वेगवेगळ्या मार्गाने प्रचार करून, चर्चा करून आपण सत्तेच्या दिशेने जायचे हे भाजपचे स्थापनेपासून इंगित होते. पण चर्चेसाठी कोणता विषय हाताळला आहे यावर भाजपचे यशापयश ठरले आहे. त्यामुळेच प्रत्येक राजकीय पक्षाने भाजपचा चढउताराचा आलेख पाहिला तर त्या पक्षाला तो मार्गदर्शक ठरेल. त्या चूका आपल्या पक्षात होत नाहीत ना हे पाहता येईल. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी वापरलेल्या सोशल मिडीयाची चर्चा जोरात झाली. अलिबागच्या चिंतन शिबीरातही शरद पवारांनी सोशल मिडीयाची दखल घ्यावी लागेल असे कबूल केले. अगोदर शरद पवारांचा या मिडीयावर विश्वास नव्हता हे सांगण्यासही ते विसरले नाहीत. जवळपास प्रत्येक पक्षाने याची दखल घेतली आहे. पण फक्त भाजपच्या यशस्वी फॉर्म्युल्याची दखल घेवून चालणार नाही तर 1980 च्या स्थापनेपासूनची वाटचाल पाहिली पाहिजे.अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना भाजपला 2004 च्या निवडणुकीत वातावरण अनुकूल असतानाही अचानक सत्तेपासून दूर जावे लागले. हे कसे घडले याचाही अभ्यास केला पाहिजे. अतिआत्मविश्वास हा कायम घातकच असतो. त्यातलाच तो प्रकार होता.1999 ते 2003 या आपल्या कार्यकाळाचा ताळेबंद दाखवण्यासाठी भाजपने इंडिया शायनिंगची मोहीम जोरदारपणे उघडली होती. पण इंडिया शायनींग म्हणजे सर्वोच्चपणा आला. आता यापेक्षा अधिक चांगले काही होणार नाही. त्यामुळे भाजपची क्षमता संपली असा तो अर्थ होता. शायनींग म्हणजे आता सगळे ठिक आहे, यापेक्षा काही जास्त होणार नाही असा त्यातून नकळत अर्थ होता. त्यामुळे आता यांची क्षमता संपली आता नव्याला संधी द्या हे मतदारांनी ठरवले. ही चूक जाहीरातबाजी करणार्या भाजपला समजण्यास दहा वर्ष लागली. त्यामुळे त्यांनी 2014 च्या निवडणुकीत अच्छे दिन आनेवाले है ही घोषणा दिली. अच्छे दिन आनेवाले है याचा अर्थ आत्ताचे दिवस वाईट आहेत, सरकार वाईट आहेत हे सहजपणे त्यांना ठसवता आले. ही प्रचाराची पद्धती लक्षात घेणे गरजेचे आहे. इंडिया शायनींग किंवा फिल गूडचा वापर केला पण प्रत्यक्षात उदारीकरण-खासगीकरण- जागतिकीकरण धोरण घाईघाईने, व्यवस्थेला न जुमानता राबवल्याने या सरकारला आश्चर्यकारकरीत्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. या पराभवाचे विश्लेषण करताना भाजपचे चाणक्य समजले जाणारे प्रमोद महाजन यांनी असे वक्तव्य केले होते की, ‘एनडीए आघाडी जशी भाजपने बांधली होती तसाच प्रयोग काँग्रेसने केल्याने भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले.’ महाजन यांच्या म्हणण्यात तथ्य होते. कारण काँग्रेसने आंध्र प्रदेशात, तामिळनाडू, बिहार, महाराष्ट्र येथे स्थानिक-प्रादेशिक पक्षांची मोट बांधली होती व या पक्षांना मिळालेले यश काँग्रेसच्या पथ्यावर पडून 2004 मध्ये डाव्यांच्या पाठिंब्यावर यूपीए आघाडी प्रत्यक्षात आली होती. हा गटातटाचा, प्रादेशिक पक्षांना हाताशी धरून सत्ता मिळवण्याचा काँग्रेसचा प्रयोग 2009 मध्ये दिसून आला. त्या वेळी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 206 जागा मिळाल्या; पण त्यांना द्रमुक, राष्ट्रवादी, समाजवादी पार्टी, बसपा अशा पक्षांना हाताशी घेऊन यूपीए-2 सरकार चालवावे लागले होते. नंतर हे सरकार सतत तीन वर्षे भ्रष्टाचाराच्या आरोपात घेरल्यामुळे 2014 च्या लोकसभा निवडणुका घोषित होण्याअगोदर हे सर्व घटक पक्ष काँग्रेसच्या बुडत्या जहाजातून पळून जाऊ लागले. या निवडणुकीत भाजपने काँग्रेससह अनेक प्रादेशिक पक्षांची त्यांच्याच प्रदेशात धूळधाण उडवल्याने देशाच्या राजकारणाचा पोतच बदलला. केंद्रात भाजप हा बलवान पक्ष झाला. त्यात हिंदी पट्ट्यातील बहुतांश बडी राज्ये भाजपच्या हातात असल्याने प्रादेशिक पक्षांच्या राजकारणाला वावच शिल्लक राहिला नाही. त्यात भाजपने संसदेत विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसला नाकारल्याने काँग्रेससह सर्व प्रादेशिक पक्षांची राजकीय कोंडी होऊ लागली. भाजपचा संसदेत व रस्त्यावर मुकाबला करण्याइतपत ताकद व आत्मविश्वास या पक्षांमध्ये नाही, हे या पक्षांना लवकरच जाणवल्याने जी काही कोंडी निर्माण झाली होती, ती फोडण्याची गरज होती. त्याचे प्रयत्न पं. नेहरूंच्या 125 व्या जयंतीनिमित्ताने काँग्रेसने आयोजित केलेल्या कार्यक्रमात दिसून आले. प्रत्यक्ष या कार्यक्रमाचे निमंत्रण काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी भाजप सोडून सर्व राजकीय पक्षांना दिले होते. त्यानुसार या कार्यक्रमात राजदचे लालूप्रसाद यादव, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे प्रकाश करात, तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी, जनता दल (सं.)चे शरद यादव, माजी पंतप्रधान देवेगौडा, रालोदचे अजितसिंग हे नेते उपस्थित होते. त्यांच्या या उपस्थितीमुळे बिगर भाजपविरोधी मोट बांधण्यास सुरुवात झाली असे म्हणण्यास वाव आहे. भाजप आणि काँग्रेस हे मोठे राजकीय पक्ष या देशात आहेत. त्यामुळे या देशात द्विपक्षीय पद्धती आली नाही तर सततचे राजकारण या दोन पक्षांभोवतीच फिरत राहणार आहे. त्यांच्या प्रवाहातच सर्वांना सामावून जावे लागणार आहे हे लक्षात घेतले पाहिजे. सोनिया गांधींनी आयोजीत केलेल्या या कार्यक्रमात भाजपच्या हिंदुत्वाला रोखण्यासाठी सर्व सेक्युलर विचारसरणीच्या पक्षांनी एकत्र यावे असे थेट व स्पष्ट भाष्य कोणी केले नाही; पण सोनिया गांधी यांनी आपल्या भाषणात नेहरूंच्या लोकशाहीवादी व सेक्युलर मूल्यांची देशाला गरज असल्याचे प्रतिपादन केले. भारत व भारतीयत्व हे सेक्युलर मूल्यांशिवाय अस्तित्वात येऊच शकत नाही आणि सेक्युलरवाद हा केवळ आदर्श नव्हे तर ती देशाला एकसंघ ठेवणारी गरज आहे, असे त्या म्हणाल्या. आजपर्यंतच्या बिगर काँग्रेस राजकारणात सेक्युलरवादाचा मुद्दा काँग्रेसशिवाय अन्य पक्षांकडून उचलला जात नसे. आता बिगरभाजपच्या राजकारणाचे दिवस आल्याने या मुद्द्यावर सर्वच पक्षांना जाग आली आहे. मुख्यत: ज्या प्रादेशिक अस्मितेच्या बळावर हे पक्ष जन्मास आले व वाढत गेले, ते पक्ष काँग्रेसच्या सेक्युलर भूमिकेशी सहमत होतील का, हा प्रश्न आहे. त्यांना आपली भूमिका तपासावीच लागणार आहे. पराभवानंतर काँग्रेस पक्ष फिनिक्स भरारी घेण्याचा प्रयत्न करतो आहे हे लक्षात घेतले पाहिजे. अगदी लगेच त्यांना 2019 ला यश येईल असे नाही पण प्रयत्न तर तसेच सुरू आहेत. काँग्रेस आघाडीकडून राज्य काढून घेण्यासाठी भाजपला 10 वर्ष लागली होती. तेवढा काळ पक्ष बांधून ठेवणे, सर्वांना सत्ता नसताना एकत्रित बांधून ठेवण्याचे काम भाजपच्या नेत्यांनी केले होते. अपयश आल्यावर इतर पक्षात जाण्याचे वेध लागतात. अशा पक्षांनी याचा विचार केला पाहिजे. आज महाराष्ट्रात सत्तेपासून दूर राहिल्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील अनेकांना भाजपचे वेध लागले आहेत. अशा पक्षांनी हे लक्षात घेणे गरजेचे आहे. महत्त्वाचे म्हणजे डाव्यांनी 2008 मध्ये अणुकराराच्या मुद्द्यावरून काँग्रेसशी युती तोडली होती, तर 2012 मध्ये ममतांनी रेल्वे भाड्याच्या मुद्द्यावरून यूपीए सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. गेल्या 10 वर्षांत काँग्रेसशी नाते तोडताना सर्वच पक्षांनी काँग्रेसच्या निओलिबरल व विकासवादी धोरणांचा समाचार घेतला होता. या कार्यक्रमाला समाजवादी पार्टी, बसपा, नॅशनल कॉन्फरन्स, द्रमुक, अण्णा द्रमुक हे सर्व एकेकाळचे काँग्रेसचे सहकारी पक्ष उपस्थित नव्हते. या सर्वांच्या अनुपस्थितीचे एक कारण म्हणजे या सर्वांना आपले अस्मितेचे राजकारण सांभाळत भाजपचा अश्वमेध रोखावा लागणार आहे. आज मुलायमसिंह यादव यांना जनता दल पुनरुज्जीवित करायचा आहे, तर मायावतींना मुलायमसिंह व भाजपचे आव्हान एकाच वेळी मोडून काढायचे आहे. द्रमुक व अण्णा द्रमुक यांच्यामधून विस्तव जात नाही. नॅशनल कॉन्फरन्सने अगोदरच काँग्रेसशी युती तोडली आहे. त्यांना आगामी जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकांत जबर फटका बसेल असे वाटत आहे. डावे आपल्याच पक्षातल्या संघर्षात अडकले आहेत. एकंदरीत नेहरू जयंतीच्या निमित्ताने काँग्रेसने सेक्युलर कार्ड खेळले आहे. त्याला प्रतिसाद लगेचच मिळेल असे वातावरण अद्याप दिसत नाही. पण भाजपला भविष्यात शह देण्यासाठी केलेली ती खेळी आहे.भाजपच्या स्थापनेनंतर वाजपेयींनी कमल जरूर खिलेगा असे भाष्य केले होते. तेव्हा त्यांना 2014 साल दिसत होते. त्या काळात संघ परिवारात एक पद्य खूप गाजले होते. ‘नव्या युगाची हाक आम्हाला झेप आमुची यशाकडे, नरसिंहाचे वंशज आम्ही गती आमुची पुढे पुढे.’ 1980 च्या संचलनापूर्वी सगळ्या शिबिरांमधून, प्रभात फेर्यांमधून हे पद्य ऐकवले गेले होते त्याचे हे यश आहे. दीर्घ परिश्रमांनंतर मिळालेले हे यश आहे.
शुक्रवार, २१ नोव्हेंबर, २०१४
नव्या युगाची हाक आम्हाला, झेप आमुची यशाकडे
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा