे.
- नेहमी घोषणा करून काही तरी प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात असलेले उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नीट, एआयपीएमटी आणि राज्य सीईटीची पार्श्वभूमी आणि त्यासाठी मागील सरकारने केलेल्या उपाययोजनांकडे साफ दुर्लक्ष केल्यानेच ही परिस्थिती उद्भवली. तावडे यांनी ९ मार्च २०१५ रोजी बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारितच सीईटी घेण्याचा निर्णय जाहीर करून टाकला होता. ही त्यांची पहिली मोठी चूक होती. कारण केंद्रीय सामाईक प्रवेश परीक्षा या अकरावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असतात, पण तावडे यांनी कोणत्या तरी चुकीच्या मंडळींनी दिलेला सल्ला घेतला आणि ही परीक्षा केवळ १२वीच्या अभ्यासक्रमावर घेण्याचा निर्णय घेतला. पुढे दुसरी मोठी घोडचूक त्यांनी केली की, या परीक्षेत निगेटिव्ह मार्क देण्याची अट काढून टाकली. राज्य सरकारच्या या चुकीचा फटका विद्यार्थ्यांना बसणार आहे, पण यातून गुणवंत विद्यार्थीच पुढे जातील. सरस्वती आणि लक्ष्मीच्या स्पर्धेत सरस्वती पुढे जाईल असे दिसते.
रविवार, १५ मे, २०१६
सरस्वतीचा विजय होईल
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा