सध्या महाराष्ट्राची नायिका किंवा हिरो कोणी असेल तर त्या तृप्ती देसाई आहेत. त्यांना जे हवे आहे ते त्या करत आहेत. त्यामुळे अनेकांना आनंदही मिळतो आहे. अगदी देवापासून सर्वांना वाकवण्याची ताकद या तृप्ती देसाइर्ंंमध्ये आहे. शनीदेवालाही ज्या बाईने वाकवले ती किती महान असेल हे लक्षात घेतले तर महाराष्ट्रातले सगळे प्रश्न सुटण्यासाठी तृप्ती देसाईंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद मिळाले पाहिजे.तृत्पी देसाई या जर मुख्यमंत्री झाल्या तर या राज्यातील सगळा दुष्काळ संपून जाईल. पाण्याचा प्रश्न कायमचा सुटेल. शेतकर्यांच्या आत्महत्या संपून जातील. कारण शनीदेवाप्रमाणे, कोल्हापूरच्या अंबाबाईप्रमाणे त्या पावसालाही आज्ञा करू शकतील की हे ढगांनो लवकर फुटा, बरसात करा नाही तर मी तुमची डोकी फोडेन. धडाड धुडूम करत गर्जत गर्जत सगळे मेघ कोसळल्याशिवाय राहणार नाहीत. आज खाजगी क्षेत्रात काम करणार्यांची अवस्था फार वाईट आहे. त्यांचे पगार वेळेवर होत नाहीत. दीड दीड महिना उलटून गेला तरी त्यांचे पगार अडवले जातात. त्यांना ना कधी साप्ताहीक सुट्टी असते ना कसल्या सवलती असतात. तुटपुंजे पगार देणारे मालक लोक कामगारांची छळवणूक करत असतात. हे सगळे बंद करण्याची ताकद तृप्ती देसाईंकडे आहे. म्हणजे त्या शनि मंदीरात, अंबाबाई मंदीरात जशा आडव्या पडल्या तशी प्रत्येक खाजगी संस्था, कंपन्यांना वठणीवर आणतील. पगार वेळेवर करण्यास भाग पाडतील. खाजगी असंघटीत क्षेत्रातील कामगारांचे पगार वेळेवर होण्यासाठी एखादा कायदा करतील. आज वेळेवर पगार होत नसल्यामुळे लाईट बिले, टेलिफोन बिले, कर्जाचे हप्ते, विविध खर्च नोकरदारांचे खोळंबून राहिलेले असतात. पण मालकांच्या पिळवणूकीच्या प्रवृत्तीमुळे त्यांचे वेतन अडवले जाते. एक महिन्याचे वेतन अडवून ठेवण्याची मालकांची प्रवृत्ती वाढीस लागण्याचे कारण कामगार काम सोडून जातील अशी त्यांना सतत भिती वाटत असते. पण कामगार काम सोडून जाणार नाहीत अशी शिस्त, व्यवस्था त्याठिकाणी असली पाहिजे हे मालकांना जमत नाही. त्यामुळे कामगारांचे शोषण होत असते. अशा मालकांना वठणीवर आणण्यासाठी वेळेवर वेतन देण्याचा कडक कायदा तृप्ती देसाई करतील. त्यासाठी त्यांना मुख्यमंत्री केले पाहिजे. एखादी हडळ डोक्यावर बसते आणि सर्वांना वाकवते त्याप्रमाणे तृप्ती देसाई या महाराष्ट्रातील समस्यांच्या मुळाशी असणार्यांच्या मानगुटीवर बसून काम करून घेतील. कारण आपल्याकडे कामगार विषयक कायदे आहेत, कामगार सुरक्षेचे नियम आहेत. पगाराबाबतचे कायदे आहेत. पण हे सगळे कायदे आणि नियम सरकारी बाबूंनी मालकांच्या पैशावर ताव मारत गुंडाळून ठेवले आहेत. कधी कुठला लेबर ऑफिसर कोणत्या कारखान्यात, संस्थेत जावून पगार वेळेत होतात की नाही हे बघत नाही. कारण त्यांना दरमहा पाकीट पोहोच केले की त्यांची जबाबदारी संपते. सगळे नियम धाब्यावर बसवून कामगारांचे शोषण सुरू राहते. अशा प्रवृत्तींना धडा शिकवण्यासाठी तृप्ती देसाईच मुख्यमंत्री झाल्या पाहिजेत. आज थेट मतदानातून नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय पुन्हा एकदा तिसर्यांदा आला आहे. त्याप्रमाणे मुख्यमंत्रीपदाचीही थेट निवड व्हावी आणि संपूर्ण महाराष्ट्राने तृप्ती देसाईंना निवडून द्यावे. सगळी गैरव्यवस्था त्या अगदी सुरळीत करतील. आज भाजपचे सरकार आले आणि कॉंग्रेसचे गेले. पण व्यवस्थेत कोणताच बदल झालेला नाही. हे चित्र बदलण्यासाठी तृप्ती देसाईच मुख्यमंत्री झाल्या पाहिजेत. कॉंग्रेसच्या राज्यात दुष्काळ होता तसाच तो भाजपच्या काळात आहे. तेव्हा जशा महिला असुरक्षित होत्या, गुन्हेगारी वाढीस होती तशीच ती आजही आहे. म्हणजे अच्छे दिन आनेवाले है हे मोदींचे वाक्य खरे करण्यासाठी तृत्पी देसाईंच्या हातात सत्ता द्या. म्हणजे सगळीकडे कसे सुजलाम सुफलाम असे चित्र तयार होईल. शिक्षणसंस्थांकडून होणारी विद्यार्थ्यांची लुबाडणूक, निकृष्ठ प्रकारचे दिले जाणारे शिक्षण, शिक्षकांमधील अनास्था, खाजगी संस्थांचे बोकाळलेले प्रस्थ, खाजगी क्लासेसचे एजंट म्हणून काम करणार्या शिक्षण संस्था, कामगारांचे होणारे शोषण, शेतकर्यांच्या आत्महत्या, महागांई, टंचाई, निममीत वाढणारे दर या संकटांपासून कोण सामान्य माणसांना सोडवू शकत असेल तर त्या तृप्ती देसाईच सोडवू शकतील. देवाचे धर्माचे कायदे कानून समाजव्यवस्थेला उपयोगी पडत नाहीत म्हणून त्यांनी परंपरा मोडून काढत शनीच्या डोक्यावर तेल ओतले, महालक्ष्मीची ओटी भरली आता या सरकारची छुट्टी करून सुव्यवस्था येण्यासाठी तृत्पी देसाईंसारख्या हुकुमशाही प्रवृत्तीच्या, मानगुटीवर बसणार्या बाईलाच आता मुख्यमंत्री केले पाहिजे.
रविवार, २२ मे, २०१६
तृप्ती देसाईंना मुख्यमंत्री करा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा