संस्कार म्हणजे नक्की काय? बहुतेकांच्या मते घरी संध्याकाळी शुभंकरोती म्हणणे, मोठ्यंांचा आदर करणे, खरे बोलणे, स्वच्छतेचे पालन करणे, वगैरे वगैरे म्हणजे संंस्कार. पण हे संस्कार मुलांमध्ये रूजणार कसे? संस्कार ही काही दैवी देणगी किंवा रेडिमेड पॅकेज म्हणून उपलब्ध होणारी गोष्ट नाही. संस्कार हे काही वारसाहक्काने ट्रान्स्फर होणारे नाहीत. संस्कार हे एका पिढीतून दुसर्या पिढीत रूजवायचे असतात. नेमके हेच काम कित्येक दशकांपूर्वी साने गुरूजींनी केले होते. संस्कारांचा अनमोल ठेवा मागच्या शतकात साने गुरूजी यांनी ‘श्यामची आई’ रूपाने लिहून ठेवला आहे. प्रत्येक मराठी माणसाने हे पुस्तक वाचलेच पाहिजे. बिगरमराठी माणसांना त्यातील महत्त्व समजावून सांगितले पाहिजे. तेव्हाच महाराष्ट्रातील उच्च संस्कार सर्व देशाला समजतील. शामची आई हे पुस्तक वाचले नाही अशा माणसाला मराठी म्हणून घेण्याचा अधिकारच नाही. नाशिकला जेलमधे असतांना साने गुरूजींनी आपल्या आईच्या आठवणी 5 दिवसात लिहून काढल्या. रूढ अर्थाने हे लिखाण काही आत्मचरित्र, कांदबरी किंवा निबंधही नाही. त्या आहेत सच्च्या दिलाने लिहीलेल्या आईच्या आठवणीं आणि अंत:करणापासून आईला वाहिलेली श्रध्दाजंली. ‘श्यामची आई’ पुस्तकावर कितीतरी पिढ्या संस्कारक्षम झाल्या. 1953 साली आचार्य प्र.के.अत्र्यांनी ह्या पुस्तकावर चित्रपट काढायचा ठरवला. चित्रपटाचा नायक श्याम होता. ही भूमिका माधव वझे यांनी केली होती तर आईच्या भूमिकेत त्यावेळच्या उच्च शिक्षित शिक्षिका संध्या पवार म्हणजेच वनमाला होत्या. हा चित्रपट जरी 153 मिनिटांचा असला तरी एकदा पाहिलेल्या ह्या चित्रपटाचा ‘इम्पॅक्ट’ (परिणाम) मात्र आयुष्यभर राहतो. जेवढ्या ताकदीने साने गुरूजींनी हे पुस्तक लिहीले आहे तेवढ्याच ताकदीने आचार्य अत्रे यांनी त्याची निर्मिती केलेली होती.या पुस्तकात आणि चित्रपटात एक दृश्य आहे. अंांघोळ झाल्यावर श्याम आपल्या आईला पाय पुसायला सांगतो. त्यावेळी आई म्हणते, “श्याम, जसे पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, तसेच मनाला घाण लागू नये म्हणूनही जपत जा. मनाची शुध्दी करण्याकरिता देवाने अश्रूंचे दोन हौद भरून दिले आहेत.” केवढे मोठे तत्वज्ञान किती सोप्या भाषेत सांगितले आहे? संस्कार हे ठरवून, ठराविक वेळी करायचे नसतात तर ते योग्यवेळी आणि सहजपणे जाता जाताही करता येतात. बोलण्याच्या ओघात ते करता येतात. संस्कार करताना सकारात्मकता असली पाहिजे.सकारात्मकता म्हणजे काय? तर आपल्याकडे लहान मुलांना शिकवताना घरातील आई, वडील, मोठी माणसे, हे करू नये, ते करू नये, इकडे जावू नकोस. तिकडे जावू नकोस. अमूक एक करू नकोस. तमूक एक चांगले नाही. असे सतत सांगून फक्त नकारात्मक गोष्टींचा भडीमार करतात. पण अमूक एक गोष्ट करू नये याचा अर्थ नेमके काय करावे हे सांगण्याचीही जबाबदारी असते. इथेच पालकवर्ग कमी पडतो. म्हणून जनरेशन गॅप निर्माण होते. शामची आई पुस्तकातून साने गुरूजींनी नेमके हेच जपले आहे. सकारात्मकतेने संस्काराचे धन दिले आहे, म्हणून ते सर्वश्रेष्ठ ठरते. या पुस्तकात भजनाची आवड असलेला श्याम जेव्हा बुवांना चिडविण्यासाठी मोठ्याने भजन म्हणता,े तेव्हा आई त्याला म्हणते, “ देवाची भक्ती ही मोठ्याने नाही तर हृदयातून केली तरच देवापर्यंत पोहोचते.” लहान मुलांचा अल्लड स्वभाव असतो. त्यांना रागावून सांगण्यापेक्षा प्रेमाने समजावून सांगितले तर ते कायमचे लक्षात राहते. शामच्या आईने ते जपले होते. त्यामुळेच शामची आई संस्कार करण्यात सक्षम ठरले.या पुस्तकात बंधू प्रेमाचे धडे अतिशय सुरेख आहेत. हे मर्म आचार्य अत्रे यांनी शामची आई सिनेमात उत्तम जोपासले होते. ‘चिंधीच्या’ गाण्यातून समजावून सांगणारी आई, पोहायला जात नाही म्हणून श्यामच्या पाठीवर चाबकाचे फटके ओढणारी आई, श्यामला कळया न तोडू देणारी आई, दलित असलेल्या म्हातारीला मोळी उचलून मानवतेचे धडे देणारी आई, गरीबीतही ताठ मानेने जगणारी आई, आपल्या मुलांनी शिकून मोठे व्हावे म्हणून कष्ट करणारी श्यामची आई, हे फार मोठे संस्कारधन आहे. साने गुरूजींनी 45 भागात या कथा लिहून काढल्या आहेत. छोट्या छोट्या परंतु अत्यंत महत्त्वाच्या अशा या गोष्टी आहेत. तितक्याच प्रभावीपणे आचार्य अत्र्यांनी शामची आई पडद्यावर उभी केली आहेत.शामची आई या चित्रपटाने 1953 सालचे राष्ट्रपती सुवर्ण पदक पटकावले. राष्ट्रीय पुरस्कार 1954 साली सुरू झाले त्यामुळे त्या वर्षीचा राष्ट्रीय पुरस्कारही ‘श्यामची आई’लाच मिळाला.या चित्रपटातील माधव वझेंचा ‘श्याम’ आणि वनमाला बाईंची ‘आई’ ह्या अजरामर झालेल्या भूमिका आहेत. इतर भूमिकेत बाबुराव पेंढारकर, सुमती गुप्ते, प्रबोधनकार ठाकरे, शंकर कुलकर्णी यांच्यासारखे कसलेले कलाकार होते. वनमाला बाईंना (त्याकाळच्या) आधुनिक कपडयात पाहिले तर आईची भूमिका ह्या बाई कशा पार करणार?” अशी आठवण श्याम म्हणजेच ‘माधव वझे’ सांगतात. वनमाला बाईंचे अस्सल खानदानी सौंदर्य, तपकिरी घारे डोळे आणि चेहर्यावरची सोशिकता यामुळे आईची भूमिका अजरामर झाली. वनमालाबाई आज हयात नसल्या तरी श्यामची आईच्या रूपाने त्या अजरामर झालेल्या आहेत. उत्तम संस्कार करणार्या आईचा चेहरा म्हणून त्या कायम स्मरणात राहतात. वनमाला या त्या काळातील मोठ्या कलाकार होत्या. तो काळ स्त्री कलाकारांच्या दृष्टीने अत्यंत आव्हानात्मक असतानाही किंवा सिनेमात काम करणार्या महिलांना प्रतिष्ठेने पाहण्याचा जमाना नसलेल्या काळातील त्या थोर कलाकार होत्या. वनमाला बाईंच्या नावावर एकूण 40 चित्रपट जमा आहेत. पण त्यातली सर्वात लक्षवेधी आणि अविस्मरणीय भूमिका ही ‘श्यामची आई’ हीच होती. इतर भूमिकांमध्ये त्यांच्या ‘वसंतसेना’ आणि ’सिकंदर’ मधली ‘रूखसाना’ या गाजलेल्या भूमिका होत्या. पण त्या खर्या अर्थाने घराघरात पोहोचल्या त्या श्यामची आईच्या रूपातच. ज्या काळात स्त्रियांच शिक्षण हे दुय्यम होते, किंवा कमी वयात लग्न करून देण्याचा काळ असल्यामुळे कसेबसे सातवीपर्यंत किंवा अजिबातच नसायचे. त्या काळात वनमाला बाईंनी पॉलिटिकल सायन्स घेऊन एम.ए. केले होते. त्याकाळी कॉलेजला जाणार्या त्या एकटयाच महिला होत्या. त्यामुळे मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेज मधली मुलं त्यांना गंमतीने ‘क्वीन ऑफ बीच’ म्हणत असत. वसंत देसाईचे संगीत लाभलेल्या ह्या चित्रपटातले ‘छडी लागे छम छम’ हे ह्दयनाथ मंगेशकरांचे पर्दापणातले गीत रिमिक्सच्या जमान्यात आजही ठेका धरायला लावते. काळ बदलला तशी माध्यमेही बदलली आणि अधिक प्रभावी झाली. 2004 रोजी ‘श्यामचा आई’ला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून रूद्रा व्हिडीओने ह्या चित्रपटाची व्हिसीडी/डिव्हिडी उपलब्ध करून देऊन मोलाची कामगिरी केली आहे. डिव्हिडीमध्ये तर वनमालाबाईंवर अत्यंत माहितीपूर्ण डॉक्युमेंटरी आहे. वाचनाची आवड कमी झालेल्या ह्या पिढीसाठी व्हिसीडी/डिव्हिडी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. त्याबरोबर श्यामची आईचे इंग्रजीत रूपांतर केले आहे ते व्ही. रामकृष्णन ह्यांनी. पुण्यात 74 वर्षाचे पुराणिक आजोबा एक हाती घरोघरी जाऊन ‘श्यामची आई’ पुस्तकाची विक्री करायचे. एखाद्या दिवशी पुस्तके विकली गेली नाही तर संध्याकाळचे जेवण ते घ्यायचे नाहीत. इतकी त्यांची श्यामच्या आईवर निष्ठा होती. त्यांनी घरोघर जावून पाच हजार पेक्षा जास्त पुस्तकांची विक्री केली आहे. यामागचा हेतु एकच होता, तो म्हणजे संस्काराचे धन योग्य हातात योग्य वेळी पडले पाहिजे. त्यासाठी आपल्यानंतरही हे काम कोणीतरी करावे असे त्यांना वाटत असे. श्यामच्या आईला साठ वर्षे पूर्ण झाली असली तरी अजूनही रसिकांच्या मनात चित्रपटाच्या आठवणी आणि आईच्या संस्कारांचा पगडा आहे. श्यामच्या आईचे संस्कार हे अनंत काळासाठी आहे. इथून पुढे येणार्या काळात त्याची गरज अधिकाधिक भासणार आहे. त्यावेळी कदाचित मुलांच्या आधी त्यांच्या पालकांनी पुस्तक/सीडी बघणे अधिक गरजेचे होईल. कारण संस्कारक्षम पिढीच पुढची पिढी अधिक चांगली जोपासू शकते. हे संस्काराचे धन प्रत्येकाच्या घरात असले पाहिजे. घराघरात श्यामची आईआपल्या घरात जशी धार्मिक पुस्तके, पोथ्या असतात त्याप्रमाणे श्यामची आई हे पुस्तकही प्रत्येकाच्या घरात असले पाहिजे. मार्गशीर्षातील गुरूवारचे व्रत असे करामार्गशिर्ष महिन्यातील गुरूवारी किंवा वैभवलक्ष्मी नामक शुक्रवारची व्रते करून वैभव प्राप्त करण्याची कामना बाळगणार्या भाबड्या आया बहिणींना सांगावेसे वाटते की अशी व्रते केल्यानंतर त्याची भाकड कथा असलेली पुस्तके हळदीकुंकवाला बोलावून वाटली जातात. त्या पुस्तकांपेक्षा श्यामच्या आईचे एक पुस्तक वाटले तर फार मोठे संस्कारधन प्रत्येकाच्या घरात जमा होईल.
मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०१४
घराघरात हवी ‘श्यामची आई’
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा