- शैक्षणिक सहल ही मौजमजेची गोष्ट नसते तर त्यातून ज्ञानात भर पडते. यासाठीच अभ्यासासंबंंधी ठिकाणी सहल काढणे हा शिक्षणाचा उद्देश असला पाहिजे. अशा ठिकाणी सहलीला नेल्यावर अनिष्ठ घटना घडण्याचा प्रश्न येत नाही. पण सहल कोठे नेली पाहिजे याची अक्कल नसलेले आणि नेलेली सहल नीट हाताळू शकत नाहीत असे संयोजक असल्यावर दुर्घटना या घडणारच. त्यावरून लगेच सहलींवर बंधने आणण्याचे धोरण हे पणपुटेपणाचे आहे.
- म्हणजे एखादी अनिष्ट घटना घडल्यावरच बहुधा सरकारला जाग येत असावी. अशी जाग आल्यावर जी उपाययोजना केली जाते ती म्हणजे आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी असाच प्रकार आहे. मुरूडमधील समुद्रात १४ विद्यार्थ्यांना जलसमाधी मिळाल्यानंतर राज्य सरकारने उचललेले पाऊल त्याची खात्री पटवणारे आहे. झोपी गेलेले शिक्षण खाते मुरूडच्या घटनेनंतर खडबडून जागे झाले. शैक्षणिक सहलींसाठी नियमांचे सुरक्षाकवच जाहीर करून शिक्षण खात्याने ‘वरातीमागून कागदी घोडे’ दामटले आहे. शैक्षणिक सहलींबाबत शाळा-महाविद्यालयांवर बरेच निर्बंध लादले आहेत. समुद्र, तलाव, नदी वा किल्ल्यांवरील सहलींसाठी पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. पण शिक्षण संस्थांमधून चांगले नियोजन करणारे शिक्षक तयार झाले पाहिजेत याबाबत शिक्षण खाते आग्रही का नाही?
- चुकीच्या पद्धतीने अनेक जाचक नियम लादून सहलींच्या उद्देशालाच हरताळ फासला आहे. शैक्षणिक सहलींचा उद्देश नेमका काय असतो याबाबत कोणीच का चर्चा करत नाही? वर्षानुवर्षे सहली का काढल्या जात आहेत? सहलीसाठी राज्य परिवहन महामंडळाचीच बस नेणे हा नियम अतिशय योग्य आहे. बहुतेक शाळा त्या नियमांची अंमलबजावणी करतात. पण खाजगी ट्रॅव्हल कंपन्यांच्या बसेस वापरणार्या शिक्षणसंस्थाही आहेत. मुंबईत तर सर्रास खाजगी बसेसचा वापर केला जातो. लाल डब्यातून आमची मुले प्रवास करत नाहीत असा पालकांचा दबाव असल्यामुळे ते घडते. पण पालकांच्या अहंकाराला किती प्रमाणात साथ द्यायची हे सरकारने आणि संस्थांनी ठरवले पाहिजे.
- समुद्र वा तलावात विद्यार्थी बुडतात म्हणून तेथे जाऊच नये असे म्हणणे म्हणजे ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ नाही का? पर्यटनस्थळांनी महाराष्ट्राची भूमी समृद्ध आहे. परंतु पर्यटनामुळे होणार्या ज्ञानवर्धनापासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवणारा नियमांचा अघोरी उपाय शिक्षण खात्याने का केला असावा? समुद्र किनारी तलावांच्या ठिकाणी नेवू नये हे सांगितले तसे नेमके न्यावे कुठे हे का नाही निश्चित केले?
- कारखाने, धरणे ही मुलांना दाखवणे आवश्यक असते. जलसिंचन, पाणलोट विकास हे भावी पिढीला समजले पाहिजे. यासाठी धरण, तलाव हे दाखवले गेले पाहिजेत. नद्या, नाले, शिवार पाहता आले पाहिजे. पण त्यासाठी काय खबरदारी घेतली पाहिजे याची नियमावली करणे आवश्यक आहे.
- समुद्रावरील सहलींना बंदी घालण्यापेक्षा ती ठिकाणे सहलींसाठी सुरक्षित करण्यावर भर द्यावा असे सरकारला का वाटत नाही? ‘सहलींबाबतचे नियम नवे नाहीत. ते जुनेच आहेत. मात्र शाळा-महाविद्यालयांकडून त्यांची अंमलबजावणीच होत नाही’ असे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे म्हणणे आहे. ते म्हणणे खरे असेल तर मग नियमांची अंमलबजावणी होते की नाही हे पाहण्याचे काम कोणाचे? म्हणजे वर्षानुवर्षे सर्व संबंधितांनी झोपा काढायच्या, एखादा भयानक अपघात होईपर्यंत वाट बघायची. हे प्रकार थांबले पाहिजेत.
- शैक्षणिक सहलींसाठी शिक्षण खात्याची परवानगी घ्यावी लागते. मात्र तो नियम बहुतांश मुख्याध्यापक व अधिकार्यांना तरी ठाऊक आहे का? आणि हे विधान अधिकार्यांनी केले आहे हा फार मोठा विनोद आहे. शिक्षणाच्या घसरत्या दर्जाबद्दल चहूकडून नेहमीच ओरड चालू असते. शिक्षण खाते झोपले तरी आहे किंवा निरर्थक प्रयोगांतच अडकलेले आहे.
- आज परिस्थिती अशी आहे की शाळा-महाविद्यालयांशी अधिकार्यांचा संवाद नाही. एकूणच शिक्षण खात्याच्या कारभारात किती गलथानपणा आहे याला शिक्षणमंत्र्यांच्या विधानाने दुजोरा मिळतो. समुद्रकिनारे वा किल्ले धोकादायक म्हणून तेथे सहली न्यायच्या नाहीत हा कुठला न्याय? पाठ्यपुस्तकात छत्रपती शिवरायांचा इतिहास शिकवायचा. त्यात महाराजांनी आरमार उभे केले हे सांगायचे. पण ते आरमार कोणत्या समुद्रात उभे केले तो समुद्र पहायचा नाही. असा इतिहास खरा वाटेल का? शिवरायांनी अनेक गड किल्ले घेतले ते पाहिल्याशिवाय त्याचे महत्व कसे कळणार? त्यामुळे बंदी घालून धोके टळणार नाहीत. आज अनेक शाळांच्या इमारती धोकादायक आहेत. दरवर्षी दोन-चार तरी पडतातच. तरी तेथे विद्यार्थ्यांना बसवले जातेच ना? शाळा शिक्षण संस्था यांना परवानगी देताना त्याठिकाणी चांगले संयोजक आहेत की नाही, योग्य नियोजन करणारे आहेत की नाही, संस्थाचालक किती शिस्तीचे आहेत, त्यांची स्वत:ची नियमावली किती आदर्श आहे याकडे शिक्षणखात्याचे लक्ष का नाही? छाबडा शिक्षण संस्थेसारख्या अनेक शिक्षण संस्थांनी आपले स्वत:चे असे आदर्श नियम घातले आहेत. ते सरकारला मार्गदर्शक आहेत. त्यावर लक्ष देवून त्याचे अनुकरण करण्याची आज गरज आहे.
मंगळवार, १६ फेब्रुवारी, २०१६
चांगले संयोजक घडवा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा