शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२५

संमेलनाचे अध्यक्ष नंतर काय करतात?


शुक्रवारपासून राजधानी दिल्लीत ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली. डॉ. तारा भवाळकर यांच्यासारख्या पुरोगामी साहित्यिक, नेत्या, आक्रम क व्यक्तिमत्त्व संमेलनाचे अध्यक्षपदी मिळाल्याने जरा अपेक्षा वाढल्या आहेत हे नक्की. कारण आजपर्यंत गेल्या दोन दशकात साहित्य संमेलनातून फक्त पोपटपंचीच झालेली पाहायला मिळाली आहे. त्यामुळे साहित्य संमेलनानंतरचा साधारण वर्षभराचा कालावधी संपल्यानंतर हे अध्यक्ष नंतर करतात काय? त्यांनी आपल्या कारकिर्दीत घेतलेल्या निर्णयांचे होते काय? ते सर्वांच्या विस्मरणात कसे काय जातात आणि पुढील वर्षीच्या संमेलनात पुन्हा ते मुद्दे कसे काय येतात? हे गेल्या दोन दशकातील चित्र आहे.


आपल्या साहित्य संमेलनाचे तीन टप्पे फार महत्त्वाचे आहेत. यातील पहिला टप्पा होता तो स्वातंत्र्यपूर्व काळातला होता. या काळात या व्यासपीठाचा फायदा तत्कालीन साहित्यिक आणि बंडखोर स्वातंत्र्य चळवळीतील विचारवंतांनी चांगला करून घेतला होता. त्याचप्रमाणे भाषेत भर टाकण्याचा अनेक शब्दप्रयोग देण्याचा त्यांच्या कामगिरीचा उल्लेख करावा लागतो. विशेष म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून केलेल्या सुधारणा या महत्त्वाच्या ठरल्या आहेत. मराठी भाषेला त्यांनी अनेक शब्द दिले. त्याचप्रमाणे भाषाशुद्धी आणि लिपीचा विचार मांडलाच नाही तर प्रत्यक्षात उतरवला. तत्कालीन परिस्थितीत अन्य भाषांमधील शब्द जसेच्या तसे वापरले जात होते. त्याला सावरकरांनी दिलेले पर्यायी मराठी शब्द आज नित्य वापरले जात आहेत. त्यापैकी अर्थसंकल्प, उपस्थित, क्रमांक, क्रीडांगण, गणसंख्या, गतिमान, चित्रपट, टपाल, तारण, दिग्दर्शक, दिनांक, दूरध्वनी, ध्वनिक्षेपक, नगरपालिका, नभोवाणी, निर्बंध, नेतृत्व, नेपथ्य, प्राचार्य, प्राध्यापक, मध्यांतर, महापालिका, महापौर, मुख्याध्यापक, मूल्य, विधिमंडळ, हुतात्मा असे असंख्य शब्द मराठी भाषेला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिले. अ या अक्षराला स्वराबरोबरच व्यंजनाचा दर्जा देऊन टंकलेखनासाठी ४८ अक्षरी मराठी लिपीला लहान करण्याचे कामही त्यांनी केले. अशा सुधारणांना त्यांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून जगमान्यता दिली. आज हे शब्द आपण दिवसातून कितीतरी वेळा वापरत असतो. याला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाचे योगदान म्हणतात.

साहित्य संमेलनाच्या दुसºया टप्प्यात उभी राहिली ती संयुक्त महाराष्टÑाची चळवळ. आचार्य अत्रे यांनी संयुक्त महाराष्टÑ आणि बेळगाव-कारवारसह सीमावासीयांच्या मुद्द्याला हात घालून सीमाप्रश्न पेटवला. राजकीय निष्क्रियतेमुळे तो प्रश्न अजूनही सुटलेला नाही, तरीही त्या प्रश्नाची ज्योत या टप्प्यात पेटवली. पण १९६०ला महाराष्टÑ राज्याच्या निर्मितीनंतरच्या टप्प्यात मात्र कोणा अध्यक्षाने काय केले हा प्रश्नच पडतो. साहित्य संमेलनाचा अध्यक्ष फक्त भाषणापुरताच राहिलेला दिसतो आहे. विचार व्यक्त करण्यापलीकडे त्यांच्याकडून काहीही होताना दिसत नाही. सगळे काही सरकारवर सोडून मोकळे व्हायचे आणि वर्षभर कुठे तरी कार्यक्रम करत फिरायचे या पलीकडे त्या अध्यक्षपदाला काहीही अर्थ राहिलेला नाही. म्हणजे महाराष्टÑाच्या निर्मितीपूर्वी ज्याप्रकारे वैचारिक आणि व्यापक साहित्य संमेलने झाली त्याप्रमाणात महाराष्टÑाच्या निर्मितीनंतर या साहित्य संमेलनाची कामगिरी शून्य झालेली दिसते.


देश स्वतंत्र होण्याचा प्रश्न झाला, महाराष्टÑाच्या निर्मितीचा प्रश्न झाला. आता आमचे काही प्रश्नच उरलेले नाहीत असा समज साहित्य संमेलनाचा झालेला दिसतो. त्याप्रमाणे शोभेपुरता अध्यक्ष निवडला जाण्याचे प्रकार सुरू झाले. त्या अध्यक्षाचे साहित्याशी काहीही योगदान नसले तरी तो निवडणूक लढवू लागला. त्यामुळे मराठी भाषेवर प्रेम नसणाºया आणि फक्त नावापुरते अध्यक्ष झालेल्या निष्क्रिय प्रवृत्तीने कोणतेही प्रश्न पुढे सरकेनासे झाले आहेत. साहित्य संमेलन हा फक्त काही लोकांचा मिरवण्याचा सोहळा झाला आहे. त्या ठिकाणी असाहित्यिकांचा मेळा भरताना दिसत आहे. त्या ठिकाणी विचार काय मांडले जातात यापेक्षा त्या मांडवात बसून फोटो काढायचा, सेल्फी काढायचा आणि आपले स्टेट्स फेसबुक व्हॉट्सअ‍ॅपवर अपडेट करण्यापलीकडे कोणी काही करताना दिसत नाही. ऐकावी अशी वक्तव्ये नाहीत की, त्या मराठी भाषेचा आतून उमाळा फुटत नाही. अशा परिस्थितीत जुन्या मागण्याच मागच्या पानावरून पुढच्या पानावर ओढण्याचे प्रकार होताना दिसत आहेत.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला इतका का वेळ लागतो आहे? त्यावर चर्चा मागच्या साहित्य संमेलनापर्यंत झाली. आता तोही प्रश्न सुटला आहे. त्यामुळे आता अध्यक्ष करणार काय? कोणते विषय घेणार? वर्षानुवर्षे ज्या मातीत संमेलन होते तेथील साहित्यिकांचा आढावा घेणे आणि पुढे सरकणे या पलीकडे काहीही होताना दिसत नाही. संमेलनाच्या समारोपाला दरवर्षी ठराव केले जातात. या ठरावाची जोरदार घोषणा केली जाते. पण ते प्रत्यक्षात उतरतच नाहीत. मग वर्षभर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नेमके करतात काय? त्याहून महत्त्वाचे म्हणजे अध्यक्षपदाचा कार्यकाल संपल्यानंतर ते करतात काय? म्हणजे अध्यक्षपदाची सूत्रे नूतन अध्यक्षाकडे सोपविल्यानंतर हे जुने माजी अध्यक्ष करतात काय? संयुक्त महाराष्टÑाचा, सीमावासीयांचा प्रश्न आजही सुटलेला नाही. कर्नाटकातील सरकारकडून, कन्नड भाषिकांकडून सीमाभागातील मराठी भाषिकांचे खूप छळ होतात. तेथील शेतकºयांना आपला ऊस महाराष्टÑात घालायचा की कर्नाटकात याबाबत शाश्वती नसते. शनिवारीच साहित्य संमेलन दिल्लीत होत असताना कर्नाटकातील लोकांनी महाराष्ट्राच्या एसटी चालकाला मारहाण केली. याचा निषेध तिथे होणे अपेक्षित आहे. त्याबाबत आम्ही काही बोलणार आहोत की नाही? त्यामुळेच पुरोगामी, धडाडीच्या असणाºया तारा भवाळकर यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्यांच्याकडून काहीतरी प्रशासकीय हालचालीसाठी प्रयत्न होतील अशी अपेक्षा आहे. आम्ही प्रयत्न केला हो, पण लाल फितीच्या कारभारात ते प्रस्ताव प्रलंबित राहिला म्हणून गळा काढणाºया साहित्यिकांना उत्तर देण्यासाठी तारा भवाळकर आक्रमक होणार का? फक्त टाळ्या मिळवणारे आणि समोरच्यांना खूश करणारे भाषण करून काही साध्य होणार नाही, तिथे अकलेचे तारे तोडून उपयोग नाही तर कृतीची अपेक्षा आहे.


प्रफुल्ल फडके/ अन्वय

९१५२४४८०५५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: