- नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपच्या अभूतपूर्व निर्णायक बहुमताच्या विजयाने आता देशात काय होईल, याची चिंता पुरोगामी म्हणवल्या जाणार्या वर्तुळातून अकारण व्यक्त होत आहे. नरेंद्र मोदींनी सत्तेची सूत्र हाती घेतल्यापासूनच काही महत्त्वाकांक्षी पावले टाकलेली आहेत. त्यामुळे संपूर्ण देशाला त्यांनी एक विश्वास दिलेला आहे. असे असताना त्यांच्या कार्यशैलीबाबत समाजवाद्यांनी, तथाकथीत पुरोगामींनी साशंकता बाळगणे घाईचे होईल. विशेषत: निर्णयक्षमता नसलेल्या काँग्रेस, चर्चेत वेळ घालवणार्या डाव्या समाजवादी विचारांना मोदींचा निर्णयक्षम कारभार चिंतेचा ठरू शकतो. यासाठी तथाकथीत पुरोगामी आणि काँग्रेसवाद्यांनी भारताच्या इतिहासातील महत्त्वाच्या टप्प्यांवर नजर मारण्याची गरज आहे.
- यातला पहिला टप्पा म्हणजे, स्वातंत्र्य चळवळीतून उदयाला आलेला विचार प्रवाह. या विचारानुसार व्यक्तिस्वातंत्र्य, सर्वधर्मसमभाव, लोकशाही मूल्यांना मानणारा वर्ग होता. त्याचप्रमाणे वंचितांना झुकते माप देणारा, मध्यममार्गी परंतु निश्चितपणे भांडवली विकासाच्या दिशेने जाणारा प्रवाहही या विचारधारेत होता. त्यामुळे आधी राजकीय स्वातंत्र्य की आधी सामाजिक सुधारणा हा संघर्ष स्वातंत्र्य मिळाल्यावर संपला. परंतु संविधानात या दोहोंतून आलेल्या मूल्यांचा समावेश झाला. या प्रवाहाचे प्रतिनिधित्व काँग्रेस करते असे सतत सांगण्यात आले. प्रत्यक्षात याची अंमलबजावणी आणि आचरणात आणण्याचे काम काँग्रेसने केले असते तर आज काँग्रेसची ही वाताहात झाली नसती. म्हणूनच मोदीयुगाचा प्रारंभ होताना या सगळ्या इतिहासावरून नजर मारणे आवश्यक आहे.
- आणखी एक टप्पा होता तो म्हणजे, पहिल्या प्रवाहातील सर्व प्रगत मूल्यांचा समावेश असलेला प्रवाह. मात्र भांडवलशाही व्यवस्थेच्या पुरस्काराला विरोध व कष्टकरी-दलित समुदायांच्या प्रति निष्ठा आणि राज्यशकट त्यांच्या हाती यायला हवे यासाठी प्रयत्नरत डाव्या-पुरोगामी संघटनांचा-पक्षांचा प्रवाह. या प्रवाहाकडे कल्पकता असूनही, आदर्श विचारसरणी असूनही तो विचार फक्त कागदात आणि संघर्षातच राहिला. विरोधात आणि मोर्चात राहिला. किंबहुना या विचाराने सतत विरोधात राहणेच पसंत केले असे वाटते. त्यामुळे या दोन्ही विचारांमधील चांगले मुद्दे उचलून धरत नरेंद्र मोदींनी सर्वसामान्य आणि भांडवलदार यांना जवळ केल्याचे दिसून आले.
- भारतीय राजकारणातील आणखी एक महत्त्वाचा प्रवाह म्हणजे, राजकीय स्वातंत्र्याच्या व सामाजिक सुधारणांच्या चळवळींनी ज्या उच्च जातीय-वर्गीय गटांचे हितसंबंध दुखावले गेले, त्यांचा प्रवाह. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व त्याचा अंकुश मानणार्या विविध संघटना, समविचारी पक्ष संघटना या प्रवाहाचे प्रतिनिधित्व करतात. या तिनही विचारांची ऐतिहासिक सांगड घालण्याचे काम नरेंद्र मोदींनी केल्याचे दिसून येते. थोडे थोडे पंख कटावे असे म्हणत ज्या कालबाह्य गोष्टी आहेत त्यांना बाजूला सारून नव्या आकाशाला मिठी मारण्यासाठी गगनभरारी घेण्याचे काम नरेंद्र मोदींनी केले, त्यामुळे सर्व स्तरातून त्यांना पाठिंबा मिळत गेला. हा भाजपचा, संघाचा विचार होता का हा स्वतंत्र चर्चेचा विचार आहे. पण भाजपने मोदींना स्विकारले आहे याचा अर्थ चांगलाच घेतला पाहिजे.
- स्वातंत्र्यलढ्यावेळी व स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही भांडवलशाहीचा पुरस्कार करणारा, आंबेडकरवादी डावी विचारसरणी आणि संघविचार हे तीन प्रवाह कायम राहिले आहेत. त्यातला तिसरा ‘संघा’चा प्रवाह हा अधिक बांधेसूद व लवचिक राहिला आहे. काळाची गरज ओळखून बदलत्या काळाप्रमाणे बदलले पाहिजे, नवे तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे या विचारांचा राहिला आहे. पण पहिले दोन विचार हे परस्परांत व अंतर्गतही कायम व उघड संघर्ष करत राहिले. हे संघर्ष इतके वाढत गेले की, त्यांचे दोन प्रवाह अनेक वाटावेत इतके त्यांचे तुकडे झाले. या ताणात संघ विचाराच्या प्रवाहाची संगत-सोबतही आवश्यतेनुसार या पहिल्या दोन प्रवाहांतील विचारांनी केली. त्यामुळे नरेंद्र मोदी, भाजप किंवा संघविचाराला अस्पृश्य समजणार्या आणि आम्ही पुरोगामी आहोत असे म्हणवणार्या पक्षांचे खरे स्वरूप समोर आले आणि संघ, भाजप हा लवचीक आणि सर्वसमावेशक असल्याचा विश्वास सामान्यांना वाटू लागला. आज आंबेडकरी चळवळीचे पुरस्कर्ते, डावे म्हणवणारे आठवले, पासवान यांच्यासारखे गट किंवा त्याआधी मायावती, नितीशकुमार , शरद यादव हे भारतीय जनता पक्षासोबत राहिले आहेत. त्यामुळे भारतीय इतिहासात, राजकारणात असलेल्या तीनही भिन्न विचारांना एकत्रित बांधून, सोबत घेवून जाण्याचे कसब आपल्यात आहे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने, भारतीय जनता पक्षाने दाखवून दिलेले आहे.
- डाव्या-पुरोगाम्यांच्या अधिक प्रगत प्रवाहाने काँग्रेसचा पराभव करणे, हे भारतीय राजकारणातील पुढचे पाऊल ठरले असते. तसे झाले असते तर ते देशाचे दुसरे स्वातंत्र्य ठरले असते. डाव्या पक्षांचे टायमिंग चुकले, नियोजन चुकले आणि धरसोड प्रवृत्तीमुळे सामान्यांचा त्यांच्यावरचा विश्वास उडाला. त्यामुळे काँग्रेसला पोषक वातावरण तयार झाले. साहजीकच देशात काँग्रेस तर नको आहे. काँग्रेसला संपविण्याचे बळ डाव्या पुरोगामींमध्ये नाही. साहजीकच या कार्याची धुरा भारतीय जनता पक्षाकडे आली. काँग्रेसचा पराभव डाव्या, समाजवादी आणि पुरोगामी विचारांनी न करता हा पराभव भाजपने करणे, हा पुरोगामी राजकारणाला काँग्रेसपेक्षाही अधिक जिव्हारी लागणारा फटका आहे. त्यामुळे डाव्या पुरोगामी विचारांना आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. आपण खरोखरच पुरोगामी आहोत काय? आपण केवळ भाजपला अस्पृश्य मानून काँग्रेसला मोठे करत राहिलो काय याचा विचार आता या पक्षांना करावा लागेल. आणिबाणीच्या काळात जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाने गांधीजींच्या खुनानंतर प्रचंड अडचणीत सापडलेल्या आणि कायम संशयाच्या भोवर्यात अडकलेल्या संघपरिवाराला प्रतिष्ठा दिली. जनसंघ जनता पार्टीत सामील झाला आणि नंतर भारतीय जनता पार्टीत रूपांतरित झाला. संघ परिवार हा भारताला हिंदुस्थान म्हणवतो असा प्रचार करून भाजपला भारत या नावाची अॅलर्जी आहे असे भासविण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. पण भारतीय जनता पक्ष असे पक्षाचे नामकरण करून भाजपने आपण हिदुस्थान नाही तर भारत मानतो हे दाखवून दिले. या उलट उत्तर भारतातील नेते, अगदी राहुल गांधींच्याही तोंडातून हिदुस्थाना असाच उल्लेख असतो. ते कुठे संघाच्या शाखेवर कधी गेले होते? शरद पवारही आपल्या भाषणात हिंदुस्थान असाच उल्लेख करतात. ते कुठे संघाच्या शाखेत गेले आहेत? शिवसेनेचे नेतेही भारताचा उल्लेख हिंदुस्थान असाच करतात. अनेक पक्ष करतात. पण भाजपने केला की तो धर्मांध ठरतो. हा केला गेलेला अपप्रचार नवमतदारांना, नव्या प्रवाहांना पटला नाही, त्यामुळे नवा विचार मोदीमय झाला. मोदींनी काँग्रेसमुक्त भारत अशी घोषणा दिली. काँग्रेसमुक्त हिंदुस्थान असे ते म्हटले नाहीत. त्यामुळे सर्व विचारधारांचे एकत्रित रूप हे मोदीयुगात दिसून आले.
- 1977 च्या निवडणुकीत उदयास आलेल्या जनता पार्टीची संपूर्ण क्रांती या पक्षाचे असंख्य तुकडे होवून तो पक्ष संपण्यात झाली. जनता पार्टीचा बॅनर मिरवणारा शेवटचा शिलेदार सुब्रमण्यम स्वामी अगदी अलीकडे भाजपत विलीन झाला. काँग्रेसमधून बाहेर निघाल्याने पुरोगामी ठरलेल्या व्ही. पी. सिंगांच्या संगतीला डावीकडे डावे व उजवीकडे उजवे-भाजप होते. या डाव्या-उजव्यांचा सामायिक शत्रू होता काँग्रेस आणि त्याला गारद करणे हे होते यांचे प्रथम कर्तव्य. या डावपेचांत डावे-पुरोगामी स्वत: इतके क्षीण झाले की या वेळी त्यांची फारशी दखल घेणेही भांडवली माध्यमांना गरजेचे वाटेनासे झाले. या डावपेचांचा फेरविचार करणे आवश्यक आहे. डाव्या पुरोगामी विचारांना फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी इतिहासावर नजर मारणे गरजेचे आहे.
- नरेंद्र मोदींचा एकहाती विजय हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पहिला देदीप्यमान विजय आहे. नव्या पिढीला संघाचा जुना परिचय नसल्याने आणि पुरोगामी विकलांग झाल्याने आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना हे काही कळत-सुधरतच नसल्याने संघ आता उजळ माथ्याने क्रियाशील होऊ शकतो. त्यांचा कट्टर स्वयंसेवकच संपूर्णपणे स्वत:च्या ताकदीवर देशाचा पंतप्रधान झाला आहे. लोकांनी दिलेल्या कौलात या क्षणी तरी विकासाचा मुद्दा प्रधान आहे. खंबीरपणे पाठिंबा देणार्या भांडवलदारांनाही त्यांच्या हिताची आर्थिक धोरणे तातडीने हवी आहेत. तेव्हा, तूर्त हेच मोदींचे प्राधान्य राहील, असे दिसते. 370 कलम, राष्ट्रवाद याच्या चर्चा सुरू होतील.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिपूजा ही अध:पतन आणि अंतिमत: हुकूमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो’, असा इशारा संविधान सभेतच दिला होता. परंतु दीर्घकाळ काँग्रेसकडे सत्ता राहिल्याने काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार पुसून टाकला. गांधी घराण्याचे, व्यक्तिपूजेचे स्तोम माजवले. चाळीस वर्षाच्या राहुल गांधींना ऐशी वर्षांचे काँग्रेस नेते खाली वाकून नमस्कार करतात. नरेंद्र मोदींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार जपत या प्रथेला तिलांजली देण्याचे काम केलेले दिसून येते. आता व्यक्तिपूजा नको. आता पाय पकडून नमस्कार करणे बंद करा आणि अभ्यास करा, जनतेची कामे करा असा संदेश दिला आहे. हे भारताच्या दृष्टीने विकासाचे पहिले पाऊल आहे.
- भाजपच्या संसदीय मंडळासमोरील अत्यंत प्रभावी भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारक व जनसंघाचे नेते दीनदयाळ उपाध्याय यांची जन्मशताब्दी 2015-16 या वर्षात सरकार व पक्ष या दोन्ही पातळ्यांवर साजरी करण्याचा मनोदय मोदींनी जाहीर केलाच आहे. या काळात ‘लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता यांची पाश्चात्त्य मुळे व भारतीय परंपरा’, अशा शीर्षकाखाली चर्चा सुरू होतील व ‘आम्ही म्हणतो ते हिंदुत्व हेच खरे भारतीयत्व’ ठसवण्याची आसेतुहिमाचल मोहीम सुरू होईल. नरेंद्र मोदी देशाचा चेहरा बदलतील, विकासाच्या मार्गावर नेतील यात कुठेच शंका नाही. त्यांच्या दहा बारा दिवसातील निर्णयातूनच ते स्पष्ट होताना दिसते आहे.
- मोदींच्या विजयाने आपण संपलो असे वाटून अनेकांना वैफल्यावस्था येणे स्वाभाविक आहे. परंतु मोदी यांच्या विचारात डावा विचार, पुरोगामी विचार, आंबेडकरी विचार आणि भांडवलदारी विचार या सार्यांचे मिश्रण आहे. प्रत्येकातील चांगल्या गोष्टी संपादीत करून झालेली ही क्रांती आहे. यातील आपला विचार पुढे नेण्यासाठी प्रत्येकाने जरूर प्रयत्न करावेत परंतु ते देशहिताचे असतील एवढेच पहावे.
- काँग्रेसने केलेल्या चुका, डाव्यांनी केलेल्या चुका, रिपब्लिकन पक्षांनी केलेल्या चुकांवरून शहाणपण घेतलेल्या भाजपने घेतलेली झेप ही इतिहासावर नजर ठेवून घेतली होती हे लक्षात घेतले पाहिजे. थोडे थोडे पंख कटावे असे म्हणत घेतलेली ही झेप देशात एक नवे युग घेवून आलेली आहे. त्याचे साक्षीदार आपण होणार आहोत हे लक्षात घेतले पाहिजे.
- प्रफुल्ल फडके/ मुखशुद्धी
शनिवार, ७ जून, २०१४
थोडे थोडे पंख कटावे
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा