मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२५

हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसला संजीवनी देतील



हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद देऊन काँग्रेसने खूप छान काम केले आहे. एक अत्यंत साधेसुधे आणि सभ्य व्यक्तिमत्त्व या पदावर नेमल्याने काँग्रेसने आपल्या मूळ विचारधारेकडे आपण वळत असल्याचे दाखवून दिले आहे. या प्रक्रियेची सुरुवात महाराष्ट्रापासून होत आहे हे अत्यंत समाधानकारक आहे. त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्रातील काँग्रेसला आणि हर्षवर्धन सपकाळ हा पॅटर्न काँग्रेसला संजीवनी देणारा ठरेल यात शंका नाही.


हर्षवर्धन सपकाळ यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. पदाची कोणतीही हवा त्यांच्या डोक्यात गेलेली नाही. त्यांनी आपला नम्र स्वभाव जपला आहे. हे साधेपणच काँग्रेसला वरदान ठरेल. मंगळवारी हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रदेश अध्यक्षपदाची सूत्र घेतली. पण त्यासाठी आपला साधेपणा सोडला नाही. त्यांनी मुंबईत दाखल झाल्यावर फाईव्ह स्टार हॉटेल सोडून गिरगावच्या आश्रमात राहिले, रात्रभर जमिनीवर झोपले. हे फार भावणारे आहे. विशेष म्हणजे हे त्यांनी कसलाही दिखावा करण्यासाठी नाही तर आपल्या नेहमीच्या वर्तणुकीप्रमाणे केले. नाहीतर काँग्रेसचे नेते पूर्वी एखाद्या झोपडीत जाऊन कलावती बाईकडून भाकरी खाण्याचे वृत्त गाजले होते. पण तो दिखाऊपणा होता. मात्र हर्षवर्धन सपकाळ यांच्या वागणुकीत अत्यंत प्रामाणिकपणा दिसतो. त्यामुळे ते काँग्रेसचे बलस्थान होतील यात शंका नाही.

भारतीय जनता पक्षाला सतत यश मिळण्यामागे त्यांच्यातील साधेपणा, सामान्य माणसापेक्षा आपण कोणी वेगळे आहोत हे दाखवून न देणे हे आहे. त्याचे अनुकरण सर्व पक्षांनी करणे गरजेचे आहे. ही परंपरा हर्षवर्धन सपकाळ अध्यक्षपदावर आल्यावर काँग्रेसमध्ये सुरू करत आहेत. त्यामुळे ते अतिशय कौतुकास्पद आहे.


विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या आणि उतरती कळा लागलेल्या राज्यातील काँग्रेस पक्षाची नव्याने बांधणी करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा नुकतीच हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतला. हर्षवर्धन सपकाळ यांनी मंगळवारी मुंबईतील बिर्ला मातोश्री सभागृहात झालेल्या सोहळ्यात प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. त्यासाठी हर्षवर्धन सपकाळ हे सोमवारी मुंबईत दाखल झाले. एरवी प्रदेशाध्यक्ष म्हटले की, पक्षाची संपूर्ण यंत्रणा त्यांच्या दिमतीला असते. मात्र, हर्षवर्धन सपकाळ सोमवारी खासगी कारने मुंबईत दाखल झाले. तसेच हर्षवर्धन सपकाळ यांनी मुंबईतील एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याऐवजी गिरगाव येथील नाना चौकात असणाºया सर्वोदय आश्रमात मुक्काम केला. रात्रभर ते जमिनीवर झोपले. ही बाब अत्यंत लक्षणीय अशी आहे.

याबाबत प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत, मी नेहमीच सर्वोदय आश्रमात थांबत आलोय. मी जमिनीवरचा कार्यकर्ता असल्याने मला नेहमीच सर्वोदय आश्रम भावत आला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सरंजामी आणि तालेवार नेत्यांचा पक्ष अशी प्रतिमा तयार झालेल्या काँग्रेस पक्षातील हा बदल सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. काँग्रेस पक्षातील आगामी बदलांची नांदी ठरणार का, हे आगामी काळात स्पष्ट होईल. पण त्यांच्या या वागणुकीत कुठेही दिखाऊपणाचा लवलेशही नव्हता.


नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसची धुरा कोणाच्या हातात जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी सतेज पाटील, विश्वजित कदम, अमित देशमुख यांच्यासारख्या बड्या नेत्यांची नावे चर्चेत होती. यापैकी एखाद्या नेत्याला प्रदेशाध्यक्षपद मिळेल, याची अनेकांना खात्री होती. मात्र, काँग्रेस हायकमांडने सर्वांचे अंदाज चुकवत राजकीय लाईमलाईटपासून कोसो दूर असलेल्या आणि कोणाच्याही ‘खिजगणतीत’ नसलेल्या हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद दिल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. पण हर्षवर्धन सपकाळ यांनी आपले वेगळेपण दाखवून दिले. हे नक्कीच वेगळेपण सर्वसामान्यांना भावणारे आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये काँग्रेससह विरोधी पक्षातील प्रमुख नेते हे सातत्याने तपास यंत्रणांच्या कचाट्यात सापडताना दिसत आहेत. या कचाट्यातून सुटण्यासाठी बहुतांश नेत्यांनी भाजपवासी होण्याचा मार्ग निवडला होता. जे नेते भाजपमध्ये गेले नाहीत ते एक तर तुरुंगात गेले किंवा त्यांनी तडजोड करत शांत बसण्याचा पर्याय निवडला. हीच गोष्ट ध्यानात घेऊन काँग्रेस हायकमांडने कोरी पाटी असलेल्या हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे दिली आहेत. हा विश्वास त्यांनी पहिल्या झटक्यात सिद्ध करून दाखवला हे फार महत्त्वाचे आहे. देशात, राज्यात नेहमीच विरोधी पक्ष हा सत्ताधारी पक्षाप्रमाणे मजबूत असला पाहिजे. दोघांमध्ये खेळीमेळीचे राजकारण असले पाहिजे. सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेकांचे शत्रू नसतात, तर त्यांनी चांगला कारभार करताना दुसरी बाजू मांडायची असते. हातात हात घालून हा रथ या दोन चाकांनी हाकायचा असतो. पण दुर्दैवाने गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्ष आपल्या भूमिकेपासून दूर जात तिरस्काराचे राजकारण करत आला आहे. ही प्रथा हर्षवर्धन सपकाळ बदलतील अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही. या अपेक्षांमध्येही ते यशस्वी होतील यात शंका नाही.


प्रफुल्ल फडके/ अन्वय

9152448055

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: