- यंदा कोकणात ७० टक्के आणि उर्वरित महाराष्ट्रात चाळीस टक्के पाऊस जास्त पडेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे. हवामान खात्याचे अंदाज सहसा बरोबर येत नाहीत हे आजवरचे निरिक्षण आहे. तरीही हा अंदाज खरा ठरावा अशी आज अपेक्षा करण्याची गरज आहे. म्हणजे ज्या कोणी शास्त्रज्ञाने हा अंदाज व्यक्त केला त्याच्या तोंडात साखर पडो, त्याचे अंदाज कायम बरोबर ठरोत आणि तो ठरला तर सरकारने त्याचा जाहीर सत्कार करावा अशी अपेक्षा करायला पाहिजे. कारण या कडक उन्हाळ्यात त्या सुखद अंदाजानेच गारवा निर्माण झालेला आहे. अगदी वेटींग फॉर गोदोप्रमाणे पावसाची वाट पाहात आहे प्रत्येकजण. प्रत्येकाच्या तोडातून शब्द निघत आहेत वेटींग फॉर क्लाउडस्.
- म्हणजे या अंदाजाप्रमाणे चाळीस ते सत्तर टक्के पाऊस जास्त पडला तरीही घाबरण्याचे कारण नाही. अगदी या महाराष्ट्रात महापूर आला तरी चालेल पण ओला चिंब व्हावा आणि गेल्या अनेक वर्षाच्या दुष्काळाचा सगळा ताण संपून जावा, अशीच महाराष्ट्रातील तमाम जनतेची मनापासून इच्छा आहे. आकाशातून पडणारा पाऊस जगाचा आधार होता. तो आला नाही तर काय होते याचा अनुभव आपण घेतोच आहोत. तो भरपूर कोसळला तर त्याचे सुख, समाधान आणि आनंद किती आहे याचाही अनुभव आपण घेतलेला आहे. म्हणूनच हा अंदाज खरा ठरो अशी प्रार्थना आत्ताच करायला हवी.
- ३ जून हा मुहूर्त हवामान खात्याने दिलेला आहे. अलीकडे आधुनिक तंत्रज्ञानाने हवामान खाते बरेचसे नेमके भविष्य वर्तवित आहेत. पूर्वी हवामान खात्याचा अंदाज हा विनोदाचा भाग मानला जायचा. ‘आज भरपूर पाऊस पडणार’, असे भविष्य हवामान खात्याने वर्तवले की, त्या दिवशी पाऊस हमखास येणार नाही, असे गृहीत धरले जायचे. अलीकडच्या आधुनिक युगात कोणत्याही शहराच्या भोवती जमा झालेल्या ढगांमध्ये पाण्याची आर्द्रता आणि घनता किती आहे याचाही अंदाज संगणकावर येतो. हे ढग किती शक्तिशाली आहेत, किती वेळ बरसू शकतील याचे सगळे तपशील संगणकावर मिळू लागले आहेत. वारे किती वेगाने वाहत आहेत, त्याची छायाचित्रे टिपता येत आहेत. एवढेच नव्हे तर हवामान खात्याच्या खोलीत बसून जगातील बहुसंख्य देशातील तापमानाचा आढावा आता दररोज सांगितला जातो.
- कोणत्या देशावर किती ढग आहेत.. कोणत्या प्रांतात काळया ढगांची गर्दी आहे.. पांढुरके ढग कुठे आहेत, अशी सगळी चित्रे आज उपलब्ध होत असल्यामुळे हवामान खाते अधिक अद्ययावत बनल्यामुळे पाऊस पडणार की नाही याचा अंदाज बराचदा व्यक्त करता येतो. खाजगी वृत्त वाहिन्यांवर नाही तरी किमान सरकारी वाहिनी दुरदर्शनवर दररोज या पावसाचा अंदाज व्यक्त होत असतो. अर्थात यातही चुका होऊ शकतात. परंतु या वर्षी आपण सगळे जण अशी प्रार्थना करूया की, चुका होणार नाहीत आणि हवामान खात्यानी व्यक्त केलेला पाऊस ३ जूनपासून सुरू होईल.
- गेली चार वर्षे महाराष्ट्रातील अनेक भागात पाऊस पडलेला नाही. पावसाळ्यात नवनिमिर्तीचे वातावरण तयार होते. पाऊस हा विषयच असा आहे की, केवळ शेतीसाठीच तो ऊर्जा देतो असे नव्हे तर अनेक निर्मितीसाठी तो कारणीभूत ठरतो. कालिदासाचे मेघदूत हे आषाढ महिन्यातील पहिल्या दिवशी लिहीले गेले. महाकवी कालीदास दिन म्हणून तो साजरा करतो. पण या मेघदूतालाही पाउस नसता तर निर्माण होता आले नसते. जगातील सर्व साहित्यिकांचे, कवींचे, लेखकांचे, सर्वात मोठा लेखनाचा स्त्रोत पाऊस हाच आहे. पावसाळी कविता, वर्षा कविता हा अनेकांचा आवडीचा आणि आनंदाचा क्षण असतो. पावसावर किती लिहिले गेले, पावसावर किती कविता केल्या गेल्या.. याची गणती होणे शक्य नाही. जगातील बहुसंख्य कवींना पाऊस जी स्फूर्ती देतो तशी अन्य कुणाकडूनही स्फूर्ती मिळत नाही. शायरांचीही तीच अवस्था आहे.
- हा पाऊसच गेली चार वर्ष नसल्यामुळे जणू काही निर्मितीच ठप्प झाली होती. वर्षा सहलीचे आयोजन, पर्यावरण दिन, वृक्षारोपणाचे कार्यक्रम गेल्या चार वर्षात पूर्णपणे फाफलले होते. म्हणजे वृक्षारोपणाची इच्छा असली तरी ज्या पावसाळ्यात ते करायचे तो पाऊसच नसल्यामुळे खणलेल्या खड्ड्यात रोपे वाळवण्याची वेळ आली.
- कालच जाहीर झालेल्या बातमीनुसार मराठवाड्यात फक्त २ टक्के पाणी आहे. अन्य महाराष्ट्रातही १५ ते २० टक्क्याच्या आसपास पाणी आहे. अशा परिस्थितीत यंदा ४० ते ७० टक्के जास्त पाऊस पडणार हे भाकीत सुखद असे आहे. दिल्लीहून रेल्वेने पाणी आणण्याची वेळ लातूरकरांवर आली. पावसाने जर भरपूर वृष्टी केली नाही तर यावर्षी संपूर्ण महाराष्ट्राला रेल्वेची वाट पहावी लागेल. यासाठी हा अंदाज खरा ठरला पाहिजे. अनेकांनी महादेव कोंडले, बेडकांची लग्न लावली पण चार वर्षात ढगांचा पाळणा काही हालला नव्हता. पण यावर्षी हवामान खात्याच्या कृपेने वर्तवलेला अंदाज खरा ठरावा एवढीच इच्छा.
शुक्रवार, ६ मे, २०१६
वेटींग फॉर क्लाउडस्
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा