मंगळवार, १६ फेब्रुवारी, २०१६

सत्तेसाठी केलेला देशद्रोह

  •   बुधवारी झालेल्या तांत्रिक बिघाडानंतर  डेव्हीड कोलमन हेडली काय सांगणार, त्याबददल कोणाला फ़ारशी उत्सुकता नव्हती. फक्त सामान्य माणसांना, देशप्रेमी व्यक्तिंना (जितेंद्र आव्हाड सोडून) जे वाटत होते त्यावर शिक्कामोर्तब होणार काय याबाबत शंका होती. जी माहिती आता बाहेर येत आहे, त्यात नवे असे काहीच नाही. पण पाकधार्जिण्या कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या भारतविरोधी नेत्यांनी या गुन्हेगारांचे सातत्याने समर्थन केल्यामुळे सामान्यांमध्ये प्रचंड चीड आहे. आपला मुंब्रा हा विधानसभा जणू काही पाकीस्तानातील भाग आहे अशा थाटात वावरणार्‍या जितेंद्र आव्हाडांचे खरे स्वरूप आता समोर आले आहे हे यातून दिसून आले. इशरत जहाचा बुरखा नाही तर जितेंद्र आव्हाडांचा चेहरा समोर आला आहे.
  •   डेव्हिडने जे सांगितले त्यात प्रामुख्याने इशरत जहान या फ़िदायिन मुलीविषयीची माहिती नवी नाही. कारण जेव्हा हेडलीला अमेरिकेत अटक झाली व तिथेच त्याच्यावर खटला भरला गेला, तेव्हाच त्याची भारतीय अधिकार्‍यांनी जबानी घेतली होती. त्याविषयी तेव्हाही गवगवा झालेला होता. त्यात इशरत फ़िदायिन असल्याचे त्याने कबुल केल्याची माहिती उजेडात आलेली होती. मात्र त्याबद्दल इथलेच स्वत:ला पुरोगामी म्हणवणारे कॉंग्रेस राष्ट्रवादीचे नेते, युपीए सरकार गोपनीयता पाळत होते. हा देशद्रोहच म्हणावा लागेल.
  •  इशरत पाकिस्तानची हस्तक असल्याची माहिती हाताशी असताना, तेव्हाचे मनमोहन सरकार व त्यातले गृहमंत्री लपवाछपवी कशाला करत होते, हा मुद्दा खरा चर्चेचा किंवा चिंताजनक आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या सुशीलकुमार शिंदेपासून राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांचा संपूर्ण देशभरातून तीव्र भाषेत निषेध होणे गरजेचे आहे. कारण देशविघातक आणि फितूरीचे कारस्थान त्यांनी केल्याचे दिसते आहे. इशरत ही बिहारची बेटी म्हणून तेव्हा नितीशकुमार अश्रू ढाळत होते. राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तिला मुलीसारखी ठरवून रडत होते, यासारखे दुर्दैव ते काय असेल? पवारांचेच निकटवर्तिय जितेंद्र आव्हाड हे इशरतच्या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून आकाशपाताळ एक करत होते. त्यांनी इशरतच्या कुटुंबाला लाखांचे चेक देण्यात पुढाकार घेतला होता. हे किती हिडीस राजकारण आहे? देशविरोधी कारवाया करणार्‍या इशरतला पाठीशी घालण्याचे काम मुंब्र्यातील लोक करत असतील त्यांची मते मिळवण्यासाठी मुंब्र्य्यातील मुस्लिम समाज एकवटत असेल तर हे सगळे देशद्रोही ठरतात का? जितेंद्र आव्हाडांनी देशद्रोहयांना पाठीशी घालण्यात मुंब्र्यातील मुसलमान पुढे आहेत हेच यातून दाखवून दिले असे समजायचे का?  त्याचप्रमाणे इशरत ही लष्करे तोयबाची हस्तक असल्याची माहिती भारत सरकारचे गृहमंत्री का लपवत होते, हा गहन प्रश्न आहे. 
  •     इशरतला निरपराध ठरवण्यासाठी तिच्या चकमकीत गुंतलेल्या अधिकार्‍यांना गजाआड टाकण्यासाठी आटापिटा चालला होता. त्याच्याही पुढे जाऊन भारतीय गुप्तचर खात्याच्या वरीष्ठ अधिकार्‍याना खुनी ठरवण्यासाठी सीबीआयला कामाला जुंपलेले होते. अशा सर्वांच्या अब्रुची लक्तरेच आता हेडली वेशीवर टांगतो आहे. पण २६/११ च्या हल्ल्याच्या सुनावणी दरम्यान हे उघड होते आहे. या हल्ल्यात करकरे, साळसकर, कामटे असे अधिकारी मारले गेले. त्यांना मारण्यात अशाच राजकीय नेत्यांचा सहभाग होता काय याचा तपास आता करावा लागेल. म्हणूनच निवडणुकीच्या तोंडावर कसाबला कसाबसा फासावर चढवून आपले पाप धुण्याचा प्रकार सुशीलकुमार शिंदे आणि कॉंग्रेसने केला का? 
  •   तत्कालीन कॉंग्रेस सरकार हेडलीची जबानी लपवून आपल्या अधिकार्‍यांना गुन्हेगार ठरवण्याचे उद्योग करीत होती. ही बाब अतिशय गंभीर आहे. सेक्युलर वा पुरोगामी असण्यासाठी पाकिस्तानी हस्तक वा घातपातींना पाठीशी घालण्यापर्यंत तात्कालीन सेक्युलर सरकारने किती भयंकर निर्णय घेतले, त्याचा पर्दाफ़ाश हेडलीच्या साक्षीने आज झाला आहे. तेव्हाचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे किंवा पंतप्रधान मनमोहन सिंग या विषयात काय करत होते? हेडलीची कबुली हाताशी असताना त्यांनी विचारणा झाली तरी इशरत दोषी असल्याची माहिती कशाला लपवली होती? ती लपवून आपण देशाचा घात करतोय, एवढेही त्यांच्या लक्षात आले नसेल काय? इशरतचे उदात्तीकरण थांबवून तिला गुन्हेगार ठरवणे दूर राहिले. उलट इशरतचा निकाल लावणार्‍या अधिकार्‍यांनाच आरोपी बनवण्यात तेव्हा सीबीआय गर्क होती. अर्थात सीबीआयचे स्वरूप म्हणजे कॉंग्रेस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टीगेशन असे होते. एकामागून एक अर्धा डझन अधिकारी त्यात गोवले गेले होते. 
  •     हेडलीने तेव्हाच दिलेली कबुली बाहेर आलेली होती. पण त्यामुळे इशरत प्रकरणात मोदींना सुटका मिळेल म्हणून ती जबानी लपवण्यात धन्यता मानली गेली. हेडलीच्या कबुलीविषयी जी माहिती देण्यात आली, त्यातला इशरतविषयीचा भाग खोडून पाठवण्यात आला. जेणे करून इशरत फ़िदायिन आहे, याला दुजोरा मिळू नये. हा सत्तेसाठी केलेला देशद्रोहच म्हणावा लागेल. अशा देशद्रोह्यांना शासन झाले पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: