वारीमध्ये नामस्मरण, जपाला फार महत्त्व आहे. विठ्ठलाचे, पांडुरंगाचे,हरीचे नाव घेणे हे वारकर्याचे श्वासाप्रमाणे असते. इतके की नंतर नंतर त्याला समजतही नाही की आपल्या मुखातून हरीनाम येते आहे. त्याचा श्वासच पांडुरंग, पांडुरंग असे स्मरण करत असतो. ही तल्लीनता खरी भक्ती आहे. खर्या भक्तीच्या ठिकाणी भगवंताचे स्थान आहे. हे स्थान आपल्याला वारीत पहायला मिळते. वारीतील लाखो वारकरी म्हणजे परमेश्वराचे विराट रूप असते. रामाच्या आणि कृष्णाच्या नावाचा जप यापूर्वी कितीतरी मोठया लोकांनी केलेला आहे. अनेकांनी तो सहजपणे केला आहे तर कित्येकांनी तो अगत्यपूर्वक केला आहे. याचे फार मोठे उदाहरण म्हणजे भगवान श्रीशंकर सतत श्रीराम चंद्रभूच्या नामाचे स्मरण करतात. किंबहुना आपल्या आत्म्यावर ते जितकी प्रिती करतात तितकीच प्रिती ते रामकृष्ण नामावर करतात.भगवंतांच्या नामाचे साधन साधले तर इतर साधनाची आवश्यकताच उरत नाही. कारण नाम घेतले की द्वेत संपते. एकदा द्वेत संपले की भेद संपला. भेद संपला की देव आणि भक्त हा भावच उरत नाही. हा भेदभाव संपवण्याचे काम वारीत होत असते. म्हणूनच वैष्णवांच्या मुखामध्ये सदैव नामामृत असते. योग्यांना जशी जीवनमुक्त अवस्था सुख देते तोच अनुभव वैष्णवांना नाममृताचे सेवन करताना मिळतो. प्रल्हादाच्या मनात सत्वर म्हणजे तत्काळ भगवंतांच्या नामाचा उच्चार बिंबला होता. राक्षसकुळातील प्रल्हादही परमेश्वराला प्रिय झाला होता. विष्णूमय सारे जीवन आहे हे समजणे फार महत्त्वाचे असते. ही समज वारीत येते. कारण सगळे वातावरण विष्णूमय झालेले असते. म्हणून तर आमचे पंढरपूराला वैकुंठाचे स्वरूप येते. अशा विष्णूच्या सतत नामस्मरणाने तर प्रल्हादाच उद्धार झाला होता. उद्धवाचा दाता म्हणून कृष्ण लाभला होता. कारण तो सतत भगवंतांचे चिंतन करीत होता. कृष्ण ज्यावेळी निजधामाला निघाले तेव्हा त्यांनी आपल्याकडील असलेले सर्व ज्ञान हे उद्धवला देऊन टाकले. हा कशाचा परिणाम असेल तर तो भगवंतांच्या नामाचा परिणाम आहे. म्हणून हा वारीचा मार्ग फक्त पंधरा दिवस चालण्याचा नाही तर अखंड वैकुंठाला जाण्याचा मार्ग आहे. संत ज्ञानदेव म्हणतात, नाम ही साधना अत्यंत सुलभ आहे. मात्र इतके सुलभ असणारे नाम घेणारे मात्र दुर्लभ आहेत. ज्या लोकांना नामचे महत्त्व पटले आहे, तेच हरिपाठात दंग होतात. संतांच्या संगतीत राहून नामात दंग होतात. तेच मनोमार्गाने हरीला समजू शकतात. हे आकलन खर्या अर्थाने होते ते या वारीत. त्यामुळे भक्तीने, मजेने, सहजपणे, आकर्षणाने किंवा कोणत्याही हेतुने जरी ही वारी कोणी पूर्ण केली तरी त्याला त्याचे फळ प्राप्त होते. कारण कोणतेही लोखंड असले तरी परिसाच्या स्पर्शाने ते पावन असे सोनेच होते. तसेच या वारीबरोबर जाण्याने आपले जीवन पावन होत असते. भगवंताची भक्ती करताना फळापेक्षा त्यातील भावाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. भक्तिमार्गाचा भाव जर सकारात्मक असेल तर फळ आपसूकच मिळतं.पण ‘भाव’ म्हणजे नेमके काय? हे समजून घेणेही फार महत्त्वाचे आहे. भावेवीण भक्ती भक्तिवीण मुक्ती| बळेवीण शक्ती बोलो नये॥ कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित| उगा राहे निवांत शिणसी वाया॥ सायासे करीशी प्रपंच दिननिशी| हरिशी न भजशी कोण्या गुणे|्|३्॥ ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे| तुटेल धरणे प्रपंचाचे॥ भावाशिवाय कोणतीही भक्ती फलद्रूप होऊ शकत नाही. भावाशिवाय केलेली भक्ती म्हणजे बळाशिवाय दाखवलेल्या शक्तीसारखे आहे, असं ज्ञानदेव म्हणतात. इतकं भावाचं महत्त्व जर भक्तीमध्ये आहे, तर भाव म्हणजे नेमकं काय? हे समजून घ्यावं लागेल. हा भाव, हा भक्तीभाव निर्माण करण्याची ताकद वारीच्या वाटेवर आहे. त्यामुळे कोणी चेष्टेने किंवा मजेने जरी त्या मार्गावर आला तरी त्याच्यामध्ये भावन निर्माण करण्याची ताकद या वारीत आहे. अर्थात भाव या शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत. मात्र या ठिकाणी भाव शब्दाचा अर्थ प्रेम हाच अभिप्रेत आहे. भक्तीच्या, प्रेमाच्या, ईश्वराच्या माउलीच्या प्रेमात पडण्याचा मार्गच ही पंढरपूरची वारी आहे. म्हणून हा भक्तीभाव फार महत्त्वाचा आहे. भावाचं महत्त्व सांगताना एकनाथ महाराजही म्हणतात-एक भाव चित्ती तरी न लगे काही युक्ती|कळो आले जिवे मज माझियाची भावे॥ अंतकरणात एक भाव जर असेल तर इतर कोणत्याही साधनाची आवश्यकता नाही. मात्र तो भाव निर्माण होणंच मोठी कठीण गोष्ट आहे. निर्व्याज, निरपेक्ष प्रेमाचा आविष्कार म्हणजेच भाव आहे. परंतु भगवंताकडे येताना बहुतेक जण काही ना काही अपेक्षेने येत असतात. जिथे अपेक्षा असते तिथे प्रेम नसते तर व्यवहार असतो. भगवंत हा प्रेमाचा भुकेला आहे. प्रेमाची त्याला आवड आहे. आवड केव्हा निर्माण होते. एखाद्या गोष्टीचा आनंद अनुभवल्यानंतर ती गोष्ट ज्यावेळी दुर्मीळ होते; तेव्हा त्या गोष्टीची आवड निर्माण होते. भगवंतांच्या बाबतीत तेच आहे. हनुमंत, प्रल्हाद, ध्रुव, शबरी, सुदामा, उद्धव, गोकुळातल्या गवळणी यांची भक्ती ही निर्विकल्प अशी भक्ती होती. प्रेमयुक्त भक्ती होती. म्हणून भगवंत त्यांच्या अधीन झाला होता. हे अधिन होणे, वारीच्या मार्गावर घडत असते.
शनिवार, १८ जुलै, २०१५
भगवंतावर प्रेम करण्याची प्रक्रीया वारी
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा