भजन, कीर्तन, नामस्मरण हे वारीसाठी फार महत्त्वाचे आहे. वारीत ते सतत घडत असते. या भजन, कीर्तन आणि नामस्मरणाच्या जयघोषातच वारी पुढे सरकत असते. या वारीमध्ये हरीनाम घेणे, हरीकथा निरूपण आणि हरीभजन याला फार महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येक वारकरी हा नित्यनेमाने हरिपाठ करीत असतो. अतिशय एकरूप होऊन हरिपाठाचं मनापासून वाचन करणारे भक्त तसे वास्तव जीवनात फारच कमी आहेत. पण रममाण होवून जे करतात, त्यांना काळाचं भय राहत नाही. हरिपाठ वाचत असताना त्यांच्या डोळ्यातून पाणी येत असते इतके ते त्यात रमून जातात. अशा प्रकारे हरिपाठ करतात त्यांना जीवनाचा अर्थ समजतो. हरिपाठाचं महत्त्व हे शिवशंकराला होतं. सध्या झी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या जय मल्हार मालिकेतही हरी आणि हर म्हणजे विष्णू आणि शंकर यांच्या परस्परांवरील भक्तीचे वर्णन केलेले आहे. अनेकजण शिव आणि विष्णू असा भेदभाव करतात. शैव वेगळे, वैष्णव वेगळे असे समजतात ते खरे अज्ञानी आहेत. साक्षात शिवशंकरच हरिनाम जपत असतात. हरिपाठात, हरिनामात इतकी जबरदस्त ताकद आहे की, आपल्याला निजधामापर्यंत सहज पोहोचता येतं. त्यामुळे ज्ञानदेवांनी हरिनामाचा जप तरी करा, असं सांगितलं आहे.
नित्य सत्य मित हरीपाठ ज्यासी| कळीकाळ त्यासी न पाहे दृष्टी॥
रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप| पापाचे कळप पळती पुढे॥
हरि हरि हरि हा मंत्र शिवाचा| म्हणती जे वाचा तया मोक्ष्॥
ज्ञानदेव पाठ नारायण नाम| पाविजे उत्तम निजस्थान॥
म्हणजे हरिपाठात जीवन जगण्याचं सार सांगितलं आहे. जो हरिपाठ एकरूप होऊन वाचतो, त्याला जगण्याचं सार आपसुकच समजतं. त्याला काळाचंही भय राहात नाही.अशा हरिपाठाचे वाचन, मनन, चिंतन आणि कीर्तन हे वारीमध्ये सातत्याने होत असते. त्यामुळे वारकर्याला ही वारी नुसतेच पांडुरंगाचे दर्शन घडवीत नाही, तर त्याला मुक्तीचा मार्ग दाखवते. वैकुठात नेवून पोहोचवते.
आज जगात एकही वस्तू अशी नाही की, जिला काळाचं भय नाही. त्यामुळे ‘हरिपाठ वाचल्यावर काळाचं भय राहत नाही,’ यावर ज्ञानदेवांचा ठाम विश्वास आहे. हरिपाठ करतात त्यांच्यातला अहं ब्रह्मास्मी भाव जागृत झालेला असतो. द्वैत संपलेलं असतं. ‘भक्त आणि देव दुजा नाही भाव| ’ याची खात्री पटलेली असते. मी आणि देव वेगळा नाही, ही धारणा ज्यावेळेला पक्की होते, तेव्हा ‘कळीकाळा’चं भय उरत नाही.
जगात आलेल्या प्रत्येकाने जो आकार धारण केलेला आहे, तो आकार कधी ना कधी सोडावाच लागतो. हेच तर खरे गीतेचे सार आहे. ते समजणे नाही तर श्वासाश्वासात, रंध्रारंध्रात बिंबवण्याची ताकद या वारीमध्ये आहे. इथे कळीकाळाचं भय नाही किंवा कळीकाळ त्यांच्याकडे पाहत नाही, असं म्हणणार्या ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या ‘भावार्थदीपिका’ म्हणजे ‘ज्ञानेश्वरी’ या ग्रंथांमध्ये, ‘जे निर्माण होते त्याचा नाश होतो, ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू होतो,’ हे भगवत गीतेमधील विचार ठामपणे सांगताना नमूद केलंय की,
उपजे ते नाशे| नाशे ते पुनरपि दिसे|
हे घटिका यंत्र जैसे| परिभ्रमे गा॥
म्हणजे उपजणार्याला नाश असली तरी हरिपाठ करणार्यांना मात्र कळीकाळाचं भय राहात नाही. कारण धारण केलेला देह जरी कालपरत्वे नष्ट होत असला तरी आत्मा हा कधीही नष्ट होते. तो अमर आहे. या विचारांवरची श्रद्धा पक्की झाली की, त्याला काळाचं भय राहात नाही. तो काळ आपल्याकडे वाकडया नजरेने पाहू शकत नाही, हा विचार पक्का होतो. आत्मा देहाची आदलाबदल कशी करतो, हे सांगताना संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात-
जैसे जीर्णवस्त्र सांडिजे| मग नूतन वस्त्रे लेईजे|
तैसे जन्मांतराते स्वीकारीजे| चैतन्य नाथे॥
हरिपाठावरील श्रद्धाभाव दृढ झाल्यावर ही भूमिका पटते. म्हणूनच मग रामकृष्ण नामाचा उच्चार केला की, अनंत राशी तप निर्माण होतं. राशी म्हणजे संचय. रामकृष्ण नामाच्या उच्चाराने अनंत राशी तप निर्माण झाल्यावर काय होतं? तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ‘पापाचे कळप पळती पुढे. नुसते पाप म्हणलेलं नाही. तर त्याचे कळप म्हणजे समूह पळून जातो,’. महाराजांना विचारलं, ‘या भगवंतांच्या नामाचं तुम्ही एवढं महत्त्व सांगता. परंतु यापूर्वी ते कुणी घेतलं आहे का,’ महाराजांनी हरिनाम हे किती पुरातन आहे हे सांगताना चक्क शिवशंकराचाच दाखला दिला. ‘साक्षात भगवान श्रीशंकरसुद्धा सतत हरिनामाचा जप करतात. जेवढी निष्ठा श्रीशंकाराची हरिनामावर आहे, खचितच ती दुसर्या कुणाची असेल.’ तितकीच श्रद्धा हरिचीही हरावर आहे. हा हरी हरातील भेद नष्ट करणारा भाव हरिपाठात आहे. याचा पाठ सतत केल्याने वारकरी हा भेदभाव विरहीत असा स्वच्छ आणि निर्मळ असतो.