मंगळवार, १६ फेब्रुवारी, २०१६

सर सलामत तो हेल्मेट पचास

  1.    सध्या हेल्मेट सक्तीचा विषय जोरदार चर्चेत आहे. नाशिकचे प्रदीप निफाडकर यांनीही स्वानुभवाचा दाखला देत विविध वाहिन्यांवरून हेल्मेट वापरण्याबाबत कळकळीचे आवाहन केलेले सवार्ंंनी पाहिले आहे. अर्थात वाहिन्यांवरील चर्चा या साधक बाधक झाल्या नाहीत. कुठेही दोन्ही बाजूंनी विषय मांडला गेला नाही तर एकतर्फीच चर्चा झाल्याचे दिसते. हेल्मेट सक्तीला विरोध करण्याचे धाडस कोणीच केले नाही. त्यामानाने आमच्या सातारच्या ज्येष्ठ कर सल्लागार, चित्रपट निर्माते, लेखक अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाने थेट विरोध करून आपले मत मांडण्याचे धाडस दाखवले.
  2.     हेल्मेट सक्ती कशासाठी? तर डोकं शाबूत राहण्यासाठी. म्हणजे सर सलामत तो पगडी पचास असे असेल तर सर सलामत राहण्यासाठी हेल्मेट वापरावे लागेल. याचे कारण, मानवी शरीरामधला सर्वात वजनदार भाग म्हणजे या धडावरचे डोके असते असे म्हणतात. तोल गेल्यानंतर दुखापत होण्याचा सर्वाधिक धोका डोक्याला असतो. त्यामुळे दुचाकीवरून जाताना झालेली किरकोळ चूक जीवघेणी ठरू शकते. त्यामुळेच डोक्याला संरक्षण देणारे हेल्मेट असले पाहिजे. हेल्मेट परिधान केल्यानंतरही दुखापत होणारच नाही, याची शाश्वती अर्थातच कोणीही देत नाही. म्हणूनच हेल्मेटला विरोध होत आहे हे यातील नेमके कारण आहे.
  3.   हेल्मेटमुळे जीव वाचण्याचे प्रमाण जास्त असल्याची सबळ आकडेवारी सरकारकडे उपलब्ध आहे. मोटार वाहन कायद्यामध्ये दुचाकीधारकांसाठी हेल्मेट अनिवार्य करण्यामागची पार्श्वभूमी अशीच आहे. हा उद्देश लक्षात घेतल्यानंतर विरोधाचे कारण उरत नाही. अर्थात आपल्याकडे कोणताही नियम आणि कायदा हा विरोध पत्करून अस्तित्वात येतो. किंवा विरोधानेच तो लटकतो. प्रत्येकाला मत स्वातंत्र्य असल्याने मतांचा गलबला वाढतो. पण नियम-कायदे करून व्यवस्था सुरळीत ठेवावी लागते. 
  4.   हेल्मेट अनिवार्यतेच्या मुद्यावरून याचा अनुभव राज्याला येतो आहे. मुंबई, पुणे, औरंगाबाद आदी मोजक्या शहरांसाठी हेल्मेट अनिवार्य नाही. पुणेकर त्याला कडाडून विरोध करत आहेत. त्यामुळे हा प्रश्‍न अधिक प्रतिष्ठेचा केला गेला आहे. पुणेकरांनी मान्य केले तरच सगळे मान्यताप्राप्त आहे हा नियम खोडून काढण्यासाठी सरकारला हीच संधी आहे. पण पुणेकरांना सवलत दिली तर कोणीच नियम पाळणार नाही, हे सरकारने लक्षात ठेवावे. २००५ सालीही विलासराव देशमुख सरकारने ही सक्ती केली होती तेव्हा पुणेकरांनी स्थगिती मिळवली. सामान्य शहरांमधून पोलिसांची लूटमार, दंड वसूली सुरू झाली पण पुणेकर मोकाट सुटले. सगळ्यात जास्त हेल्मेट वापराची गरज ही पुणेकरांना आहे. कारण जगात सर्वात बेशिस्त बाईक चालवण्याचे प्रकार हे पुण्यातच चालतात. त्यामुळेच बर्‍याचवेळा पुणेरी माणसे ही डोक्यावर पडल्यासारखी वागतात. असे असुनही पुण्याला सुट दिली तर सातारकर आणि महाराष्ट्रातील तमाम नागरिकांनी पोलिसांसमोरून बिनधास्त बोडक्या डोक्यानेच जावे.
  5.    न्यायालयाचा निर्णय संपूर्ण राज्यासाठी लागू आहे. वाहतूक पोलिसांची संख्या, दुचाकी वाहनांची संख्या आदी तांत्रिकतेपायी सर्वत्र सारख्याच तीव्रतेने कायद्याची अंमलबजावणी होत नाही ही चुकीची गोष्ट आहे. परिणामी हेल्मेटविरोधाचे लोण औरंगाबाद-पुण्यापुरते मर्यादित राहिले आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावतेंनी हेल्मेट सक्तीचा बडगा राज्यभर उगारायचे ठरवले तर विरोध वाढेल, हे निश्चित. मोटार वाहन कायद्याच्या अंमलबजावणीचा रावतेंचा आग्रह रास्तच आहे. तरीही विनाहेल्मेट दुचाकीचालकांकडून दंडवसुली सुरू झाल्याच्या विरोधात पुण्यातून जोरदार प्रतिक्रिया उमटल्या. हेल्मेट न घालणार्‍यांकडून दंडवसुली करणारे गृह खाते भाजपच्या मुख्यमंत्र्यांकडे आणि हेल्मेट सक्तीच्या कायद्याचा आग्रह धरणारे खाते शिवसेनेकडे. परिणामी जनक्षोभाचा रोख शिवसेनेच्या दिशेने वळला. त्यातून राजकीय संघर्ष पेटला. सक्ती हा मुद्दा शिवसेनेने प्रतिष्ठेचा केला तर विरोध हा मुद्दा भाजपच्या अहंकाराला दुखावू लागला. विशेष म्हणजे आता सत्तेत असलेल्या मंडळींनीच दशकभरापूर्वी हेल्मेट सक्तीविरोधात तीव्र आंदोलने केली होती. सत्तेत आल्यानंतर त्याचा विसर पडावा याला भाजप-शिवसेनेचा दुटप्पीपणा म्हणावा लागेल. 
  6.   वाहनांची प्रचंड संख्या आणि वेग यामुळे रस्त्यावरची सुरक्षितता धोक्यात आल्याची जाणीव सर्वसामान्यांना आहे. हेल्मेटची उपयुक्तता लोकांना पटलेली आहे. लोकांची अपेक्षा व्यावहारिक अडचणींची सोडवणूक करण्याची आहे. रावतेंनी त्या आधी समजून घ्यायला हव्या होत्या. महामार्ग, हमरस्त्यावरच्या हेल्मेट सक्तीला विरोध कोणाचाच नाही. परंतु गल्लीबोळातून कूर्मगतीनेे धावणार्‍या दुचाकीस्वारांना कशाला हवे हेल्मेट? सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मोडकळल्यामुळे दुचाकीवरचा प्रवास लादला जातो अशी परिस्थिती आहे. मद्यपान केलेले, मोबाइल कानाशी धरलेले किंवा वेगावर नियंत्रण नसलेले बेशिस्त वाहनचालक ‘यमदूत’ बनून मोकाट फिरत असताना सीटबेल्ट किंवा हेल्मेटच्या कारणावरून पोलिस लोकांच्या खिशात हात घालणार असतील तर त्यांचे चिडणे स्वाभाविक म्हणावे लागते.  हेल्मेट स्वरक्षणासाठी आहे. त्याकडे सक्तीच्या नजरेतून न पाहता गरज म्हणून पाहावे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: