गुरुवार, २० नोव्हेंबर, २०१४

वेध भविष्याचा नाही, वेध सरकारला ग्रहण लावण्याचा

अलिबाग येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन बैठकीत, वेध भविष्याचा घेताना शरद पवारांनी भाजपला ग्रासण्याचा प्रकार केला. आपल्याकडे पूर्वी सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाबद्दल काही भाकड कथा किंवा अज्ञानामुळे गैरसमज होते. सूर्याला केतू आणि चंद्राला राहू गिळतो त्याला ग्रहण म्हणतात. ते ग्रहण सुरू होण्यापूर्वी काही काळ ग्रहणाचे वेध लागतात. हे वेध म्हणजे काय? तर  चंद्राच्या जवळ सरकत सरकत राहू येत असतो आणि म्हणत असतो ‘खाऊ का तुला खाऊ का तुला?’ चंद्रापर्यंत जावून स्पर्ष करे पर्यंत वेधकाल असतो. शरद पवार नेमके तसेच करत आहेत.     देवेंद्र फडणवीस यांचे समर्थन करून शरद पवारांनी महाराष्ट्राच्या कुंडलीत वेगळी युती केली आहे. आता त्याचा षडाष्टक योग कधी येतो आणि या सरकारला ग्रहण कधी लावायचे याबाबत शरद पवारांनी राहूची भूमिका सुरू केली आहे. वेध भविष्याचामध्ये शरद पवारांनी हे सरकार अस्थिर आहे आणि आम्ही केव्हाही ते कोसळवू शकतो असेच वेध दिले आहेत.    शरद पवार यांच्याशिवाय महाराष्ट्रातील राजकारणाची आणि सत्ताकारणाची चर्चा होऊच शकत नाही आणि कोणी करण्याचा प्रयत्न केला तर पवार तसे होऊ देत नाहीत, हे पवारांना दाखवून द्यायचे होते. अलिबागमध्ये त्यांनी नेमके तेच केले. मतदारांनी घरी बसवले तर पवार दुसर्‍याच्या दारी जातात पण तिथेही ते त्यांची चर्चा न करता स्वतःचीच चर्चा घडवून आणतात. पवारांचा अनुभव खूप मोठा आहे. पवारांचा आवाका मोठा आहे. पवारांचा कार्यकर्त्यांचा गोतावळा मोठा आहे. तसेच पवार या नावाचा भ्रम आणि संभ्रमही मोठा आहे. पवार यांनी तो मोठ्या कौशल्याने तयार केला आहे आणि या भ्रमाच्या भोपळ्यात काही भोळसट गुंडाळले जातात. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार, महाराष्ट्रातील भाजपही गुंडाळला गेला. शिवसेनेला सोडून भाजपने पवारांशी केलेली शय्यासोबत आता त्यांना पवारांच्या हातातील बाहुले बनवू लागली आहे. आता पवारांनी विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकांची शक्यता असल्याचे सांगून आणि आपला पाठिंबा गृहित धरू नये असे जाहीर करून, फडणवीसांच्या पायाखालचे जाजम आपण कधीही खेचू शकतो, असा इशारा दिला आहे.      पवारांनी अल्पमतातल्या भाजप सरकारला पाठिंबा का दिला? तर त्यांना म्हणे या राज्यातले सरकार अस्थिर होऊ द्यायचे नव्हते. एखाद्याला वाटेल शदर पवारांना केवढी या राज्याची काळजी आहे? आणि त्यांची ही काळजी भल्याभल्यांच्या काळजाला घरे पाडून गेली. आता मात्र पवारच सरकारला विचारत आहेत की आम्ही किती दिवस तुम्हाला टेकू द्यायचा? आम्ही काय सरकार टिकवण्याचा मक्ता घेतला आहे का?              बरोबर महिनाभरापूर्वी, विधानसभेचे निकाल जाहीर होत असताना पवारांनी माध्यमांपुढे दूत धाडून भाजपला पाठिंबा जाहीर केला. महिनाभरात त्यांची अशी काय मती फिरली की त्यांना, कडेवर घेतलेले फडणवीसांचे सरकार खाली ठेवायची, राज्य अस्थिर करण्याची घाई झाली आहे? शिवसेनेला धडा शिकवण्यासाठी भाजपने पवारांचा उपयोग करून घेतला आणि पवार त्या कर्जाच्या वसुलीसाठी आता पठाणासारखे उभे ठाकले आहेत. भाजप आणि शिवसेनेत कधी भरून न येणारी पोकळी निर्माण करून राज्याच्या राजकारणात किंगमेकरची भूमिका बजावण्यासाठी शरद पवार सज्ज झाले आहेत. अजून काही दिवसांनी काँग्रेसला पटवून काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठींब्यावर शिवसेनेला सरकार स्थापन करण्याची प्रेरणा देवून हरभर्‍याच्या झाडावर चढवायला शरद पवार मागेपुढे पाहणार नाहीत. भाजप किंवा शिवसेना यापैकी कोणालाही आपण आपल्या बोटावर नाचवू शकतो हे दाखवून दिले की पुढच्या निवडणुकीत आपल्यायोग्य परिस्थिती निर्माण होईल याची खात्री शरद पवारांना आहे.  समाजात इभ्रत असलेल्या एखाद्या व्यक्तीला परिस्थितीमुळे कधी कधी सावकाराकडून अव्वाच्या सव्वा दराने कर्ज घ्यावे लागते. एकदा नड भागली की ती व्यक्ती सावकाराशी व्याजाच्या दरावरून हुज्जत घालते, तसे भाजपचे झाले आहे. आपण सावकाराकडून कर्ज घेतले हे जगाला कळू नये, असे त्या व्यक्तीला वाटते आणि त्या व्यक्तीने कर्ज घेतले हे जगापुढे यावे, असे सावकाराला वाटते. देवेंद्र फडणवीसांचे नाक दाबून मोदी सरकारचे तोंड उघडण्याचा हा पवारांचा डाव आहे.     गुजरातमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान सक्तीचे करणार्‍या भाजपने महाराष्ट्राच्या विधानसभेत मात्र मतदानाला पाठ दाखवून आवाजाच्या बळावर लाज झाकून ठेवली. सत्ताप्राप्तीसाठी राष्ट्रवादीचा पाठिंबा घेण्यावर सोशल मीडियात एवढी तीव्र प्रतिक्रिया उमटली होती की भाजपला तो उघड घेणे अडचणीचे झाले. शरद पवारांना मात्र भाजपला दिलेल्या पाठिंब्याची पुरेपूर वसुली करायची आहे.     महाराष्ट्रात एकदा सगळे स्थिरसावर झाले, वातावरण निवळले की हळूच केंद्रातील एनडीएच्या वळचणीला जाऊन उभे रहायचे, अशी त्यांची योजना होती, असे म्हणतात. परंतु मनाची नसली तरी जनाची बाळगली पाहिजे, याचे भान भाजपला आले आणि पवारांना आपला मनसुबा पार पडणार नाही याचा बहुधा सुगावा लागला. शिवसेनेने विरोधी पक्षनेतेपद स्वीकारले असले तरीही सेनेच्या सत्तेतील सहभागाची शक्यता ना भाजप फेटाळत आहे, ना शिवसेना. नेमके कोण कोणाच्या पाठिशी आहे आणि सरकार नेमके कोणाच्या पाठिंब्यावर आहे हे महिना झाला तरी स्पष्ट नाही. उद्या सेना सत्तेत आली तर पुन्हा राष्ट्रवादीच्या नशिबी सत्तेचा उपवास आणि विविध चौकशींच्या शुक्लकाष्ठाचा बागुलबुवा येणार. यातून मार्ग काढण्यासाठी पवारांनी, पुन्हा निवडणूक होण्याच्या शक्यतेचा फुगा हवेत सोडला आहे. सरकार स्थिर ठेवण्याचा मक्ता त्यांनी घेतलेला नाही, हे खरेच आहे.    महाराष्ट्रातील विविध पक्षातील आणि भाजपमधीलही काही शक्तींना गेल्या अनेक दिवसांपासून खंत आहे. सोशल मिडीयावरून ही खंत सतत बोलूनही दाखवली जात आहे. ती खंत म्हणजे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले ही. एक ब्राह्मण या राज्याचे नेतृत्त्व कसे काय करू शकतो? ही खंत तमाम मराठा आणि बहुजन समाजात खदखदताना दिसते आहे. भाजपमधील खडसे, तावडे यांनी ती बोलूनही दाखवली. खडसेंनी तर कार्तिकी एकादशीच्या पुजेला पंढरपूरात ही खंत जाहीर व्यक्त केली. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ब्राह्मण असता कामा नये. नाहीतर पुन्हा निवडणुकीला जाताना मतदार मतदान करणार नाहीत अशी असुरक्षितता प्रत्येकाच्या मनात आहे. युती सरकारच्या काळातही ती असुरक्षितता होती. शिवसेनाप्रमुखांनी मनोहर जोशी यांना चार वर्ष मुख्यमंत्री केले. पण अखेरच्या वर्षासाठी म्हणून मराठा मुख्यमंत्री असला पाहिजे यासाठी नारायण राणे यांना आणले होते. हीच असुरक्षितता प्रत्येक पक्षाला आज भेडसावत आहे. त्यातच नुकतेच कोर्टाने मराठा आरक्षण स्थगित केलेले आहे. ती प्रक्रीया आधीच्या सरकारची असली तरी कावळा बसायला आणि फांदी मोडायला एक गाठ पडावी तसे देवेंद्र फडणवीस सरकारचे झाले आहे. राष्ट्रवादीचे विनायक मेटे मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरूनच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देवून निघून गेले. त्यांनी भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी केली. त्यामुळे याच मुद्यावरून भाजपला अडचणीत आणण्याची संधी शरद पवार कधीही सोडणार नाहीत. त्यामुळे भाजपला खिंडीत पकडण्यासाठी भविष्यात मराठा मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा गाजणार हे निश्‍चित.महाराष्ट्रातील हे सरकार पाडण्यासाठी लागणारे आणखी एक निमित्त येत्या काही दिवसात होवू शकते. ते कारण म्हणजे स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा हा भाजपच्या अजंड्यावर आहे. देवेंद्र फडणवीस स्वत: विदर्भवादी आहेत. विदर्भ वेगळा करण्याच्या मुद्दयावर शिवसेना कधीच भाजपला साथ देणार नाही. तो मुद्दा उकरून काढून शरद पवार ही अस्थिरता माजवतील आणि आपली पोळी भाजून घेतील हे निश्‍चित. त्यामुळे वेध भविष्याचा नाही तर शरद पवारांना वेध लागले आहेत सरकार पाडण्याचे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: