- काँग्रेस आमदार प्रशांत ठाकूर यांच्या भ्रष्टाचाराची लक्तरे मंगळवारी समोर आली. पनवेल नगरपालिका ही आपली घरची मालमत्ता आहे असे समजून लूट करण्यासाठी ठाकूर पितापुत्रांनी कशी यंत्रणा राबवली होती याचे चित्र समोर आले. पनवेल नगरपालिकेचे अधिकारी ठेकेदारांकडून लाच घेतात आणि मग कामे करतात हे चित्र अत्यंत भयावह आहे. अधिकारी हे राजकीय नेत्यांच्या वरदहस्ताशिवाय कोणतेही काम करीत नाहीत. पण शेवटी बळीचे बकरे तेच बनतात. लाच घेताना नगरपालिकेच्या अधिकार्यांनी नगराध्यक्षांसह अनेक नेत्यांची नावे घेतली. नगराध्यक्षा या काही स्वत:च्या मनाने काम करीत नाहीत हे गेली अडीच वर्ष सगळ्याना माहित आहे. त्यामुळे या भानगडीच्या मागे प्रशांत ठाकूर यांची भ्रष्ट नीती आहे हे पनवेलकरांना समजले आहे.
- काँग्रेसची गल्ली ते दिल्ली जी भ्रष्टाचाराची पद्धती आहे त्यामध्ये स्वत: घोटाळे करायचे आणि बळीचा बकरा अधिकार्यांना बनवायचे अशी आहे. महाराष्ट्रात झालेल्या आदर्श घोटाळ्यातही काँग्रेसने जयराज फाटक, प्रदीप व्यास अशा अधिकार्यांचा बळी दिला आणि अशोक चव्हाणांना सोडवले. तोच कित्ता प्रशांत ठाकूर यांनी पनवेलमध्ये गिरवला आहे. या भ्रष्टाचारामागे, लाचलुचपतीमागे प्रशांत ठाकूर यांचाच हात असणार आहे. त्याशिवाय हे अधिकारी असे थेट डिलींग कसे करू शकतील? राजकीय वरदहस्त असल्याशिवाय घोटाळे होत नाहीत हेच यातून दिसून आलेले आहे. केंद्रिय पातळीवर मागच्या पाच वर्षात सुरेश कलमाडी यांनी असाच भ्रष्टाचार केला होता. राष्ट्रकूल घोटाळ्यात अमाप पैसा कमावल्याचे उघड झाल्यावर सोनिया गांधी राहुल गांधी यांनी कलमाडींना पाठीशी घालण्याचे प्रचंड प्रयत्न केले. परंतु मतदारांनी त्याचा परिणाम काँग्रेसला कात्रजचा घाट दाखवला. आता आगामी विधानसभा निवडणुकीत अशा भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणार्या, भ्रष्टाचाराच्या मार्गाने नगरपालिकेची लूट करणार्या प्रशांत ठाकूर यांना मतदार असाच धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत हे निश्चित. आता ज्या अधिकार्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे त्यांनी चौकशीत प्रामाणिकपणे आपल्यावर कसा प्रशांत ठाकूर यांचा दबाव येत होता हे सांगितले पाहिजे. मूळात प्रशांत ठाकूर यांची पार्श्वभूमी ही भ्रष्टाचाराचीच आहे. पनवेल नगरपालिका ही त्यांना चरण्याचे कुरण झालेली आहे. नगराध्यक्ष असताना प्रशांत ठाकूर यांनी एकाच रस्त्याची चार चार वेळा टेंडर काढून त्याची बिले हडप केली होती. ते प्रकरण विधानसभेतही गाजले होते. त्यामुळे प्रशांत ठाकूर यांची नगरविकास खात्यातर्फे चौकशी सुरू आहे. या चौकशीत ते निश्चित दोषी आढळणार आहेत. पण सरकार त्यांचे असल्यामुळे त्या चौकशीचा अहवाल समोर येत नाही. पण आता सत्तांतराचे वारे आहे. आगामी काळात प्रशांत ठाकूर यांचा हा भ्रष्टाचारी चेहरा समोर आल्याशिवाय राहणार नाही.
- काही दिवसांपूर्वीच पनवेलच्या शहर बस खरेदीचा प्रश्न उपस्थित झाला होता तेव्हा मुख्याधिकार्यांशी बोलणे झाले होते. त्यावेळी टेंडर प्रक्रीया पूर्ण झालेली नसतानाही प्रशांत ठाकूर यांनी सँपल बस कशी पनवेलमध्ये दाखवायला आणली असा सवाल केल्यावर मुख्याधिकार्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की त्या बसशी नगरपालिकेचा संबंध नाही. टेंडर मॅनेज करण्याचा त्यांचा काही इरादा असेल तर आपल्याला सांगता येणार नाही पण इ टेंडरींग असताना, निविदा फोडलेली नसताना, निविदा स्विकारण्याची मुदतही संपलेली नसताना प्रशांत ठाकूर यांनी बस कशी आणली हा संशयास्पद प्रकार आहे. याचा अर्थ नगरपालिकेच्या प्रत्येक ठेक्यामध्ये आपले कमिशन काढण्यासाठी ठाकूर पितापुत्र कसे धडपडत आहेत हे यातून दिसते. भ्रष्टाचारामुळे हा पालिकेवर पडणारा अतिरीक्त बोजा पनवेलकरांच्या खिशातून जात आहे हे लक्षात घेतले पाहिजे. जी कंपनी, जो ठेकेदार टक्केवारी देणार आहे ती काही स्वत:च्या खिशातून देणार नाही. त्याची बिले वाढवून पनवेल नगरपालिकेच्या तिजोरीतूनच ती दिली जाणार आहे. त्यामुळे प्रशांत ठाकूर हे नगरपालिकेची कशाप्रकारे लूट करत आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. जी बस सँपल म्हणून फिरवली त्या बसच्या कंपनीकडून, वितरकाकडून प्रशांत ठाकूर यांनी अशीच मोठी रक्कम डिल केली असण्याची शक्यता आहे. सध्या ऑटोमोबाईल इंडस्ट्री ही अत्यंत तोट्यात चाललेली इंडस्ट्री आहे. वाहन खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी सगळ्या कंपन्या आकर्षक योजना, डिस्काउंट ऑफर करत आहेत. हा जास्तीत जास्त डिस्काउंट स्वत:च्या खिशात घालायचा आणि एमआरपीने बस खरेदी करायच्या असा डाव प्रशांत ठाकूर यांचा शहर बस खरेदीबाबत आहे. म्हणूनच याही प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे आहे.
- राम ठाकूर स्वत:ला दानशूर म्हणवून घेतात. हुजर्यांकडून कौतुक करून घेतात. पण हे दान कोणत्या पैशातून आलेले आहे हे जगासमोर आता येत आहे. चोरीचा, भ्रष्टाचाराचा पैसा दान केल्याने कधी पुण्यसंचय होत नाही. कोणी कर्णाचा अवतार सिद्ध होत नाही. स्वत:च्या प्रामाणिकपणाच्या कमाईचा एक रूपाया तरी राम ठाकूर यांनी कोणाला दान केला आहे काय हे त्यांनी जगाला नाही स्वत:च्या मनाला सांगावे. कारण प्रामाणिकपणे कबूल करण्याचा जो पुरूषार्थ असतो, जे मोठे मन असावे लागते ते यांच्याकडे नाही हे निश्चित. म्हणूनच स्वत:ला खरोखरच दानशूर म्हणण्याच्या आपण लायकीचे आहोत काय याचा विचार त्यांनी करावा. लोकांचा पैसा हडप करून, प्रकल्पग्रस्तांचा पैसा हडप करून, सिडको, जेएनपीटी, पनवेलनगरपालिका लूटून केलेल्या दानधर्माने कोणी आदर्श राम घडत नाही. हा हरामचा पैसा असतो. हरामचा पैसा देणगी म्हणून दिल्याने त्या संस्थेला, व्यक्तिलाही तो पचत नाही. पण देणगी देण्यासाठी, दानधर्म करण्यासाठी कशी टक्केवारी या ठेकेदारांनी चालवली आहे हे समोर आलेले आहे. आज पनवेल नगरपालिकेच्या अधिकार्यांच बळी दिला गेला आहे, पण यामागील खर्या सूत्रधारांचा शोध घेतला पाहिजे हे मात्र खरे.
- वाईट मार्गाने पैसा मिळवणे हेच प्रशांत ठाकूर यांचे ध्येय आहे. पनवेल तालुक्यात, पनवेल विधानसभा मतदारक्षेत्रात तळोजा येथे घातक कचरा टाकण्याचा प्रयत्न चालला होता. भोपाळचा युनीयन कार्बाइडचा घातक कचरा तळोजात आणून टाकण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू होते. त्याला आमदार विवेक पाटील यांनी कडाडून विरोध केला आणि पनवेलकरांच्या जीवाशी होणारा खेळ थांबवला. त्या विषयावर विधानसभेत जोरदार चर्चा झाली, त्या चर्चेच्यावेळी प्रशांत ठाकूर हे पळून गेले. हे वारंवार सांगूनही त्यावर एका अक्षराने प्रशांत ठाकूर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. त्यामुळे या घातक कचर्याचे दलाल प्रशांत ठाकूरच आहेत हेच सिद्ध होते. तो कचरा तळोजात गुपचूप आणून टाकण्यासाठी अशीच काही मोठी रक्कम, टक्केवारी प्रशांत ठाकूर यांनी घेतली होती काय याचीही चौकशी आता होणे गरजेचे आहे.
- 1983 साली ज्या विषाने भोपाळमधील हजारो जणांचा बळी घेतला तो विषारी घातक कचरा आपल्या मतदारसंघात येवू देण्याचा मूर्खपणा एखादा विकृत विचारांचा, दुष्ट विचारांचा माणूसच करू शकतो. वाईट मार्गाने पैसा कमाविण्यासाठी हे पितापुत्र किती खालच्या पातळीवर जातात हे यातून दिसून आले आहे. आज पनवेलकरांना, खारघर, कामोठा, तळोजा, कळंबोलीच्या नागरिकांना आमदार विवेक पाटील यांच्या आक्रमक भूमिकेमुळे वाचवले आहे. नाहीतर विषारी कचर्याच्या प्रादुर्भावाने वेगवेगळे साथीचे रोग आले असते, विषगळती झाली असती आणि इथले लोक पटापट मृत्यूमुखी पडले असते. हा असूरी आनंद प्रशांत ठाकूर यांना मिळवू दिला नाही. या विषयावर एकदाही भाष्य त्यांनी केले नाही. कारण टक्केवारी बोलत होती. विधानसभेतही चर्चेला न थांबता शेेपूट घालून पळाले आणि बातमीच्या रूपानेही त्याला प्रसिद्धी मिळाल्यावर उत्तर देण्याचे टाळले. कारण पैशासाठी कोणत्याही थराला जाणार्या या राजकीय व्यभीचारी लोकांची प्रवृत्ती अत्यंत घातक असते. तो घातक चेहरा झाकण्यासाठी स्वयंघोषित लोकनेतेपद असल्याचे जाहीर केले जाते. कोणी केले राम ठाकूर यांना लोकनेतेपद बहाल? लोकनेता कसा असतो तो गोपीनाथ मुंडेंकडे पाहून सार्या महाराष्ट्राने पाहिला आहे. पण हे भ्रष्टाचाराच्या मार्गाने पैसा कमावलेले स्वत:च, कोणीही न म्हणता लोकनेते म्हणवून घेतात. अशी पदवी जाहीरपणे कोणीतरी मोठ्या समुदायापुढे द्यावी लागती. त्यामुळे भविष्यात राम ठाकूर स्वत:ला महात्मा म्हणवून घेतील. ते जेव्हा स्वत:ला नवी स्वयंघोषित पदवी लावून घेतील तेव्हा समजायचे की यांनी कुठले तरी घबाड मिळवले आहे. कुठल्यातरी तिजोरीवर डल्ला मारला आहे. कुठेतरी नवी टक्केवारी केलेली आहे. अशी टक्केवारी करताता स्वत:ला तोषिश लागू न देता अधिकार्यांचा मात्र बळी देतात हे पालिकेच्या अधिकार्यांनी लक्षात घेतले पाहिजे. आता इथून पुढे तरी सावधपणे त्यांनी कामे करावीत. प्रशांत ठाकूर यांचा ठेकेदारीत, निविदा प्रक्रियेत हस्तक्षेप होत असेल तर अधिकार्यांनी प्रसारमाध्यमांच्या पुढे येवून ही माहिती दिली पाहिजे. हे त्यांनी केले तरच ते प्रामाणिक सिद्ध होतील. नाहीतर तुरूंगात खितपत पडतील आणि त्यांच्यावरच टिका करून स्वत: किती स्वच्छ आहोत हे दाखवण्याचे काम पितापुत्र करतील. पालिका अधिकार्यांना लाचलुचपत विभागामार्फत अडकवून प्रशांत ठाकूर यांनी आदर्शचा कित्ता गिरवला असला तरी अशोक चव्हाणांप्रमाणे प्रशांत ठाकूर यांना क्लीन चीट मिळणार नाही. ही क्लीनचीट आता पनवेलकरांच्या हातात आहे. कोणत्याही चौकशी समीतीच्या क्लीनचीटवर आता मतदारांचा विश्वास नाही. त्यामुळे भ्रष्ट नेत्यांना हद्दपार करण्याचे, पनवेल काँग्रेसमुक्त करण्याचे काम मतदार आगामी काळात केल्याशिवाय राहणार नाही.
बुधवार, ४ जून, २०१४
प्रशांत ठाकूर यांनी गिरवला आदर्शचा कित्ता
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा