शनिवार, ८ फेब्रुवारी, २०२५

आप मतलब


दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी लागला. अनेक वृत्तवाहिन्यांनी नेहमीच्या आक्रस्ताळेपणाने भाजपने केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाची सत्ता खेचून आणली वगैरे वगैरे वर्णन केले. पण, या आपच्या पराभवाचा नेमका अर्थ मतलब आप मतलब काय आहे हे लक्षात घेतले पाहिजे. भारतीय जनता पक्षाने दिल्लीत सत्ता हस्तगत केली हे जरी वरकरणी दिसत असले, तरी त्यांनी ती गमावली होती का हा खरा प्रश्न आहे. म्हणून आप मतलब समजला पाहिजे.


मुळात २०१३ पासून आम आदमी पार्टी जी दिल्लीत राज्य करत आहे ती अपघाताने करते आहे. २०१२ ला दिल्लीत झालेल्या निर्भया प्रकरणाचा इतका गाजावाजा आम आदमी पार्टीने केला होता की, दिल्लीतील प्रत्येक रिक्षावर केजरीवाल यांचे फोटो लावून महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे शीला दीक्षित यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या राजवटीत महिला सुरक्षित नाहीत, यासाठी केजरीवाल यांनी जंग जंग पछाडले होते. भाजपच्या मोदी युगाचाही तेव्हाच प्रारंभ होत होता. त्यामुळे डिसेंबर २०१३ ला झालेल्या निवडणुकीत शीला दीक्षित यांचा पराभव ठरला होता. फक्त मतदारांना भाजप की आप हे दोन पर्याय संभ्रमित करत होते. त्यामुळे हा निकाल त्रिशंकू लागला. स्पष्ट बहुमत कोणालाच मिळाले नव्हते. भाजपला ३१ जागा मिळून तो सर्वात मोठा पक्ष होता. तर त्या खालोखाल आपला २८ जागा होत्या. काँग्रेसला ८ जागा होत्या तर अकाली दल, संयुक्त जनता दल, अपक्ष यांना एकेक जागा मिळाली होती. या तिघांची मदत घेऊनही भाजप ३४ पर्यंत जात होते. त्यामुळे भाजपने सरकार स्थापन करण्यास नकार दिला आणि आम आदमी पार्टीने काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केले. ज्यांना नाकारायचे त्यांना स्वीकारून बनलेले सरकार किती काळ टिकणार होते? अवघ्या ४९ दिवसांत केजरीवाल यांनी राजीनामा दिला आणि विधानसभा बरखास्त केली.

हे घडत असताना लोकसभा २०१४ चे वेध लागले होते. मोदीपर्व सुरू होणार होते. लोकसभा निवडणुकीत यावेळी केजरीवाल यांनी मोदींविरोधात वाराणसीत उभे राहण्याचे काम केले. विधानसभेत नसल्यामुळे आपले महत्त्व वाढवण्यासाठी आणि चर्चेत राहण्यासाठी थेट मोदींविरोधात ते लढले आणि चर्चेत राहिले. त्यामुळेच ते पुढे टिकले. भाजपची मोदींची लाट आली आणि लोकसभेत भाजपचे एनडीए १ चे सरकार आले. मोदींच्या कामाच्या प्रभावाने संपूर्ण देशात वातावरण बदलून गेले. त्यानंतर सहा महिन्यांनी २०१५ मध्ये दिल्ली विधानसभेच्या निवडणुका पुन्हा जाहीर झाल्या. मोदींच्या या वातावरणात भाजप सहज सत्ता मिळवू शकले असते. पण भाजपने तसे न करता काँग्रेसला सत्ता मिळू नये यासाठी आपचा पर्याय जनतेसमोर भक्कम करण्याचा चंग बांधला. दुय्यम उमेदवार उभे केले. भाजपचे महत्त्वाचे जे नेते होते की, जे २०१३ला मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते अशा हर्षवर्धन सारख्यांना केंद्रात घेतले आणि सुमार उमेदवार देऊन आपचा विजय सोपा केला. त्यामुळे ३१ जागा जिंकणाºया भाजपला फक्त ३ जागा जिंकता आल्या आणि २८ वरून आम आदमी पार्टी ६७ वर गेली. काँग्रेसला शून्य करण्यात भाजप यशस्वी झाला. बहुमत आपला असले तर भाजपची खेळी यशस्वी झाली. काँग्रेसला पूर्ण हटवणे हे ध्येय होते ते साध्य केले.


केजरीवाल यांचे उपद्रव मूल्य भाजपने ओळखले होते. मोदींच्या विरोधात लढून आपले महत्त्व वाढवणाºया केजरीवाल यांना दिल्लीपुरते सीमित करण्याचा डाव खेळून भाजपने २०१५ आणि २०२०ला सत्ता दिली. मात्र दुसºया निवडणुकीत भाजपने ३ वरून ८ वर उडी मारत आम्ही केव्हाही पुढे सरकू शकतो ही हिंट दिली होती. ती ना केजरीवाल यांना समजली ना काँग्रेसला. पण दिल्लीनंतर आम आदमी पार्टी पंजाबकडे सरकू लागली, गोवा, गुजरातमध्ये उमेदवार उभे करू लागली, तेव्हा त्यांच्या मुळावर दिल्लीवर घाव घालून त्यांना दिल्लीत गुंतवण्याचे धोरण भाजपने आखले. त्याप्रमाणे या निवडणुकीत केजरीवाल यांना विधानसभेत पराभवाला सामोरे जावे लागले आणि सत्ताही गमवावी लागली. शिशमहल, दारू परवाने अशा अनेक प्रकरणात जास्तीत जास्त बदनाम झालेल्या केजरीवाल यांना जनतेने नाकारले. पण आपचा विजय आणि पराजय दोन्ही भाजपच्या मदतीने झालेला होता हे लक्षात घेतले पाहिजे. ६७ जागांवर २०१५ला मिळालेला कौल हा काही खरा विजय नव्हता, तर ती काँग्रेसला नाकारण्यासाठी भाजपने आणलेली सूज होती. ती सूज २०२०ला पुरती कमी केली आणि आता २०१३च्या मागे नेऊन टाकले. आम आदमी पार्टी अर्थात आपच्या विजयाचा आणि पराजयाचा मतलब हा आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

भारतीय जनता पक्षाने या अगोदर २०१५ आणि २०२० तुम्ही जिंकला नव्हता, तर आम्ही हरलो होतो हे दाखवून दिले. दिल्लीत कोणी जिंकायचे ते आम्ही ठरवणार आहोत हे दाखवून दिले आहे. आम्ही हरण्यासाठी त्या निवडणुका लढवल्या होत्या हे दाखवून दिले आहे. भाजप हा पक्ष आपल्या रणनीतीने हार किंवा विजय प्राप्त करत असतो. कुठे मागे जायचे कुठे पुढे जायचे हे त्यांचे नियोजन असते. बुद्धिबळाच्या पटावर जसा वजीर, घोडा, उंट आणि हत्ती कधीही मागे पुढे होतात, त्याप्रमाणे भाजपची चाल असते. ती मात दिल्यावरच लक्षात येते. २०१५ला आणि २०२० ला केजरीवाल यांना विजयी करून काँग्रेसला हद्दपार करण्याचे धोरण होते. आताही पुन्हा काँग्रेस शून्य झाल्यावर केजरीवाल यांच्या आपची जागा त्यांना दाखवून दिली हे वास्तव आहे. मोदी लाट असताना आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असताना २०१५ आणि २०२०च्या दिल्लीतील निवडणुकीत भाजपचा पराभव होणे शक्यच नव्हते. आता दिल्लीची गरज म्हणून ही सत्ता हस्तगत केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: