जन्म दिला म्हणजे मुलांचे आपण मालक होतो का?
* मुलांकडे प्रॉडक्ट म्हणून पहायचे का?
मुलीने प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून धुळे जिल्ह्यातील कासारे गावातील अविनाश तोरवणे नामक निर्दयी बापाने आपल्या जिवंत मुलीचा पंचक्रिया करण्याचा कार्यक्रम गावात फलक लावून जाहीर केला. या कार्यक्रमाची व्हॉटसऍप, फेसबुकवरून इतकी जाहीरात केली गेली की कोणाही सभ्य माणसाला शरम वाटावी आणि अशा माणसांबद्दल घृणा निर्माण व्हावी. आपल्या मुलांवर आपला संपत्तीप्रमाणे मालकी हक्क असतो काय? असा प्रश्नच यातून निर्माण झाल्याशिवाय रहात नाही.
या प्रकाराची व्हॉटस्ऍप व सामाजिक माध्यमांवरून त्याची माहितीही दिली आहे. आधुनिक भावी पिढी घडवण्याचे काम करणार्या एका शिक्षक बापाचा हा घृणास्पद उपद्व्याप आहे. अशा शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना कोणते धडे दिले जाणार? या निर्दयी शिक्षकाच्या मुलीने मात्र बापाविरुद्ध पोलिसांत तक्रार देण्याचे धाडस दाखवले. अशा व्यक्तिंना शिक्षक म्हणवून घेण्याचा अधिकार आहे काय? मुलीला जन्म दिला म्हणजे त्या प्रॉडक्टचा मालक झाला असे त्या बापाला वाटते काय?
पोलीस आणि अंनिस कार्यकर्त्यांनी बापाचा प्रयत्न हाणून पाडला. पण तेवढ्याने भरकटलेल्या मनोवृत्तीने निर्माण केलेला प्रश्न अनुत्तरीतच राहतो. बाप शिक्षक आहे म्हणून त्याच्या डो्क्यातून मुलीच्या प्रेमविवाहाला विरोध करणारी नवी शक्कल निघाली. तथापि मुला-मुलींनी घेतलेले व्यक्तिगत जीवनाबद्दलचे स्वयंनिर्णय मान्य करण्याचे औदार्य जगाला धडे देणार्या शिक्षकाकडेसुद्धा नसावे ही कोणत्या प्रकारची प्रगती म्हणावी?
महाराष्ट्राची उत्तुंग संस्कृती व परंपरेचे गुणगान अभिमानाने गायले जाते. मायमराठीचा डंका देशात व देशाबाहेर वाजवण्यासाठी साहित्य संमेलने भरवली जातात. पण राज्यातील सामाजिक स्थितीकडे लक्ष पुरवावे व सामाजिक प्रश्नांवर चर्चा घडवून आणाव्यात असे महाराष्ट्रातील बुद्धिवंतांनाही वाटत नाही. अर्थात अशा शिक्षकाला बुद्धिजीवी तरी कसे म्हणावे हा प्रश्नच आहे.
राजकारणावर टीका-टिपण्णी करण्यात आघाडीवर असणार्या मराठी माणसांना महाराष्ट्रधर्माच्या अधोगतीबद्दल काहीच खंत वाटत नाही. मुलीने इच्छेविरुद्ध प्रेमविवाह केला म्हणून तिचा जीव घेणारी अनेक कुटुंबे पाहायला मिळतात. कधी मुलीसह तिच्या पतीचा काटा काढल्याच्या घटनादेखील कानावर येतात. हुंड्यासाठी छळवाद मांडून लेकीसमान सुनांना आत्महत्येस प्रवृत्त केले जाते. रॉकेल ओतून जाळले जाते. वंशाच्या दिव्यासाठी गर्भातच मुलींचा गळाघोट करण्याची प्रवृत्ती फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात फोफावली आहे.
हे सगळे प्रकार पाहता भविष्यातील महाराष्ट्र कसा असेल याची कल्पना तरी करवेल का? जातीपातीच्या खोट्या प्रतिष्ठेच्या नशेतही महाराष्ट्र मागे नाही असा दुर्लौकिक मिळवण्याची नशा राज्यातील स्वार्थांध पालकांना चढली आहे. ती कोण उतरवणार?
शंभर वर्षांपूर्वी महत्त्वाच्या प्रश्नांवर महाराष्ट्राचे मत सर्वत्र महत्त्वाचे मानले जात होते. गेल्या अर्धशतकात मात्र विचारांची दिशा भरकटली आहे. एखादी स्त्री पतीच्या मृत्यूनंतर सती गेली म्हणून टीका होत असे. आताच्या पालकांची मनोवृत्ती लेकीने मनाविरुद्ध प्रेमविवाह केला म्हणजे जणू ती मेली असे समजत तिच्या पंचक्रियेचा कार्यक्रम करण्याइतकी का खालावली? अशा प्रवृत्तीविरोधात समाजमन पेटून उठल्याची चिन्हेही कुठे दिसत नाहीत. या प्रकाराचा प्रसारमाध्यमांनी फक्त बातमी म्हणून वापर केला, त्यातून निषेध हा होणे अपेक्षित असताना तो फारसा कोणी केला नाही.
त्यामुळे अशा सातत्याने होणार्या घटनांमुळे प्रश्न निर्माण होतो की मुलांना जन्म दिला म्हणजे त्यांचे आपले नाते काय? मुलांवर आपला मालकीहक्क असतो काय? आपण त्यांच्याकडे एक प्रॉडक्ट म्हणून पहायचे काय? त्यांच्या मनावर आपण अशा प्रकाराने राज्य करू शकू का?
मालिकांचे योगदान किती?सध्या झी मराठीवरील लोकप्रिय असलेल्या का रे दुरावा या मालिकेत आदितीचे वडिल दाभोळकर हे जय आदितीमध्ये अशीच फूट पाडून मुलीवर आपला मालकी हक्क दाखवत आहेत. इतक्या पुढारलेल्या समाजात, उच्चभ्रू समाजात त्या जयचे खच्चीकरण करून आदितीची मालकी मिळवण्यासाठी चाललेला दाभोळकर (राजन भिसे) यांचा प्रयत्न म्हणजे अशा घटनांना प्रोत्साहन देणारा आहे. त्यामुळे मालिकांमधून अशी कथानके थांबवली पाहिजेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा