नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी नवे विक्रम स्थापन केले आहेत. पाच राज्यांमधील हे निकाल भाजपला संजीवनी देणारे वाटत असले तरी हे यश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या दोन वर्षांच्या कामकाजामुळे मिळाले आहे असे मानण्याचे कारण नाही. हा जनादेश केंद्र सरकारच्या परफॉर्मन्सच्या आधारावर मिळालेला नाही. नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर जनता नाखुश दिसत नसली तरी दुष्काळ आणि शेतकर्यांच्या आत्महत्यांमुळे सरकारविरूध्द वाढत चाललेल्या नाराजीकडे दुर्लक्ष केले जावू शकत नाही. त्यामुळेच आगामी काळातील उत्तर प्रदेश या सर्वाधिक जागा असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपला अत्यंत सावधपणे घुसावे लागेल.
आसाममध्ये भाजपची सत्ता आली तर पश्चिम बंगालमध्ये जागा वाढल्या. केरळमध्ये खाते उघडले आहे आणि तामिळनाडूत मतांची टक्केवारी वाढली. वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा मोडून काढीत जयललिता यांना पुन्हा सत्ता मिळाली आहे. ममता बॅनर्जी यांचा विजय म्हणजे जम्बो विजय. त्याउलट सव्वाशे वर्षे जुन्या कॉंग्रेसच्या हातून एकामागून एक राज्य निसटत चालले आहे. यानंतर पक्षाच्या कार्यप्रणालीत सुधारणा करण्यास कोणी तयार नाही. अर्थातच, या सर्व गोष्टींचा राष्ट्रीय राजकारणावर प्रभाव दिसून येईल.
पश्चिम बंगाल, तामीळनाडू, केरळ, आसाम आणि पुडुचेरी या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालाने राजकीय पक्षांना वेगवेगळा संदेश दिला आहे. ईशान्य आणि दक्षिण भारताच्या नागरिकांनी भाजपसाठी आपले दार उघडले आहे. ईशान्य भारतात दमदार प्रवेश करीत भाजपने आसामची सत्ता मिळवली तर बंगालमध्ये जागा वाढल्यात. केरळमध्ये खाते उघडले आणि मतांची टक्केवारीही वाढली. दुसरीकडे, याच निकालांनी कॉंग्रेससमोर आव्हानांचे मोठे डोंगर उभे केले आहे. या निकालांनी आणखी एक महत्वाची बाब अधोरेखित केली आहे आणि ती म्हणजे, देशाच्या राजकारणात प्रादेशिक पक्षांचे महत्व मुळीच कमी झालेले नाही.
या निवडणुकीत ममता बॅनर्जींनी डाव्या पक्षांचा केवळ किल्लाच उध्वस्त केला नाही तर डाव्यांची व्होटबँक असलेले मुस्लिम आणि गरिब यांना त्यांनी आपल्याकडे आकर्षित केले आहे. हे मतदार आतापर्यंत डाव्यांना मतदान करीत होते. त्याशिवाय महिला मतदारांचा दीदींच्या यशात सिंहाचा वाटा आहे हे सर्वांनी मान्य करायला पाहिजे. यशाचे जे अंतर वाढलेले आहे ते त्यांच्यामुळे. कॉंग्रेसने डाव्यांसोबत लढणे मतदारांना रूचलेले नाही असेही दिसून आले. डावे पक्ष आता कालबाह्य झाले आहेत आणि त्यांनी त्यांची धोरणे बदलली नाहीत तर ते आणखी गाळात जातील हाच संदेश यातून दिसतो.
आसाममध्ये भाजपला मिळालेला विजय तसा अनपेक्षित नाही. त्यासाठी फार मोठे नियोजन होते. २०१४ मधील लोकसभेच्या निवडणुकीतच भाजपने आसाममध्ये यशाचे दार ठोठावले होते. यावेळी सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आल्यानंतर भाजपने आपली संपूर्ण ताकद विधानसभा निवडणुकीच्या कामात झोकून दिली. भाजपने बीपीएफ आणि आसाम गण परिषदेशी आघाडी करून केवळ विजयाचा मार्ग सुकर केला नाही तर सर्वाधिक जागा मिळविण्यातही यश मिळविले. भाजपच्या झोळीत १२६ पैकी ८६ जागा पडल्या. पण आसामचा निकाल कॉंग्रेसच्या विरोधात नव्हता तर सत्तांतरासाठी होता. कारण, राज्यात मागील १५ वर्षांपासून कॉंग्रेसची सत्ता होती. त्यामुळे बदल हा अपेक्षित होता. मतदारांनी सत्तांतराचा निर्णय मनावर घेतला आणि डोळ्यासमोर भाजपशिवाय दुसरा पर्यायी पक्ष नव्हता.
पश्चिम बंगालमध्ये डाव्यांशी आघाडी करून मैदानात उतरणारा कॉंग्रेस पक्ष केरळमध्ये डाव्यांच्या विरोधात मैदानात उभा होता. आतापर्यंत सत्ता परिवर्तनाच्या खांद्यावर बसून कॉंग्रेस पराभव झाकण्याचा प्रयत्न करीत आला आहे. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. आतापर्यंतच्या निवडणुकीत सत्ता मिळविणार्या आणि गमाविणार्या पक्षामध्ये जय-पराजयाचे अंतर फार कमी असायचे. एलडीएफचा आताचा विजय हा प्रचंड मोठया अंतराने झाला आहे. कॉंग्रेससाठी याहीपेक्षा वाईट बातमी म्हणजे, कॉंग्रेसच्या मतांची टक्केवारी आघाडीतील पक्षांना मिळालेल्या मतांच्या तुलनेतही वाईट आहे आणि हीच खरी धोक्याची घंटा आहे. दिल्ली आणि बिहारमध्ये झालेल्या दारूण पराभवानंतर पाच राज्यांत मिळालेले यश भाजपला नक्कीच संजीवनी प्रदान करणारे आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढायला मदत होईल. पुढच्या वर्षी उत्तरप्रदेशात होणार्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला याचा फायदा होईल. किंबहुना मुलायमसिंग यादव आणि त्यांचा मुलगा अखिलेश यादव यांच्या दीर्घकाळातील सत्तेनंतर आता भाजप हा नवा पर्याय उभा राहिला आहे. एकदा का उत्तर प्रदेशची सत्ता मिळवली की कॉंग्रेस मुक्त भारताची मोदींची इच्छा पूर्ण झाली म्हणावे लागेल. पण त्यासाठी पुढील वर्षापर्यंत मोदी सरकाला अच्छे दिन नेमके कुठे, कसे, केव्हा आले आहेत हे दाखवून द्यावे लागेल. कारण उत्तर प्रदेशातील मतदार हा कळपाने जाणारा आणि एक गठ्ठा मतदान करणारा आहे. म्हणूनच आत्ताच्या यशाने, दोन वर्षातील कामगिरीने फुशारून न जाता अत्यंत सावधपणे भाजपला घुसावे लागेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा