- हिंदू अविभक्त कुटुंबात वंशपरंपरेने मोठ्या मुलालाच कर्ता मानले जाते. त्या परंपरेला दिल्ली उच्च न्यायालयाच्या नुकत्याच दिलेल्या निकालाने चांगलाच हादरा दिला आहे. ‘थोरले अपत्य मुलगी असेल तर ती कुटुंबाचा ‘कर्ता’ मानली जावी’ असा महत्त्वपूर्ण निकाल न्यायालयाने दिला. फार मोठी सुधारणा करणारा हा निर्णय आहे. आजवर अशाप्रकारचा कोणी विचारही केला नसेल. कर्ता पुरूष म्हणूनच आपली संस्कृती ओळखली जाते. पण जो कोणी थोरला असेल त्याला अधिकार मिळणे हा फार महत्वाचा निर्णय म्हणावा लागेल.
- परंपरेतील एक फार मोठी सुधारणा या निकालाने केलेली आहे. सुधारीत हिंदू वारसा हक्क कायद्यानुसार महिलांनाही कर्तेपणाचा हक्क प्राप्त झाल्याची जाणीव न्यायालयाने पुरुषवर्गाला करून दिली आहे. हा निकाल महिला सक्षमीकरणाला पूर्ण न्याय देतो, यात शंकाच नाही. तसेच परंपरा आणि प्रथेचा बाऊ करून स्त्रियांना दुय्यम लेखणार्या पुरुषवर्गाच्या डोळ्यात अंजन घालतो हे या निकालावरून स्पष्ट होते.
- आपल्याकडे स्त्रियांचा हक्क फक्त चौथर्यावर चढण्याइतपत मर्यादीत करण्याची भावना स्त्रि संघटनांचीच आहे. प्रत्यक्षात ज्या कर्तृत्ववान स्त्रिया आहेत त्यांचे कर्तृत्व कुठेही उल्लेखले जात नाही. भाषणात एक ठराविक चार नावे झाली की झाला स्त्रियांचा गौरव. पण ज्यांनी खर्या अर्थाने आपले थोरलेपण सिद्ध केले आहे अशा स्त्रियांचा फारसा गौरव होत नाही. थोरलेपण हे जन्माने नाही तर कर्माने येते. जबाबदारी घेण्याने ते सिद्ध होते. बरोबर बारा वर्षांपूर्वी सातार्यातील एक रंगकर्मी, क्रीडाप्रेमी आणि हरहुन्नरी अभ्यासू व्यक्तिमत्व सुधीर माजगांवकर यांचे निधन झाले. तेव्हा त्यांचा अंतिम संस्कार त्यांची कन्या चैत्राली हीने केले. आज बारा वर्ष या गोष्टीला झाली. आज चैत्राली छोट्या पडद्यावर नाव कमावते आहे. सौभाग्यवती या मालिकेतून ती सर्वांच्या लक्षात राहते आहे. पण अभिनयापलिकडे तिने जी थोरलेपणाची जबाबदारी सांभाळली आहे त्याला सलामच करावा लागेल. आज ज्या कोणी स्त्रियांना आपल्या हक्कासाठी झगडा करायचा आहे त्यांनी आपले कर्तव्य अशाप्रकारे सिद्ध करून दाखवले पाहिजे. शनीच्या चौथर्यावर चढून काय फायदा? त्यापेक्षा आपल्या हक्कासाठी न्यायालयातून असा न्याय मिळवणे केव्हाही उत्तम.
- तसं पाहिलं तर एरवी स्त्री-पुरुष समानता ही केवळ कागदावरच आढळते. कायद्यात तरतुदी होतात. मात्र त्याचा लाभ महिलांना सहसा मिळत नाही. ही समानता कृतीत येण्याला पुरुष श्रेष्ठत्वाची गतानुगतिक भावना हाच मोठा अडसर आहे, होता. पण न्यायालयाच्या या निर्णयाने एक नवी दिशा दाखवून दिलेली आहे. आजवर कोणतीही थोरली मुलगी आपला हक्क मागण्यासाठी पुढे आली नसेल. अशा भगीनींना हा मार्गदर्शक असा निर्णय आहे. या निकालाबद्दल न्यायालयाचे अभिनंदन करू तेवढे थोडेच.
- आपल्याकडे म्हटले जाते की, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. अर्थात हे फक्त भाषणातच म्हटले जाते. कारण तोसुद्धा एक पुरुषी नाटकीपणा असतो. पुरुषांपेक्षा स्त्रिया तसूभरही कमी नाहीत हे स्पष्ट सांगायचे नाही तर त्यांना पाठीमागची जागा देण्याचा प्रकार इथे आहे. किंबहुना पुरुषाइतक्याच महिला हुशार, सक्षम, सुजाण आणि तत्पर असल्याचे स्त्रियांनी कर्तबगारीने सिद्ध केले आहे. परंतु ती फक्त सपोर्टर आहे असेच या वक्तव्यातून दिसून येते. कर्तव्यात टाळाटाळ करण्याची प्रवृत्ती ही आज तरी पुरुषांचीच मक्तेदारी आहे. भारतातच नव्हे तर जगातील अनेक मोठमोठ्या आर्थिक संस्थांची धुरा स्त्रिया चोखपणे सांभाळत आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य, आयसीआयसीआयप्रमुख चंदा कोचर, ऍक्सिस बँकेच्या प्रमुख शिखा शर्मा, अलाहाबाद बँकेच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी पानसे, बँक ऑफ इंडियाच्या विजयलक्ष्मी अय्यर, युनायटेड बँक ऑफ इंडियाच्या अर्चना भार्गव, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख ख्रिस्तीना लगार्ड अशी कितीतरी नावे सांगता येतील. स्त्रियांमध्ये नैसर्गिक व्यवस्थापकाची भूमिका निभावण्याची क्षमता असते. त्यामुळे या मोठ्या संस्थाचे अध्यक्षपद, फंड मॅनेजरपद सांभाळुन या बँकांना एका उंचीवर नेवून ठेवण्याचे काम त्यांनी केले आहे. मग जगाचे कर्तेपण करणारी स्त्रि घरातील कर्ती का नाही?
- आज स्त्रियांना हक्कांसाठी पदोपदी लढा द्यावा लागतो. आंदोलने पुकारावी लागत आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्ली उच्च न्यायालयाने स्त्रीशक्तीच्या बाजूने दिलेल्या कौलाला विशेष महत्त्व आहे. स्त्रियांचे ‘कर्ते’पण प्रत्येक घराला घरपण देते. तथापि ‘गृहलक्ष्मी’ शब्दाचा पुरस्कार बहाल करून तिला दुय्यम ठरवण्याचा मानभावी प्रकार समाजाच्या अंगवळणी पडला आहे. पण न्यायालयाने फार मोठे काम केले आहे. त्याचे स्वागत मोठ्या मनाने झाले पाहिजे.
शनिवार, ६ फेब्रुवारी, २०१६
सौभाग्यवती मी, कर्ती मी
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा