झी मराठी वाहिनीवर जय मल्हार या मालिकेतील हेगडी प्रधानची भूमिका करणारा कलाकार अतुल अभ्यंकर याचे चार दिवसांपूर्वी अकाली निधन झाले. एक चांगला कलाकार निघून गेला असला तरी शो मस्ट गो ऑन या न्यायाने मालिकांमध्ये खंड पडू शकत नाही. कलाकाराचा डाव अध्यावर मोडला तरी मालिकेची कहाणी पूर्ण ही होतीच. डेली सोपच्या जमान्यात अशा प्रकारच्या घडलेल्या काही घटनांचा हा वेध. महेश कोठारेंची पहिलीच निर्मिती असलेल्या झी मराठीवरील ‘ जय मल्हार ’या मालिकेतील हेगडी प्रधान ही भूमिका साकारणार्या अतुल अभ्यंकरचा नुकताच मृत्यू झाला. हसतमुख शांत आणि संयमी अशाप्रकारे ही भूमिका सादर करत असताना त्यांची असलेली संवादफेक ही प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. खंडोबाचा प्रधान, मित्र, सहकारी, सखा अशा सगळ्या भावना ओतून त्यांनी ती भूमिका वठवली होती. त्यामुळे गेले सहा महिने ही मालिका सुरू झाल्यापासून प्रत्येकाच्या मनात हेगडी प्रधानने घर केले होते. हा हसतमुख चेहर्याचा कलाकार कोण आहे, त्याचे नाव काय हे त्याच्या निधनापर्यंत अनेकांना माहित नव्हते. मुळातच पोषाखी मालिका असल्यामुळे वर्तमानातील चेहरा आणि ओळख समोर येणे अवघड होते. त्याने अनेक नाटकांमधून चांगल्या भूमिका केल्या होत्या. पण अतुलच्या निधनानंतर आता नवा हेगडी प्रधान कोण येणार याची उत्सुकताही प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली. डेली सोपच्या अन्य मालिकांमध्ये अशा कलाकाराचा मृत्यू झाला तर त्याची रिप्लेसमेंट मिळेपर्यंत कथानकाला वेगळे वळण देता येणे शक्य असते. कलाकार सहज बदलणे शक्य होते. तसेच कधीकधी त्या कलाकाराचा रोल तिथेच संपवूनही टाकला जातो. पण जय मल्हारमधील कथानक हे पौराणिक असल्यामुळे तीथे कल्पकता लढवणे अशक्य आहे. त्यामुळे काही भाग हेगडी प्रधानला वगळून केले तरी नवा हेगडी प्रधान हा आणला जाईल. कलाकाराचा डाव अर्ध्यावर मोडला तरीही कहाणी पूर्ण ही होईलच. 2001 मध्ये अल्फा टीव्हीवर भक्ती बर्वेची एक मालिका अशीच लोकप्रियतेच्या शिखरावर होती. नाटक, सिनेमा, मालिका अशा सगळ्या आघाड्यांवर काम करणारी भक्ती बर्वे ही तेव्हा फुलराणीतून रिटायर्ड झाली होती. त्यामुळे पुल, फुलराणी आणि मी असा एकपात्री कार्यक्रम भक्ती बर्वे सादर करत होत्या. वाईच्या कृष्णाबाईच्या उत्सवात तो कार्यक्रम झाल्यानंतर नव्यानेच होत असलेल्या महामार्गावरून येताना गाडीचा अपघात होवून त्यात भक्ती बर्वे यांचा मृत्यू झाला. भक्ती बर्वे यांच्या मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला होता. भक्ती बर्वे नावाची जादू तीस पस्तीस वर्ष महाराष्ट्रावर होती. मग दूरदर्शनवरील बातम्या देताना त्यांची शब्दफेक असो वा ती फुलराणीमधील तुला शिकवीन चांगलाच धडा असो. पण भक्ती बर्वे नावाचे गारूड मराठी मनावर दीर्घकाळ होते. त्यामुळे त्यांच्या अपघाती निधनामुळे अल्फा टीव्हीवरची मालिका पोरकी झाली. कौटुंबिक अशा मालिकेतील न्यायनिष्ठूर आजीची भूमिका साकारत असताना या आजीचा अकाली मृत्यू झाला होता. पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर भक्ती बर्वेच्या जागी नवी आजी आली आणि मालिका पुढे सुरू झाली. अर्ध्यावरती कलाकाराचा डाव मोडला असला तरी तिथेही कहाणी पूर्ण झाली होती. डेली सोपमधील गाजलेल्या मालिकांमध्ये ईटीव्ही मराठीवरील चार दिवस सासूचे या मालिकेतही असे प्रकार घडले आहेत. जवळपास दहा वर्ष चाललेल्या या मालिकेत एक आशालता देशमुख म्हणजे रोहीणी हट्टंगडी, कविता लाड आणि सुनीला करबेळकर, प्राजक्ता कुलकर्णी सोडल्या तर जवळपास सगळी पात्रे या ना त्या कारणाने बदलून झाली. पण या मालिकेला सर्वात पहिला झटका दिला होता तो त्या मालिकेतील आशालता देशमुख यांचा चार्टर्ड अकौंटटची भूमिका करणार्या कलाकाराने. सुप्रियाच्या मदतीने पेपर बदलून इस्टेट बळकावण्याचा आणि देशमुख इंडस्ट्रीजला पहिला धक्का देणारा खलनायक असा चार्टर्ड अकौंटंट अचानक मालिका सुरू असताना हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावला. त्यामुळे कथानकाला वेगळे वळण देवून त्याला गायब केला गेला. दीर्घकाळ खलनायकाची असलेली त्याची भूमिका बदलली गेली आणि नवा खलनायक आणण्याचे कसब निर्माता दिग्दर्शकाने दाखवले. कथानकात बदल करून सुशांत सुभेदार नावाच्या नव्या राजकीय खलनायकाची एंट्री केली गेली. इथेही कलाकाराचा डाव अर्ध्यावर मोडला असला तरी कहाणी पूर्ण केली गेली. चार दिवस सासूचे मध्येच मालिका पाच वर्ष सतत चालल्यानंतर आशालता देशमुख म्हणजे रोहीणी हट्टंगडींच्या पतीची भूमिका करणार्या जयंत घाटे यांचा मृत्यू झाला. त्याच्या जागी चारच दिवसात रोहीणी हट्टंगडींना नवा नवरा देण्यात आला आणि अर्ध्यावरती कलाकाराचा डाव मोडला तरी मालिकेची कहाणी पुढे पाच वर्ष सुरू राहिली आणि पूर्ण झाली. दोन वर्षांपूर्वी झी मराठीवर ‘ मला सासू हवी’ ही मालिका लोकप्रिय झाली होती. या मालिकेत आबांची भूमिका करणारे आनंद अभ्यंकर आणि विघ्नेशची भूमिका करणारा अक्षय पेंडसे यांचा पुण्याजवळ महामार्गावर टोलनाक्याजवळच अपघाती मृत्यू झाला. 23 डिसेंबर 2012 ची पहाट ही झी मराठीला धक्का देणारी होती. एकाचवेळी एकाच मालिकेतील दोन महत्त्वाच्या कलाकारांचा मृत्यू झाला होता. मालिकेचा टीआरपीही चांगला होता. तो जपणे आवश्यक होते. त्यासाठी मालिकेतील कथानकात विघ्नेशला काही दिवसांसाठी टूरवर पाठवण्यात आले. आबाही त्याला आणायला गेले आहेत अशी चर्चा दाखवून बाकीच्या कलाकारांकडून एपिसोड सुरू ठेवले गेले. पंधरा दिवसांनी आबा आणि विघ्नेशची नव्या कलाकारांसह एन्ट्री झाली. आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसेचा डाव अर्ध्यावर मोडला असला तरी मालिकेची कहाणी मात्र पूर्ण झाली. कित्येकदा मालिकेतील दुय्यम अशा पात्राचा अचानक मृत्यू झाला किंवा त्या कलाकाराने मालिका मध्येच सोडली तर त्याला अत्यंत विचित्रपणे मालिकेतून नाहीसे केले जाते. झी मराठीवरील अवंतीका ही मालिका अशीच लोकप्रियतेच्या शिखरावर होती. या मालिकेत पुष्कर श्रोत्री याच्या आईची आणि शर्वणी पिल्लेच्या सासूची भूमिका करणारी कलाकार अचानक अशीच नाहीशी केली गेली. कथानकाशी काहीही संबंध नसलेली कथा घुसडून त्या कलाकाराला संपवले गेले. घरात एकटीच असताना दरोडेखोर येतात आणि तिच्यावर हल्ला करतात आणि ती आई मरते. संपवूनच टाकली तिला. नंतर त्याचा काही तपास नाही, काही नाही. पण त्या काळात मुंबईत एकट्या दुकट्या वृद्धांवर हल्ले होण्याच्या घटना घडत होत्या. त्याचा संदर्भ घेवून त्या म्हातारीला संपवले गेले. कलाकाराचा मृत्यू झाला तरी मालिकांवर काहीही फरक पडत नाही. जन पळभर म्हणतील हाय हाय अशी अवस्था या मालिकांच्या बाबतीत होताना दिसते. कलाकाराचा डाव अर्ध्यावर मोडला तरी मालिकांची कहाणी मात्र पूर्णच होत राहते. मराठी चित्रपट मालिकांमधून विनोदी भूमिका करणारा कलाकार जयंत तारे याचे असेच गेल्यावर्षी अचानक निधन झाले. फू बाई फू सारख्या अनेक मालिकांमधून तो काम करत होता. पण कोणत्याही डेलीसोपमध्ये त्यावेळी तो नसल्यामुळे त्याचा डाव अर्ध्यावर मोडला तरी कहाणी कुणाची अधुरी राहणार नव्हती. फू बाई फूमधून तो बाहेर पडला इतकेच. मालिका सोडलेल्या घटनाकलाकारांच्या मृत्यूव्यतिरीक्तही अनेकवेळा कलाकारांच्या काही समस्यांमुळे मालिका सोडण्याची वेळ येते. कधी बिझी शेड्यूल्डमुळे तर कधी भूमिका न आवडल्यामुळे कलाकार मालिका सोडतात. तरीही त्या मालिका पूर्ण होतात. चार दिवस सासूचे या मालिकेने तर कलाकार बदलण्याचा जणू विक्रमच केला असेल. आशालता देशमुख यांची तिनही मुले बदलली. धाकटा मुलगा तर तीन वेळा बदलला. आनंद लागू, चेतन दातार आणि पंकज विष्णू हे तीन मुलगे. नंतर पंकज विष्णूच्या जागी दोन कलाकार झाले. चेतन दातारच्या जागी दोन कलाकार झाले. आनंद लागू गायबच केला. आशालता बाईच्या मुलीची भूमिका करणार्या कलाकाराचे लग्न झाल्यामुळे त्याजागी दुसरी मुलगी आली. अशा तर्हेने आशालताबाईचे कुटुंब बदलले तरी रोहीणी हट्टंगडी आणि कविता लाड तन्मयतेने काम करीत राहिल्या. कारण शो मस्ट गो ऑन. अर्थात बहुतेक मालिकांमध्ये असे घडताना दिसते. मला सासू हवीमध्ये काम करणारी सासू आसावरी जोशी यांनी आनंद अभ्यंकर यांच्या मृत्यूनंतर काही भाग केले आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असताना ती मालिका सोडली. त्यामुळे त्याजागी सविता प्रभुणे यांची वर्णी लागली. प्रेक्षक लगेच विसरून जातात आणि कथानकाशी समरस होतात हे यामागचे रहस्य आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा