गुरुवार, २० नोव्हेंबर, २०१४

जबाबदारीची जाणिव

सध्या मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात डेंग्यू साथीची चर्चा सुरू आहे. त्यातच के.ई.एम. रुग्णालयातील डॉ. खोब्रागडे या भूलतज्ज्ञ शाखेच्या निवासी डॉक्टरच्या डेंग्यूमुळे झालेल्या मृत्यूमुळे प्रशासनाला ही साथ नियंत्रणात आणण्यात आलेल्या अपयशासाठी टीकेला तोंड द्यावे लागते आहे. दरवर्षी आपल्याकडे अधूनमधून साथीचे आजार येतच असतात. काही साथी तर कित्येक वर्षे अव्याहत सुरूच आहेत. साथीचे हे रोग म्हणजे आपल्या बेजबाबदारपणाचे लक्षण असते. संसर्ग, संपर्क यातून साथीचे रोग पसरत असतात. त्याला रोखण्यासाठी जी दक्षता घेणे आवश्यकता असते ती घेतली जात नाही. त्यामुळे मागच्या महिन्यापासून नरेंद्र मोदींनी जे स्वच्छतेचे आवाहन संपूर्ण देशाला केलेले आहे ते फार महत्त्वाचे ठरते. त्याचप्रमाणे श्रीसंप्रदायातील दासभक्तांनी आदरणीय आप्पासाहेबांच्या आवाहनानुसार संपूर्ण महाराष्ट्रात राबवलेले स्वच्छता अभियान हे फार मोठे कार्य आहे. कोणत्याही सरकारी यंत्रणा अथवा राजकीय नेत्यांना जमले नाही इतके स्वच्छ काम कालच्या रविवारी श्री सदस्यांनी करून दाखवले. अर्थात स्वच्छता अभियान राबवणे हे या संप्रदायाचे सततचे कार्य आहे. गेल्यावर्षीही पनवेलच्या तलावामधील गाळ आणि कचरा साफ करण्याचे काम या दासभक्तांनी केले होते. नगरपालिकेला जे जमले नाही ते केवळ श्रमदानातून या भक्तांनी करून दाखवले. त्यामुळे डेंग्यूची साथ रायगडात पसरली नाही. स्वच्छतेचा मंत्र सेवेतून दिला. अशी स्वच्छता मुंबई आणि अन्य महाराष्ट्रात राखली गेली नव्हती.       डेंग्यूच्या साथीपेक्षा त्याची भीती फार पसरवली गेली आहे. यात काही प्रमाणात मृत्युदर असला तरी डॉक्टरांनी ठरवून दिलेली उपचारांची मार्गदर्शक तत्त्वे पाळली तर यात ही रुग्णाचा मृत्यू होत नाही. डेंग्यूमध्ये शरीर काही काळ पांढर्‍या पेशी व प्लेटलेट्सचे उत्पादन थांबवते. डेंग्यूच्या साथीत पेशी कमी झाल्या व आता फारच मोठे संकट कोसळल्याचा भास निर्माण केला जातो जो चुकीचा आहे. पेशंट आणि त्याच्या नातेवाईकांना घाबरवून सोडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी या आजाराची भिती घालून डॉक्टर लोकांकडून रूग्ण आणि नातेवाईकांची लूट होते आहे. साथीच्या रोगापेक्षा हा प्रकार अतीशय भयानक आहे. रोगापेक्षा औषध भयानक असा प्रकार होताना दिसतो आहे. त्यामुळे वैद्यकीय उपचार करणारी यंत्रणा नीट आहे की नाही हे पाहणेही तितकेच महत्त्वाचे. साथीचे रोग टाळण्यासाठी स्वच्छता महत्त्वाची आहे तितकेच डॉक्टरांनी याबाबत असलेली भिती घालवण्याचे प्रयत्न करणे आवश्यक आहे.   कोणतीही केस गुंतागुंतीची कशी होईल हे पाहणे वकीलांचे आणि रोग जेवढा बळावेल तेवढा आपला धंदा जास्त अशी प्रवृत्ती डॉक्टरांची होताना दिसते आहे. त्यामुळे कितीही अवघड केस असली तरी त्यात काही फारसं नाही असं सांगून केसमधील गांभीर्य वकील घालवतात तर उपचाराला गेल्यावर योग्य वेळी आलात, थोडा उशीर झाला असता तरी.. असे म्हणून डॉक्टर घाबरवून सोडतात. प्रत्येक पेशंट हा योग्यवेळीच जात असतो. पण घाबरण्याचे कारण नाही असे डॉक्टर सांगत नाहीत त्यामुळे मानसिक आजाराने पेशंट खचतो. स्वच्छतेबरोबरच डॉक्टर लोकांनी याकडेही लक्ष दिले पाहिजे.साथीमध्ये आजारांच्या उपचाराइतकेच आजाराचा फैलाव थांबवणे व प्रतिबंध करणे हा साथ नियंत्रणात महत्त्वाचा घटक असतो. डेंग्यूच्या उपचारांमध्ये जसे डॉक्टरांचे अज्ञान व रुग्णाच्या भीतीमुळे पीछेहाट झाली तसेच प्रतिबंधाच्या बाबतीत आपल्या साध्या व्यक्तिगत व सामाजिक जबाबदार्‍या विसरल्यामुळे गोंधळ झाला आहे. एडिस या डेंग्यूचा फैलाव करणार्‍या डासाची उत्पत्ती साधारणत: साठवलेल्या, स्वच्छ व कधी घाण पाण्यात होते. यात घराच्या छतावरील पाण्याची टाकी, छतावरील पडलेले सामान, जुने टायर्स, रस्त्यावरील खड्डे, घराच्या आजूबाजूला असलेले खड्डे, फुटके डबे, नारळाच्या करवंट्या अशा जागांचा समावेश असतो. एवढी गोष्ट समजून घेतली व आपण आपली मान दोन्हीकडे वळवण्याची तसदी घेतली किंवा सहज खिडकीबाहेर डोकावण्याची तसदी घेतली, तरी डेंग्यूच्या साथीचे मूळ आपल्याला काही मिनिटांत सापडेल. डेंग्यू साथीमध्ये प्रशासनाच्या काही जबाबदार्‍या आहेत; पण कोणी मंत्री वा सेलिब्रिटी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत हातात झाडू घेऊन फोटो काढून घेण्यासाठी आपल्या छताची व घराची निवड करेल याची वाट बघणे व्यर्थ आहे. या जबाबदार्‍या आपल्यालाच घ्याव्या लागणार आहेत. कारण डेंग्यू झाला तर तो आपल्यालाच भोगावा लागणार आहे. शासनाकडून, नगरपालिकेकडून होणारी फवारणी ही काही प्रमाणात प्रभावी असली तरी त्यातून डासांची उत्पत्ती थांबत नाही. तसेच आपल्याकडे डासांमुळे होणार्‍या सर्वच आजारांना मलेरिया नियंत्रण कार्यक्रमाखाली नियंत्रित करण्याचा प्रयत्न होतो. पण मलेरियाच्या फवारणीसाठी वापरले जाणारे डी.डी.टी. हे डेंग्यूवर तितकेसे प्रभावी नाही. कारण हे दोन आजार दोन वेगळ्या जातीच्या डासांमुळे होतात. डेंग्यू नियंत्रणासाठी मस्किटो रिपेलंट क्रीम, इलेक्ट्रॉनिक उपकरणे यांची जोरात जाहिरात होते. मच्छरदाणीसह या डासाच्या चाव्यापासून वाचवणार्‍या वैयक्तिक सुरक्षेच्या गोष्टी तुम्हाला रात्री डासांपासून वाचवतील. पण डेंग्यूचा डास हा दिवसा चावतो. म्हणून या जाहिराती साहाय्यभूत ठरू शकतात, पण ते भासवले जाते तसे अंतिम उत्तर नाही. पाण्यात गप्पी मासे सापडणे फायद्याचे ठरते; मात्र डासांची उत्पत्ती होत ते साचलेल्या पाण्याची ठिकाणे शोधून कोरडी करणे व अशा प्रकारे आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस’ पाळणे हाच साथ नियंत्रणाचा केंद्रबिंदू आहे. डेंग्यूची साथ सहसा पावसाळा संपल्यावरच्या पुढील महिन्यात येते असे निरीक्षण आहे. कारण तेव्हा पावसात वाहणारे पाणी स्थिर होते. डेंग्यूची साथ दरवर्षी याच काळात येते व ती इतक्या उत्तम प्रकारे इशारा देऊनही आम्ही पावसाळा सरून गेल्यावर आंधळेपणाने साचलेल्या पाण्याकडे दुर्लक्ष करतो. डेंग्यू पसरवणार्‍या एडिस डासाची उडण्याची क्षमता 100 मीटरपेक्षा जास्त नसते. त्यामुळे डेंग्यूचे निदान झालेल्या रुग्णाच्या घराच्या 100 मीटर आसपास जरी शोध घेतला, तरी एडिस डासांची खाण सापडते. अशा प्रकारे 10 ते 15 दिवस जरी ध्यास घेऊन रुग्णांचा शोध व त्यांच्या 100 मीटरभोवतीच्या परिसराचा सर्व्हे हाती घेतला, तरी डेंग्यू साथीच्या मुळाशी घाव बसेल याकडे फारसे लक्ष दिले गेले नाही.   वारंवार येणार्‍या डेंग्यूच्या साथीबद्दल शासनाने करावयाचा एक पुरोगामी विचार म्हणजे अशा साथी कुठल्याही नियोजनाअभावी होत चाललेले शहरीकरण हे आहे. नियमांना डावलून होणारे रस्त्यांचे बांधकाम हे त्यामागचे कारण आहे. बेरोजगारीमुळे लोक कामाच्या शोधात शहरांकडे जाऊन झोपडपट्ट्यांमध्ये राहत आहेत. मोठमोठ्या टॉवरचे बांधकाम सुरू असताना साचलेल्या पाण्याच्या नियोजनासाठी कुठलेही नियम नाहीत. म्हणून डासांमुळे होणार्‍या आजारांना बिल्डर्स डिसीज असेही म्हटले जाते. स्मार्ट शहरे उभारताना पुलाखाली झोपणारे सावज अशा साथींमध्ये चिरडले जाणार आहेत. याचा अर्थ आर्थिक प्रगती नकोच असा नाही, पण आर्थिक प्रगतीबरोबर सामाजिक प्रगतीही आवश्यक असल्याची आठवण आपल्याला डेंग्यूची साथ देते.नरेंद्र मोदींचे स्वच्छता अभियान असो वा श्री संप्रदायाच्या दास भक्तांनी केलेली स्वच्छता असो. त्यांनी दररोज आपल्याला ही शिकवण देण्याची वेळ येता कामा नये. एकदा स्वच्छ करून दिल्यावर ती स्वच्छता कायम राखण्याची जबाबदारी आपली आहे.  या जबाबदारीचे भान राखणे महत्त्वाचे आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: