- पाच राज्यातील निवडणुकांचे निकाल आज लागले. पाचही ठिकाणचे निकाल पाहता कॉंग्रेसला मतदारांनी पुन्हा एकदा नाकारल्याचे चित्र दिसत आहे. त्या तुलनेत लाट नसली तरी मोदींनी आसाममध्ये आपले कमळ फुलवले हे फार महत्वाचे आहे. प. बंगालमध्ये मागच्यावेळी कॉंग्रेसला बरोबर घेऊन डाव्यांना हरवणार्या ममता बॅनर्जींनी कॉंग्रेसची कुबडी काढून टाकत आपले वर्चस्व राखले आहे. तर तमिळनाडूत जे जयललिता यांनी इतिहास बदलत पुन्हा सत्तेवर येण्याचा विक्रम केला आहे. यामध्ये जे जे कॉंग्रेसबरोबर गेले ते गाळात गेल्याचे दिसून आले. विशेषत: तमिळनाडूत करुणानिधींनी कॉंग्रेसबरोबर केलेली आघाडी काहीही फायद्याची नाही हे स्पष्ट झाल्याने या निवडणुकीत कॉंग्रेस नको असेच चित्र पुढे आले आहे.
- तमिळनाडूमध्ये जे. जयललिता या आगळ्या वेगळ्या महिलेची पक्षावर किती पकड आहे हे दिसून आले. विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात सोपी असलेली लढत शेवटच्या टप्प्यात अनिश्चित झाली, तरी बाईंनी हिकमतीने ती ओढून आणली. गेल्या तीस वर्षांपासून कोणतेही सरकार पुन्हा निवडून न देण्याचा तमिळनाडूचा पायंडा यामुळे मोडला आहे. शिवाय १९७२ साली एम. जी. रामचंद्रन यांनी स्थापन केलेल्या अण्णा द्रमुक पक्षाला पहिल्यांदाच त्यांनी पक्ष संस्थापकाच्या छायेतून बाहेर आणले आहे. प्रशासनावर पकड आणि राजकारणात जरब असली, तरी दारू दुकानांच्या धोरणामुळे जयललितांबाबत नाराजी होती. खासकरून महिलांमध्ये दारूबंदीबाबत असलेली आपुलकी त्यांना नडणार, असेच वाटत होते. परंतु, मुख्यमंत्रीपदाचा मोह ९३व्या वर्षीही सोडता न आलेल्या करुणानिधींनी त्यांचा रस्ता सोपा केला. १९८८ साली एमजीआर यांचे निधन झाल्यानंतर आजपर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत या दिवंगत नेता-अभिनेत्याच्या करिष्म्याचा उपयोग अम्मांनी करून घेतला होता. यंदाच्या निवडणुकीत त्यांनी संपूर्ण प्रचार स्वतःभोवती केंद्रित ठेवला होता. प्रत्येक मतदारसंघात मीच उमेदवार आहे असा प्रचार करा, असा आदेशच त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना दिला होता. प्रत्येक भाषणात त्या ‘मुलाला काय पाहिजे, हे एका आईलाच चांगलेच कळते,’ असे सांगून भावनिक साद घालायच्या. त्यामुळे महिलांना स्वतःकडे फिरवून घेणे, त्यांना सोपे गेले असावे. अर्थात या निवडणुकीत सगळ्यात भारी ठरला तो पैसा. एमजीआरच्या करिष्म्याला निरोप देऊन त्या जागी अम्मांची झालेली स्थापना, प्रस्थापितविरोधी मतदानाची खंडीत केलेली परंपरा आणि भारतीय जनता पक्षासारख्या ‘उत्तर भारतीय’ पक्षाला करून दिलेला चंचुप्रवेश, ही तमिळनाडूच्या यंदाच्या निवडणुकीची वैशिष्ठ्ये आहेत. अशक्य अशा राज्यात मोदींच्या भाजपचा झालेला तीळमात्र शिरकाव भाजपसाठी आशादायक आहे.
- दक्षिणेतील टोकाचे राज्य म्हणजे केरळ. केरळमध्ये डाव्यांना यश मिळाले आहे. पण ते मोदी सरकारच्या विरोधात पुकारलेल्या कन्हैय्याकुमारच्या चळवळीचे यश म्हणता येणार नाही. या चळवळीच्या माध्यमातून सरकार विरोधात रान पेटवले होते. केरळमध्ये कन्हैय्या आणि जेएनयूचा उल्लेख करून, त्याच्या सभा भरवून भाजप विरोधात रान उठवले गेले, पण भाजप तिथे नव्हताच प्रबळ. त्यामुळे हा मोदीविरोधातील कौल आहे असे कोणीही समजू नये.
- मागच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी कॉंग्रेसला बरोबर घेऊन डाव्यांची दोन दशकांची सत्ता घालवली होती. तोच डाव ममता बॅनर्जींवर उलटवता येईल असा विचार किंबहुना अविचार डाव्या पक्षांनी प. बंगालमध्ये केला. त्यात डाव्या पक्षांना सपशेल पराभव पत्करावा लागला. कॉंग्रेसला सोबत घेऊन पश्चिम बंगालमध्ये पुन्हा सत्ता मिळवण्यात डाव्यांना अपयश आले. डावे पक्ष पश्चिम बंगालमध्ये कॉंग्रेससोब जाऊन बुडत्या जहाजात बसले. बुडत्या जहाजात जाऊन त्यांनी वजन वाढवले आणि लवकर बुडाले. इथेही आपला प्रतिस्पर्धी तृणमूल कॉंग्रेस आहे भाजप नाही हे लक्षात न घेता कन्हैय्याकुमारचा वापर करून चक्क मोदी सरकार विरोधात टिका केली. त्यामुळे सत्ताधारी ममता बॅनर्जी नामा निराळ्या राहिल्या. उलट भाजपची कधी नव्हे इतकी बरकत झाली. आठ जागा मिळवत भाजप आणखी मोठा झाला.
- एकंदर मतदार कॉंग्रेसला भाजपने दिलेल्या कॉंग्रेसमुक्त भारतच्या दिशेने नेत असल्याचे दिसते आहे. भाजपचे यश तर आहेत, पण या निवडणुकांतही कॉंग्रेसचा पराभव ही मोठी गोष्ट ठरली आहे. आसाममध्ये सत्तेत असलेल्या कॉंग्रेसला जवळपास २५ जागांवर समाधान मानावे लागत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पश्चिम बंगालमध्येही फारशी चांगली स्थिती नाही. भाजपला आसाम वगळता इतर राज्यांमध्ये काहीही थेट फायदा झालेला नसला तरी त्यांचा आत्मविश्वास यामुळे बळावणार आहे. आगामी काळात येणार्या प्रामुख्याने उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत उतरताना भाजपला या विजयामुळे मोठा आधार मिळेल. कारण दिल्ली पाठोपाठ बिहारमध्ये झालेला पराभव म्हणजे मतदारांचा मोदी सरकारवरील राग असा अर्थ काढला जात होता. पण आसाममधील विजयाने दडपणाचे हे ओझे बरेचसे कमी झालेले असेल. या निवडणुकीत पाच पैकी भाजपने एकच राज्य मिळवले असले तरी बाकी ठिकाणी झालेला शिरकाव आणि पूर्वी कधीच नसलेल्या राज्यात मिळवलेली सत्ता हे फार मोठे यश आहे. कॉंग्रेसमुक्तीच्या दृष्टीने हे पाऊल आहे.
गुरुवार, १९ मे, २०१६
भाजपचे यश आणि कॉंग्रेसचे गाळात जाणे
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा