शुक्रवार, २६ फेब्रुवारी, २०१६

आरक्षणासाठीची आंदोलने

  • आंध्र प्रदेशात नुकतेच कापू समाजाचे राखीव जागांच्या मागणीसाठी आंदोलन झाले. गेल्या वर्षी गुजरातमध्ये पटेल समाजाने असेच आंदोलन केले. राजस्थानात गुर्जर समाजाने असेच आंदोलन केले. महाराष्ट्रात मराठा समाजाचे आंदोलन अनेकवर्ष आहेच. स्वत:ला उच्च म्हणवून घेणार्‍या या जाती यातून नेमके काय साधणार आहेत? आज अल्पसंख्य असलेला सिंधी समाज कोणताही सरकारी मदतीचा हात नसताना कष्टाने पुढे येतो. ब्राह्मण समाज कधी कुठल्या आरक्षणाची मागणी करत नाही. तरीही त्यांचा संघर्ष आपल्या करीअरसाठी सुरू असतो. त्यात ते यश मिळवतात.  मग याच समाजांना नेमके काय झाले आहे? त्यांच्यावरचा अन्याय दूर करताना सर्व भारतीय केंद्रबिंदू मानून सर्वसमावेषक समानतेसाठी प्रयत्न का होत नाहीत?
  •      आंध्र प्रदेशातील आंदोलन हे  हिंसक आंदोलन झाले. हे आंदोलन कापू ऐक्य गर्जना या संघटनेमार्फत करण्यात आले होते. कापू ऐक्य गर्जना संघटनेत कापू समाजातील विविध पक्षांतील राजनेते एकत्र आले होते. कापू समाजाला मागासवर्गाचा दर्जा देण्यात आला आहे आणि मागासवर्गीयांसाठी जे आरक्षण आहे, त्यात त्यांचाही समावेश केला जावा, अशी त्यांची मागणी आहे.
  •    गेल्या वर्षी गुजरातमध्ये हार्दीक पटेलच्या नेतृत्वाखाली पटेल समाजाने याच मागणीसाठी अतिशय उग्र आंदोलन केले. पोलिस गोळीबारात सात जण ठार झाले. राजस्थानमध्ये गुर्जर समाज स्वत:ला मागासवर्गीय समाज ठरवण्यासाठी दीर्घकाळ आंदोलन करत आहे. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश राज्यातील जाट समाजदेखील स्वत:ला मागासवर्गीय समजतो. महाराष्ट्रात मराठा समाजदेखील मागासवर्गीय दर्जा मिळावा म्हणून आंदोलन करत आहे. उच्च जातीच्या समाजाला हे काय भिकेचे डोहाळे लागले आहेत? त्यापेक्षा सर्वत्र समतेचे राज्य येण्यासाठी हे लोक का आंदोलन करत नाहीत? आर्थिक मागासांना आरक्षण देण्यासाठी पुढे का येत नाहीत? 
  •    वेगवेगळ्या प्रगत जाती स्वत:ला मागासवर्गीय का ठरवू इच्छितात? हा अतिशय महत्त्वाचा आणि गंभीर प्रश्न आहे. ही सर्व आंदोलने राजकीय हेतूने प्रेरित होऊन चालली आहेत यात कोणतीच शंका नाही. केवळ शक्तीप्रदर्शनासाठी सर्व काही. या आंदोलन समाजांचा सामाजिक दर्जा मोठा आहे. काही जाती परंपरेने राज्यकर्त्या जाती आहेत. काही जाती आर्थिकदृष्ट्या अतिशय सबळ आहेत. असे असतानादेखील त्या-त्या जातीतील हजारो तरुण आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरतात. त्याचे कारण काय?
  •      कोणत्याही आंदोलनामागे असंतोष हे एक कारण असते. या असंतोषाचे मुख्य कारण असे की, ज्या प्रकारचे आरक्षण धोरण देशात चालवले जाते, यामुळे समाजातील काही वर्गांना असे वाटते की, त्यांच्यावर खूप अन्याय होत आहे. अन्याय होत असल्याची भावना सार्वत्रिक असते. राजकीय नेत्यांना किंवा अराजकीय नेत्यांना जनमानसाच्या भावना नीट समजतात. या भावनांना चेतवून ते आंदोलन करू लागतात. 
  •     ज्या जाती आज आम्हाला मागासवर्गीय प्रवर्गात टाका, अशी मागणी करत आहेत, त्यांचा असंतोष समजून घ्यायला पाहिजे हे निश्‍चितच. त्यासाठी त्यांच्या असंतोषाची अशी कारणे लक्षात घेतली पाहिजेत.  शैक्षणिक आरक्षण नसल्यामुळे शासकीय शैक्षणिक संस्थांत चांगले गुण मिळूनदेखील अनेक वेळा प्रवेश मिळत नाहीत.  पात्रता आणि गुणवत्ता असूनही शासकीय नोकर्‍यांत जागा मिळत नाही. यामुळे विद्यार्थी आणि पालक वर्गात प्रचंड असंतोष निर्माण होतो. कालपर्यंत ज्या मागास जाती होत्या त्यांना आरक्षण मिळाल्यामुळे त्यांची मुले शासकीय शिक्षण संस्थांत प्रवेश मिळवतात, सरकारी नोकर्‍यांतदेखील त्यांना जागा मिळतात. ही गोष्ट प्रगत जातीतील लोकांना खटकते आणि आपल्यावर अन्याय होत आहे, अशी त्यांची भावना तयार होते.
  •     राखीव जागांचा विषय सामाजिक न्यायाशी जोडला गेलेला आहे. समाजातील ज्या जाती शेकडो वर्षे परंपरेने शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या मागास राहिल्या त्यांना सर्वांच्या बरोबरीने आणण्यासाठी राखीव जागांचा विषय आला.  म्हणून ज्या कारणांमुळे असंतोष निर्माण होतो ती कारणे कशी दूर करता येतील याचा विचार राज्यकर्त्यांनी आणि राज्याचे धोरण ठरवणार्‍यांनी केला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणावर ५० टक्क्यांची मर्यादा घातली आहे. यामुळे आरक्षणाची टक्केवारी वाढवता येत नाही. यावरून एक लक्षात येईल की, हा प्रश्न समाधानकारकरीत्या सोडवणे वाटते तितके सोपे काम नाही. म्हणून असंतोषाच्या निवारणासाठी नवीन प्रकारचे मार्ग आणि उपाय शोधणे गरजेचे आहे. ज्याला उत्तम गुण मिळालेले आहेत तो शैक्षणिक प्रवेशापासून वंचित राहणार नाही आणि ज्याच्याकडे गुणवत्ता आणि कार्यक्षमता आहे, त्याला शासकीय नोकरी नाकारली जाणार नाही हे बघायला पाहिजे. समाजातील कुठल्याही वर्गाची आमच्यावर अन्याय होत आहे, अशी भावना निर्माण होता कामा नये.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: