२० मार्चचा दिवस उगवला, तो निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशी दिल्याची बातमी घेऊन. फाशी दिली हे छानच झाले, उशीरच झाला त्याला. तरीही त्यावर समाधान व्यक्त करण्याइतकी परिस्थिती बिल्कूल नाही. याचे कारण समाधान, आनंद यशाचा व्यक्त करायचा असतो. निर्भयावर अत्याचार झाला, तिला आपण वाचवू शकलो नाही, समाजाला त्यामुळे खूप त्रास सोसावा लागला, पण याही परिस्थितीत त्या गुन्हेगारांना फासावर जाण्यापासून वाचवण्यासाठी १९ मार्चच्या रात्री १२ पर्यंत म्हणजे फासावर जाण्यापूर्वी पाच तासांपर्यंत वकील प्रयत्न करत होते. अशा प्रकारे कायद्याचा दुरुपयोग करणाºयांना समज देण्याची गरज आहे. गुन्हेगारांपेक्षा गुन्हेगारांना पाठीशी घालणारे घातक असतात. त्यांच्यावर कारवाई झाली, तरच समाधान व्यक्त करता येईल, नाही तर असे वकील आहेत, म्हणून त्यांच्या जीवावर गुन्हे करणाºयांची प्रवृत्ती वाढत जाईल. कायदा सांगतो की, शंभर अपराधी सुटले तरी चालतील, पण एकाही निरपराध्याला फाशी होता कामा नये, पण यातील निरपराध्याला शिक्षा होऊ नये यासाठी प्रयत्न करणारे वकील या देशात नाहीत. गुन्हेगारांना वाचवणारे वकील जास्त आहेत, हेच या देशाचे दु:ख आहे. हे काही आज घडते आहे असे नाही. ४० वर्षांपूर्वी पुण्यात जोशी-अभ्यंकर खून खटला झाला होता. त्यात दहा जणांचे खून करणाºयांपैकी चांडाळ चौकडीतील एक जण होता, तो जक्कल. त्या जक्कलचे वकील होते, कोळसे पाटील. तेच नंतर न्यायाधीश झाले आणि आताही सामाजिक कार्यकर्ते म्हणून मिरवतात. अशा लोकांकडून न्यायाची अपेक्षा करता येईल का? म्हणूनच कायद्याचा दुरुपयोग करणाºयांना समज दिली, तर खºया अर्थाने निर्भयाचा न्याय पूर्ण झाला असे म्हणता येईल.सात वर्षांनंतर अखेर निर्भयाला न्याय मिळाला असे म्हणावे लागेल. २० मार्च २०२०, सकाळी साडेपाच वाजता ठरलेल्या वेळेवर चारही दोषींना फासावर लटकवण्यात आले. फाशीच्या आधीचा अर्धा तास महत्त्वाचा होता. अखेरच्या तीस मिनिटांतही दोषींनी स्वत:च्या बचावाचा बराच प्रयत्न केला. फाशी घरात पोहोचल्यावर चारही दोषींनी रडारड केली, बचावासाठी फाशी घरातील लादीवर लोळण्याचाही प्रयत्न केला, पण अखेर सात वर्षांनंतर निर्भयाला न्याय मिळाला आणि मुकेश सिंह, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि विनयकुमार सिंह या चारही आरोपींना फासावर लटकवण्यात आले. गडाबडा लोळणाºयांना समजायला हवे होते की, सात वर्षांपूर्वी अशीच ती निर्भया दयेची याचना करत होती. अत्यंत निर्दयपणे तुम्ही तिचे लचके तोडलेत. तिचा निर्दयपणे खून केलात. तिचा सहकारी असाच दयेसाठी तडफडत होता, पण त्यालाही मारहाण केलीत. तेव्हा जराही माणुसकीची जाणीव न होणाºयांना दयेची याचना करण्याचा काय हक्क आहे? तिहार तुरुंगात एकाच वेळी चार जणांना फासावर चढविण्याची ही पहिलीच घटना ठरली. चारही दोषींना एकाच वेळी फासावर लटकवण्यात आले. त्यासाठी तिहारच्या तुरुंगाच्या क्रमांक तीनच्या फाशी घरात चार हँगर बनवण्यात आले होते. यातील एक खटका (लिवर) मेरठहून आलेल्या जल्लाद पवनने खेचला, तर दुसरा जेलच्या स्टाफने. त्यापूर्वी पहाटे ३.१५ वाजता चौघांना उठवण्यात आले, पण त्यांच्यातील कोणीही झोपलं नव्हतं. आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना आंघोळ करण्यास सांगण्यात आले. नंतर चहा मागवण्यात आला आणि अखेरची इच्छा विचारली. सेलच्या बाहेर आणण्याआधी चौघांनाही पांढरे कपडे घालण्यात आले. चौघांचे हात मागे बांधण्यात आले होते, यावेळी दोघा दोषींनी हात बांधण्यास विरोध करण्याचाही प्रयत्न केला. फाशी घरात घेऊन जात असताना एक दोषी प्रचंड घाबरला आणि तिथेच लादीवर लोळून राहिला. त्याने पुढे जाण्यास नकार दिला. अखेर बºयाच प्रयत्नांनंतर त्याला नेण्यात आले. नंतर चौघांचेही चेहरे काळ्या कपड्याने झाकण्यात आले. थोड्या वेळात जेल प्रशासनाकडून इशारा मिळताच पवन जल्लादने खटका खेचला आणि चारही दोषींच्या गळ्याभोवतीचा फास आवळला. हे वर्णन इथे मुद्दमा केले जात आहे. कारण कोणालाही अशा प्रकारचा गुन्हा करण्याचा विचार सुचता कामा नये. उशिरा मिळालेल्या या न्यायाने इथल्या न्यायव्यवस्थेची लक्तरे काढली असली, तरी न्याय मिळाला आहे. फक्त ज्यांच्यामुळे हा विलंब झाला, त्या वकिलांची सनद रद्द होणे गरजेचे आहे. जोपर्यंत गुन्हा सिद्ध झालेला नव्हता, तोपर्यंत वकिलांनी बचाव करणे मान्य करता येईल, पण गुन्हा सिद्ध झाला, गुन्हेगारांनी कबूल केला, सर्व पुरावे मिळाले, फास्ट ट्रॅक कोर्ट, हायकोर्ट, सर्वोच्च न्यायालय या सर्वांनी फाशी दिल्यानंतरही वकिलांनी या गुन्हेगारांना वाचवण्यासाठी प्रयत्न करणे हे अक्षम्यच म्हणावे लागेल. हा कायद्याचा दुरुपयोग आहे.गुरुवारी रात्री उशिराही दोषींची फाशी टळावी यासाठी प्रयत्न झाले. ही या वकिलांची अक्षम्य चूक म्हणावी लागेल. संताप याच गोष्टीचा होता. म्हणजे बलात्काºयांपेक्षा अशा वकिलांनी कायद्याचा दुरुपयोग केलेला मानसिक बलात्कार भयानक आहे, असे म्हणावे लागेल, मात्र सुप्रीम कोर्टाने सगळ्या याचिका फेटाळून लावत फाशीचा निर्णय कायम ठेवला. त्यानंतर ७ वर्षे, ३ महिने आणि ३ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ही फाशी दिली गेली.हे सगळे काल घडले आहे, असेच वाटते. १६ डिसेंबर २०१२ रोजी दिल्लीतील मुनीरका भागात ६ जणांनी एका पॅरामेडिकलला शिकणाºया विद्यार्थिनीवर चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केला. निर्भयासोबत तिचा मित्रही होता, मात्र या दोघांनाही मारहाण करण्यात आली. त्यानंतर या दोघांनाही चालत्या बसमधून बाहेर फेकण्यात आलं. केवढं हे क्रौर्य होतं? १८ डिसेंबर २०१२ दिल्ली पोलिसांनी राम सिंह, मुकेश, विनय शर्मा आणि पवन गुप्ताला सामूहिक बलात्कार प्रकरणात अटक केली. २१ डिसेंबर २०१२ रोजी दिल्ली पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीसह सहावा दोषी अक्षय याला अटक केली.२९ डिसेंबर २०१२ रोजी निर्भयावर दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र तिच्या प्रकृतीत काहीही सुधारणा होत नव्हती. त्यामुळे तिला सिंगापूरला पाठवण्यात आले. सिंगापूरला उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. देशभर संतापाची लाट उसळली होती. ३ जानेवारी २०१३ रोजी पोलिसांनी पाच जणांविरोधात सामूहिक बलात्कार, खुनाचा प्रयत्न, अपहरण आणि लूटमार या प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल केला.१७ जानेवारी २०१३ रोजी फास्ट ट्रॅक कोर्टाने पाचही दोषींवर आरोप निश्चित केले, पण फास्ट ट्रॅकचा फारसा उपयोग झालाच नाही. विशेष म्हणजे ११ मार्च २०१३ रोजी तिहार तुरुंगात या प्रकरणातला आरोपी राम सिंह याने आत्महत्या केली. इतके महत्त्वाचे गुन्हेगार असताना जेलमध्ये तो आत्महत्या कसा काय करू शकतो? हेही एक गूढच होते. ३१ आॅक्टोबर २०१३ या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला ज्युवेनाईल बोर्डाने दोषी ठरवलं आणि त्याची रवानगी तीन वर्षांसाठी बालसुधारगृहात करण्यात आली. ज्याला बलात्कार करायचे सुचते, तो कसला अल्पवयीन? पण कायदा आहे, त्याच्याविरोधात कोण बोलणार? कायद्याचा फक्त दुरुपयोग करायचा एवढेच.१० सप्टेंबर २०१३ रोजी फास्ट ट्रॅक कोर्टाने मुकेश, विनय, पवन आणि अक्षयला दोषी ठरवलं. त्यानंतर सात वर्षांनी फाशीची प्रक्रिया पूर्ण झाली. निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणात आता चारही आरोपींना पहाटे साडेपाच वाजता फासावर लटकवण्यात येण्याआधी रात्रभर नाट्यमय घडामोडी सुरू होत्या. फाशी टळावी म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत आरोपींनी प्रयत्न केले, अर्थात, हे त्यांचे डोके नव्हते. वकिलांनी त्यांचे महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न केला, मात्र दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी रात्री अडीचच्या सुमारास दोषींची याचिका फेटाळून लावली. या निकालानंतर निर्भयाच्या दोषींना काही तासांतच फाशी देण्यात आली, मात्र हा निकाल लागल्यानंतर निर्भयाच्या आईने आनंद व्यक्त केला. यापुढे आपण देशातील इतर मुलींसाठी आपला संघर्ष कायम ठेवणार आहोत, असे निर्भयाच्या आईने स्पष्ट केले. यापेक्षा तिच्या हातात तरी काय आहे? आपल्या नशिबी जे दु:ख आले, ते इतरांच्या नशिबी येऊ नये, हीच अपेक्षा करणार, पण या दु:खाला ठळक करणारी प्रवृत्ती म्हणजे गुन्हेगारांना वाचवणाºया वकिलांची आहे. त्यांना समज देण्याची गरज आहे.अर्थात, गुरुवारी मध्यरात्री आरोपींचे वकील ए. पी. सिंग यांनाही न्यायालयाने झापलं आहे. तुम्ही जे काही दावे करत आहात आणि जी याचिका दाखल केली आहे, त्याला काहीही अर्थ नाही, असे न्यायालयाने म्हटले, तसेच आम्ही रात्रीचे १० वाजून गेले आहेत, तरी इथे बसलो आहोत. आता तुम्हाला आणखी काय सांगायचं आहे, ते सांगा, मात्र त्यात काही तरी तथ्य हवं, असं म्हणत न्यायालयाने याचिका करणाºया सिंग यांच्यावर ताशेरे ओढले, पण या सिंग वकिलाचे एवढे धाडस कसे काय असू शकते? गुन्हा सिद्ध झाला आहे, शिक्षा सुनावली आहे, तरीही ती टाळण्यासाठी प्रयत्न करणारी ही वृत्ती म्हणजेच दहशतवादाला जन्म देणारे आहेत. हेच देशद्रोही आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे.
शनिवार, २१ मार्च, २०२०
फासावर लटकवले, पण कायद्याचा दुरुपयोग करणाºयांनाही समज द्या
शुक्रवार, २० मार्च, २०२०
संकटातही संधी आहे!
जगभरात कोरोनाची लागण दोन महिन्यांपूर्वी झाली असली, तरी भारतात त्याचा शिरकाव हा गेल्या महिन्याभरातच झाला, पण सज्ज यंत्रणा पाहून खूपच आश्चर्य वाटत आहे. भारतात हे कसे काय शक्य झाले? म्हणजे या कोरोनाच्या बचावासाठी लागणारी यंत्रणा, उपाययोजना इतक्या जलद कोरोनापेक्षाही चौपट गतीने कशी काय पोहोचली? हे आश्चर्यकारक, कौतुकास्पद, तितकेच संशयास्पदही आहे. बाजारात उपलब्ध झालेले मास्क, सॅनिटायझर, टिश्यूपेपर आणि अन्य वस्तू इतक्या पटापट मार्केटमध्ये उपलब्ध कशा झाल्या? त्याचे उत्पादन इतक्या गतीने कसे काय झाले?भारत हा क्रांतिकारक देश आहे. परिवर्तनाची ताकद भारतात आहे. त्यामुळेच कोरोनाची साथ अचानक आल्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात बाजारात मास्क कसे काय उपलब्ध झाले? हा न उलगडणारा प्रश्नच आहे. साधारणपणे आपल्याकडे एखादा सण जवळ असला की, त्याची चाहूल बाजारपेठेत दिसते. त्या सणाच्या अगोदर काही दिवस त्या वस्तू मार्केटमध्ये येतात आणि तो सण उरकल्यावर त्या वस्तू आत जातात, म्हणजे वर्तमानपत्रात काही बातम्या अशा येतही असतात. संक्रांतीसाठी बाजारपेठ सजली. मग दुकाने आणि बाजारपेठा या पतंग, तीळगूळ, तिळाचे लाडू, हलवा, छोट्या छोट्या लुटण्याच्या वस्तू, काळे कपडे, साड्या दुकानातून डोकावू लागतात. ही तारीख सणाची निश्चित असते. त्यामुळे व्यापारी आणि उत्पादक त्याचे नियोजन करून योग्य वेळी बाजारात या वस्तू आणतात.पाडवा जवळ आला की, छोट्या गुढ्या, कळक, नवनव्या रंगाच्या साड्या, साखरेच्या गाठी किंवा माळा, कुंची, कलश, कडुलिंबाचे डहाळे या वस्तू बाजारपेठेत दिसतात. उत्पादकांची तयारी असते. बाजारपेठेचे नियोजन असते. याचप्रमाणे अगदी छोटे सण ते मोठे उत्सव काहीही असले, तरी त्याची जय्यत तयारी त्या काळात बाजारपेठेत डोकावत असते. मग अगदी नागपंचमी असो वा गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी, ख्रिसमस या सगळ्या सणांना बाजारपेठेत बदल झालेला दिसतो. २५ डिसेंबरला ख्रिसमस असतो, तेव्हा लाल उबदार टोप्या, सांताक्लॉजचे मुखवटे, ख्रिसमस ट्री हे सगळे २० डिसेंबरच्या दरम्यानच बाजारपेठेत आलेले असते.म्हणूनच आश्चर्य वाटते की, हे संकट येणार आहे याची कसलीही कल्पना नसताना कोरोनाशी लढणारी यंत्रणा इतक्या सहजपणे कशी काय उभी राहिली? आज देशात १३० कोटी नागरिक आहेत. त्यातील जवळपास ५० कोटी नागरिक तरी आज मास्क वापरताना दिसत आहेत. हे एवढे मोठे उत्पादन आपल्याकडे इतक्या कमी वेळेत कसे काय झाले? इतक्या प्रचंड प्रमाणात मास्क बाजारात उपलब्ध आहेत की, ते कसे आले? हाच प्रश्न आहे. फुटपाथवर, लोकलमध्ये दुकानात कुठेही आज १० ररुपये ते ३० रुपये दराने मास्क विकले जात आहेत. विविध रंगांचे, मॅचिंगचे मास्क उपलब्ध आहेत. काही महिला साडीला आणि पोशाखाला मॅचिंग पाहिजे म्हणून विविध रंगांचे मास्क घेताना दिसत आहेत. ते सहज उपलब्ध आहेत. ही एवढी उपलब्धता कशी काय एकाएकी काही दिवसांत झाली? त्याचे उत्पादक कोण आहेत? त्यांची टंचाई बिल्कूल नाही? म्हणजे एकीकडे शेअर बाजार कोसळत आहे, लोक रस्त्यावर येत आहेत, विविध उद्योगांना फटका बसत आहे, व्यापार आणि व्यवसायाला झळ बसली आहे, पण मास्कचा बाजार मात्र तेजीत आणि अतितेजीतच आहे. हेच फार मोठे आश्चर्य आहे. जसे पंचांग, कॅलेंडरमधून कोणता सण केव्हा आहे याची माहिती मिळते आणि त्याप्रमाणे बाजारपेठेत वस्तूंची आवक होते. तशी याची चुणूक कुणाला लागली होती का? हे नियोजन कसे झाले हेच फार मोठे गूढ आहे.अशीच भरपूर उत्पादन करण्याची आणि जलदगतीने बाजारपेठेत माल आणण्याची आमच्या उत्पादक आणि विक्रेत्यांची तयारी असेल, तर भारत हा जगात एक नंबरचा देश होईल. गेली पंचवीस वर्षे भारतातील सर्वात मोठी बाजारपेठ ही चीनने काबीज केली होती. इतकी की, आमची खाण्याची सवय, लहान मुलांची खेळणी, घरातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तू इतकेच नव्हे, तर ते फेंगश्युईचे देवही घराघरांत घुसले होते, पण आम्ही जर आमच्या गरजांसाठी आमची उत्पादने निर्माण केली, तर चीनच्या अर्थव्यवस्थेला दणका देऊन जगातील सर्वात मोठी उत्पादने आणि विक्रीची यंत्रणा उभी करू शकतो. हे या मास्कवरून दिसून येते.केवळ मास्कच नाही, तर ज्या गतीने सॅनिटायझर आणि इतर खबरदारीची उत्पादने बाजारात आली, वितरित झाली ते खरेच कौतुकास्पद आहे. हे एक चांगले लक्षण आहे. भारत यातून वाचून स्वबळावर उभा राहू शकतो, हे दाखवण्याची हीच संधी आहे, म्हणजे चीनच्या वुहान प्रांतातून उगम पावलेल्या कोरोना विषाणूचा प्रसार जगभरातील १४५ हून अधिक देशांमध्ये झाला आहे. कोविड १९ मुळे मृत्युमुखी पडणाºयांची संख्याही दिवसागणिक वाढते आहे. या सर्व परिस्थितीचे अत्यंत दूरगामी सामाजिक परिणाम दिसून येत आहेतच, परंतु त्याबरोबरीने याचे अत्यंत गंभीर आर्थिक परिणामही येत्या काही काळात समोर येणार आहेत. त्यात भारत याच प्रयत्नांनी सावरू शकतो. ते आपल्याला जमले पाहिजे.आज चीनमधील आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. जागतिक महासत्ता बनू पाहणाºया या देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. मागील काळात सार्स नावाच्या विषाणूचा असाच प्रसार झाला होता. त्यावेळी जगाच्या जीडीपीत चीनचा वाटा होता, ८ टक्के, परंतु आज कोरोना विषाणूचा प्रसार होत असताना चीनचा जागतिक जीडीपीतील वाटा २० टक्के आहे. चीन हा जगातील पुरवठा साखळीतील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. चीनची निर्यात अब्जावधी डॉलर्सची आहे. एकट्या अमेरिकेबरोबर चीनचा ७०० अब्ज डॉलर्सचा व्यापार आहे. जपानबरोबरचा चीनचा व्यापार ४५० डॉलर्सचा आहे. संपूर्ण जगाला कच्चा माल पुरवणारा कारखाना म्हणून चीनकडे पाहिले जाते. बहुतांश अमेरिका आणि युरोपियन देश हे चीनकडूनच कच्चा माल घेतात, परंतु आज चीनमधील ५० टक्क्यांहून जास्त उद्योग-धंदे बंद पडले आहेत. चीनकडून होणारी निर्यात २० टक्क्यांहून अधिक प्रमाणात कमी झाली आहे. चीन सरकारने कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आले असल्याचे घोषित केले असले, तरी तेथील बंद झालेले उद्योग, कारखाने सुरू होण्यासाठी, पूर्ववत होण्यासाठी पुढील सहा महिन्यांचा अवधी लागणार आहे.आजघडीला चीनमधील केवळ २५ टक्के उद्योग उघडण्याच्या मार्गावर आहेत. चीनमधील कोळश्याची विक्री ७५ टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे कोळशाचे उद्योग ठप्प झाले आहेत.आज जगभरातील विविध देशांमध्ये असंख्य प्रकारच्या पक्क्या वस्तू निर्माण करण्यासाठी आवश्यक असणारा कच्चा माल चीनकडून निर्यात केला जातो. यामध्ये वाहनाचे सुटे भाग, रसायने, सिरॅमिक्स, रबर, कपडे, तसेच कार्बन यांचा समावेश होतो, पण गेल्या महिन्याभरापासून हा पुरवठा बंद झाला आहे. तत्पूर्वी जवळपास दोन वर्षे अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापारयुद्ध सुरू होते. त्या काळात अमेरिकेतील बहुराष्ट्रीय कंपन्यांनी चीनला पर्याय शोधायला सुरुवात केली होती. हा पर्याय भारत बनू शकतो का? यासाठी तातडीने प्रयत्न झाले पाहिजेत. हीच वेळ आहे. आपण संधीसाधू नाही, पण परिस्थितीवर मात करत असताना आलेली संधी गमावणेही योग्य नाही.आज अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी चीनमधून आपले उद्योग गुंडाळायला सुरूवात केली. उदाहरणच घ्यायचे तर मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक्स जगतातील दिग्गज कंपनी असणाºया सॅमसंग या कंपनीचे ५० टक्के मोबाइल चीनमध्ये उत्पादित होत असत, पण त्यांनी ते युनिट बंद केले असून, उत्तर प्रदेशातील नोएडा येथे हे युनिट उभारण्याचा निर्णय झाला आहे. अशाच प्रकारे आता अन्य अनेक कंपन्याही कच्च्या मालासाठी पर्यायांचा शोध घेत आहेत. ही फार मोठी संधी भारताला आहे. अनेक उद्योग असे भारतात आले, तर इथला रोजगाराचा प्रश्न सुटणार आहे, म्हणूनच या आश्चर्यकारक घटनेकडे क्रांती म्हणून बघावे लागेल. संकट म्हणून न पाहता संधी म्हणून पाहायला हवे.गेल्या एक महिन्यात घडलेल्या घडामोडींमुळे दिसून आले आहे की, सिरॅमिक्स, रबर, रसायने, गाड्या, कपडे आणि दागिने यांसारख्या विशिष्ट क्षेत्रांमध्ये युरोपियन देश, अमेरिका यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर भारताकडे पुरवठ्याविषयी चौकशी केली जात आहे. १०० कोटींपेक्षा अधिक रकमेच्या कराराविषयी चौकशी सुरू आहे. आज संपूर्ण जग चीनचा पर्याय म्हणून भारताकडे पाहात आहे. अमेरिकेनेही चीनवरील त्यांचे अवलंबित्व कमी करत आणले आहे. भारताने या संधीचा फायदा नेमका कसा घ्यायचा, याचा विचार केला पाहिजे.
गुरुवार, १९ मार्च, २०२०
कोरोनाचा बंद; बेमुदत?
गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोनाने हैदोस घातला आहे. त्यापेक्षा जास्त हैदोस माध्यमांनी आणि अफवांनी घातला आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट बंद केली जात आहे, म्हणजे आमच्या राजकीय पक्षांना जे जमत नाही, ते या कोरोनाने करून दाखवले. आजकाल कोणताही राजकीय पक्ष किंवा संघटनेने बंदची हाक दिली, तर बंद यशस्वी होत नाही. बंदला संमिश्र प्रतिसाद अशीच बातमी येते, पण या कोरोनाच्या भीतीने पुकारलेला बंद मात्र शंभर टक्के यशस्वी होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने मुंबईतील गर्दी कमी झाली नाही, तर लोकलही कदाचित बंद ठेवावी लागेल, असा इशारा दिला आहे. हे अत्यंत गंभीर आणि तितकेच विचित्र आहे.लोकांनी गर्दी कमी केली नाही, तर मुंबई लोकल बंद करावी लागेल, असा इशारा मंगळवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे खासगी कंपन्यांना घरून काम करण्याची मुभा देण्याची विनंती केली आहे. गरज पडल्यास ५० टक्क्यांपेक्षा कमी लोकांनाच कार्यालयात बोलवा असं सांगितलं आहे. सरकारी कार्यालयातही ५० टक्क्यांपेक्षी कमी लोकांनी काम करावं असा निर्णय घेत आहोत. जेणेकरून सार्वजनिक वाहतूक सेवेवर ताण कमी पडावा. त्या अनुषंगाने महत्त्वाचे निर्णय घेत आहोत. मुंबईच्या लोकांनी ऐकलं नाही, तर बस आणि ट्रेन सेवा १० ते १२ दिवसांसाठी जनहितार्थ बंद करावी लागेल, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. अर्थात, लोकलची संख्या कमी केली किंवा बंद केली, तर गर्दी आणखी वाढेल. त्यामुळे रेल्वे स्थानकांवरील गर्दी कमी करण्यासाठी सर्वात प्रथम लोकलची संख्या वाढवली पाहिजे. ज्यादा फेºया कराव्या लागतील. ही गर्दी रोखणे केवळ अवघड आहे. आज किती जणांना सरकारी नोकºया आहेत? मुंबईत ७० टक्के लोकांची हातावर पोटं आहेत. खाजगी नोकरी करणाºयांचे प्रमाण सर्वाधिक आहे. तिथे कामगारांना रजा कशी काय मिळू शकेल? ३१ मार्चपर्यंत किंवा पंधरा दिवस कामगारांना बिनपगारी घरी बसावे लागेल. ते नुकसान कसे भरून काढायचे? ही पोटाची चिंता प्रत्येकाला आहे. त्यामुळे ही गर्दी कदापि कमी होणार नाही. रेल्वे स्थानकांवरील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे बंद करणे हा उपाय नाही, तर ज्यादा रेल्वे सोडून स्टेशनवरून प्रवाशांना पटापट बाहेर पडता येईल असे काही तरी करावे लागेल.बुधवारी सकाळपर्यंत महाराष्ट्रात ४२ करोना रुग्ण आहेत. आतापर्यंत ८०० टेस्ट झाल्या असून, त्यापैकी ४२ पॉझिटिव्ह सापडले आहेत. उर्वरित सर्व निगेटिव्ह आहेत. परदेशातून आलेल्यांचीच चाचणी केली जात आहे, तसंच राज्यात आणखी काही लॅब, हॉस्पिटल्स सुरू होणार आहेत. सरकार म्हणते आहे की, अत्यावश्यक सेवा कुठल्याही स्थितीत बंद करणार नाही, परंतु अनावश्यक व्यवहार बंद करायला हवेत. पालिकांशी संपर्क साधून ज्वेलर्स, कपड्यांसारखी दुकानं बंद ठेवण्यास सांगण्यात येणार आहे. हा एक प्रकारे आणीबाणीचाच प्रकार आहे. यामुळे काळ्या बाजारालाही ऊत येऊ शकतो, पण कोरोनाने केलेला हा बंद बंदसम्राट जॉर्ज फर्नांडिस यांच्यापेक्षा भयानक बंद आहे असे वाटते.परिस्थितीचा फायदा आणि गैरफायदा घेणारे अनेक जण असतात. त्यात काही गंभीर प्रकार, तर कधी विनोदही घडत असतात. आज तेच वातावरण सगळीकडे पाहायला मिळत आहे. या जमाव बंदी, संचारबंदी, बंद प्रकाराने सगळीकडे होत असलेला शुकशुकाट स्मशानशांतता निर्माण करत आहे. सर्वात भयानक म्हणजे, ज्या भागात असा रुग्ण असल्याचा संशय आहे, त्या घरातील लोकांना आसपासचे, सोसायटीतील लोक ज्याप्रकारे वागणूक देत आहेत, तो प्रकार वाईट आहे, म्हणून सोसायटीतल्या लोकांनी रुग्णांशी माणुसकीला धरून वर्तन करावे. त्यांना गुन्हेगारासारखी वागणूक देणं योग्य नाही. कोरोनाचा आजार हा उपचार घेऊन बरा होणारा आहे. त्यामुळे रुग्ण आढळल्यास त्यांना १४ दिवसांचं विलगीकरण करावं, उपचार करावेत, पण केवळ सोशल मीडिया आणि दुसरी बातमी नसल्याने रंजित करून बातम्या सांगणाºया वाहिन्या यांच्यामुळे दहशत पसरत आहे. बंदचे वातावरण वाढीस लागत आहे. खरं तर या सगळ्या टीव्ही वाहिन्या चार दिवस बंद ठेवल्या, तर आपोआप हा रोग आटोक्यात येईल असे वाटते. फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि अन्य समाजमाध्यमे बंद केली, तर या व्हायरसचा प्रसार थांबू शकेल.एक महिला आपल्या पाच वर्षांच्या मुलाला हाताला बोट धरून चालली होती. रस्त्याने अनेकांनी तोंडाला मास्क लावला होता. मुलाला गंमत वाटत होती. हे काय आहे? अशी उत्सुकता त्याच्या चेहºयावर दिसत होती. त्याने आईला विचारले, ‘हे काय लावले आहे? तर ती बाई पटकन म्हणाली, ‘कोरोना झाला की, असे तोंड झाकून घ्यायचे असते! म्हणजे कोरोना झाल्यावर मास्क लावायचा की, तो होऊ नये म्हणून तो लावायचा हेही लोकांना नीट समजत नाहीये. संध्याकाळी त्या मुलाचे वडील घरी आले, तेच मुळी मास्क लावू०न. झाले, मग काय? त्या मुलाला वाटले, आपल्या वडिलांना कोरोना झाला. तो सगळीकडे उड्या मारत आमच्या पप्पांना कोरोना झाला, असे सांगत सुटला. सोसायटीतील सगळी दारे फटाफट बंद झाली. हाही बंदचा प्रकार नवाच होता. हे असले प्रकार सगळीकडे चालू आहेत.
बुधवार, १८ मार्च, २०२०
दोन महिन्यांत जगात ३० लाख ५२ हजार ७८१ जणांचा मृत्यू
सर्वाधिक बळी कॅन्सरचे, तर सर्वात कमी कोरोनाचे
मुंबई - गेले दोन महिने संपूर्ण जगभर कोरोना व्हायरसची भीती निर्माण झाली आहे, परंतु नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका आकडेवारीनुसार संपूर्ण जगात कोरोनाचे मृत्यू फक्त २३६० आहेत, तर कॅन्सरमुळे झालेल्या बळींची संख्या ११ लाख ७७ हजार १४१ इतकी आहे. ही आकडेवारी २०२० या वर्षातील पहिल्या दोन महिन्यांतील असून, आजही कॅन्सरमुळे जाणाºया बळींची संख्याच अधिक असल्याचे अहवालातून दिसत आहे. हा अहवाल हमबर्ग युनिव्हर्सिटीने घेतलेल्या आकडेवारीचा आहे.संपूर्ण जगभरात आज कोरोनाची दहशत आहे. जगभरात कोरोनाने मृत पावलेल्या रुग्णांचा आकडा ५ हजारांच्या वर सांगितला जात आहे. याचा अर्थ मार्च महिन्याच्या पंधरा दिवसांत अडीच हजारांपेक्षा जास्त रुग्ण दगावले असावेत, पण जगात सर्वाधिक बळी हे कॅन्सरचेच असल्याचे या आकडेवारीतून दिसून आले आहे.या आकडेवारीनुसार कोरोना व्हायरसने मृत पावलेल्या रुग्णांची संख्या २३६० आहे, तर साध्या थंडी तापाने ६९ हजार ६०२ लोक जगभरात मरण पावले. मलेरियाने बळी गेलेल्यांची संख्या १ लाख ४० हजार ५८४ आहे. आत्महत्या केलेल्यांची संख्या १ लाख ५३ हजार ६९६ आहे. रस्ते अपघातात मेलेल्यांची संख्या १ लाख ९३ हजार ४७९ आहे. एचआयव्ही एड्सने गेलेल्यांची संख्या २ लाख ४० हजार ९५० आहे. दारू पिल्याने मेलेल्यांची संख्या ३ लाख ५८ हजार ४७१ आहे, तर धूम्रपानामुळे हृदयविकार आणि तत्सम आजाराने ७ लाख १६ हजार ४९८ बळी घेतले आहेत, मात्र सर्वाधिक बळी ११ लाख ७७ हजार १४१ हे कॅन्सरनेच गेलेले आहेत.कोरोनाचा या दोन महिन्यांत खूप बाऊ केला गेला आहे, तरीही या आकडेवारीवरून कोरोनाच्या नवीन वर्षातील पहिल्या दोन महिन्यांतील जगभरातील बळींची संख्या ही खूपच कमी आहे.
गटबाजीचा बळी
मध्य प्रदेश विधानसभेचे आज सोमवारी शक्तिप्रदर्शन होणार आहे. कमलनाथांची गच्छंती अटळ आहे, पण त्याचे देशाच्या राजकारणातही मोठे परिणाम उमटणार आहेत हे नक्की. ज्योतिरादित्य शिंदे यांचे भाजपने पुनर्वसन केल्याने काँग्रेसला फार मोठा दणका बसला आहे. मध्य प्रदेशातील काँग्रेसचा हात छाटला गेला आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये दोन वर्षांपूर्वी काँग्रेसची सरकारे येण्यात तिथल्या ज्येष्ठ नेत्यांपेक्षा युवक नेत्यांचे योगदान मोठे होते, असे असताना सरकार स्थापण्याच्या वेळी राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांना, तर मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांना संधी देण्यात आली. त्यामुळे खरे तर दोन्ही राज्यांमधल्या काँग्रेसी नेत्यांमध्ये अस्वस्थता होती. सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपद देऊन राजस्थानमध्ये सुवर्ण मध्य साधण्यात आला; परंतु मध्य प्रदेशमध्ये तसे करण्यात आले नाही. असे असूनही लोकसभा निवडणुकीपर्यंत काँग्रेसमध्ये वादाची मोठी ठिणगी पडली नव्हती. युवा नेत्यांनी समंजसपणा दाखवला होता, परंतु लोकसभेच्या निवडणुकीत ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला. भारतीय जनता पक्षापेक्षाही काँग्रेसमधली गटबाजी शिंदे यांच्या पराभवाला कारणीभूत ठरल्याचे सांगितले गेले. काँग्रेसमधल्या या गटबाजीचा भारतीय जनता पक्ष फायदा उठवत गेला. गेल्या वर्षभरात वारंवार काँग्रेसच्या सरकारला धोका असल्याचे चित्र पुढे येत गेले; परंतु कमलनाथ यांनी काही अपक्षांना तसेच भाजपच्या एक-दोन आमदारांना गळाला लावून शिंदे यांच्या नाराजीमुळे पक्षाला फार काही फरक पडत नाही, असे दाखवण्याचा प्रयत्न केला.
जनमानसात स्थान असलेल्या नेत्यांना मोठे होऊ द्यायचे नाही, ही खेळी काँग्रेसमध्ये नेहमीच पाहायला मिळाली. शरद पवार, राजेश पायलट, माधवराव शिंदे, पी. ए. संगमा, ममता बॅनर्जी, राजमोहन रेड्डी यांच्यासह अन्य नेत्यांना तो अनुभव आला आहेच. हुजरेगिरी करणारांचे राजकारण करणाºयांचे ऐकून निर्णय घेण्याच्या पक्षश्रेष्ठींच्या वृत्तीचाही तो दोष आहे. दिल्लीतल्या आपल्या खुर्चीला कोणी आव्हान देऊ नये, म्हणून राज्या-राज्यातल्या नेत्यांना आपसात झुंजत ठेवण्याची सवय काँग्रेसमध्ये परंपरेने चालत आली. तोच दोष काँग्रेसच्या ºहासाला कारणीभूत ठरला हे अजूनही लक्षात घेतले जात नाही. आता सत्तेची सावली जाऊन किती तरी वर्ष झाली, तरी काँग्रेसजनांना त्याची जाणीव झालेली नाही. काँग्रेसमध्ये जुन्या-नव्यातला संघर्षही कायम आहे. खरे तर देशात युवकांची संख्या वाढली आहे. त्यांचे प्रश्न वेगळे आहेत. अशा वेळी युवकांना संधी देऊन नेतृत्व सोपवले असते, तर काँग्रेसला उभारी घेण्याची संधी होती; परंतु काँग्रेस आपल्या पायावर वारंवार कुºहाड मारून घेत आहे. ते कशासाठी याचे कोडे उलगडत नाही. भारत हा आता युवकांचा देश आहे. युवकांच्या वाढत्या आकांक्षा, प्रश्न समजून घेऊन राजकारण करणारी पिढी पक्षात सक्रिय करण्याऐवजी जुन्या धेंडांकडे नेतृत्व देण्याची किंमत पक्ष मोजत आहे. युवक नेत्यांनी सत्ता आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायची, मेहनत घ्यायची आणि त्यांना काही द्यायची वेळ आली की, दूर ठेवायचे, ही रणनीतीच काँग्रेसच्या अधोगतीला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे काँग्रेस एक एक राज्य हातातून गमावत आहे.जगनमोहन रेड्डी यांच्यासारख्या नेत्याची अशीच उपेक्षा केल्याने आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेस नामशेष झाली. ज्योतिरादित्य शिंदे यांचे योग्य वेळी पुनर्वसन न केल्याने आता मध्य प्रदेश काँग्रेसच्या हातून गेल्यासारखीच अवस्था आहे. काँग्रेसने आपल्या कार्यपद्धतीत बदल केला नाही, तर पुढचा क्रमांक राजस्थानचा असू शकतो. ज्योतिरादित्य शिंदे, जगनमोहन रेड्डी, सचिन पायलट आदी तरुण किंवा जनाधार असलेल्या नेत्यांचे काँग्रेस पक्षात पद्धतशीरपणे पंख छाटण्यात आले. लागोपाठ दोन पराभवांनंतरही पक्षाने काही बोध घेतलेला दिसत नाही. गटबाजीचे राजकारण आणि परस्परांना झुंजवण्याचे उद्योग अजूनही सुरूच आहेत. यातूनच ज्योतिरादित्य यांच्यासारख्या नेत्यानेपक्षाला रामराम ठोकला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आता म्हणतात त्याप्रमाणे शिंदे यांना राज्यसभेत पाठवता आले असते. कमलनाथ यांच्याकडचे पक्षाध्यक्षपद ज्योतिरादित्य यांना देता आले असते. तशी शिंदे यांची मागणी होती. एक व्यक्ती एक पद या नियमाप्रमाणे पक्षाध्यक्षपद ज्योतिरादित्य यांना देता आले असते; पण तसे न झाल्याने राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर स्फोट झाला. ज्योतिरादित्य हे उदयोन्मुख तडफदार नेतृत्व होते. हिंदी भाषेवर प्रभुत्व होते. राज्याचा नसला तरी दिल्लीमधल्या मंत्रीपदाचा अनुभव होता. ते निश्चितच भावी नेते होऊ शकले असते. त्यामुळे चव्हाण यांना वाटते ते काँग्रेसच्या शीर्षस्थ नेत्यांना कळले नाही.
मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री कमलनाथ आणि पक्षाचे नेते दिग्विजय सिंग या जोडगोळीने ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला सुरुंग लावला. लोकसभा निवडणुकीत शिंदे पराभूत झाले. त्यांचा पराभव घडवून आणला. विधानसभेत सत्तेवर येणाºया काँग्रेसला मध्य प्रदेशात एकही खासदार निवडून आणता येत नाही हे आश्चर्य आहे. ११४ आमदारांचे संख्याबळ असताना एकही खासदार निवडून येत नाही हे कसे शक्य झाले? गेल्या वर्षभरापासून शिंदे यांनी आपली नाराजी वारंवार प्रगट केली होती. त्यांच्या नाराजीची दखल घ्यावी, असे पक्षाला वाटले नाही. त्यांनी काँग्रेसला आपल्या नाराजीतून वारंवार इशारा दिला होता; परंतु त्याची दखल घ्यावी असे पक्षाला वाटले नाही. सहा महिन्यांपूर्वी शिंदे यांनी पक्षापासून दुरावण्याचे संकेत दिले होते, त्यावेळी त्यांची मनधरणी करून उपमुख्यमंत्रीपद किंवा प्रदेशाध्यक्षपद दिले असते, तरी शिंदे पक्षात थांबले असते; परंतु तुमची आम्हाला गरज नाही असेच संकेत त्यांना जणू देण्यात आले. मध्य प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी निवड व्हावी, अशी ज्योतिरादित्य यांची अपेक्षा होती, पण कमलनाथ आणि दिग्विजय सिंग यांनी याला विरोध दर्शवला. मध्य प्रदेशमध्ये डिसेंबर २०१८ मध्ये सत्ता मिळाल्यापासून प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सुटला नव्हता. मुख्यमंत्रीपदासाठी ज्योतिरादित्य यांना डावलण्यात आले. कारण, त्यांच्यामागे फक्त २० ते २३ आमदार असल्याचा युक्तिवाद करण्यात आला होता. आता तेवढेच आमदार सत्ता घालवायला कारणीभूत ठरत आहेत. हेसुद्धा कमलनाथ आणि काँग्रेस नेत्यांच्या लक्षात आले नाही. ज्योतिरादित्य हे गांधी घराण्याच्या जवळचे होते. प्रियंका गांधी यांच्या बरोबरीनेच त्यांच्याकडे उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आली, पण राहुल गांधी यांना आव्हान नको, म्हणून शिंदे यांचे पंख कापण्याचे प्रयत्न दिल्लीतल्या नेत्यांनी केले. ज्योतिरादित्य यांच्या आजींचा काँग्रेस ते भाजप व्हाया जनसंघ असा प्रवास झाला. त्यांच्या वडिलांनी जनसंघातून राजकारणात प्रवेश करत काँग्रेसचा हात धरला. आता ज्योतिरादित्य यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपशी हातमिळवणी करत राजकारणाची पुढची दिशा केली आहे. त्यामुळे शिंदे घराण्यातल्या राजकीय प्रवासाचे एक वर्तुळ पूर्ण झाले आहे. पण काँग्रेसने गटबाजीने केवळ ज्योतिरादित्य यांचा नव्हे, तर आपल्या सरकारचा बळी घेतला आहे हे लक्षात घेतले पाहिजे. आता आज बहुमत सादर करताना बराच ड्रामा होईल, पण सरकार वाचवणे केवळ अशक्य आहे, अशीच परिस्थिती आहे.
चित्रपटातील रोगराई!
सध्या देशात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे सगळीकडे साथीच्या रोगांची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर चित्रपटातील रोगराई यावर नजर टाकली तर तत्कालीन चित्रमाध्यमांतून ते विषय कसे हाताळले गेले होते, हे लक्षात येईल. काही रोग हे परंपरागत असतात. त्याचा वापर आपल्याकडे कथानकात घुसडण्यासाठी केला जातो, पण योग्य वेळी योग्य रोगांची निवड करणे हे चित्रपट माध्यमांचे वैशिष्ट्य ठरलेले आहे.१९७० च्या दशकात हृषिकेश मुकर्जी यांचा तुफान गाजलेला चित्रपट आला, तो म्हणजे ‘आनंद’. तत्कालीन सुपरस्टार राजेश खन्ना आणि भावी सुपरस्टार अमिताभ बच्चन हे या चित्रपटाचे आकर्षण होते. त्यात राजेश खन्ना हा कॅन्सरग्रस्त तरुण दाखवला आहे. त्यापूर्वी कोणत्याही चित्रपटात कॅन्सर हा रोग दाखवला गेला नव्हता, पण त्यानंतर कॅन्सर, ट्यूमर हे चित्रपटात येऊ लागले, पण चित्रपटातील कॅन्सरचा जनक हा आनंद म्हणावा लागेल. त्यानंतर अनेक दशके ही साथ अनेक हिंदी चित्रपटांत पसरली. ‘मजबूर’ या चित्रपटात अमिताभ बच्चनना ब्रेन ट्यूमर झालेला दाखवला आहे. ‘प्रेम तपस्या’ चित्रपटात जितेंद्रला फुप्फुसाचा कॅन्सर झाल्याचे दाखवले आहे. या कॅन्सरच्या रोगातून अनेक दिग्गजांनी आपले प्राण ओतले आहेत. ‘एक ही रास्ता’ चित्रपटात शबानाला कॅन्सर झाला आहे. मग प्रेमाचा त्रिकोण आल्यावर एकाला कॅन्सर होऊन त्याचा मृत्यू घडवणे हे कथानकाचे बलस्थान ठरू लागले. मग तो नायक, नायिका डोळ्याभोवती काळे वर्तुळ, खंगत जात खोकताना दाखवून एके दिवशी प्रेक्षकांना रडवत मरून जायचा. ‘मांग भरो सजना’, ‘अर्पण’ यासारख्या अनेक जितेंद्रपटांत कधी रेखा, कधी रिना रॉय, कधी मोसमी चटर्जी यांना कॅन्सरने खपवले आहे. कॅन्सरची ही साथच चित्रपटात अनेक वर्षे टिकली. कॅन्सर हा भयंकर रोग आहे. त्यावर खुद्द सुनील दत्तने ‘दर्द का रिश्ता’ हा चित्रपट काढला होता. पत्नी नर्गिसचा कॅन्सरने मृत्यू झाल्यामुळे त्याने तो विषय घेऊन चित्रपट काढला होता. यात सुनील दत्तची पत्नी रिना रॉय दाखवली आहे. तिचा मृत्यू कॅन्सरने होतो. त्यानंतर त्यांची मुलगी असते. ती म्हणजे अभिनेत्री खुशबू दाखवली आहे. तिलाही कॅन्सर झालेला दाखवला आहे. कॅन्सरग्रस्त रुग्णांचा विषय घेऊनच तो चित्रपट काढला गेला होता. ही कॅन्सरची साथ दीर्घकाळ चालली होती.कॅन्सर येण्यापूर्वी चित्रपट क्षेत्रात टीबी हा रोग दाखवला जात असे. ‘अमर अकबर अँथनी’ चित्रपटात प्राणची बायको भारती म्हणजे निरुपा रॉयला टीबी होतो, म्हणून ती घर आणि तिन्ही मुलांना वाºयावर सोडून निघून जाते, पण मनमोहन देसार्इंच्या चित्रपटात चमत्कार घडतात. मग तिचे झाड पडून डोळे जातात, ती परत येते, डोळे परत येतात, पण त्यात तो टीबी कुठे गायब होतो हे चित्रपटात नंतर कधीच पुढे येत नाही. अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना यांचा आणखी एक चित्रपट म्हणजे ‘नमक हराम’. मालक-कामगार संबंधावर असलेल्या या चित्रपटात कामगारांमधला एक असलेल्या रझा मुरादला टीबी झालेला दाखवला आहे.कॅन्सर आणि टीबीच्या तुलनेत जास्त काळ आणि एव्हरग्रीन असा रोग म्हणजे हृदयविकार. या रोगाने चित्रपटसृष्टीची भरपूर साथ दिली. धक्का बसला की गेला तो अभिनेता. यात श्रीराम लागू, ओम शिवपुरी, मदन पुरी, अमरिश पुरी, ओमप्रकाश अशा अनेकांनी रुपेरी पडद्यावर हृदयविकाराने कधी अंथरुण धरले, तर कधी प्राण गमावला आहे.मराठी चित्रपटातही अनेक प्रकारचे रोग आणि रोगांवर चित्रपट येऊन गेले आहेत. २२ जून १८९७ सारख्या चित्रपटांतून ऐतिहासिक कथानक असल्याने तत्कालीन प्लेग या रोगाची पार्श्वभूमी घेतलेली आहे. त्यापूर्वी १९६०च्या दशकात संपूर्ण देशभरात कुष्ठरोगाची भीती होती. त्यामुळे ‘स्वप्न तेच लोचनी’ या गाजलेल्या चित्रपटात कुष्ठरोग आनुवंशिक नाही हा संदेश देताना चंद्रकांत गोखले या अभिनेत्याला कुष्ठरोग झाल्याचे दाखवले आहे.बाकी तसे सर्दी, खोकला, ताप असल्या किरकोळ आजारांना चित्रपटात स्थान कोणी दिलेले नाही. गेल्या वीस वर्षांत अनेक आजार आले आहेत, त्यामध्ये डेंग्यू, स्वाइन फ्ल्यू, बर्ड फ्ल्यू असे अनेक रोग आले, पण या रोगांना चित्रपटांत काम मिळालेले नाही. अर्थात, भविष्यात हे रोग पडद्यावर येतील किंवा कदाचित कोरोनालाही रुपेरी पडद्यावर स्थान मिळू शकते.
मंगळवार, १७ मार्च, २०२०
कबूतरांवर नजर कोण ठेवणार?
सध्या जगभरात कोरोनाची चर्चा आहे. हा रोग वेगाने पसरतो आहे म्हणून देश चिंतेत आहे. पण तो कशाने पसरतो आहे याचा शोध खरंच घेतला जात आहे का? केवळ कोरोनाच नाही तर अनेक रोग मुंबईत अशा प्रकारे पसरतात की त्या कारणांकडे दुर्लक्ष केले जाते. आज कोरोना रूग्णांना लांब ठेवून, त्यांच्या पासून आपल्याला हा रोग होउ नये म्हणून मास्क घातले जात आहेत, गर्दी कमी केली जात आहे. पण हा रोग प्राणी आणि पक्षांपासूनही पसरत नाही ना याचा कोणी विचार करतो आहे का? मुंबईत कबूतरे ही फारच खतरनाक बनताना दिसत आहेत. मुंबई, ठाणे, रायगड जिल्हयात एवढी कबूतरे वाढली आहेत की त्यांच्यामुळे अनेक रोगांचा प्रसार होतो आहे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात ठिकठिकाणी कबूतरांचे हजारोंच्या संख्येचे थवे आहेत. या कबूतरांचा सामान्यांना खूप त्रास होत असतो. पण काही पक्षीप्रेमी त्यांच्या अतिरेकी प्रेमापोटी संपूर्ण शहरांमधून घाण करत असतात. बाजारपेठेत, गर्दीच्या ठिकाणी रस्त्यावर, फूटपाथवर कबूतरांना बाजरी, धान्य खायला टाकत असतात. त्यामुळे कबूतरांचा थवाच्या थवा येतो आणि ते कण टिपत असतो. रस्त्याने चालणारी माणसे आली की ती भुर्रकन उडतात. उडताना प्रचंड प्रमाणात घाण ही कबूतरे टाकतात. त्यांची पिसे, मातीचा धुरळा आणि काही कबूतरे विष्ठाही टाकतात. रस्त्याने जाणार्या माणसांच्या कपडयांवर, अंगावर, डोकयावर ही घाण पडते. दिवसात हजारो माणसांना या संकटाला सामोर जावे लागते.मुंबई, ठाणे, नवी मुंबईत खाण्याचे स्टॉल ठिकठिकाणी फुटपाथवर असतात. पोहे, उपीट, शिरा, खिचडी असे अनेक पदार्थ विकणारे उभे असतात. त्यांच्याकडून उघडन्यावरच हे खाद्य पदार्थ खाण्यासाठी माणसे जमा होतात. त्याचवेळी वरून कबूतरांचे थवे उडत जात असतात. काही विजेच्या तारांवर लटकत असतात. काही कबूतरांचे थवे इमारतींच्या भिंतींवर कोपरयांवर बसून रस्त्यावर नजर टाकत असतात. खाद्य पदार्थ दिसले की लगेच झेपावतात. त्यांच्या पंख फडकवण्याने मोठया प्रमाणात धुरळा आणि जंतू हवेत पसरत असतात. हे थवे सर्वाधिक रोग प्रसाराचे काम करत असतात. पण तरीही डोकयावर जंतुंचा आणि धुलीकणांचा वावर होत असताना माणसांना उघडयावर पदार्थ खाण्याशिवाय पर्याय रहात नाही. या कबूतरांचा काहीतरी बंदोबस्त करण्याची गरज आहे. त्यांच्यावर नजर ठेवण्याची गरज आहे. ही कबूतरे केवळ अन्नपदार्थ खाउन घाण करतात असे नाही तर अनेक प्रकारची घाणही भक्षण करत असतात. अनेक लोक खाउन थुंकतात त्यातही ही कबूतरे चोच मारताना दिसतात. त्यामुळे रोगप्रसाराचे फार मोठे माध्यम हे कबुतरांचे थवे होताना दिसत आहे. या कबूतरांमुळे अनेकांना दमा, अस्थमा असे आजार झाले आहेत. कबूतराची पिसे नाका तोंडात गेल्यामुळे न बरी होणारी सर्दी अनेकांना झालेली आहे. कपडयांवर आणि अंगावर कबूतरांची विष्ठा पडल्याने अनेकांना त्वचारोग आणि अन्य आजारही झालेले आहेत. अशा परिस्थितीत कोरोनाचा प्रसारही मोठया प्रमाणात कबूतरे करत नाहीत ना याचा तपास करावा लागेल.ही कबूतरे कुठून कुठून येत असतात. कोरोना बाधित भागातून स्थलांतरीत झालेले कबूतर मोठया शहरात आले. त्या कबूतराने अनेक कबूतरे बाधीत होउन त्या रोगाचा प्रसार करू शकतात. त्यामुळे कबूतरे ही फार मोठा रोग प्रसार करणारी ताकद बनताना दिसत आहे. या रोग पसरवणारया पक्षांना पोसण्याचे काम अनेकजण करताना दिसत आहेत. म्हणूनच यावर प्रतिबंध कसा लावता येईल याचा विचार करावा लागेल. माणसामाणसांमधून या रोगाचा प्रसार होत आहेच. त्याहीपेक्षा हवेतून कबुतरांसारखे पक्षी काही संकट घेउन येत नाहीत ना याचा विचार केला पाहिजे. कबूतरांना शांतीदूत म्हटले जाते. पण ती पांढरी कबूतरे आहेत. ही घुटरघुम करणारी पारवा रंगाची कबूतरे ही अत्यंत घाण करत असतात. दुर्र्गधी पसरवत असतात. पिसवांसारखे कीटकही या पक्षांमुळे हवेतून माणसांच्या अंगावर येतात. त्यामुळे या कबूतरांवर नजर ठेवण्याचे काम कोण करणार हा प्रश्न आहे. फोटो काढायला हे थवे चांगले वाटत असतीलही. पण ते लांबूनच चांगले दिसतात. आपल्या डोकयावरून वाहीली जाणारी ही घाण अत्यंत धोकादायक आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
देवाघरी जाण्याचा मार्ग बंद
कोरोनाचे संकट इतके वाढले आहे की गर्दीची सगळी ठिकाणे बंद केली जात आहेत. सुरवातीला शाळा, महाविद्यालये, मॉल, नाटयग्ृहे, चित्रपटगृहे बंद केली. मग पोहोण्याचे तलाव, सार्वजनिक उद्याने, पब, बार बंद करण्यात आले. मग काही ठिकाणी जमावबंदी करण्यात आली. गर्दीची सगळी ठिकाणे बं करूनही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोच आहे. मग निर्णय घेण्यात आला की देवस्थाने बंद ठेवण्याचे. कोरोनामुळे देवाघरी जाण्याची वेळ येउ नये म्हणून देवाचीच दारे बंद करण्यात आली तर.कोणतेही संकट आल्यावर आम्ही शरण येतो ते देवाला. देव आम्हाला बळ देईल. आत्मीक ताकद देईल. आमचे गार्हाणे ऐकेल. त्यासाठी मनाचा संवाद साधण्यासाठी आम्ही देवाला जातो. पण आता आम्हाला देवाशीच संवाद साधता येणार नसेल तर करायचे काय? पुण्यातील कसबा गणपती बंद. दगडुशेठ हलवाई गणपती बंद. सारसबागेतील गणपती बंद. पंढरपूरचा विठोबा आता बंद. नाशिकचा त्र्यंबकेश्वर बंद. शिर्डीचे साईबाबा नका येउ मला भेटायला म्हणतात. कोल्हापूरची अंबाबाई महालक्ष्मी आता भकतांना दार बंद करून घेणार आहे. आता आम्ही गारहाणे गाण्यासाठी जायचे कुठे? आम्ही शिर्डीच्या साईबाबांचे चरित्र ऐकले, वाचले. त्यांच्यावर काढलेले मनोजकुमारपासून ते दिपक बलराजपर्यंतच्या अनेक निर्मात्यांचे चित्रपट पाहिले. या कथानकात शिर्डीत महामारीची साथ येउ नये म्हणून बाबांनी वेशीवर पिठाची रांगोळी घालून तो रोग रोखला होता. पण आता हा रोग रोखण्याची ताकद बाबांमध्ये नाही असे का वाटते? बाबांच्या जन्मभूमी आणि कर्मभूमीचे राजकारण आणि वाद केल्यामुळे बाबा नाराज आहेत का? म्हणून ते या रोगाला रोखू शकत नाहीत का? का आमची श्रदधा कमी पडली की सबूरी कमी पडली? बाबांनी दार बंद करू न घेतले? देवाघरी जाण्याचा मार्ग बंद करण्यासाठी दार बंद केले की हे संकट एवढे वाढणार आहे की ते देवालाही पाहवत नाही म्हणून त्यांनी दरवाजा बंद केला म्हणायचा? कसबा गणपती आमचा मानाचा. त्याला नारळ ठेवल्यावर आमच्या सगळया मनोकामना पूर्ण होतात. राजकीय पक्षांचे नेते यश मिळण्यासाठी इथूनच प्रचाराची सुरूवात करतात. दगडूशेठ हलवाई गणपतीही आमच्या नवसाला पावणारा गणपती. मग या रोगाचे समूळ नष्ट होउन दे असा नवस बोलायला का कोणी जाउ शकत नाही? तो नवस बोलायला येण्यापूर्वीच भक्तांना दरवाजा बंद केला गेला? सारसबागेतील गणपती हा तर पेशवेकालीन गणपती. अटकेपार झेंडा लावण्यापूर्वी इथेच कौल लावून, आशीर्वाद घेउन आमचे मराठे पेशवे यशस्वी झाले. मग या कोरोनाला अटकेपार नाही तर हद्दपार करण्यासाठी हा गणपती का आमच्या मदतीला धावून येणार नाही? पण त्याला साकडे घालण्याच्या आतच तर दरवाजे बंद झाले आहेत. मुंबईतला सिद्धीविनायक तर जगभरातील नामवंतांचे आकर्षण. राज्याचे मुख्यमंत्री पदाची सूत्र घेण्यापूर्वी याचेच दर्शन घेतात. सचिन तेंडूलकर आपले विक्रम करतो तेव्हा सिद्धीविनायक त्याच्या पाठिशी असतो. अमिताभ बच्चन संकटातून बाहेर पडण्यासाठी जुहूपासून पायी या मंदीरापर्यंत येतो. मग आम जनतेवर आलेले संकट दूर करण्यासाठी हा बाप्पा नाही का येणार? मग त्याचेच दार बंद करून भकतांनी जायचे कुठे? भक्तांवरचे संकट रोखता येणार नाही म्हणून तर हे देव आता बंदीस्त होत नाहीत? कोरोना हा प्रलयकारी महामारी होणार का? देवही तुमच्याकडे पाठ फिरवतो आहे का? कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई हे तर शक्ती पीठ. सर्वांना लढण्याचे बळ देणारी ही जगन्माता. तीचाही दरवाजा भकतांना बंद होणार? खरंच इतका भयंकर आहे का हा कोरोनाचा रोग? पुराणकथांमध्ये आपण वेगवेगळया आकारांचे चेहर्रंयांचे राक्षस पहायचो. तसाच हा दानव प्रकटला आहे का? हा चिनी डॅ्रगन किंवा राक्षस मारण्याची ताकद आमच्या देवांमध्ये नाही म्हणजे नवा अवतार येणार का कोणी? काय होणार आहे आता? सगळं ठप्प झाले तर माणसांनी गप्प बसून करायचे तरी काय? तुळजापूरची भवानीमाता आमच्या छत्रपती शिवरायांना भवानी तलवार देते आणि संकटांत लढण्याचे बळ देते, यश मिळवून देते. मग आज तीचाच दरवाजा बंद झाला तर आम्ही जायचे कुठे? आज संपूर्ण देशात महाराष्ट्रात सर्वाधिक रूग्ण आहेत. या रूग्णांना वाचवण्यासाठी आणि नवीन बाधा होउ नये म्हणून देवाला साकडे घालायचीही आता सोय राहिलेली नाही. देवानेच पाठ फिरवली तर जायचे कुणीकडे? शेवटी अंतिम उपाय झाल्यावर विज्ञानवादी डॉकटरही म्हणतो की आता सगळे देवावर सोपवा. आता दवा नाही दुवा आवश्यक आहे. मग हा दुवा आता बंद झाला तर होणार तरी काय?पण हातपाय गाळून चालायचे नाही. लढायचे, काम करत रहायचे, परिणामांची चिंता न करता काम करत रहा, तो रोग काम करणार्यांच्या वाटेलाही जाणार नाही. बंद झालेली देवस्थाने तेच सांगत असतील, असे मानायला हरकत नाही.
चरित्र अभिनेता जयराम कुलकर्णी
मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचं मंगळवारी पुण्यात निधन झाले. मराठी कलासृष्टीला लाभलेला एक हरहुन्नरी अभिनेता म्हणून त्यांची ओळख होती. विशेषत: मराठी चित्रपटातील चरित्र अभिनेता म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. जे स्थान हिंदी चित्रपटात ओमप्रकाश, ओम शिवपुरी अशा अभिनेत्यांनी मिळवले होते तेच स्थान त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत मिळवले होते. हिरो म्हणून अनेकजण लक्षात राहतात, पण चरित्र अभिनेता म्हणून लक्षात राहणारे नट फार कमी असतात. ते स्थान जयराम कुलकर्णी यांनी अढळपणे मिळवले होते. मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी केलेल्या अनेक भूमिका गाजल्या. विशेषत: १९८० च्या दशकानंतर सचिन पिळगांवकर आणि महेश कोठारे या दोन दिग्गजांच्या चित्रपटात जयराम कुलकर्णी यांची भूमिका हमखास असायची. ती ते अत्यंत प्रामाणिकपणे आणि लक्षवेधी अशी करायचे. महेश कोठारे यांचा पहिलाच निर्मिती असलेला चित्रपट म्हणजे धुमधडाका. या चित्रपटात महेश कोठारेंच्या वडिलांची भूमिका त्यांनी केली होती. छोटी असली तरी या भूमिकेला एक वेगळी झलक होती. संस्कृत भाषा शिकवणारा शिक्षक की जो एकही इंग्रजी शब्द बोलत नाही. त्यांनी शोधून काढलेल्या मराठी शब्दांनी धमाल उडवली होती. महेश कोठारे, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, शरद तळवलकर या दिग्गज अभिनेत्यांमध्ये जयराम कुलकर्णी यांनी वेगळ्या भाषेचा वापर करून आपली सहज अभिनयाची शैली दाखवून दिली होती. त्यानंतर महेश कोठारेंच्या चित्रपटात त्यांचे स्थान अढळ होते. सचिन पिळगांवकर याच्या चित्रपटातील त्यांची प्रत्येक भूमिका ही लक्षात राहणारी होती. 'माझा पती करोडपती' या चित्रपटात लुकतुकेची भुमिका करणार्रंया अशोक सराफचा बॉस त्यांनी साकारला होता. म्हणजे एकीकडे शहरी कार्पोरेट आॅफीसमधील बॉस तर दुसरीकडे सचिनच्याच 'अशी ही बनवाबनवी' या चित्रपटात ग्रामीण भाषेत बोलणारा तमाशाचा मालक आणि प्रिया बेर्डेच्या वडिलांची भूमिका त्यांनी केली होती. 'आयत्या घरात घरोबा' या चित्रपटातील त्यांची भूमिका तर अतिशय विलक्षण होती. सचिनच्या घरातील विश्वासू नोकर असलेला परंतु लिंबाची अॅलर्जी असलेला गडी अशी अफलातून भूमिका त्यांनी केली होती. लिंबाची अॅलर्जी उठल्यावर लाल बुंद झालेले नाक, आवाजात झालेला बदल आणि सरपटत झाडावर जाउन बसलेला गडी त्यांनी अफलातून केला होता. सचिनच्या आणखी एका चित्रपटात जयराम कुलकर्णी यांनी मध्यवर्ती भूमिका केली होती. ती म्हणजे आमच्या सारखे आम्हीच हा चित्रपट. या चित्रपटात सचिन आणि अशोक सराफ यांचा डबलरोल आहे. एक जोडी श्रीमंत घरातील बावळट भावांची आहे तर दुसरी जोडी इरसाल भामटे, चोरटे आहेत. इस्टेटीचे रक्षण करण्यासाठी खरया सचिन अशोक सराफला वाचवण्यासाठी या भामट्यांना डुप्लीकेट बनवण्याचे काम दिवाणजी असलेल्या जयराम कुलकर्णी यांनी केले होते. सुरवातीला ती भूमिका खलनायकाची आहे काय असा भास होतो पण अत्यंत निष्ठावंत विश्वस्ताची भूमिका त्यांनी यात केली होती. सचिन आणि सुप्रियाची भूमिका असलेला पहिलाच चित्रपट म्हणजे नवरी मिळे नवर्रंयाला. या चित्रपटात राजघराण्यात वावरणारया दया डोंगरे यांच्या राजवाडयातील दिवाणजीची भूमिका अत्यंत सहजपणे जयराम कुलकर्णी यानी केली होती. महेश कोठारेंच्या 'थरथराट', 'दे दणादण', 'झपाटलेला' अशा अनेक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. यातील बहुतेक चित्रपटात त्यांनी पोलीस अधिकारयाची भूमिका केलेली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील आंबेजवळगे हे जयराम कुलकर्णी यांचे मूळगाव. गावात शिक्षणाची जेमतेम सोय असल्याने त्यांनी पुण्यातील स. प. महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथेच श्रीकांत मोघे, शरद तळवलकर यांच्याशी मैत्री झाली. पुढे १९५६ साली आकाशवाणी पुणे केंद्रात नोकरी केली. जयराम यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. मराठी चित्रपटात त्यांनी केलेल्या सर्वच भूमिका या अविस्मरणीय होत्या. सातारचे निर्माते अरुण गोडबोले यांचा पहिलाच चित्रपट कशासाठी प्रेमासाठी हा होता. त्यात आयुर्वेदाचार्य असलेल्या आणि आयुवैदीक औषधांचा कारखान्याच्या मालकाची सहज भूमिका त्यांनी केली होती. अजिंकय देव आणि निवेदिता जोशी यांच्या यात प्रमुख भूमिका होत्या. |
मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी केलेल्या अनेक भूमिका गाजल्या. विशेषत: १९८० च्या दशकानंतर सचिन पिळगांवकर आणि महेश कोठारे या दोन दिग्गजांच्या चित्रपटात जयराम कुलकर्णी यांची भूमिका हमखास असायची. ती ते अत्यंत प्रामाणिकपणे आणि लक्षवेधी अशी करायचे. महेश कोठारे यांचा पहिलाच निर्मिती असलेला चित्रपट म्हणजे धुमधडाका. या चित्रपटात महेश कोठारेंच्या वडिलांची भूमिका त्यांनी केली होती. छोटी असली तरी या भूमिकेला एक वेगळी झलक होती. संस्कृत भाषा शिकवणारा शिक्षक की जो एकही इंग्रजी शब्द बोलत नाही. त्यांनी शोधून काढलेल्या मराठी शब्दांनी धमाल उडवली होती. महेश कोठारे, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, शरद तळवलकर या दिग्गज अभिनेत्यांमध्ये जयराम कुलकर्णी यांनी वेगळ्या भाषेचा वापर करून आपली सहज अभिनयाची शैली दाखवून दिली होती. त्यानंतर महेश कोठारेंच्या चित्रपटात त्यांचे स्थान अढळ होते.
सचिन पिळगांवकर याच्या चित्रपटातील त्यांची प्रत्येक भूमिका ही लक्षात राहणारी होती. 'माझा पती करोडपती' या चित्रपटात लुकतुकेची भुमिका करणार्रंया अशोक सराफचा बॉस त्यांनी साकारला होता. म्हणजे एकीकडे शहरी कार्पोरेट आॅफीसमधील बॉस तर दुसरीकडे सचिनच्याच 'अशी ही बनवाबनवी' या चित्रपटात ग्रामीण भाषेत बोलणारा तमाशाचा मालक आणि प्रिया बेर्डेच्या वडिलांची भूमिका त्यांनी केली होती. 'आयत्या घरात घरोबा' या चित्रपटातील त्यांची भूमिका तर अतिशय विलक्षण होती. सचिनच्या घरातील विश्वासू नोकर असलेला परंतु लिंबाची अॅलर्जी असलेला गडी अशी अफलातून भूमिका त्यांनी केली होती. लिंबाची अॅलर्जी उठल्यावर लाल बुंद झालेले नाक, आवाजात झालेला बदल आणि सरपटत झाडावर जाउन बसलेला गडी त्यांनी अफलातून केला होता. सचिनच्या आणखी एका चित्रपटात जयराम कुलकर्णी यांनी मध्यवर्ती भूमिका केली होती. ती म्हणजे आमच्या सारखे आम्हीच हा चित्रपट. या चित्रपटात सचिन आणि अशोक सराफ यांचा डबलरोल आहे. एक जोडी श्रीमंत घरातील बावळट भावांची आहे तर दुसरी जोडी इरसाल भामटे, चोरटे आहेत. इस्टेटीचे रक्षण करण्यासाठी खरया सचिन अशोक सराफला वाचवण्यासाठी या भामट्यांना डुप्लीकेट बनवण्याचे काम दिवाणजी असलेल्या जयराम कुलकर्णी यांनी केले होते. सुरवातीला ती भूमिका खलनायकाची आहे काय असा भास होतो पण अत्यंत निष्ठावंत विश्वस्ताची भूमिका त्यांनी यात केली होती. सचिन आणि सुप्रियाची भूमिका असलेला पहिलाच चित्रपट म्हणजे नवरी मिळे नवर्रंयाला. या चित्रपटात राजघराण्यात वावरणारया दया डोंगरे यांच्या राजवाडयातील दिवाणजीची भूमिका अत्यंत सहजपणे जयराम कुलकर्णी यानी केली होती.
महेश कोठारेंच्या 'थरथराट', 'दे दणादण', 'झपाटलेला' अशा अनेक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. यातील बहुतेक चित्रपटात त्यांनी पोलीस अधिकारयाची भूमिका केलेली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील आंबेजवळगे हे जयराम कुलकर्णी यांचे मूळगाव. गावात शिक्षणाची जेमतेम सोय असल्याने त्यांनी पुण्यातील स. प. महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथेच श्रीकांत मोघे, शरद तळवलकर यांच्याशी मैत्री झाली. पुढे १९५६ साली आकाशवाणी पुणे केंद्रात नोकरी केली. जयराम यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. मराठी चित्रपटात त्यांनी केलेल्या सर्वच भूमिका या अविस्मरणीय होत्या. सातारचे निर्माते अरुण गोडबोले यांचा पहिलाच चित्रपट कशासाठी प्रेमासाठी हा होता. त्यात आयुर्वेदाचार्य असलेल्या आणि आयुवैदीक औषधांचा कारखान्याच्या मालकाची सहज भूमिका त्यांनी केली होती. अजिंकय देव आणि निवेदिता जोशी यांच्या यात प्रमुख भूमिका होत्या.
शुक्रवार, १३ मार्च, २०२०
शरद पवारांचे मत किती खरे, किती खोटे?
राज्यसभेसाठी अर्ज दाखल केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मध्य प्रदेशसारखी स्थिती महाराष्ट्रात उद्भवणार नाही, अशी प्रतिक्रिया पत्रकार परिषदेत दिली. अर्थात, देशाच्या राजकारणात शरद पवारांबाबत नेहमीच असे म्हटले जाते की, पवार ‘नाही’ म्हणतात, तेव्हा त्याचा अर्थ ‘हो’ असतो आणि ‘हो’ असतो, तेव्हा त्याचा अर्थ ‘नाही’ असा असतो. त्यामुळेच शरद पवारांचे हे मत किती खरे आणि किती खोटे यांचा विचार करावा लागेल.सध्या राज्यात असलेल्या सरकारची अशी ख्याती आहे की, हे सरकार ठाकरे सरकार असले, तरी चालवणारे पवार सरकार आहे. आपल्या अनुभवाचा आणि ज्येष्ठत्वाचा पुरेपूर फायदा उठवत उपमुख्यमंत्री अजित पवार सतत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या आजूबाजूलाच असतात. त्यामुळे हे सरकार राष्ट्रवादी काँग्रेस चालवते असाच आरोप केला जात आहे. त्यामुळे या सरकारमध्ये काँग्रेसचा चेहरा कुठेच दिसत नाही. साहजिकच हा असंतोष बाहेर पडला, तर या सरकारला काँग्रेसमुळे धोका निर्माण होऊ शकतो.भारतीय जनता पक्षाने जिथे जिथे आॅपरेशन लोटस केले, तिथे तिथे वर्षभर सरकार चालवल्यानंतर ते पाडण्याची किमया भाजपने केली आहे. कर्नाटकात कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या सहकार्याने बनवलेले सरकार भाजपने वर्षभर चालू दिले. लोकसभा निवडणुकीत भाजपला यश आल्यानंतर येडियुरप्पांनी ते सरकार अस्थिर केले. काँग्रेस आणि जनता दलाचे आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केला. तोच फॉर्म्युला यशस्वी करण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे. मध्य प्रदेशचे सरकारही भाजपने वर्षभर सव्वा वर्ष चालू दिल्यानंतर कमलनाथांचा गेम करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात आॅपरेशन लोटस यशस्वी करण्यासाठी भाजप आता घाई करणार नाही. साधारण दिवाळीनंतर डिसेंबर महिन्यात असा काही घोळ घालण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळेच शरद पवारांनी दिलेली प्रतिक्रिया आज खरी वाटत असली, तरी ती तितकीशी खरी नाही असे चित्र आहे. अर्थात, हे सरकार किती काळ टिकवायचे हे जरी शरद पवारांच्या हातात असले, तरीही भाजप काहीच प्रयत्न करणार नाही, असे नाही.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील हे अगोदरच फिल्डिंग लावून बसले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी वक्तव्य केले होते की, या वर्षाच्या अखेरीस राज्यात मुदतपूर्व निवडणुका होतील. त्यामुळे भाजपचे राज्यातील आॅपरेशन लोटस म्हणजे हे सरकार कोसळवणे असले, तरी फोडाफोडी करून नवे सरकार आणण्याचे धोरण आहे की, निवडणुकांना सामोरे जाण्याचे धोरण आहे हे अजून ठरलेले नाही, पण स्पष्ट बहुमत मिळवण्यासाठी भाजप राज्यात पुन्हा निवडणुकांना सामोरे जाण्यास लावणार असेच दिसत आहे. त्यामुळे शरद पवारांनी जरी राज्यात मध्य प्रदेशसारखी परिस्थिती नाही, असे वक्तव्य केले असले, तरी ते तितकेसे खरे नाही. या सरकारवर टांगती तलवार आहेच.वयात आलेल्या किंवा सोळा वर्षांच्या यौवनेचा जसा भरवसा देता येत नाही. कोण कधी शिळ घालून बोलावेल आणि फूस लावून पळवून नेईल याची शाश्वती नसते, म्हणूनच म्हटले जाते की, ‘तरुणपणाच्या रस्त्यावरचं पहिलं ठिकाणं मोक्याचं, सोळावं वरीस धोक्याचं गं सोळावं वरीस धोक्याचं’. त्याप्रमाणे विद्यमान सरकारमधील कोणत्या आमदारांना कमळाबाई शुकशुक करून नादाला लावेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे शरद पवार हे जरी या सरकारचे राखणदार असले, तरी त्यांचा डोळा चुकवून काही हालचाली होणारच नाहीत याची खात्री आज पवारांनाही नाही. त्यामुळेच पवारांच्या या मतात तसा काहीच दम नाही. ते आत्मविश्वासपूर्ण तर बिल्कूल नाही. महाराष्ट्रात मध्य प्रदेशसारखी परिस्थिती उद्भवणार नाही, असे जरी ते म्हणत असले, तरी हे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल असे पवारांनी अजूनही ठामपणे सांगितलेले नाही. त्यामुळेच प्रश्न पडतो की, त्यांचे हे मत खरे किती आणि खोटे किती?महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण झालीच तर ती काँग्रेसकडूनच होऊ शकते. याचे कारण आज जी खाती काँग्रेसच्या वाट्याला आलेली आहेत, त्याबाबत काँग्रेस समाधानी नाही. तसेच आपली एकूणच सरकारमध्ये उपेक्षा होत आहे, असेच काँग्रेस नेत्यांना वाटत आहे. त्यातच काँग्रेसमध्ये राज्यात इतकी गटबाजी आहे की, पक्ष नामशेष होत असतानाही गट-तट काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे अतिशय सहिष्णू आहेत. त्यांचा तसा कोणावर प्रभाव पडत नाही. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण हे वेगळ्या भूमिका घेताना दिसतात. बाळासाहेब थोरातांची भिस्त ही प्रामुख्याने शरद पवारांवर आहे. त्यामुळे ते शरद पवारांचेच बोट धरून काँग्रेसला नेत आहेत. त्यामुळे पवार विरोधक निष्ठावंत काँग्रेस आक्रमक होऊन काही गडबड करू शकते. काँग्रेसच्या अनेक युवा नेत्यांना तसे सध्या काहीच काम नाही. त्यामध्ये मिलिंद देवरा असतील, संजय निरुपम असतील किंवा अनेक पडेल उमेदवार हे आपले अस्तित्व राज्यात टिकवण्यासाठी आक्रमक होऊ शकतात. त्यामुळे ते आपल्या जवळच्या आमदारांना कुठे तरी गडबड करायला लावतील, असे दिसते. त्यामुळे राज्यात मध्य प्रदेशसारखी स्थिती उद्भवणार नाही, हे शरद पवारांचे वक्तव्य तितकेसे खरे ठरेल असे नाही.
गुरुवार, १२ मार्च, २०२०
शिक्षकांच्या निवृत्तीबाबत धोरण सरकारने ठरवावे
शिक्षणात नेहमीच सुधारणा करून प्रत्येक सरकार लक्ष वेधून घेत असते, पण शिक्षणातल्या सुधारणा म्हणजे दप्तराचे ओझे, पुस्तकात काय असावे, उपक्रम काय असावेत, याबाबत केल्या जातात. परंतु अनेक गोष्टी या शिक्षणावर परिणाम करणाºया असतात. त्यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील संबंध. हे संबंध अतिशय प्रेमळ आणि जिव्हाळ्याचे तितकेच संवदेनशील असतात. वर्षभर वर्गात शिकवणारे एखादे शिक्षक किंवा शिक्षिका मध्येच सेवानिवृत्त होऊन जातात किंवा बदली होऊन जातात, तेव्हा त्याचा परिणाम विद्यार्थीवर्गावर होत असतो. म्हणून शिक्षकांची निवृत्ती केव्हा करावी याबाबत एक कायदा केला पाहिजे.शिक्षणात सुधारणा करण्याच्या चर्चा नेहमीच केल्या जातात, पण कोणतीही व्यक्ती, कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याने या मंत्रिपदाचा भार सांभाळल्यापासून काही मूलभूत गोष्टींकडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे नव्या शैक्षणिक सुधारणांमध्ये शिक्षकांच्या निवृत्तीची तारीख निश्चित केली पाहिजे. राज्य सरकारने तसा कायदा संमत करून त्याबाबत शिक्षक सेवानिवृत्तीबाबतचा एक नवा शैक्षणिक धोरणाचा महाराष्टÑ पॅटर्न तयार केला पाहिजे. सुधारणा करण्याबाबत आणि नवे काही करण्याबाबत ठाकरे सरकार हे तरबेज आहे. किंबहुना ते त्यांचे वैशिष्ट्य बनत आहे. नवे काही करण्याची त्यांची उमीद आहे. म्हणूनच या सरकारने येत्या शैक्षणिक वर्षापासून तसे बदल करून घेण्याची गरज आहे.म्हणजे शिक्षकांचे असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे त्यांना मोर्चे काढावे लागतात, आंदोलने करावी लागतात, परंतु त्याही पलीकडे शिक्षकांच्या निवृत्तीमुळे होणाºया नुकसानीचे अनेक प्रश्न आहेत. त्याकडेही गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. आपल्याकडे कर्मचाºयांच्या सेवानिवृत्तीचे जे नियम आहेत त्यामध्ये वयाची ५८ वर्ष पूर्ण झाल्यावर ज्या महिन्यात जन्म झाला त्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी त्याला निवृत्त केले जाते. परंतु हा नियम अन्य कोणत्याही खात्याबाबत योग्य असला तरी शिक्षण कर्मचाºयांबाबत विशेषत: शिक्षकांबाबत उचित नाही.निवृत्तीबाबत जे काही नियम आहेत त्यामध्ये यापूर्वी बदल केले आहेत. म्हणजे साधारण वीस वर्षांपूर्वी ज्या तारखेला माणसाचा जन्म झाला त्याच दिवशी त्याची निवृत्ती होत होती. म्हणजे ७ एप्रिलला त्याचा जन्म असेल, तर ७ एप्रिललाच त्याची सेवानिवृत्ती व्हायची, पण कालांतराने त्यात बदल करून असे अधेमध्ये निवृत्त न करता तो संपूर्ण महिना काम करायचे आणि मग महिन्याच्या शेवटच्या दिवशी निवृत्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला. हे इतर खात्यांबाबत ठीक आहे, पण शिक्षकांबाबत हे योग्य नाही, म्हणून शिक्षकांच्या निवृत्तीबाबत सरकारने निर्णय घ्यावा, ही अपेक्षा आहे. त्याचा निर्णय येत्या शैक्षणिक वर्षापासून घेतला तर ते या महाविकासआघाडी किंवा ठाकरे सरकारचे सुधारणात्मक पाऊल असेल.दरवर्षी शाळा या १५ जूनच्या आसपास सुरू होतात. सगळे मार्गी लागेपर्यंत १ जुलै उजाडतो, पण ज्यावेळी एखाद्या शिक्षकाची जन्मतारीख आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यातील असते तेव्हा तो शिक्षक दोन-अडीच महिने शिकवण्याचे काम करतो आणि त्याला निवृत्त केले जाते. बहुसंख्य शाळांमधून त्या शिक्षकाच्या निवृत्तीनंतर रिक्त झालेल्या जागेचे नियोजन त्यानंतर केले जाते. यामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. एक शिक्षक चार-पाच वर्गांवर शिकवत असेल, तर त्या शाळेतील सुमारे तीनशे विद्यार्थ्यांचे नुकसान यामुळे होत असते. नवीन शिक्षक येऊन त्याच्याबरोबर विद्यार्थ्यांची भट्टी जमेपर्यंत अनेक विद्यार्थी मागे पडतात. हे टाळण्यासाठी शिक्षकांच्या निवृत्तीची ठराविक तारीख असली पाहिजे. त्याबाबत शिक्षण खात्यात सुधारणा करून सरकारने तसा कायदा करण्याची गरज आहे.या सुधारणेप्रमाणे आॅक्टोबरपर्यंत ज्यांच्या जन्मतारखा आहेत त्यांना अगोदरच्या ३१ मेपर्यंत निवृत्त करावे. नोव्हेंबर ते एप्रिलदरम्यान ज्यांच्या जन्मतारखा असतील, त्यांना पुढील वर्षापर्यंत मुदतवाढ देण्यात यावी. त्याप्रमाणे फक्त ३१ मे या दिवशीच सर्व शिक्षकांना निवृत्त करावे. शिक्षकांच्या निवृत्तीच्या अन्य तारखा असता कामा नयेत. कित्येक वेळा शिक्षक मुख्याध्यापक म्हणून पदोन्नतीच्या रांगेत असतात, पण काही घटनांमध्ये ३० एप्रिलला एक मुख्याध्यापक निवृत्त झाले. त्यानंतर १ मेपासून कागदावर नव्या मुख्याध्यापकाची नेमणूक होते. तो ३० जूनला निवृत्त होतो. म्हणजे सुट्टीच्या काळापुरताच मुख्याध्यापक झाल्याचे प्रकारही अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. अशावेळी योग्य त्या मुदतीकरिता कामाची संधी सर्वांना मिळाली पाहिजे. त्यांची ज्या कारणासाठी नेमणूक झाली आहे ती कागदोपत्री पदे असणे योग्य नाही. त्यासाठी निवृत्तीची तारीख शिक्षकांपुरती, निश्चित करण्याची सुधारणा सरकारने केली पाहिजे.मध्येच शिक्षक निवृत्त झाले, तर त्या शिक्षकांच्या हातोटीने शिकण्याची सवय विद्यार्थ्यांना झालेली असते. नवे शिक्षक कसे आहेत, ते कसे शिकवतात, याबाबत मुलांमध्ये साशंकता असते. तसेच नव्या शिक्षकांना रुळायला वेळ लागतो. ते नवीन आणि तरुण असल्यामुळे अनुभवाची कमतरता असू शकते. अशा परिस्थितीत त्यांना नेमणूक करताना पुरेसा वेळ मिळाला पाहिजे. शाळेची, मुलांची मानसिकता समजून घेता आले पाहिजे. पहिला शिक्षक निवृत्त होण्यापूर्वी नवा शिक्षक नेमला गेला पाहिजे. त्या निवृत्त होणाºया शिक्षकाच्या संपर्कात त्या नव्या शिक्षकाला आणून विद्यार्थ्यांची मानसिकता, गुणवत्ता त्यांच्याकडून समजून घेता आली पाहिजे. त्यानंतर थोडे दिवस रुळल्यानंतर त्या नव्या शिक्षकाला स्वत:च्या कल्पना अंमलात आणता आल्या पाहिजेत. यासाठी पुरेसा कालावधी मिळण्यासाठी सर्वात प्रथम शिक्षकांच्या निवृत्तीची एकच तारीख असली पाहिजे. ती म्हणजे ३१ मे ही. जर आपण मुलांना प्रवेश देताना ३१ मे या दिवशी वयाची सहा वर्ष पूर्ण झाली असतील तरच पहिलीत प्रवेश देतो, तर शिक्षकांच्या निवृत्तीलाही तसेच काही बंधन असले पाहिजे. याबाबत सुधारणा या सरकारने करून संपूर्ण देशात महाराष्ट्राचा फॉर्म्युला आदर्श पॅटर्न म्हणून नावलौकिक मिळवावा.आज आपल्याकडे अनेक प्रयोग केले जातात. अनेक नवनवीन विचार शिक्षणात आणले जातात. तसाच हा एक प्रयोग करायला काहीच हरकत नाही. आॅक्टोबरपर्यंत जन्म झालेल्या शिक्षकांना सहा महिनेअगोदर निवृत्त केल्याने किंवा त्यानंतर जन्म असलेल्या शिक्षकांना सहा महिने ज्यादा मुदत दिल्याने काहीच झोळीत धोंडा पडेल असे समजायचे कारण नाही. परंतु संपूर्ण शैक्षणिक वर्षात एकच शिक्षक असला पाहिजे. त्याच शिक्षकाने वर्षभर तो विषय संपूर्ण वर्गाला शिकवला पाहिजे. काही धडे एका शिक्षकाने, काही अभ्यासक्रम दुसºया शिक्षकाने, यात विद्यार्थी गोंधळून जाण्याची शक्यता असते. म्हणून शिक्षकांना निवृत्त करणे, त्यांची भरती करणे, त्यांची बदली करणे, याबाबत कायदा असला पाहिजे.अनेक वेळा काही शिक्षिका बाळंतपणाच्या रजेवर जातात. त्या काळात दुसरे शिक्षक शिकवायला येतात. या काळात नवीन आलेल्या शिक्षकांची व मुलांची भट्टी जमत नाही. कारण मुले पहिल्या शिक्षिका आणि दुसºया शिक्षिका यांच्यात तुलना करतात. काहीजण ते बोलून दाखवतात. त्यामुळे नवे शिक्षक दुखावतात. अशा विद्यार्थ्यांचा राग राग करतात. ती मुले शाळेत जाण्याचे टाळतात. असे बदलही घडतात. त्यामुळे अशा परिस्थितीत जर परिणाम होतो तर मध्येच नवे शिक्षक आल्यानेही काय परिणाम होतो हे लक्षात घेतले पाहिजे.
मनसेची शॅडो कॅबिनेट
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १४ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शॅडो कॅबिनेटची घोषणा केली. राज्यातील महाविकासआघाडी सरकारच्या कामावर नजर ठेवण्यासाठी राज ठाकरे यांनी ही आखणी केलेली आहे. वास्तविक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकमेव आमदार विधानसभेत आहे. तरीही त्यांनी शॅडो कॅबिनेट बनवून संपूर्ण महाराष्ट्राचेच नाही, तर देशाचे लक्ष यानिमित्ताने वेधून घेतले आहे. कारण ज्याप्रकारे अमराठी वृत्तपत्रे आणि वाहिन्यांनी या बातमीला चालवले आहे त्यावरून ही एक लक्ष वेधून घेणारी घटना आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी आपला पक्ष उतरवला, तेव्हाच त्यांनी जाहीर केले होते की, आम्हाला प्रबळ विरोधी पक्ष म्हणून निवडून द्या. सगळे पक्ष आणि आघाड्या या आम्हाला सत्ता द्या अशी जोरदार मागणी करत असताना एकमेव राज ठाकरे असे नेते होते की, त्यांनी प्रत्येक सभेत आम्हाला सक्षम विरोधी पक्ष म्हणून कौल द्या, अशी मागणी केली होती, म्हणजे एकाच वेळी शिवसेना-भाजप यांची युती होती. ते युतीला सत्ता मागत होते. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांची आघाडी होती. ते त्यांना सत्ता मागत होते, तर वंचित बहुजन आघाडीही आम्हाला एकदा संधी द्या, असे म्हणत होते. सत्ता मिळावी यासाठी सगळे धडपडत असतानाच राज मात्र आम्हाला विरोधी पक्ष म्हणून खंबीरपणे बसू दे, अशी मागणी करत होते.राज्यात सक्षम विरोधी पक्ष असेल, तर सरकारवर अंकुश ठेवता येतो, हे राज ठाकरे यांचे ठाम मत आहे. ते आत्ताचे नाही, अगदी २००९ च्या पहिल्याच निवडणुकीत राज यांना चांगले यश मिळाले होते तेंवहाही त्यांचे तेच मत होते. म्हणजे आपल्या भाषणात राज ठाकरे नेहमी म्हणत की, राज्यात चार हत्ती माजले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप हे चार हत्ती आहेत. त्यांच्यावर अंकुश चालवणारा माहुत मला बनायचे आहे, असेच त्यांचे मत होते. त्यामुळे विरोधात राहून भक्कम कामगिरी करण्याचे ध्येय हे राज ठाकरे यांचे होते. आजही ते आहे.आता त्यांनी शॅडो कॅबिनेट तयार केलेली आहे. वास्तविक शॅडो कॅबिनेट ही विरोधी पक्ष तयार करतो, पण गेल्या काही वर्षांत राज्यात विरोधक प्रबळ राहिलेले नव्हते. या खेपेला प्रथमच भारतीय जनता पक्षासारखा प्रबळ विरोधी पक्ष आह, ज्यांच्याकडे सरकारमध्ये असलेल्या प्रत्येक पक्षाच्या दुपटीपेक्षा जास्त संख्याबळ आहे. त्यामुळे हे शॅडो कॅबिनेट खरे तर भाजपने बनवण्याची गरज आहे, पण भाजपने ते केले नाही. ते अजून सत्तेपासून बाहेर गेलो आहे, हे मान्य करायला तयार नाहीत. अशावेळी राज ठाकरे आपल्या पक्षाचा एकमेव आमदार निवडून आलेला असताना ते शॅडो कॅबिनेट बनवतात, हे विशेष आहे. भाजपला विरोधक म्हणून कामगिरी करायची नाही, तर अन्य छोेटे पक्ष आणि आमदारांना कोणाबरोबर तरी जायचे आहे. त्यामुळे विरोधकांची पोेकळी भरून काढण्याचे काम फक्त मनसेच करू शकतो हे राज ठाकरे यांनी दाखवून दिले आहे.आपले पुत्र अमित ठाकरे यांच्यासह मनसेच्या नेते, पदाधिकाºयांकडे एकेका खात्याची जबाबदारी दिली आहे. हे सर्व घडवून आणताना सरकारच्या चांगल्या कामाचे कौतुक करा, पण चुका असतील, तर त्या डोळ्यांत तेल घालून शोधा, हे राज ठाकरे यांनी सांगितले आहे. गेल्या पंधरा वर्षांत सरकार आणि प्रशासनाची डोकेदुखी होती ती माहिती अधिकाराचे कार्यकर्ते. त्यामुळे तेच विरोधकांची भूमिका करत किंवा विरोधक स्वत: काही न करता अशा कार्यकर्त्यांच्या आडून प्रहार करत होते. त्यामुळे त्याचा अनेक वेळा गैरफायदा घेतला जात होता. त्याला आळा घालण्याचे कामही राज ठाकरे यांनी केले आहे. अमित ठाकरे यांच्याकडे पर्यटन खात्यावर लक्ष ठेवायची जबाबदारी दिलेली आहे, म्हणजे जे खाते आदित्य ठाकरे यांच्याकडे आहे, त्यावर नजर ठेवायचे काम अमित ठाकरे करणार आहेत.अर्थात, या शॅडो कॅबिनेटच्या माध्यमातून किती प्रखर विरोधी पक्ष आपण आहोत हे राज ठाकरे दाखवून देण्याचा प्रयत्न करत असले, तरी त्याला कितपत यश येते आणि सरकारला ते कशाप्रकारे कोंडीत पकडतात, हे पाहण्यासाठी काही महिने वाट पाहावी लागेल!
आॅपरेशन लोटसची दिशा! कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्र
महाभारत युद्धात भीष्माचार्यांच्या पतनानंतर त्यांनी घातलेले नियम कौरवांनी धुडकावून लावले. सूर्यास्तानंतर युद्ध थांबवण्याचे नियम सोडून समोरच्याला संपवण्यासाठी काहीही करायची वृत्ती उफाळून आली. तशीच वृत्ती राजकारणात उफाळून आलेली आहे. अटलबिहारी वाजपेयी, महाजन, मुंडे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेल्या युतीच्या नियमांना तिलांजली देण्याचे काम सेना-भाजप दोघांनी केल्यावर आता कोणत्याही मार्गाने सरकार मिळवण्याचे प्रकार घडले, तर आश्चर्य नाही. आॅपरेशन लोटसची दिशा तेच दाखवून देते. कर्नाटकात यशस्वी झाल्यावर आता मध्य प्रदेशात तो प्रकार यशस्वी होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि राजस्थान सध्या सुपात असले, तरी लवकरच ती सरकारेही जात्यात जातील हे सांगण्यासाठी कोणाही भविष्यवेत्त्याची गरज नाही.भारतीय जनता पक्षाने सगळीकडे सुत जमवले, पण महाराष्ट्रासारखे राज्य का गमावले? ईशान्येकडील छोट्या राज्यांतही तडजोडीने सत्ता मिळवली, गोव्यातही मिळवली, हरयाणात तडजोड केली, जम्मू काश्मीरमध्येही चार वर्षांपूर्वी तडजोड केली आणि नंतर काडीमोड घेतला, पण मेहबूबा मुफ्तीबरोबर मेतकूट जमवणारा भारतीय जनता पक्ष शिवसेनेपासून दूर गेला आणि सत्तेची संधी सोडली, हे तसे आश्चर्यजनकच आहे. बिहारमध्ये नितीशकुमारांशी तडजोडी करणारे भाजपचे नेते महाराष्ट्रात सत्ता गेली तरी बेहतर, पण शिवसेनेबरोबर जाणार नाही, असा निर्णय कसे घेऊ शकले? हे सर्वांनाच खरे तर न उमगलेले कोडे आहे, पण ईव्हीएमवरचा संशय मोडून काढण्यात भाजप यशस्वी झाला. आता सरकार कोणतेही येवो, बहुमत कोणाचेही होवो, आॅपरेशन लोटसच्या माध्यमातून आम्ही ते सरकार पाडू शकतो, आमचे सरकार आणू शकतो हा पाशवी आत्मविश्वास भाजपमध्ये वाढलेला दिसत आहे.काँग्रेसचे युवा नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी होळीच्या दिवशी आपले रंग दाखवले. काँग्रेसला रामराम ठोकला. माधवराव शिंदे यांच्या जयंतीचेही औचित्य त्यांनी या पक्षांतरासाठी साधले. ज्योतिरादित्यांनी राजीनामा सादर करताच त्यांच्या समर्थक आमदार व मंत्र्यांची पक्षातून गळती सुरू झाली. या साºयाचा परिणाम म्हणून मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार तर संकटात आलेच आहे, परंतु केवळ तेवढ्यापुरता हा परिणाम सीमित राहणार नाही. ही लाट लवकरच महाराष्ट्रात येईल आणि ठाकरे सरकारही कोसळवले जाईल, असाच हा इशारा आहे. मध्य प्रदेशातील हालचालींनंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेली प्रतिक्रिया ही काँग्रेसमधील नाराजी व्यक्त करणारीच आहे. त्यामुळे आगामी काळात आॅपरेशन लोटसची मोहीम महाराष्ट्रात आल्यास त्याला पृथ्वीराज चव्हाणही बळी पडले, तर आश्चर्य वाटायला नको. जुने निष्ठावंतच काँग्रेसला तिलांजली देत आहेत आणि काँग्रेसच्या हाताची पाचही बोटे पिरगाळून उखडून काढत तिला बुंढी करत आहेत, असे दिसते. त्यामुळे या गळतीमुळे पाच बोटांच्या पंजाची काँग्रेस फकत तीन बोटांचीच राहील. त्यातले एक बोट सोनिया गांधी, करंगळी असेल प्रियंका गांधी आणि राहुल गांधी असतील अंगठा. अनामिका आणि चाफेकळीची बोटं खुडलेली दिसतील. त्या जागी कमळाचा देठ दिसेल असे चित्र आहे.ज्योतिरादित्यांसारखा तडफदार तरुण नेता अठरा वर्षांची साथ सोडून चालता होणे हा काँग्रेससाठी मोठा हादरा आहे. मध्य प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या विजयाचे ते एक महत्त्वाचे शिल्पकार होते, परंतु राज्यातील पक्षांतर्गत संघर्षात ज्योतिरादित्य यांची उपेक्षाच होत राहिली. पक्षाच्या यशात मोठा वाटा असूनही मुख्यमंत्री पद तर त्यांना मिळाले नाहीच, परंतु प्रदेश काँग्रेसाध्यक्षपदीही त्यांची वर्णी लागली नाही. राज्यसभेच्या येत्या निवडणुकीसाठीदेखील त्यांच्या नावाचा विचार झालेला नव्हता. पक्षाची एकूण स्थिती पाहता आता आपल्याला येथे भवितव्य नाही अशी त्यांची धारणा झाली. त्यांना बंडाचा पवित्रा घ्यावा लागला.राहुल गांधी जोपर्यंत पक्षनेतृत्वात सक्रिय होते, तोपर्यंत या तरुणांना संधी होती, परंतु जेव्हा राहुल यांनीच नेतृत्वाकडे पाठ फिरवली आणि पुन्हा एकदा सोनिया पर्व सुरू झाले, तेव्हा या तरुण नेत्यांची पक्षांतर्गत गळचेपी सुरू झाली होती. ज्योतिरादित्य, सचिन पायलट, मिलिंद देवरा, जितीन प्रसाद, वगैरे तरुण नेत्यांची काँग्रेस पक्षात हीच शोकांतिका बनलेली आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या कौतुकाची संधीही ते दवडत नव्हते. काश्मीरचे कलम ३७० खाली विशेषाधिकार हटवले गेले, तेव्हा ज्योतिरादित्य यांनी जाहीरपणे मोदी सरकारचे समर्थन केले. हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुडांचे चिरंजीव दिपेंदर हुडा यांनीदेखील तेव्हा मोदी सरकारचे गुणगान गायले होते. मिलिंद देवरा यांनी हाऊडी मोदींच्या यशाचे गोडवे गायले होते. या सगळ्याचा अर्थ स्पष्ट आहे. काँग्रेस नेतृत्वाने पक्षातील तरुणांच्या हिताकडे लक्ष दिले नाही. त्यामुळेच आता ज्योतिरादित्यांच्या मार्गाने इतर नेतेही जाऊ शकतात, हे स्पष्ट आहे.भाजपचे आॅपरेशन लोटस सर्वात प्रथम यशस्वी झाले ते कर्नाटकात. आता मध्य प्रदेशात यशस्वी होताना दिसत आहे. लवकरच त्याचे पडसाद राजस्थानात उमटले, तर नवल वाटायला नको. साथीचे रोग जसे सगळीकडे पसरतात किंवा कोरोनासारखा व्हायरस कालपर्यंत चीनमध्ये होता, तो आखातात, इटलीत आणि केरळमार्गे भारतात आला. आता तो महाराष्ट्रातही पसरतो आहे, तसाच हा कमळाच्या फोडाफोडीचा व्हायरस महाराष्ट्रात कधी घुसेल हे सांगता येत नाही.महाराष्ट्रात सध्याचे सरकार तीन पक्षांचे असले, तरी शिवसेनेच्या नावाने राष्ट्रवादी चालवते. त्यामुळेच काँग्रेसला त्यात संधी नसल्याने त्यांची नाराजी उफाळून येऊ शकते. काँग्रेसचे दहा-बारा आमदार जरी महाराष्ट्रात हलले तरी हे सरकार कोसळेल आणि भाजप पुन्हा दावा करेल, असे चिन्ह आहे. खातेवाटप आणि अनेक कारणांवरून काँग्रेसचे नेते नाराज आहेत. ते पाट्या टाकण्याचे काम सध्या करताना दिसतात. त्यामुळे या आॅपरेशन लोटसची लागण इथे झाली, तर आश्चर्य वाटायला नको. ज्योतिरादित्यांच्या बंडाला भाजपची फूस असेल, हे तर स्पष्ट आहे. त्यांच्या समर्थक आमदारांची ज्या प्रकारे कर्नाटकमध्ये खिदमतगारी चालली आहे, ते पाहिल्यास या बंडाची मुळे कुठे आहेत हे उमगते. गेल्या पंधरा महिन्यांत कमलनाथ सरकार उलथवण्याचा प्रयत्न दोन वेळा झाला होता. आता ही तिसरी वेळ आहे आणि ती यशस्वी ठरत असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच या बंडाची पूर्वतयारी म्हणून काही आमदारांनी जो दिल्ली दौरा केला, तेव्हाच कमलनाथ सरकारवर घोंघावत असलेल्या राजकीय संकटाची चाहुल लागली होती. दिग्विजयसिंगांनी पुत्राकरवी त्या बंडखोरांना तेव्हा माघारी आणले, परंतु आता या गळतीचे प्रमाणच एवढे मोठे आहे की, काँग्रेससाठी आपले बुडते जहाज वाचवणे अशक्य बनले आहे. मध्य प्रदेशात विरोधात असलेल्या भाजपची ताकद कमी नव्हती. काँग्रेसलाही स्पष्ट बहुमत नव्हते. त्यामुळेच भाजप इथे सत्तांतर घडवणार, हे नक्की होते. तोच प्रकार राजस्थानात आहे. सचिन पायलट हा मुख्यमंत्रीपदासाठी योग्य तरुण चेहरा असताना काँग्रेसने वृद्ध अशा अशोक गेहलोत यांना आणले. गेहलोत यांनी खरे तर ज्येष्ठत्वाच्या नात्याने मोठ्या मनाने हे पद नाकारायला हवे होते, पण खुर्चीचा मोह वाईट, त्यामुळे ते चिकटून राहिले. साहजिकच सचिन पायलट यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांची उपमुख्यमंत्रीपदावर बोळवण करण्यात आली, पण हे पद संविधानिक नाही. या पदाला काहीही अधिकार नाहीत. त्यामुळे ज्योतिरादित्य यांच्या मार्गाने सचिन पायलट गेले, तर आश्चर्य वाटायला नको.हाच प्रकार महाराष्ट्रात घडू शकतो. प्रमुख विरोधी पक्ष असणाºया काँग्रेसच्या मदतीनेच राज्यात भाजप सरकार आले, तर आश्चर्य वाटायला नको. महाविकासआघाडीत शिवसेना जर राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर जाऊ शकते, तर काँग्रेसच्या मदतीने भाजपने आॅपरेशन लोटस राज्यात यशस्वी केले, तर आश्चर्य वाटायला नको.जनतेने निवडून दिलेल्या सरकारला अशा प्रकारे उलथवून मागल्या दाराने सत्ता स्थापन करणे, त्यासाठी अन्य पक्षांतील असंतुष्ट आमदारांना पक्षात घेऊन मंत्रीपदे बहाल करणे, आपल्या तिकिटावर पुन्हा निवडून आणणे हे तंत्र पक्षांतर बंदी कायद्यातील दोन तृतीयांशच्या अटीतील पळवाट नव्हे, तर एव्हाना तिला हुलकावणी देण्याचा राजमार्ग बनलेला आहे. ज्योतिरादित्यांपाठोपाठ हा राजमार्ग आणखी काही राज्यांत घुसण्याची शक्यता आहे.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)