- ठाण्यातल्या नाट्य संमेलनावर एकदाचा पडदा पडला. आता पडद्याबाहेरची नाटके सुरू झाली. म्हणजे तसे हे नाट्यसंमेलन आहे की शिवसेनेचा मेळावा आहे असेच वातावरण या संमेलनात होते. त्यामुळे जी चर्चा संमेलनाची होते तसे काहीच घडले नाही. नाट्यप्रेमींनी त्याकडे पाठच फिरवलेली दिसली. तर जमलेला गोतावळा हा मेळाव्यासाठीच आलेला होता.
- या संमेलनात ‘नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद दोन वर्षे असावे’ अशी मागणी मावळत्या अध्यक्षा श्रीमती फय्याज यांनी केली. वर्षभरात नाट्य परिषदेच्या राजकारणात आणि राजकारण्यांच्या नाटकात काहीच करता आले नाही हे फैयाज यांच्या लक्षात आले असावे. म्हणून त्यांनी तशी मागणी केली असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच ‘संमेलनाच्या अध्यक्षाला काही अधिकार नाहीत, तो गुळाचा गणपती आहे’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे एकुणच शिवसेनायुक्त नाट्यसंमेलनावर त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे दिसते. म्हणजे दिवाळीतला किल्ला असतो. त्या किल्ल्यावर मातीची खेळणी, पुतळे मांडले जातात. त्याप्रमाणे या शिवसेनेच्या गडावर नाटकातली सोंगं उभी केली काय असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही.
- आजकाल अशीच परिस्थिती सर्वत्र आहे. म्हणजे जे नाटय संमेलनाच्या अध्यक्षांचे आहे तेच साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांचे आहे. पिंपरी चिंचवडमध्ये मागच्या महिन्यात अशीच डी वाय पाटील यांनी राजकीय धुळवड उडवली. डी वाय पाटील यांच्या या संमेलनाचा फायदा कॉंग्रेसला मिळणार की राष्ट्रवादीला असा विचार सुरू असतानाच शिवसेनेेने नाट्य संमेलनावर आपली भगवी मोहोर उमटवली.
- वास्तविर साहित्य संमेलन आणि नाटय संमेलन ही दोन्ही संमेलने वेगळी हवी कशाला? नाटक हा साहित्याचा प्रकार नाही का? जर साहित्य संमेलनात कथा, कादंबरी, कविता, समीक्षा, मुलाखती हे सर्व प्रकार येऊ शकतात तर त्यात नाटक का येत नाही? याचे मुख्य कारण दोन संस्थांमध्ये वेगवेगळ्या माणसांची सोय होऊ शकते. नाटकात काम करण्यासाठी एकदा रंगमंचावर न गेलेली, किंवा नाट्यनिर्मिती, त्यातील तांत्रिक अंग सांभाळण्याचे काम कधीही न केलेली व्यक्ति नाट्य परिषदेवर असते. स्थानिक राजकारणात शिरकावर करून आपल्याकडे सेलिब्रेटींचा भरणा वळवून त्यांच्यासमवेत फोटो काढून गर्दी जमवणारे नाटक करणारे नाट्य परिषदेत आणि साहित्य परिषदेत आहेत. त्यांच्याकडून काय अपेक्षा करता येणार?
- ‘मराठी साहित्य परिषद’ ही एक संस्था आणि ‘मराठी नाटय परिषद’ ही एक संस्था. त्यामुळे संस्था दोन म्हणून संमेलने दोन होतात. नाटक हा विषय राजकारणातही आहे, जीवनातही आहे आणि प्रपंचातही आहे. इतके महत्त्वाचे विषय असलेले नाटक साहित्यापासून वेगळे का काढले गेले? त्याच्याकरिता वेगळे संमेलन कशाला? म्हणजे आमचा रेल्वेचा आणि केंद्रिय अर्थसंकल्प वेगवेगळा मांडला जातो. तसलाच हा प्रकार आहे. एकमेकांशी संबंध असूनही दोघांची वेगळी चूल असते.
- खरं तर ‘साहित्य संमेलनातच नाटय संमेलन सामावून घेऊन मराठी भाषेचा एक भव्यदिव्य सोहळा करावा’ असा विचार कुणाच्या मनात का येत नाही? सलग आठवडा गेला तरी हरकत नाही. गणेशोत्सवाप्रमाणे मस्तपैकी एकत्रित हा सोहळा करायला काय हरकत आहे? मराठी साहित्यामध्येच कथा, कादंबरी, कविता, समीक्षा यांचं संमेलन वेगळं आणि नाटकाचं वेगळं अशी फाळणी कशाकरिता केली आहे हे अनुत्तरीत आहे.
- दोन्हीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बरेच राजकारण होते. संमेलने दोन्हीही वादग्रस्तच होत असतात. त्याची निवड कशी असावी याबाबत नेहमीच चर्चा होते. त्यातच आता कालावधीचा विषय आहे. अध्यक्षांचा एक वर्षाचा कार्यकाळ अपुरा आहे, ही गोष्ट तर सर्वमान्य आहे. परंतु आतापर्यंतच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी किंवा नाटय संमेलनाच्या अध्यक्षांनी १ वर्षात काय केले आहे त्याचा अहवाल कधीच समोर येत नाही. म्हणजे जे आचार्य अत्रे, ना. सी. फडके, स्वा. वि. दा. सावरकर यांनी आपल्या संमेलनात केले ते नंतर कधी घडले नाही. आचार्य अत्रेंमुळे संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ आले. ना. सी. फडक्यांमुळे मानधनाचा प्रश्न सुटला. सावरकरांनी मराठी लिपी टाईपरायटरवर येईले हे गृहीत धरून अ ची बाराखडी सुरू करण्याचा आग्रह धरला तो पुर्णत्वास नेला. तसे नंतर कोणी काय केले याचा अहवाल एकदा प्रकाशीत केला पाहिजे. त्या सबनीसांच्या एरंडाच्या गुर्हाळाचे प्रकाशन केले त्यापेक्षा हा अहवाल जास्त महत्वाचा आहे.
- साहित्य परिषद किंवा नाटय परिषद आपापल्या अध्यक्षांना वर्षभराचा असा काही कार्यक्रम देते का? कार्यक्रम दिला तर त्यांच्या फिरण्याची व्यवस्था केली जाते का? वर्षभर अध्यक्षांनी फिरायचे म्हटले तर त्यांना कार्यक्रम द्यावा लागेल. डॉ. सदानंद मोरे वर्षभरात खूप फिरले. अनेकांच्या गाठीभेटी त्यांनी घेतल्या. बाकी आतापर्यंतचे अध्यक्ष किती फिरले? याचा तपशील नाही. ग्रामीण भागातील तरुण लेखक पुढे यावेत, त्यांनी कथा, कादंबरी, नाटकं लिहावीत आणि ते लिहिताना त्यांना प्रोत्साहन देण्याची भूमिका अध्यक्षांनी घ्यावी. साहित्य संमेलनाच्या वर्षभराच्या कार्यकाळात किती नवीन लेखक, कवी पुढे आले? किती जणांची पुस्तके तयार झाली? किती जणांना प्रकाशक मिळाले? किती जणांच्या पुस्तकांचे प्रकाशन कार्यक्रम झाले ? या सगळ्या प्रश्नांचा आढावा साहित्य परिषदेने घ्यायला हवा. तसाच हिशोब नाट्य परिषदेने द्यावा. म्हणजे रंगमंचावरील राजकीय मोहरे बाजूला होवून खरे रंगकर्मी आणि साहित्यिक पुढे येतील.
शुक्रवार, २६ फेब्रुवारी, २०१६
राजकीय बाजारात अडकलेली संमेलने
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा