या महिन्यात अजून काही दिवसांनी ९५वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होईल. उदगीर येथे होत असलेल्या ९५व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, तर समारोपाच्या दिवशी दुपारच्या सत्रात राष्ट्रपती रामनाथ कोविंद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन कार्यक्रम होणार आहे. समारोपाचा मुख्य समारंभ केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती स्वागताध्यक्ष संजय बनसोडे यांनी रविवारी येथे दिली.
साहित्य संमेलनात सर्वपक्षीयांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न असला, तरी त्यात काँग्रेसला डावलल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेनेचे नेते आहेत; पण काँग्रेसचे कोणी इथे दिसत नाहीत; पण साहित्य संमेलनात राजकारण्यांनी प्रस्थापित होणे हे आता सर्वमान्य झाले असावे. तिथे साहित्यावर नाही, तर राजकारणावरच चर्चा होताना दिसते. त्याचे राजकारण केलेले दिसते. त्यामुळे खरेतर या संमेलनाला अखिल भारतीय मराठी राजकीय संमेलन, असे नामविस्तार करण्याची गरज आहे.
उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोकणी लेखक दामोदर मावजों, संमेलनाध्यक्ष भारत सासणे, मावळते अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांच्यासह शिवराज पाटील चाकुरकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, भाषामंत्री सुभाष देसाई, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांची उपस्थिती राहणार आहे; पण ज्या मानाने तीन पक्षांना बोलावले आहे, त्या मानाने काँग्रेसला संधी नाही. अर्थात हे पक्षीय साहित्य संमेलन झाल्याने असे बोलावे लागते. या आधीचे झालेले साहित्य संमेलन हे नाशिकसारख्या शिरवाडकर, कानेटकरांच्या भूमीत झाले असले, तरी ते राष्ट्रवादी साहित्य संमेलन म्हणून गणले गेले. त्यावर सगळी छाप छगन भुजबळ यांची होती. संमेलनाध्यक्ष जयंत नारळीकर हे तब्येतीच्या कारणावरून आले नाहीत. त्यामुळे ते असाहित्यिकांचे संमेलन झाले.
महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात उभारण्यात येणाºया भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरीत २२ ते २४ एप्रिलदरम्यान संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी २० एप्रिल रोजी अजय-अतुल संगीत रजनी, २१ एप्रिल रोजी चला हवा येऊ द्या हे कार्यक्रम छत्रपती शाहू महाराज मुख्य सभामंडपात होणार आहेत. चला हवा येऊ द्या हा कार्यक्रमही राजकीय टीका टिप्पणीसाठी पाहिला जाईल. खरंतर साहित्यिकांपेक्षा कलाकारांचे कार्यक्रम आयोजित केल्यामुळे हे साहित्य संमेलन आहे की, नाट्यसंमेलन असा संभ्रम आयोजकांमध्ये निर्माण झाला का, असा प्रश्न पडतो. साहित्य संमेलनात चला हवा येऊ द्या कार्यक्रम होणे हे संमेलनाला विसंगतच वाटते. ते नाट्यसंमेलनात असेल, तर संयुक्तिक वाटेल. साहित्य संमेलनात कथाकथनाला फारसे स्थान दिसत नाही. लेखकांच्या मुलाखती नाहीत. साहित्य विषयक चर्चा नाही. त्यामुळे ही सगळी भरकटलेली संमेलने होताना दिसतात.
खरंतर साहित्य संमेलनाची प्रथा सुरू ठेवायची असेल, तर त्याचे स्वरूप बदलले पाहिजे. साहित्यिकांचे कार्यक्रम त्यात अधिक असले पाहिजेत. कलाकार, सेलिब्रेटी बोलवताना त्यांच्याबरोबर मालिकांचे लेखन करणारे, नाटकाचे लेखन करणारे, चित्रपटाचे कथा पटकथा संवाद लेखक यांना पुढे आणले पाहिजे. पांचट विनोदाचे आणि हसूही येणार नाही, असे हवा येऊ द्या यासारखे फुसके बार तिथे कसे काय उडवले जातात. ते नाट्य संमेलनात ठीक असेल पण साहित्य संमेलनात साहित्यिकच असावेत. नाशिकच्या संमेलनात जावेद अख्तर यांना आणले होते. साहित्य संमेलनात नेहमीच एक बाहेरच्या भाषेतील साहित्यिक आणला जातो. तो आणायला हरकत नाही, पण त्याचा मराठीशी काहीतरी संबंध असावा. त्याने मराठीतील एखादे पुस्तक अन्य भाषेत अनुवादीत केले असेल, तर त्याला संधी द्यावी. पण ६०-७० वर्षे महाराष्ट्रात राहून मराठी भाषेत दोन शब्दही बोलू न शकणाºया जावेद अख्तर यांच्यासारख्या माणसांना कसले आमंत्रित केले जाते?, नाशिकच्या साहित्य संमेलनात राजकीय भाषण करायला त्यांना बोलावले होते काय?, त्यामुळे साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत पुनर्रचना होणे गरजेचे आहे.
राजकारण्यांनी साहित्य संमेलने आपली शक्तिप्रदर्शन करण्यासाठी गिळंकृत केल्यामुळे साहित्यिक बाहेर फेकला गेलेला आहे. एखाददुसरा कवितेचा संग्रह प्रकाशित झालेला या संमेलनात मिरवतो आणि खºया अर्थाने ज्यांनी भरपूर लेखन केलेले असते, त्यांना डावलले जाते.
साहित्य संमेलनात एखादा संवाद प्रकाशकांसाठी असला पाहिजे. पुस्तक प्रकाशन, वितरण करून ते वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम ते करतात, त्यांना या व्यासपीठावर कधीच सन्मानाने बोलावले जात नाही. त्यांना त्यांच्या स्टॉलसाठी जागाही नीट दिली जात नाही. साहित्य संमेलनातून पुस्तकांची विक्री मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे. सर्वात जास्त खपाच्या पुस्तकाची माहिती जाहीर केली पाहिजे. सर्वाधिक पुस्तक विक्री करणाºया विक्रेत्याचा कुठे तरी सत्कार केला पाहिजे.
मागचे साहित्य संमेलन ते हे संमेलन या काळात किती पुस्तके प्रकाशित झाली?, किती कादंबºया आल्या, किती कवितासंग्रह आले, किती कथासंग्रह आले, किती विविध विषयांवरची पुस्तके आली याची आकडेवारी अहवालात आली पाहिजे. अध्यक्षांच्या भाषणात त्याचा उल्लेख असला पाहिजे. नवे विषय हाताळणारे लेखक कोण आहेत. कोणाचे पहिलेच पुस्तक प्रकाशित झाले, त्याची आकडेवारी संमेलनात मिळाली पाहिजे. पहिल्यांदाच पुस्तक प्रकाशित करणारे लेखक किती?, दहा ते वीस पुस्तके प्रकाशित करणारे या वर्षातील लेखक किती?, सर्वाधिक पुस्तके प्रकाशित करणारे प्रकाशक कोण आहेत?, या सगळ्यांची चर्चा, माहिती व्यासपीठावरून मिळाली पाहिजे.
या वर्षात किती अनुवादीत पुस्तके आली?, किती मराठी पुस्तकांचे अन्य भाषेत अनुवाद झाले?, ही माहिती मिळणे गरजेचे आहे.
पण साहित्य सोडून चर्चा करणारा राजकीय मंच अशीच साहित्य संमेलनाची अवस्था झालेली आहे. ते चित्र बदलले पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा