मंगळवार, ३ जून, २०१४

संघर्षमय जीवनाचा अंत

  • केंद्रिय ग्रामविकास मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपिनाथ मुंडे यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. हे वृत्त समजताच संपूर्ण महाराष्ट्राला प्रचंड धक्का बसला. कारण एका संघर्षमय जीवनाला आत्ता कुठे यशाची चव चाखायला मिळू लागली असताना त्यांच्यावर काळाने झडप घातली आणि एका संघर्षाचा अंत झाला. मनाला अतिशय वेदना देणारी ही बातमी महाराष्ट्राला मंगळवारची सकाळ घेवून आली.
  •      गोपिनाथ मुंडे यांच्याकडे ग्रामविकास खाते होते. ग्रामीण विकासाचा ध्यास त्यांना होता. ग्रामीण भागात भारतीय जनता पक्ष पोहोचवण्याचे काम गोपिनाथ मुंडे यांनी केले होते. त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी गोपिनाथ मुंडे यांच्याकडून अनेकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. पण हे ग्रामविकास खाते महाराष्ट्राला लाभदायक ठरले नाही असेच म्हणावे लागेल. याचे कारण यापूर्वी यूपीए-2 च्या काळात हे खाते विलासराव देशमुख यांच्याकडे होते. विलासराव देशमुख यांचेही निधन असेच अकाली झाले होते. त्यामुळे महाराष्ट्राला यामुळे फार मोठा धक्का बसला आहे.
  •      भारतीय जनता पक्षाला आठ वर्षांनी पुन्हा एकदा फार मोठा धक्का बसला आहे. प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर भारतीय जनता पक्ष एकदम मागे टाकला गेला होता. भाजपला फार मोठी पोकळी जाणवत असताना भारतीय जनता पक्षातील पोकळी भरून काढण्याचे काम गोपिनाथ मुंडे यांनी केले होते. भारतीय जनता पक्षाला पुन्हा चांगले वैभव महाराष्ट्रात प्राप्त करून देण्याचे काम गोपिनाथ मुंडे यांनी केले होते. त्यामुळे फक्त भाजपचीच नाही तर महाराष्ट्राची फार मोठी हानी झालेली आहे, ही दु:खाची बाब आहे.
  • गोेपिनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांनी भारतीय जनता पक्ष, जनसंघ या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढला होता. आणिबाणीच्या काळात त्यांनी तुुरूंगवासही भोगला होता. पण त्यानंतर भारतीय जनता पक्षाचा चेहरा बदलण्याचे काम गोपिनाथ मुंडे यांनी केला होता. सर्वसाधारणपणे पूर्वीचा जनसंघ आणि सुरूवातीचा भारतीय जनता पक्ष हा साधारणपणे ब्राह्मणी विचारसरणीचा पक्ष, विशिष्ठ जातीभोवती फिरणारा पक्ष अशी त्याची प्रतिमा होती. पण गोपिनाथ मुंडे यांनी भारतीय जनता पक्षाला सर्वसमावेशक पक्ष असा चेहरा देण्याचे काम गोपिनाथ मुंडे यांनी केले होते. भाजप हा बहुजनांचा पक्ष आहे, सर्वांचा पक्ष आहे हे दाखवून सर्व समाजाच्या कार्यकर्त्यांना पक्षात आणण्याचे काम गोपिनाथ मुंडे यांनी केले होते. त्यामुळे ते भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे शिल्पकार होते. या काळात त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला. पण या संघर्षाच्या काळातही अतिशय सकारात्मकतेने आपली वाटचाल सुरू ठेवली होती.
  • संपूर्ण महाराष्ट्रात विशेषत: साखर कारखान्यांच्या पट्ट्यात जी काँग्रेसची ताकद होती त्या ताकदीला शह देवून भारतीय जनता पक्षाचा शिरकाव करण्याचे काम त्यांनी केले होते. साखर कारखान्यांचा महत्त्वाचा भाग असलेल्या ऊस तोडणी कामगारांचे संघटन करून, त्यांना न्याय देण्याचे काम गोपिनाथ मुंडे यांनी केले होते. त्यामुळे ऊस तोडणी कामगारांचे नेते महाराष्ट्राने गमावले आहेत.
  •      भारतीय जनता पक्षावर आलेेले प्रत्येक संकट त्यांनी स्वत: समोर उभे राहुन झेलले आहे. 1999 च्या विधानसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघात मतदानाच्या आदल्या दिवशी रात्री राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता शरद लेवे याचा खून झाला होता. त्या खूनाचा आरोप भाजपचे उमेदवार छ. उदयनराजे भोसले यांच्यावर आला होता. त्यामुळे मतदानापूर्वीच उदयनराजेंना अटक करण्यात आली होती. यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. त्या परिस्थितीत उदयनराजेंच्या पाठीशी खंबिरपणे उभे राहणारे व्यक्तिमत्व म्हणजे गोपिनाथ मुंडे होते. मुंडे यांचे जवळचे तत्कालीन भाजपचे आमदार डॉ. दिलीप येळगांवकर यांना सतत उदयनराजेंच्या पाठीशी राहण्याचे आदेश गोपिनाथ मुंडे यांनी दिले होते. या खटल्यातून उदयनराजे दोषमुक्त झाल्यावर सर्वात प्रथम जलमंदीरात येवून उदयनराजेंचे  पाठबळ वाढवण्याचे काम गोपिनाथ मुंडे यांनी केले होते. या काळात उदयनराजेंना टाळण्याचे काम त्यांचे स्वकीय करीत असताना सतत त्यांचे मनोबल वाढवून आपल्या कार्यकर्त्याचे, नेत्याचे रक्षण करण्याचे काम गोपिनाथ मुंडे यांनी केले होते. गोपिनाथ मुंडे यांच्यामुळेच उदयनराजे यांना युती सरकारच्या काळात महसूल राज्यमंत्रीपद मिळाले होते. युती सरकारच्या काळात महाराष्ट्र टँकरमुक्त करण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यादृष्टीने कृष्णा खोरे विकास महामंडळासारखी अनेक महामंडळे उभारणीत त्यांचे योगदान मोठे होते. दुर्दैवाने सत्तापालट झाल्यानंतर आघाडी सरकारने ही कामे पूर्ण केली नाहीत आणि महाराष्ट्र टँकरमुक्त झाला नाही. पण आता केंद्रात ग्रामीण विकास मंत्रीपद त्यांना मिळाल्यावर महाराष्ट्राच्या आशा फार वाढल्या होत्या. त्यामुळे महाराष्ट्राला हा फार मोठा धक्का बसला आहे. सर्वसामान्यांचा, बहुजनांचा नेता महाराष्ट्राने गमावला आहे.
  • गोपिनाथ मुंडे यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते फक्त निवडणुकीपुरतेच विरोधक असायचे. पण एरवी ते सर्वांचे नेते असायचे. सगळ्या पक्षांशी त्यांचे चांगले संबंध होते. कधी त्यांनी द्वेषाचे राजकारण केले नाही. विरोधकांवर निखळ टिका करून त्यांच्या चुका दाखवून देण्याचे काम त्यांनी केले. पण त्यांच्या टिकेत कधी कपटभाव नसायचा. त्या टिका विरोधक आत्मपरिक्षणासाठी वापरत होते हे विशेष म्हणावे लागेल.
  •       एका सामान्य कुटुंबातला माणूस संघषर्र् करून उच्च पदावर जावू शकतो हे दाखवून देण्याचे काम गोपिनाथ मुंडे यांनी केले होते. कोणतीही राजकीय पार्श्‍वभूमी नसताना त्यांनी जिल्हा परिषदेपासून, आमदारकीपर्यंत, आमदारकीपासून विरोधीपक्षनेतेपदापर्यंत, तिथून पुढे उपमुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारली होती. त्यांच्याकडे गृह आणि उर्जा ही दोन खाती होती. त्यांच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था अत्यंत चोख होता. युती सरकारच्या काळात महाराष्ट्रात एकही दंगल झाली नव्हती याचे कारण गृह खाते गोपिनाथ मुंडे यांच्याकडे होते. 1995 ते 99 या काळात महाराष्ट्रात भारनियमन झाले नव्हते. भारनियमन किंवा लोडशेडींग हे शब्द काँग्रेस आघाडी सरकारने 1999 नंतर महाराष्ट्राला दिलेली देणगी आहे. पण युतीच्या काळात वीजेची टंचाई नव्हती कारण त्यांनी उर्जा खातेही चांगल्याप्रकारे सांभाळले होते. या चांगल्या कारभाराला महाराष्ट्र आता मुकला आहे.
  • प्रमोद महाजन यांच्यामुळे विद्यार्थी परिषदेत, संघ परिवारात त्यांचा प्रवेश झाला होता. योग्य माणसे निवडून योग्य ठिकाणी पाठवणे हे प्रमोद महाजन यांचे वैशिष्ट्य होते. त्यांनी गोपिनाथ मुंडे यांची केलेली निवड ही पक्ष संघटनेला बळकटी देणारीे ठरली होती. विद्यार्थी परिषदेच्या  कार्यात असताना त्यांनी महाराष्ट्रातील बहुतेक विद्यापिठे, महाविद्यालयांवरील युवकांशी संपर्क ठेवला होता. महाविद्यालयांच्या निवडणुकांना ग्लॅमर देण्याचे काम गोपिनाथ मुंडे यांनी केले होते. महाविद्यालयीन निवडणुका या लोकशाहीचे प्रशिक्षण आहे हा विचार गोपिनाथ मुंडेंनी विद्यार्थी वर्गात रुजवला होता. त्या काळात मतदानाचा अधिकार हा 21 व्या वर्षी होता. पण महाविद्यालयीन निवडणुकीत सोळाव्या वर्षापासून हे प्रात्यक्षिक मिळत होते. आपण मतदान करून आपला वर्ग प्रतिनिधी, कॉलेज प्रतिनिधी, विद्यापीठ प्रतिनिधी निवडला पाहिजे यासाठी युवकांशी संवाद साधण्याचे काम विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून मुंडे यांनी केले. त्याकाळात विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून गोपिनाथ मुंडे, प्रमोद महाजन, प्रकाश जावडेकर हे जुलै ऑगस्ट महिन्यात महाविद्यालयांच्या कँपसमध्ये असायचे. त्यांच्यामुळे पदवीधर मतदारसंघात आपले नाव असले पाहिजे ही जागृकता पदविधरांमध्ये निर्माण केली गेली होती. त्यामुळे लोकशाहीचे खर्‍या अर्थाने शिक्षण देण्याचे काम गोपिनाथ मुंडे यांनी केले होते. विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना महाविद्यालयात येण्यास महाविद्यालयीन प्रशासन मज्जाव करायचे. तेव्हा समोरच्या झाडाखाली उभे राहून विद्यार्थ्यांशी संपर्क साधण्याचे काम मुंडे महाजन करायचे. अशा खूप आठवणी त्यांच्या आहेत की त्यांनी तळागाळातून, सामान्यांमध्ये मिसळून कसे काम केले याच्या. अशाप्रकारे सामान्यांमध्ये मिसळणारा नेता महाराष्ट्राने गमावला आहे. महाजन-मुंडे यांच्या राम लक्ष्मणाच्या जोडीने आता महाराष्ट्राचा निरोप घेतला आहे. मुंडे यांच्या निधनाचे दु:ख केवळ मुंडे महाजन कुटुंबाचे नाही, केवळ भाजपचे हे दु:ख नाही तर संपूर्ण महाराष्ट्रावर आलेले हे दु:ख आहे. कारण एका संघर्षमय जीवनाची अखेर आज झालेली आहे. ज्या संघर्षाला यश लाभल्यानंतर यशाची फळे चाखायला मिळू नयेत यासारखी नियतीची खेळी वाईट नसेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: