मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०१४

शरद पवारांची ग्यानबाची मेख

  • विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना भाजप यांची युती तुटली असली तरी सत्ता स्थापनेसाठी दोघे एकत्र येणार हे निश्‍चित होते. त्या दोन पक्षांची ताकद एकत्रित आली तर पाच वर्ष आणि नंतर पुन्हा लवकर कसलीही संधी नाही याची जाणिव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अविभाज्य भाग असलेल्या शरद पवारांनी चांगलेच ओळखले. त्यामुळे या दोघांना काही केल्या एक येवू द्यायचे नाही ही रणनीती शरद पवारांनी आखली आणि दोन्ही पक्ष सेना भाजप त्यांच्या जाळ्यात अडकले. इतके जोरदार अडकले की आज त्यांचे नाते हे विळा भोपळ्याचे झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे राजकारणात शरद पवार यांचा वरचष्मा कायम आहे हे दाखवून देण्यात पवार यशस्वी झाले आहेत. सेना भाजपमधील दरी वाढवून दोघांचा मी पणा वाढवण्यात त्यांनी धन्यता मानली आणि हीच खरी राजकीय अस्थिरतेची नांदी होती.
  • दिल्लीत सरकार स्थापन करण्यात भाजपला यश आले नाही, त्यामुळे राजकीय राजधानी दिल्ली अस्थिर झाली आणि महाराष्ट्रात सरकार तर स्थापन केले; पण अस्थिरता संपलेली नाही, म्हणून आर्थिक राजधानी मुंबई अस्थिर झाली आहे. देशातील दोन सर्वात महत्त्वाची राज्ये जर अशी दीर्घकाळ अस्थिर असतील तर देश पुढे घेऊन कसा जाणार हा प्रश्नच आहे. पण आमच्याशिवाय कोणालाही सरकार चालवण्याचा अधिकार नाही हे दाखवण्याची संधी मात्र शरद पवारांनी साधली. आज भाजपचे सरकार हे शरद पवारांचे हातातील बाहुले झाले आहे. जो कौल मतदारांनी दिला होता त्याचा विरूद्ध असे चित्र उभे राहिले आहे. त्यामुळे याचा फटका भविष्यात भाजपला बसल्याशिवाय राहणार नाही. 1999 साली परस्पर विरोधात  लढून काँग्रेस राष्ट्रवादीने निवडणुकीनंतर एकत्र येण्याचा शहाणपणा दाखवला आणि युतीला सत्तेपासून दूर ठेवले. त्यामुळे युतीचे जे मित्रपक्ष, अपक्ष होते त्यांना फोडून आपल्याकडे घेण्याचे कौशल्या पवारांनी दाखवले होते. पंधरा वर्ष युतीला लांब ठेवण्यात यश आले. पण आता मतदारांनी आघाडीविरोधात कौल दिल्यावर त्या दोघांना एकत्र येवू द्यायचे नाही याचा चंग पवारांनी बांधला. निवडणुकीचे निकाल पूर्णपणे लागलेही नव्हते, भाजप हा सर्वात मोठा पक्ष असेल पण बहुमतापासून तो लांब आहे हे पाहिल्यावर शिवसेना त्यांना मिळण्याअगोदरच बिनशर्त आपला पाठिंबा जाहीर करून भाजपला पर्याय उपलब्ध करून दिला. शिवसेनेशी चर्चा करण्याचे, बोलण्याचे भाजपला प्रयत्नच करावे लागले नाहीत. दोघांना जवळ येण्यापासून पवारांनी रोखले आणि आपली खेळी यशस्वी करून दाखवली. सत्ता नसतानाही सत्तेचे केंद्र बनण्याचे काम पवरांनी केले. 
  • महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे काय चालले आहे, ते सामान्य माणसाच्या मनातील राजकारणाचा तिटकारा आणखी वाढविणारे आहे. राजकारणाचा आचार आणि विचाराशी काही संबंध नसतो, संबंध असतो तो फक्त स्वार्थाचा म्हणजे खुर्चीचा, असे सरसकट म्हटले जाते. पण दुर्दैवाने ते राजकीय पक्षांनी खरे ठरविले आहे. केंद्रात सत्ता काबीज केलेल्या भाजपला महाराष्ट्रात सर्वात अधिक जागा मिळाल्या आहेत आणि प्राप्त परिस्थितीत त्या पक्षाने सरकार स्थापन करण्याचा कौल जनतेने दिला आहे. अर्थात त्यासाठी त्याला शिवसेनेची मदत घ्यावी लागेल, असा हा कौल आहे; पण गेल्या 25 वर्षांची युती मोडून हे पक्ष आता एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. असे करून आपण मतदारांची प्रतारणा करत आहोत, हेही त्यांच्या लक्षात येत नाही. भाजप आणि शिवसेनेने आपल्या युतीला छोट्या आणि मोठ्या भावाची उपमा वापरली आहे. इतके दिवस छोटा असलेला भाऊ म्हणजे भाजप निवडणुकीने मोठा भाऊ, तर शिवसेना छोटा भाऊ झाला आहे. भावाची उपमा वापरली म्हणून भाऊबंदकीचा असा ‘आदर्श’ घेण्याची काही गरज नव्हती.
  • विधानसभा निवडणुकीत भाजपने ‘कोठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ अशा जाहिराती केल्या होत्या. त्या वादग्रस्त ठरल्यावर मागे घेण्यात आल्या. मात्र, आता महाराष्ट्र हाती दिल्यानंतरचे जे वर्तन आहे, ते पाहता पुढील काळात महाराष्ट्र नेमका कोठे नेऊन ठेवला जाईल, अशी भीती वाटू लागली आहे. आपण शिवसेनेवर टीका करणार नाही, अशी सुरुवात नरेंद्र मोदी यांनी केली होती आणि तो शब्द त्यांनी पाळला खरा; पण सरकार स्थापन करण्याच्या प्रक्रियेत भाजपचे केंद्रीय नेतृत्व कमी पडले आहे. शिवसेनेवर भाजप टीका करत नसला तरी शिवसेनेची कोंडी करण्याचे काम केले जाते आहे. ज्या मुद्यांवर शिवसेना उभी आहे, ते पळविण्याचे काम भाजपने मोठ्या खुबीने केले आहे. अर्थात निवडणूक प्रचार आपापल्या पद्धतीने करण्याचा अधिकार प्रत्येक पक्षाला आहे. मात्र, निवडणूक निकालानंतर जे सामंजस्य दिसणे अपेक्षित होते, ते गेल्या तीन आठवड्यात कोठेही दिसले नाही. दिल्लीत सरकार स्थापन करण्यात भाजपला यश आले नाही, त्यामुळे राजकीय राजधानी दिल्ली अस्थिर झाली आणि महाराष्ट्रात सरकार तर स्थापन केले; पण अस्थिरता संपलेली नाही, म्हणून आर्थिक राजधानी मुंबई अस्थिर झाली. देशातील दोन सर्वात महत्त्वाची राज्ये जर अशी दीर्घकाळ अस्थिर असतील तर देश पुढे घेऊन कसा जाणार हा प्रश्नच आहे.  
  • मोठा भाऊ म्हणून भाजपची जबाबदारी अधिक असली तरी शिवसेना सरकार स्थापन करण्याच्या प्रक्रियेत आपली भूमिका विसरली आहे. उद्धव ठाकरे शपथविधीला जाणार की नाही, याची बातमी होणे, केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेण्यासाठी गेलेल्या नेत्याला दिल्ली विमानतळावरून परत बोलावणे, या सगळ्या गदारोळात आपला एक मंत्री केंद्रीय मंत्रिमंडळात ठेवावा की नाही, याचा निर्णय न होणे आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांत भाजपला सोबत ठेवायचे की नाही, हे शिवसेना अद्याप ठरवू शकलेली नाही. आपल्याला मतदारांनी छोट्या भावाची भूमिका बजावण्यास सांगितले आहे, हे शिवसेनेला रुचले नाही, त्यावरून होणारे दु:ख समजण्यासारखे आहे; मात्र सारखे हट्ट धरून बसणे योग्य नाही. 
  • महाराष्ट्राची जनता काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारला कंटाळली होती, म्हणून जनतेने बदल म्हणून भाजप आणि शिवसेनेला सत्तेवर बसण्याचा कौल दिला आहे. भाजप आणि शिवसेनेने फार पराक्रम केला म्हणून दिलेला तो कौल नाही, याची जाणीव या दोन पक्षांच्या नेत्यांना दिसत नाही. पहिल्या दिवशी शिवसेनेने जो तमाशा केला तो तर अतिशय निषेधार्ह आहे. मराठी शाळांत उर्दूचा समावेश ऐच्छिक विषयांत करण्याचा निर्णय एकनाथ खडसे यांनी घेतला आहे. अशा निर्णयावर ताशेरे ओढून शिवसेनेने मंत्र्यांना हिरवी टोपी भेट देण्याची भाषा केली. याचा अर्थ जग बदलले तरी शिवसेना बदलायला तयार नाही. उद्धव ठाकरे ज्याला आक्रमक हिंदुत्ववाद म्हणतात, तो हा नव्हे. भावनिक मुद्यांवर गुजराण करणारी शिवसेना ताज्या निवडणुकीतून काही धडा घेण्याची शक्यता दिसत नाही. पाठिंबाही जाहीर करावयाचा नाही आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला जातो, यावरून आदळआपट करायची, हे न समजण्यासारखे आहे. थोडक्यात, आघाडी सरकारने महाराष्ट्राचे फार नुकसान केले, असा दावा करणारे भाजप, शिवसेनेचे नेते जर एकत्र येऊन सरकारही स्थापन करू शकत नसतील तर भविष्यात मतदार त्यांना माफ करणार नाहीत. सेना भाजप हे जरी परस्परविरोधात लढले असले तरी मतदारांनी दिलेला कौल हा त्यांना एकत्रित आणणारा  कौल दिलेला आहे. हा कौल नेमका काय आहे हे निवडणूक निकालांचे कल हाती आल्यावर चाणाक्ष अशा शरद पवारांनी ओळखला. राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शरद पवार सत्तेपासून फार काळ दूर राहू शकत नाहीत. त्यामुळे अस्थिरता निर्माण करून आपली संधी साधणे या राजकारणात ते माहीर आहेत. सेना भाजपला जनतेने दिलेल्या कौलाचा अर्थ समजण्यापूर्वीच  शरद पवारांनी ग्यानबाची मेख मारून ठेवली आणि त्याभोवती या दोन्ही पक्षांना घुटमळायला लावले. स्वत:चे महत्त्व वाढवले. भाजपवर टिका करणार्‍या शिवसेनेेचे खच्चीकरण करून भाजपला घोड्यावर चढवण्यासाठी शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली. महाराष्ट्राच्या राजकारणातील आपले महत्त्व कमी झालेले नाही हे दाखवण्यात त्यांनी यश मिळाले आणि भाजप आणि सेना दोघांचेही खच्चीकरण केले. त्यामुळे सत्ता कारणात हे तरूण चेहरे अजून कच्चे बच्चे आहेत हे दाखवून देण्याची संधी पवारांनी साधली.  आता सेना भाजपमधील अंतर एवढे वाढले आहे की ते कमी करणे कोणालाही शक्य नाही. ते अंतर वाढवण्यात शरद पवार शक्ती खर्च करत आहेत. पण यामुळे मतदार भविष्यात सेना भाजपमधून दूर जातील हे निश्‍चित.
  •  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: