शुक्रवार, २६ फेब्रुवारी, २०१६

नेत्यांचा सुकाळ अन विचारांचा दुष्काळ

  •  मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांना २५ हजार रुपयांचा दंड न्यायालयाने ठोठावला. शेलार आणि त्यांच्या भाजपा कार्यकर्त्यांनी परवानगी नसताना स्वागताचे फलक (होर्डिंग) लावले होते. यावर एक याचिका दाखल झाली अन त्याची न्यायालयाने दखल घेतली. सामान्य माणूस जागरूक राहिला तर काय घडू शकते याचे हे उदाहरण आहे. नाहीतर अशा याचिका दाखल झाल्याच नसत्या. 
  •     आज कायदा पाळला जावा अशा भावनेने समाजातील बहुतेक लोक वागत असतात. कारण हे लोक पापभिरू आहेत. ते कायदा पाळू इच्छित आहेत. कायद्याचे राज्य मानूनच ते काम करतात. पण अलीकडच्या काळात ज्यांना मस्ती आलेली आहे, अशी माणसे आणि त्यात प्रामुख्याने राजकीय नेते हे पैशांच्या जोरावर कायदा मोडू इच्छितात. मोडलेल्या कायद्याचे समर्थन करू इच्छितात आणि दंड झाला तर २५ हजार रुपयांचा दंड सहज भरूही शकतात. या देशातला बहुतेक पुढारी खिशात पैसे असल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही. त्यामुळे कायदा जुमानण्याची त्याला गरज भासत नाही. वाहतुकीची सिग्नल व्यवस्था वाहतूक सुरळीत राहण्याकरिता असते. पण सिग्नल तोडणारे बेफिकीर असतात. त्यांच्या खिशात भरपूर रक्कम असतात. त्यामुळे पोलिसांनी कारवाई केली तरी हे पोलिसांनाच दम देऊन सांगतात की, मुकाट्याने दंडाची पावती फाड.
  •    अलीकडच्या काळात पैसा जास्त झाल्यामुळे कायद्याचे महत्त्व वाटत नाही. कायदा तोडायची प्रवृत्ती बळावते. खिशात पैसा आल्यामुळे ‘आपले कोण काय वाकडे करू शकणार आहे?’ अशा मिजाशित जगणार्‍यांची संख्या वाढत चालली आहे.  दुचाकीवर तीन-तीन लोकांना बसवून मिरवणारी मुलं जास्त आहेत. हे सगळे अगदी उघडपणे केले जाते. याचे कारण ‘कायद्याचा धाक नाही’. त्याचप्रमाणे ‘पैशांची मुजोरी’ हे दुसरे कारण आहे. 
  •    फलक लावू नयेत असे न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही शेलार कंपनीने नवरात्र आणि दिवाळी उत्सवात शुभेच्छांचे फलक लावले. पण याविरोधात एका सामान्य नागरिकाने याचिका दाखल केली. पाच-सहा महिने पाठपुरावा केल्यावर कोर्टाची तारीख पडली आणि न्या. अभय ओक आणि न्या. चंद्रकांत भडंग यांच्या खंडपीठासमोर हा विषय सुनावणीला आला, तेव्हा या बेकायदेशीर होर्डिगचा पंचनामा या दोन्ही न्यायमूर्तीनी केला आणि आशीष शेलारांना दंड ठोठावला गेला. दंड झाल्यानंतर शेलारांनी दंड भरला. पण ‘आपण काही चूक केली आहे’ असे त्यांना त्याक्षणी वाटले नाही. न्यायालयाबद्दलची कसलीही फिकीर न वाटणे. यातूनच हा मस्तवालपणा निर्माण झाला. 
  •  ‘मी नेता आहे, पुढारी आहे, आमदार आहे, मी कसाही वागू शकतो’ अशा भावनेत असे नेते वावरत असतात. त्यामुळे सामान्य माणसाला कायद्याच्या संरक्षणासाठी, त्याची जाणीव करून देण्यासाठी, याचिका दाखल करायला लागतात. या याचिकेमुळे अनेक विषय जनहिताचे ठरतात. म्हणून याचिका करणार्‍या जागरूक नागरिकांचे अभिनंदन केले पाहिजे.
  • खरं तर आपले नेते आपल्याला आवाहन करतात आणि त्यांचे आपण ऐकत नाही यासारखा नेत्यांचा अपमान कुठला नसेल. राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना अनेकवेळा सांगितले आहे की माझ्या वाढदिवसाचे बॅनर लावू नका. बॅनरबाजी करू नका. पण कोणी ऐकले नाही. आजही दरवर्षी १४ जूनला सगळ्या हायवेवर बॅनर दिसतातच. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही बॅनर लावू नका असे ते मुख्यमंत्री असताना अनेकवेळा सांगितलं होतं. पण वाशीपासून कराडपर्यंत त्यांच्या मार्गावर कॉंग्रेसचे असंख्य बॅनर पहायला मिळतात. आपल्याच नेत्यांचे कार्यकर्ते ऐकणार नसतील तर त्या नेत्यांचा विचार कसा काय जिवंत राहणार? त्यांना कसा काय जनाधार लाभणार? आदेश हा आदेश असतो. बाळासाहेब ठाकरे आदेश काढायचे. मातोश्रीवरून काढायचे. तो संपूर्ण मुंबईत पाळला जायचा. त्या आदेशाला डावलण्याची ताकद कोणात नव्हती. पण तसे आजच्या नेत्यांमध्ये नाही कारण नेते सपक झाले आहेत, उथळ झाले आहेत. आपल्या विचारांशी प्रामाणिक नाहीत. माणसाचं असंच आहे. लग्नाच्या पत्रिकेत कृपया आहेर आणू नये असे लिहीले तरी पाकीट घेवून मी घरचा आहे, माझ्याकडून घेतलाच पाहिजे असा आग्रह करणारे आगाउ लोक असतात. तसाच प्रकार नेत्यांबाबत असतो. वाढदिवसानिमित्त कोणताही बॅनर लावू नका असा आदेश काढला तरी शेकडो बॅनर ठिकठिकाणी लावले जातात. हा त्या नेत्यांचा आपण अपमान करतो आहोत हे का लक्षात येत नाह?
  •  कोणी नाना आणि कोण तात्या, कोणी आबा आणि कोणी बाबा अशी नावे माहीत नसलेल्या लोकांवरही शुभेच्छांचा वर्षाव केला जातो आणि अनेकांना ‘कार्यसम्राट’ बनवले जाते. जो कोणी वाढदिवसाच्या दिवशी सम्राट होतो त्याचे नावही अनेकांना माहीत नसते. पण बॅनरमुळे एका रात्रीत हा ‘कार्यसम्राट’ गावभर झळकतो. काही ठिकाणी तर ३० वर्षाचा कार्यकर्ता आणि त्याचा ६० फुटांचा फोटो झळकतो. खाली शुभेच्छुकांची नावे असतात आणि त्यांचे फोटो असतात. त्यामुळे अशा या फलकांबाबतही सामाजिक कार्यकर्ते कोर्टात गेले आणि त्याने बंधने आणली.  प्रश्‍न पडतो इतके बॅनरबाज नेते, सम्राट या देशात असताना देशाचे प्रश्‍न का सुटत नाहीत? दुष्काळावर मात का होत नाही? याचे कारण आपल्याकडे नेत्यांचा सुकाळ आणि विचारांचा दुष्काळ आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: