स्वामी विवेकानंद नेहमी सांगत की सत्य हे नेहमीच एक असते. पण त्या सत्याकडे प्रत्येकजण वेगवेगळ्या नजरेने पहात असतो. प्रत्येकाला सत्य हे वेगळ्या प्रकारे जाणवते. पण सत्य मात्र एकच असते. हे सारं काही सत्य एकच आहे हे प्रत्येकाला समजले तर सगळे मतभेद दूर होतील. प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे की वर्तमान परिस्थिती ही आपल्या भूतकाळाचे फळ आहे. आपण जसे वर्तन केले आहे त्याचे फळ आपल्याला मिळणार आहे. आज निर्माण झालेल्या दु:खाला मनुष्य दोष देत बसतो आणि पूर्वी किती छान होते म्हणून तो जुने दिवस आठवत बसतो. पण जुन्या काळातील काही बिजाचीच फळे म्हणजे वर्तमान परिस्थिती आहे हे लक्षात घेतले पाहिजे. प्रत्येकाला आपला भूतकाळ माहित असतो, त्याप्रमाणे तो आपला मार्ग निवडत जातो. प्रगती करण्याचा प्रयत्न करत राहतो. आपण निवडलेला मार्गच बरोबर आहे असे प्रत्येकाला वाटत राहते. ईश्वराकडे पाहण्याच्या प्रत्येकाच्या ज्या भावना आहेत त्यावरून त्याचे व्यक्तीमत्त्व लक्षात येते. म्हणजे एखादा विचार करतो की ईश्वर हा सर्वशक्तीमान आणि सर्वशासक आहे. असा विचार करणारी व्यक्ती ईश्वराकडे त्यादृष्टीने पाहणारी असते. कारण त्या व्यक्तीलाही कुठेतरी शासक बनण्याची ओढ असते, तो आपल्या चष्म्यातून ईश्वराकडे पाहतो. एखादा शिक्षक असेल. तो अतीशय कडक शिस्तीचा असेल. पण तो ईश्वराकडे न्यायी असल्याच्या भावनेने पाहतो. ईश्वर हा दंडाधिकारी आहे असे मानतो. ही त्या शिक्षकाची दृष्टी आहे. अशाचप्रकारे जगातील प्रत्येकजण आपापल्या नजरेतून ईश्वराकडे पहात राहतो. आपल्या मनात तयार केलेल्या प्रतिमेप्रमाणेच आपला ईश्वर इष्ट असल्याचे मानू लागतो. आपण आपल्या मनातील ईश्वराचे रूप असे घट्ट केलेले असते की त्यापेक्षा वेगळे रूप दिसले तर ते मान्यच करू शकणार नाही. आपल्याकडे उपदेश करणारे गुरू अनेक असतात. अशा एखाद्याने तुम्हाला उपदेश केला. त्याने तुम्ही भारावून जाता. असाच आनंद आपल्या मित्रांना मिळावा असे वाटते म्हणून तुम्ही आपल्या मित्राला त्या उपदेशकाकडे घेवून जाता. त्याला त्याचा उपदेश आवडत नाही. तो त्या उपदेशाला निरूपयोगी मानतो. त्याला तो पटत नाही. याचा अर्थ त्याच्याशी वाद घालण्याची गरज नाही. कारण तो उपदेश त्याला योग्य नाही म्हणून त्याला तो उपयुक्त वाटलेला नाही. हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. म्हणजेच लक्षात घेतले पाहिजे एखादे सत्य सत्यही असते आणि असत्यही असते. ते सापेक्ष आहे. सूर्याकडे आपण पाहिले तर प्रत्येकाला सूर्य वेगळा वाटेल. जो ज्या अंतरावरून पाहतो आहे त्यावर त्या सूर्याचे वेगळेपण दिसणार आहे. हवामानात बदल झाला, वारा वाहू लागला, थंडी वाढली, पाऊस पडला तर त्या सूर्याचे चित्र आणखी वेगळे दिसणार आहे. तो प्रत्येकाला प्रत्येक क्षणी वेगळा भासला म्हणून त्याची गुणवत्ता, उर्जा कधी कमी होत नाही. ईश्वराचेही तसेच आहे. आपण सर्वजण त्याच्याभोवती केंद्रीत झालो आहोत. आपल्या भावना, आपल्याला जाणवलेला ईश्वर अन्य लोकांना जाणवला नाही आणि त्यांना जाणवलेला ईश्वर वेगळा जाणवला म्हणून संघर्ष करण्याची गरज नाही. प्रत्येकाने आपला मार्ग आपला ईश्वर स्वत: निश्चित करायचा असतो. सत्य एकच असते. सूर्य एकच असतो. ईश्वर एकच असतो. तो जसा बघू तसा वेगळा भासतो म्हणून त्यासाठी संघर्ष न करता प्रत्येकाला त्याच्या दृष्टीने बघायचा हक्क आहे. त्यासाठी एकमेकांना विरोध करून काही साध्य होणार नाही. विवेकवाद/प्रफुल्ल फडके
मंगळवार, २४ जून, २०१४
वर्तमान परिस्थिती हे भूतकाळाचे फळ आहे
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा