गुरुवार, २७ नोव्हेंबर, २०१४

एकाने टाका घालायचा, दुसर्‍याने उसवायचे

    शिवसेनेचा सरकारमध्ये समावेश व्हावा आणि पाच वर्ष स्पष्ट बहुमताचे सरकार चालवावे ही देवेंद्र फडणवीस यांची इच्छा आहे. शरद पवारांनी दिलेल्या इशार्‍यानंतर सहा महिन्यांनी आपले काय होणार याची चिंता फडणवीस यांना ग्रासत आहे. त्यामुळे ज्याला आपला नैसर्गिक मित्र मानले आहे त्या शिवसेनेलाच मंत्रिमंडळात सामावून घेण्यासाठी फडणवीस पुढाकार घेत आहेत. पण त्याचवेळी शिवसेना भाजपमधील दरी कशी वाढेल यासाठी एकनाथ खडसे प्रयत्नशील आहेत. फडणवीस यांना दीर्घकाळ मुख्यमंत्रीपदावर राहण्याचा अधिकार नाही असे खडसे यांना मनापासून वाटत आहे. त्यामुळे शरद पवारांना अपेक्षित काम खडसे करताना दिसत आहेत. साहजीकच नाथाभाउंचा हा उपद्व्याप फडणवीसांची डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे त्यांनी चक्क मंत्र्यांसमोरच नाथाभाउंना झापण्याचे काम केले.  पंधरा वर्षे विरोधी पक्षात बसल्यामुळे सरकारविरोधात बोलण्याचे आपल्या अंगवळणी पडले आहे. मात्र, आता सत्तेत आहोत. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रत्येक विषयावर विरोधी पक्षाच्या नेत्यांसारखे बोलू नये. सत्तेची बाजू आपली आहे याचे भान ठेवा, अशा कानपिचक्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिल्या. हे उदाहरण अत्यंत बोलके आहे.फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात खडसे, मेहता आणि मुनगंटीवार हे ज्येष्ठ मंत्री आहेत. ते शिवसेना-भाजप युती सरकारमध्येही मंत्री होते. त्यांच्या तुलनेत फडणवीस हे त्यांना ज्युनिअर आहेत. त्यामुळे राज्यात भाजपची सत्ता स्थापन झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्या काही बैठकीत हे ज्येष्ठ मंत्री प्रत्येक विषयांवर बोलतात. राज्याचा कारभार चालविण्याचे ज्ञान असल्यामुळे त्यांना अधिकारीवाणीने बोलूही दिले जात होते. पण हेच फडणवीस यांना डोईजड होवू लागले. मंत्रिमंडळावर आपली पकड राहणार नाही याची जाणिव फडणवीस यांना झाली. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत फडणवीस यांचे वेगळेच रंग दिसले. निम्मे राज्य दुष्काळाच्या खाईत आहे. शेतकर्‍यांच्या वीज बिलांची वसुली करू नका, त्यांना त्रास देऊ नका, असे महसूलमंत्री खडसे हे अजय मेहता यांना उद्देशून बोलले. तेव्हा, नियमानुसार असे करता येणार नाही, असे प्रत्युत्तर मेहता यांनी दिले. त्यावर मी शेतकरी आहे, त्यामुळे ‘महावितरण’ शेतकर्‍यांना कसा त्रास देते, हे मला माहीत आहे, असे खडसेंनी त्यांना सुनावले. त्यानंतर मुख्यमंत्री संबंधित अधिकार्‍यांना जाब विचारतील, अशी अपेक्षा या खडसेंची होती. मात्र, अधिकार्‍यांऐवजी मुख्यमंत्र्यांनी थेट खडसेंनाच , ‘आता विरोधी पक्षाचे नेते असल्यासारखे बोलू नका’, असे सुनावले. खडसे यांच्या मग्रूरीला कुठे तरी चाप लावण्याची तयारी फडणवीस यांनी केली. हे सरकार अस्तित्वात आल्यानंतर नारायण राणे यांनी या मंत्रिमंडळावर टिका केली होती. त्यावेळी यामध्ये फक्त एकनाथ खडसे हा योग्य माणूस आहे असे म्हटले होते. त्यामुळे खडसे अधिकच शेफारले होते. पण आवाजी मतदानाने बहुमत सिद्ध केले असले तरी राष्ट्रवादीच्या कुबड्या आपण कायम घेवू शकणार नाही याची जाणिव असल्यामुळे फडणवीस यांनी शिवसेनेशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू केले. पण नेमका त्यातच खोडा घालण्याचे काम खडसेंनी केल्यामुळे एकानं टाका घालायचा आणि दुसर्‍यानं उसवायचा असा प्रकार होत होता.   राज्याचे कृषी, महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी शेतीप्रश्नाच्या आढावा बैठकीत दुष्काळाने त्रस्त झालेल्या आणि शेतमालाचे भाव दररोज पत्त्यांच्या बंगल्यांप्रमाणे धडाधड कोसळत असल्याने बेजार झालेल्या शेतकर्‍यांना एक मोलाचा सल्लावजा प्रश्न केला. ‘मोबाईलची बिले वेळेवर भरता येतात मग विजेची बिले का भरत नाही?’ यावरून शिवसेनेने खडसेंवर जोरदार टिका केली होती. त्यावर खडसेंनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावरच टिका करण्यास सुरूवात केली. खडसेंच्या तोंडी पवारांची भाषा येत असल्याचे संपूर्ण महाराष्ट्र पहात होता. त्या भाषेचा दर्प शिवसेनेने दाखवण्यास सुरूवात केल्यावर फडणवीस हवालदिल झाले.   फ्रान्समध्ये अठराव्या शतकात शेतकरी, दुष्काळाने त्रस्त झाले. तेव्हा सोळाव्या लुईची पत्नी व राणी मारी अंटोयनटकडे दरबारातील कुणीतरी, ब्रेडची कमतरता असल्यामुळे जनतेच्या होत असलेल्या हालांकडे लक्ष वेधले असता, राणीसाहेबांनी ‘ब्रेड मिळत नसेल तर केक खा’, असे सांगितले होते. हे उद्गार इतिहासात काळे वाक्य म्हणून कुप्रसिद्ध आहे. भाजपच्या नेत्यांनी या ‘इतिहासा’चा थोडा अभ्यास केल्यास अशा आचरट विधानांपासून त्यांना स्वतःला वाचवता येईल. राज्यात सगळीकडे डिसेंबर महिना सुरू होण्याआधीच दुष्काळाचे चटके बसू लागले आहेत. त्यातच जागतिक अर्थव्यवस्थेला मंदीची झळ बसत असल्याने शेतमालाची बाजारपेठ रोजच्या रोज गडगडत आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्याच्या काही भागात ऊस, सोयाबीन, कापूस बर्‍यापैकी झाला असताना या पिकांपोटी केलेला खर्च निघेल इतका भावही शेतकर्‍यांना मिळणे दुरापास्त झाले आहे. उत्तर महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेल्या पिकांची पुरती नासाडी झाली आहे. अशावेळी राज्यातील शेतकर्‍यांना दिलाशाची गरज असताना एकनाथ खडसे यांच्या विधानाने शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखेच झाले.        देशातील शेतकर्‍यांना भरपूर सवलती मिळत असतात, असा गैरसमज शहरांमध्ये राहणार्‍या उच्च विद्याविभूषित वर्गांमध्ये असतो. शेतकर्‍यांना कर भरावा लागत नाही. त्यांना खते, बी-बियाणे अशा सार्‍या गोष्टींवर सवलती दिल्या जातात. तरीही त्यांची सतत ओरड का बरे सुरू असते, असा प्रश्नही या वर्गाला कायम पडतो. आपल्या देशातील 60 टक्के जनता कृषी आणि त्याच्याशी संबंधित व्यवसायांवर अवलंबून आहे. त्यातील बहुतांश लोक हे अल्पभूधारक किंवा भूमिहीन शेतकरी, शेतमजूर आहेत. त्यामुळे हा गरीब शेतकरी आपल्या शेतात जे पीक पिकवतो, ते बाजारात विकून आलेल्या पैशावर त्याला स्वतःच्या आणि कुटुंबाच्या जगण्यासाठी इतर शेतमाल खरेदी करावा लागतो. यातून पैसा उरलाच तर मग पुढे, शिक्षण किंवा आरोग्य या चैनीच्या गोष्टींवर त्याला खर्च करता येतो. त्यामुळेच अशी प्रचंड विषमता असलेल्या देशात शेतमालाला चांगला भाव देणे आणि दुसर्‍या बाजूला जीवनावश्यक वस्तूंसह इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देणे ही जबाबदारी सरकारला घ्यावी लागते.     मोबाईलचे बिल भरता मग विजेचे बिल का भरत नाही, हाच प्रश्न देशातील बड्या उद्योगपतींनाही दरडावून विचारला जाऊ शकतो. ज्यांनी देशातील राष्ट्रीयीकृत बँकांचे लाखो कोटी रुपयांचे कर्ज बुडवून कुटुंबांसाठी मोठ्ठाले टॉवर्स उभे केले, त्यांना ‘टॉवर बांधता मग बँकांचे कर्ज आधी का फेडत नाही’, असे विचारले पाहिजे.      खरेतर देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ग्रामीण भागातील बहुजन चेहरा म्हणून एकनाथ खडसे यांची ओळख आहे. आजही केवळ उत्तर महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण राज्यातील शेतकरी-शेतमजूर आपल्या प्रश्नांची सोडवणूक करणारा नेता म्हणूनच खडसे यांच्याकडे पाहतात. आवाजी मतदानाच्या गोंधळात विश्वास संपादन केलेल्या या सरकारमधील खडसे यांच्यासारख्या लोकनेत्याने तरी बोलताना सर्वंकष विचार करून बोलणे गरजेचे आहे. ‘शेतकर्‍यांचा आसूड’ होण्याऐवजी एकनाथ खडसे शेतकर्‍यांनाच आसूडाने झोडत आहेत.    शिवसेनेच्या नेत्यांना भुईमुगाच्या शेंगा खाली येतात की वर येतात असा सवाल करून खिल्ली उडवणार्‍या खडसे यांचा रामदास कदम यांनी राजीनामा मागण्याचे काम केले. त्यावर दोघांची जुगलबंदी झाली. माझा राजीनामा मागण्याइतके रामदास कदम महत्त्वाचे नाहीत असे सांगून गुरमीची भाषा खडसेंच्या तोंडून येवू लागली. हे सगळं असह्य झाल्याने फडणवीस यांना खडसेंना खडसावे लागले. काही करून शिवसेनेला आपल्या बरोबर घेतले तरच पाच वर्ष आपण काढू शकतो याची जाणिव फडणवीस यांना आहे. तशीच जाणिव शिवसेनेला आणि खडसेंना आहे. त्यामुळे फडणवीस यांना कोंडीत पकडण्याची संधी एकाचवेळी खडसे आणि शिवसेनेला आहे. फडणवीस यांनी आपल्यापुढे लोटांगण घालावे अशी शिवसेनेची अपेक्षा आहे तर शिवसेनेपासून फडणवीस दूर राहिले तरच फार काळ त्यांना मुख्यमंत्रीपदावर राहता येणार नाही असे स्वप्न खडसे पहात आहेत. यामध्ये आपले महत्त्व अधिक वाढत जाईल याची जाणिव शिवसेनेला आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: