गुरुवार, ३० जुलै, २०१५

डावे पक्ष पर्याय निर्माण करण्याचा विचार करणार कधी?

  • भारतीय जनता पक्ष आणि कॉंग्रेस या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. गेल्यावर्षी २०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली केंद्रात सरकार आले. महाराष्ट्रातही भाजपची सत्ता आली, याचा अर्थ भारतीय जनता पक्ष एक उत्तम पर्याय आहे किंवा मोदी लाटेवर सत्ता मिळाली आहे असे समजण्याची गरज नाही.
  • या देशातील लोकांना कॉंग्रेसला नाकारायचे होते म्हणून दुसरा पर्याय नाही म्हणून भाजपला संधी मिळाली आहे या दृष्टीकोनातून आता सध्याच्या सरकारकडे पहावे लागेेल. कारण सध्या जे काही चालले आहे त्यात कॉंग्रेसच्याच पावलावर पाउल ठेवून पुढे जाण्याचा प्रकार आहे. किंबहुना कॉंग्रेसने मळलेल्या वाटेनेच भारतीय जनता पक्ष जात आहे असे अनेकदा वाटते.
  •  अशा परिस्थितीत देशात एक तिसरा सक्षम पर्याय निर्माण होण्याची गरज आहे. परंतु तिसरा पर्याय निर्माण करण्याची शक्यता ज्यांच्या हातात आहे ते डावे पक्ष अत्यंत कमकुवत होत चालले आहेत. याचे कारण ते कॉंग्रेस राष्ट्रवादीबरोबर फरपटत जाताना दिसत आहेत. म्हणजे २०१४ पर्यंत जे डावे पक्ष की ज्यामध्ये माकप, भाकप, महाराष्ट्रात शेकाप हे पक्ष कॉंग्रेसला विरोध करत होते, कॉंग्रेसला नाकारा असे आवाहन करत होते तेच डावे पक्ष आज कॉंग्रेसबरोबर जाताना दिसत आहेत. ही त्यांची होत असलेली फरपट म्हणजे हे पक्ष स्वत:च्या हाताने आपली किंमत कमी करून घेत आहेत.
  • डाव्या पक्षांच्या अनेक कामगार संघटना आहेत. उरण, पाताळगंगा अशा औद्योगिक क्षेत्रात असलेल्या भांडवलदारांविरोधात आवाज उठवताना या संघटना जेव्हा कॉंग्रेस राष्ट्रवादीबरोबर जातात, तेव्हा त्यांची कीव करावीशी वाटते. एक चांगला सक्षम पर्याय देण्याची डाव्या पक्षांची उमेद आता पूर्णपणे ढासळली आहे? दिल्लीमध्ये नव्याने आलेला केजरीवाल यांचा आपसारखा पक्ष चमत्कार घडवू शकतो. मोदींच्या भाजपला धक्का देवू शकतो, मग हे इथे का घडत नाही?
  •    वृदा करात, प्रकाश करात यांच्यासारखे नेते हे याकूबची फाशी रद्द व्हावी म्हणून मागणी करतात. काय गरज पडली होती? त्या याकूबच्या फाशीऐवजी त्याच दिवशी निधन पावलेल्या भारतरत्न डॉक्टर अब्दुल कलाम यांच्याबद्दल चार शब्द बोलले असते, कलाम यांना श्रद्धांजली वाहिली असती तर शोभून दिसले असते. पण याकूबला वाचवण्यासाठी ओवैसी, आबू आझमी अशांसारख्या लोकांच्या पंगतीत जावून बसले. हे सगळे सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी केलेले काम होते. कॉंग्रेसला भाजपशिवाय आणखी चांगला पर्याय देवू शकतो असा विश्‍वास देण्यासाठी हे पक्ष का आपली ताकद पणाला लावत नाहीत?
  •    नरेंद्र मोदींनी मिळवलेल्या २०१४ मधील यशाने हे डावे पक्ष जर असेच खचून जाणार असतील तर भविष्यात या पक्षांना कसलेही अस्तित्व राहणार नाही. कारण कसलाही विचार नसल्यामुळे या पक्षांवर कोणी विश्‍वास ठेवणार नाही. म्हणजे पाच सहा वर्षांपूर्वी महाराष्ट्राला आशा निर्माण होईल असा एक किरण निर्माण झाला होता. तो म्हणजे राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून आपला महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा पक्ष काढला. त्या आनंदात तरूणांनी २००९ च्या निवडणुकीत मनसेला हात दिला, पण या  पाच वर्षात या पक्षाला काहीच करता आले नाही. शिवसेनेच्या पावलावर पाउल टाकूनच हा पक्ष चालला आहे हे लक्षात आल्यावर २०१४ च्या निवडणुकीत या पक्षाला मतदारांनी नाकारले.
  •   हे सगळे दाखले समोर असताना डावे माकप, भाकप, शेकाप हे पक्ष पुन्हा जुन्या मळलेल्या वाटेनेच का जात आहेत? १९७७ च्या निवडणुकीत इंदिरा गांधींची एकाधिकारशाही संपवण्यासाठी हे पक्ष आघाडीवर होते. आता तशीच तयारी भाजपविरोधात करण्याची वेळ असताना कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या आसर्‍याला हे पक्ष जात असतील तर आयतीच भाजपला पुन्हा संधी देण्यासारखे आहे.
  •    म्हणजे कॉंग्रेस आणि भाजप सत्तेसाठी वाट्टेल ते करायला तयार होतात. पक्ष वाढीसाठी वाटेल त्याला आपल्या पक्षात घेण्यास तयार होतात. कॉंग्रेसमधून भाजपत आलेल्यांची संख्या काही कमी नाही. अशा परिस्थितीत डावे पक्ष जर कमकुवत होत असतील तर या देशात भाजप आणि कॉंग्रेसशिवाय पर्याय नाही असेच मानावे लागेल. नवा पर्याय निर्माण करण्यासाठी अशा पक्षांच्या आसर्‍याला न जाता आपली ताकद दाखवून दिली पाहिजे. असेही आपण शून्यच आहोत मग आपल्या ताकदीवर शून्य राहिलो तर त्यातून विश्‍व निर्माण करता येईल हा विचार कधी करणार आहेत हे पक्ष?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: