नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, ही वारकरी संप्रदायाची शिकवण आहे. त्यामुळे कीर्तनाला वारकरी संप्रदायात फार मोठे स्थान आहे. भजन, कीर्तन, प्रवचन, नामस्मरण करीतच दींडी पुढे सरकत असते. वारीचा प्रवास होत असतो. दिवसभर चालून आलेला थकवा घालवण्यासाठी कीर्तनाच्या आणि भजनाच्या सानिध्यात राहिल्याने दमलेल्या पायांवर साक्षात हरी पांडुरंग फुंकर घालून ते पाय चेपत असतो. कारण या विठोब्बाची गम्मतच न्यारी. जेवढी ओढ भक्तांना माउलीची असते तेवढीच ओढ त्या पांडुरंगालाही वारकर्याची असते. हे जिवाभावाचे नाते आहे. हे जीवाशिवाचे नाते आहे. अतिशय विलक्षण असे. त्यामुळे हरिकीर्तनात रंगलेला वारकरी सकाळी जाताना पुन्हा टवटवीत झालेला असतो. तेव्हा त्याला आपल्याच पावलात परमेश्वराची पावले दिसतात. पंढरपूरचा विठ्ठल हा भावनांचा भुकेला आहेच पण तो भक्तांचाही भुकेला आहे. त्या भक्तांची सगळी संकटे दूर करण्यासाठी तो स्वत: वारीत हिंडत असतो असा भास प्रत्येकाला होतो. त्यामुळे हा थकवा दूर करण्यासाठी कीर्तन केले जाते.कीर्तन ही नारदाची भक्ती आहे. नारदाने सुरू केलेली ही कीर्तन भक्ती नवविधा भक्तीपैकी आहे. वारकरी संप्रदायाने या कीर्तन परंपरेला फार मोठे केले आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतीक भाग म्हणजे हे कीर्तन बनून गेले आहे. त्यामुळेच वारीतील कीर्तनाचे महत्त्व फार आहे. ही कीर्तनाची परंपरा जपणार्या काही मान्यवरांचे नाव घेतल्याशिवाय ही शाब्दिक वारी पूर्णच होवू शकत नाही. आपल्याकडे कीर्तनकारांना हभप म्हटले जाते. म्हणजे हरिभक्त परायण असे हे कीर्तनकार असतात. त्यांनी वारकरी संप्रदाय मोठा केला आहे. वारकरी कीर्तनकारांची यादी फार मोठी आहे. वारी इतकीच ती अखंड आहे. त्या सगळ्यांचा नामोल्लेख करणे तितके सोपे नाही. पण जेवढी आठवतील तेवढी नावे सांगितली तरी विष्णू सहस्त्र नामातील नामे घेतल्याचे पुण्या लाभेल इतके हे मोठे कीर्तनकार आहेत. त्यांनी आपल्या अमोघ वाणीने आणि रसाळ कीर्तनाने भक्ती संप्रदाय निर्माण केला. या कीर्तनांमध्ये कधीही अंधश्रद्धेला त्यांनी थारा दिला नाही.यामध्ये बाबामहाराज सातारकर, सातारचे भगवान कृष्ण सानप, चैतन्य महाराज देगलूरकर , बंडातात्या कर्हाडकर , रामकृष्णदास लहवीतकर , योगिराज महाराज पैठणकर , संदीपान महाराज हसेगावकर , पांडुरंग महाराज घुले, प्रकाश महाराज बोधल, अक्षय महाराज भोसले यांची नावे अग्रक्रमाने येतात. याशिवाय निवृत्ती महाराज इंदुरीकर, भिमाजी नवले महाराज, वासुदेव महाराज पाटील, नंदकिशोर महाराज कुबडे, सदाशिव महाराज मोरे, रविद्रसिंग महाराज राजपूत, हे सगळे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातून आलेले कीर्तनकार आहेत. त्याशिवाय ज्ञानेश्वर महाराज भांडे, अनिलकुमार रामनाथ मारुती कारभारी, बाळाबा पंढरीनाथ संभाजी शिंदे, रामकृष्ण महाराज पाटील, मारुती बाबा कुर्हेकर, रामभाऊ महाराज राऊत, सुदाम महाराज बोरसे, आकाश महाराज देवरे, सुदर्शन महाराज पाटील, परमेश्वर महाराज पाटील, सुदाम महाराज पालवे या कीर्तनकारांनी गेल्या काही दशकात आणि वर्तमानात वारकरी संप्रदायाची धुरा सांभाळली आहे.हे सर्व कीर्तनकार नियमीत वारी करणारे कीर्तनकार आहेत. हे वारीमध्ये अखंड हरिनाम, प्रवचन आणि कीर्तन करत असतात. यातून प्रबोधन करत असतात. त्यामुळे पंधरा दिवसांचा वारीचा प्रवास म्हणजे ज्ञानग्रहण करण्याचा आनंद असतो. अतिशय सोप्या भाषेत भगवंताच्या भक्तीचे महत्त्व पटवून देताना हे कीर्तनकरा संसार करावा नेटका, असू नये फाटका असे सांगून विठ्ठलाचे नाव आपल्या श्वासात असले पाहिजे. त्यासाठी वेगळा वेळ काढण्याचे ते काम नाही. काम करता करताही आपण परमार्थ करू शकतो हे ओघवत्या भाषेत सांगतात. या वारकरी कीर्तनात आणि नारदीय कीर्तनात एक फरक आहे. तो म्हणजे वारकरी कीर्तन हे माळेप्रमाणे असते. यात एक कीर्तनकार मेरू मणी असतो त्याच्या अवतीभवती अनेक साथीदार, कोरस अभंग, नामस्मरणासाठी असतात. नारदीय कीर्तनात कीर्तन करणारा एकटाच पेटीवाला आणि तबलजीच्या मध्ये उभा असतो. पण वारकरी कीर्तनात कीर्तनकार, भजनकरी, टाळकरी, विणावाला यांची एक माळच असते. शिवाय समोर जनसमुदायातही एक विणाधारक, तंबोराधारक नामस्मरण करत उभा असतो. या सगळ्या वातावरणात हे कीर्तन केले जाते. या कीर्तनातून सुखदु:खाच्या गोष्टी, दाखले आणि संसार करताना परमार्थ कसा करावा हे सांगताना फार मोठे प्रबोधन केले जाते. वारीत चालत असताना दररोज कितीतरी मैल चालावे लागते. त्यामुळे रात्री पाय कीरकीर करू लागतात. या पायाची कीरकीर थांबवण्याची ताकद कीर्तनात असते. पायाची कीर थांबवून तन म्हणजे शरीर ताजेतवाने ठेवण्याचे काम करते ते कीर तन ते हे कीर्तन. ते ऐकायला साक्षात पांडुरंगही येत असतो. इथे प्रत्येकाला आत्मसाक्षात्कार होतो. प्रत्येकाला परमेश्वराचे विठ्ठलाचे दर्शन घडत असते. कुणाला पहिल्याच दिवशी घडते तर कुणाल पंढरपुरातील पांडुरंगाच्या पायाच्या विटेपाशी गेल्यावर होते. पण प्रत्येकाला हरिदर्शन घडवण्याचे काम वारीमध्ये हरीकथा निरूपणातून हभप करत असतात. ३
शुक्रवार, १० जुलै, २०१५
नाचू कीर्तनाचे रंगी
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा