मंगळवार, ७ जुलै, २०१५

भारतातील घोटाळ्यांची समद्धी वाढते आहे

भारत हा घोटाळ्यांचा समृद्ध देश आहे. तसा तो पूर्वी सोन्याचा धूर निघणारा देश असे म्हटले जात होते. म्हणजे संघाच्या नवरात्रात ज्या प्रभात फेर्‍या निघतात त्यामध्ये श्‍लोकही म्हटला जात असतो. की,  ऋषिंनी मुनींनी जिथे वास केला, तिथे धूर तो कांचनांचा निघला| तसा तो निघत होता म्हणून तसे वर्णन आहे. पण आज घोटाळ्यांनी समृद्ध आणि व्यापक देश आहे हे दिसू लागले आहे. त्याच व्यापक अशा व्यापम घोटाळ्याची सध्या चर्चा अधिक व्यापक होत आहे.     या देशात कशाचा घोटाळा होईल हे सांगता येत नाही. आजवर जे कुप्रसिद्ध घोटाळे आहेत, त्यात व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापम) हा घोटाळा सध्या देशाला बदनाम करतो आहे. या आधीच्या अनेक घोटाळयात पैशाचे गैरव्यवहार त्या घोटाळयाच्या भोवती फिरत होते. किंबहुना गेल्या पंचवीस वर्षात या देशात मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले आहेत. त्यात अडकलेले तितक्याच ताठ मानेने मोठे होत आहेत हे या देशाचे वैशिष्ट बनते आहे. देशाची प्रगती सध्या घोटाळ्यांच्या व्याप्तीवर मोजली जात आहे. मग तो चारा घोटाळा असेल, कोळसा घोटाळा असेल, स्पेक्ट्रम घोटाळा असेल किंवा महाराष्ट्रातला तेलगीचा स्टॅम्प घोटाळा असेल, नाही तर हर्षद मेहताचा शेअर घोटाळा असेल. या अशा गाजलेल्या कुप्रसिद्ध घोटाळयात भ्रष्टाचार झाला तो पैशात. पण व्यापम घोटाळयात संबंधित व्यक्तींना जीवनातून संपवणारी एक टोळी वावरते आहे हा एक नवा प्रकार विकसीत होतो आहे. या टोळीने हा घोटाळा दडपण्याकरिता आतापर्यंत ४६ जणांना जीवनातून संपवलेले आहे आणि यातल्या एकाही मृत्यूच्या मागे नेमके कोण आहे, याचा पत्ता लागलेला नाही. म्हणजे रामसेच्या हिंदी चित्रपटात एकेक संशयीत मरावा त्याप्रमाणे अनेकजण पटापट रोल संपल्याप्रमाणे मरत आहेत हेच फार अनाकलनीय झालेले आहे.     मध्य प्रदेश सरकारचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची प्रतिमा आतापर्यंत बरीचशी स्वच्छ आहे. परंतु या घोटाळयाने आणि त्या घोटाळयातील संबंधितांच्या मृत्यूची मालिका सुरू असल्यामुळे त्यांच्या प्रतिमेवर आता डाग पडले आहेत. व्यापम घोटाळयातील टीव्ही पत्रकार अक्षय सिंग यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यानंतर डॉ. अरुण शर्मा या जबलपूरमधील एन.एस. मेडिकल कॉलेजच्या प्राचार्याचा मृत्यू झालेला आहे. डॉ. शर्मा हे व्यापम घोटाळयाच्या चौकशीचे एक सदस्य होते आणि या घोटाळयाच्या चौकशीकरिताच ते आगरतळयाला जात होते. त्यामुळे या घोटाळयाशी संबंधित असलेल्या एखाद्या टोळीने त्यांचा पाठलाग करून संपवले असावे, असा संशय घ्यायला जागा आहे. ४ जुलै २०१४ ला म्हणजे बरोबर वर्षापूर्वी जबलपूर मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. डी. के. साकल्ये यांचाही मृत्यू त्यांच्याच घरात जळून झालेला होता. वर्ष झाले तरी त्याचा तपास लागलेला नाही. या प्राचार्यानी व्यापम घोटाळयात सहभागी विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयातून निलंबित केलेले होते. त्यामुळे साकल्ये यांच्या मृत्यूशी निलंबित केलेल्या विद्यार्थ्यांची टोळी असण्याची मोठी शक्यता आहे. व्यापम घोटाळा किती व्यापक आहे, याची माहिती तपासली तर आतापर्यंत घोटाळयाशी संबंधित याच व्यावसायिक परीक्षा मंडळाने सरकारी नोकरीत एक हजार जणांची बोगस भरती केली. वैद्यकीय महाविद्यालयात ५१४ जणांची बोगस भरती झालेली आहे. इतक्या मोठया प्रमाणात घोटाळा होऊन मध्य प्रदेश सरकारला या घोटाळयाची पाळेमुळे अजून शोधून काढता येत नाहीत. भाजपशासीत राज्यात होणारा हा प्रकार भाजपला लांछनास्पद आहे हे मोदी सरकारने लक्षात घेतले पाहिजे. अर्थात अशा चौकशा आणि कसल्याही तपासाला मोदी कधीच घाबरत नाहीत त्यामुळे त्यातूनही फारशी आशा करता येणार नाही. पण मध्य प्रदेशचे गृहमंत्री बाबूलाल गौर यांनीही या घोटाळयाची जबाबदारी स्वीकारून खरे तर नैतिकदृष्टया राजीनामा द्यायला हवा. या घोटाळयाची चौकशी करणारेच नेमके मारले जात आहेत. खरे तर कॉंग्रेसने मागणी केल्याप्रमाणे सी.बी.आय.कडे ही चौकशी दिली पाहिजे. किंबहुना स्वच्छ कारभाराचा टेंभा मिरवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:हून या मृत्यूकांडात हस्तक्षेप करून ही चौकशी सी.बी.आय.कडे दिली पाहिजे.मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर हा जो कलंक आलेला आहे. त्यातून सर्व संशयाचे निराकरण होण्यासाठी केवळ एस.आय.टी.कडे चौकशी देऊन स्थानिक पोलिसांच्या अधिकारात या भयानक प्रकाराचा छडा लागणार नाही. या घोटाळयात दोन-चार लोक नाहीत, तर एक मोठी टोळी काम करते आहे आणि या टोळीकडून घोटाळयाच्या चौकशीची काम करणारी माणसे संपवली जात आहेत. केवळ भ्रष्टाचार नव्हे तर पुरेपूर हिंसाचारात अडकलेला हा घोटाळा देशातला पहिला घोटाळा आहे. विशेष म्हणजे मोदींचे स्पर्धक, त्यांच्या गटात नसलेले सध्या अडचणीत येत आहेत. २०१४ च्या निवडणुकीत शिवराजसिंह चौहान यांची कामगिरी मोदींपेक्षा जास्त सरस असल्याची हूल भाजपमधील काही लोकांनी उठवली होती. दिग्विजयसिंगांसारख्या कॉंगींनी त्याला पुष्टी देवून भाजपत संघर्ष वाढवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे शिवराजसिंह कलंकीत होत असतील मोदींना त्यात काही दु:ख होईल असे वाटत नाही. मोदींचे मनापासूनचे जवळचे नसणारे सूषमा स्वराज, वसुंधराराजे आणि आता शिवराजसिंह सगळेच अडचणीत असतील तर काटे आपोआप निघत आहेत असे तर कोणाला वाटत नाही ना?    पण तरीही सरकारला जनाची नाही निदान मनाची जरी असेल तर या घोटाळयामागची टोळी आणि हत्या करणारे बदमाश कोण आहेत, हे समजलेच पाहिजे. शिवराजसिंह चौहान यांना आपली प्रतिमा स्वच्छ ठेवायची असेल तर त्यांनी स्वत:हून केंद्र सरकारला या प्रकरणाची चौकशी करण्याकरिता सी.बी.आय.कडे प्रकरण द्यायला हवे. कारण अद्याप पुष्कळ लोक या घोटाळयाची चौकशी करण्याकरिता काम करत आहेत. उद्या त्या सगळयांच्या जीवावर बेतेल आणि मग सरकारच्या जीवावरही बेतल्याशिवाय राहणार नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: